शोध परिवर्तनाचा :: मधु मोहिते यांच्या आत्मकथनाच्या निमित्ताने

डॉ लता प्रतिभा मधुकर
चळवळी जिवंत राहतात कार्यकर्त्यांच्या जोरावर. चळवळी विखुरतात कार्यकर्ते विखुरल्यावर. चळवळी नेतृत्वाच्या नावाने ओळखल्या जातात, परंतु चळवळीच्या पाया चे दगड आणि आधारस्तंभ असतात कार्यकर्ते. ते खूपदा अज्ञात किंवा अनुल्लेखित राहतात. कार्यकर्ते चळवळीच्या अंतर्बाह्य घटनांचे साक्षीदार असतात. परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते आपल्या वैचारिक बांधिलकीतून अभ्यास करत स्वतःला घडवत चळवळीतील जन वकालत करत असतात. कित्येकदा नेत्यांच्या भूमिकेत राहून निर्णय घेऊन आघाडीवर संघटना पेलतात. आणि तरी सुद्धा ते जमिनीवर असतात, सतरंज्या उचलताना त्यांना कमीपणा वाटत नाही कारण खुर्चीची हवा त्यांना लागली नसते. अशा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीत झोकून देऊन प्रमाणिकपणे आयुष्यभर कार्य करणाऱ्या एका पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या नजरेतून गेल्या पन्नास वर्षांच्या काळातील परिवर्तनाच्या पाऊलखुणांचा मागोवा म्हणजे अलीकडेच प्रकाशित झालेले मधु मोहिते यांचे पुस्तक म्हणजे ” शोध परिवर्तनाचा. “
स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय परिवर्तनांचा काळ 1970 च्या दशकात सुरू झाला. गेल्या अर्धशतकात या परिवर्तनवादी चळवळीने अनेक चढ उतार पाहिले. अशा चळवळीत ज्यांनी स्वतःला रुजवून आणि रुतवून घेतले, अशा एका फुले-आंबेडकरवादी, गांधी -लोहियावादी, सामाजिक आणि राजकीय परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते मधु मोहिते.
त्यांचे शोध परिवर्तनाचा हे समकालीन चळवळीत नेतृत्वालाही दीपस्तंभ ठरेल अशी अनुभवांची शिदोरी आणि वैचारिक अंजन डोळ्यात घालणारे असे हे पुस्तक नुकतेच ग्रंथाली ने प्रकाशित केले. 2025 साली अनेक चळवळींना 50 वर्षे पूर्ण होत असल्याने आता अशी ग्रंथमाला कदाचित अनेक लेखक गुंफतील. त्या ग्रंथमालेतील या वर्षीचे पहिले पुष्प म्हणजे ” शोध परिवर्तनाचा. “
या आत्मकथनाचे वैशिष्ट्य असे की , महाराष्ट्रातील परिवर्तनाचा शोध घेताना मधु त्याच्या बालपणापासून या प्रवासात आपल्याला सोबत घेतो. आणि त्याच्या आयुष्यातील अनेक घडामोडी आपण त्याच्या कॅलिडोस्कोप मधून बघतो. जर तुम्ही स्वतः चळवळीतील कार्यकर्ता असाल तर तुम्हाला तुमच्या भौगोलिक स्थानावरून समांतर समकालीन असा घटना पट उलगडत जाऊन तुम्ही आपल्या संघटनेचा सुद्धा मागोवा घेऊ लागता. नॉस्टॅल्जिक करून भूतकाळात अनेक आत्मचरित्रे, चरित्रे आपल्याला नेतात, खिळवून ठेवतात, पण मधु चे हे पुस्तक आत्मचरित्र न ठरता चळवळ चरित्र होते. आपण त्यात कुठे कुठे सहभागी होतो असे मॅपिंग नकळत आपण करू लागतो. शिवाय लेखक खरेच परिवर्तनाचा शोध घेत असल्याने हे पुस्तक तुम्हाला त्या घटनांमध्ये गुंतवून न ठेवता तुम्हाला सतत काळाच्या पडद्यावर चळवळीत झालेल्या अनेक स्थित्यंतरांची दखल घ्यायला लावतं. खऱ्या अर्थाने मूव्हमेंटमय व्हायला होतं. जे कार्यकर्ते या चळवळीत प्रत्यक्ष सहभागी व सक्रिय होते किंवा ज्यांचा थोडातरी हातभार लागला आहे त्यांना आपण केवढा लांबचा पल्ला गाठला आहे याची सुखद जाणीव करून देतं. आपल्या प्रदेशातील राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाचे योगदान, रणनिती आणि आपली वैयक्तिक गुंतवणूक याच्या संमिश्र आठवणी जाग्या करतं. आपल्या नेतृत्वाच्या कधी कधी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांनी किंवा अनेक हितसंबंधी राजकीय समीकरणांनी संघटना तुटल्या, मोठी आंदोलने फसली, नेते मोठे झाले पण आंदोलन ठिय्या झाले किंवा या देशातील व्यवस्था परिवर्तनाच्या संघर्षाचे बिकट पर्व ही यातूनच सुरू झाले हे वास्तव सुद्धा प्रखरपणे समोर ठेवतं.
वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, प्रादेशिक, सांप्रदायिक, धार्मिक, आणि राजकीय अशा विविध पातळ्यांवर चाललेल्या स्त्रियांच्या, दलितांच्या, शेतकरी, आदिवासी , भूमिहीन , संघटित मजूर अशा अनेक तळागाळातील लोकांच्या जगण्याच्या संघर्ष गाथा उकलताना लेखक त्यात कोणती भूमिका जगत आला आहे हे कळतं. त्यामुळे जिथे घटना घडल्या तेथील एरवी बिन चेहऱ्यांची माणसं, ही फक्त मोर्चा, धरण्यातील गर्दी न राहता आपल्याला त्या गाव, वस्ती , मोहल्यासकट लक्षात राहतात, कारण आपले सहकारी म्हणून दखलपात्र अशी स्वत:चे अस्तित्व आणि अस्मिता असलेली व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या नावांसकट लेखक त्यांना या पुस्तकात अधोरेखित करून ठेवतो. असा एक दस्तावेज सुद्धा लेखक आपल्या हातात ठेवतो.
हे पुस्तक वाचताना खूपदा जाणवतं की कितीतरी विखारी आणि माणसांवरचा विश्वास उडेल असे प्रसंग सुद्धा लेखकाच्या वाट्याला आले, पण तो कडवट झाला नाही. उलट अतिशय रसरसून , जीगीविषेने आयुष्याला सामोरे जातो, त्याचे एक कारण आहे त्याला मिळालेले त्याच्या साथीदारांचे निरपेक्ष प्रेम आणि निर्व्याज मैत्री. त्याला आयुष्यभराची कणखर साथ देणाऱ्या, निर्मळ प्रेम करणाऱ्या माधुरी समेळ सारख्या जोडीदारामुळे त्याची ही वाट सुकर झाली. खरेतर माधुरी च्या शिक्षकी पेशा व स्वभावामुळे गेल्या सतरा वर्षांपासून चाललेल्या त्याच्या या लेखनाचा, टिपण वह्यांचा संग्रह तिने जतन करून ठेवला. अंतिम रूप देण्यासाठी अशा सतत चळवळ भूमीत मन आणि पाय दोन्ही असणाऱ्याला कार्यकर्त्याला पकडून त्याच्याकडून शेवटी पुस्तक पूर्ण करून घेण्याचे कामही तिचेच. पूर्ण वेळ कार्यकर्त्या स्त्री पुरुषांच्या वाट्याला असे जोडीदार आले तर आयुष्याच्या अखेरीस सहजीवनाची सुंदर शहाणीव उरते. ती आपल्याला या पुस्तकात उतरलेली दिसते. एका पूर्णवेळ कार्यकर्त्यांचा जगण्यावरचा अद्म्य असा विश्वास कायम ठेवण्यात तिच्या किंवा त्याच्या साथीदारांचा परस्परांशी असलेला सुसंवाद मुख्य भूमिका निभावतो. मधू एका ठिकाणी लिहितो, की तो कुठेही गेला तरी स्वतःची जागा निर्माण करेल असा माधुरीला विश्वास होता. ….सामाजिक संघटनेत काम करताना पैशांची चणचण, पोटाला चिमटा, अपुरे आणि अनियमित मानधन याची माधुरीला कल्पना होती. त्यासाठी तिने परोपरीने मदत केली होती. परंतु राजकीय पक्षात गेल्यावरही तीच परिस्थिती बघितल्यावर थोडा वेळ अबोला धरलेली तीच मग त्याची समजूत काढायची. “अरे आपला संसार चालवताना किती अडचणी आहेत, मुलाला पाळणाघरात ठेवायचं त्याचे पैसे, घरमालकाचा तगादा, अरे तुझा इतर खर्च माझ्यावर टाकत जाऊ नकोस…तुझी बांधिलकी, तगमग, धोके पत्करण्याची, कष्ट करण्याची तयारी मी. पाहतेय म्हणून तू हे काम करत रहावसं मला वाटतं.” ….मधु म्हणतो मी पैसे घेऊन तिला आलिंगन देऊन लगेच रेल्वे किंवा बसने पक्षाच्या कार्यासाठी बाहेर पडायचो.” त्याला जाणवायचे की तो स्वार्थीपणा करतो परंतु दुसरा पर्याय नव्हता. तो पुढे लिहितो की ही अशी तगमग जवळपास सर्वच फुल टाइमर्स ची असायची.
पण एक गोष्ट मात्र खरी की माधुरी सारखे जोडीदार अपवादात्मक. विशेषतः स्त्रिया फुल टाइमर्स असल्या आणि त्यांचे जोडीदार असे समजूतदार नसतील तर गृहिणी, कार्यकर्ता आणि जोडीला आपल्या व मुलांपुरते अर्थार्जन अशी तिहेरी कसरत तिला करावी लागते.
या पुस्तकात मधुने दलित पँथर सारख्या आंबेडकरी चळवळीपासून , युक्रांद, संघर्ष वाहिनी, सर्व कम्युनिस्ट पक्ष व विद्यार्थी संघटना, सेवा दल, रिपब्लिकन पक्ष, जनता दल, श्रमिक संघटना, भुमीसेना , छात्र भारती, आदिवासी, ओबीसी, भटके विमुक्त संघटना, अशा विविध संघटना मधील स्त्रियांच्या कामाचा उल्लेख त्यांच्या नामनिर्देशासकट करून ठेवल्यामुळे अगदी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पुरुष कार्यकर्त्यांच्या बरोबरीने आणि तेवढ्याच ताकदीने काम करणाऱ्या अनेक विस्मृती मध्ये गेलेल्या स्त्रियांना ऐतिहासिक स्मृती कोशात परत आणले आहे. मधु मोहितेच्या स्त्रीवादी असण्याचे आणि त्यांच्यासोबत सातत्याने कार्य करत असतानाच्या तयार झालेल्या लिंगभावा पलीकडे जाऊन तयार झालेल्या मैत्रीचे हे द्योतक आहे. असे मला वाटते. कारण त्याने कोणताही भेदभाव न करता त्याच्या सोबतीने इतर संघटनांमध्येही कार्य करणाऱ्या विविध घटका तील स्त्री पुरुष कार्यकर्त्यांचे उल्लेख पुस्तक भर आहेत. समकालीन परिवर्तनाच्या लढाईतील स्त्री कार्यकर्त्यांची अशी सन्माननीय दखल इतर पुरुष कार्यकर्त्यां लेखकांनी नी घेतलेली दिसत नाही ती इथे लेखकाने घेतली आहे, हे वैशिष्ट्य माझ्या सारख्या स्त्रीवादी समीक्षकाला विशेष जाणवले.
खरे तर आयुष्याचा एवढा मोठा पट मांडत असताना सोबत परिवर्तन कसे घडत गेले याचे विश्लेषण करण्याचा मोह लेखकाने टाळला आहे, ती एक जमेची बाजू आहे. त्यामुळे घटना जशा त्याच्या समोर घडल्या , त्याला दिसल्या, त्याच्यावर परिणाम करून गेल्या, अशा आनंद, दुःख, क्षोभ, प्रेम, मैत्र , करुणा अशा अनेक भावनांचा त्या घटनांशी जैविक संबंध न तोडता मधु लिहित जातो. म्हणून त्या भावने सकट ती घटना, ती व्यक्ती, ती माणसं, अगदी घरातला उमदा सदस्य असा त्यांचा देखणा बैल, शेती, लावणी, बाजार वगैरे सुद्धा आपल्यासमोर जिवंत होतात. त्याच्या आयुष्यातील कोकण, मुंबई, राशीन, उंबरे, खालापूर अशी अनेक गावे तेथील परिसर, आणि माणसं, त्यांच्या माणूसपणाच्या वेगळ्या छटा आणि परस्पर मानवी संबंधातून तयार झालेले रक्ता पलीकडील नाती आपल्याला भेटतात. आणि ती मधुच्या चष्म्यातून किती वेगवेगळ्या रूपात बघता येतात हे आपल्याला कळतं. कारण मधु एक चित्रकार असल्याने त्याची लेखन शैली चित्रदर्शी आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे आपण त्याचे चळवळीतील संघर्षमय अद्भुत असे जीवन बघण्यापूर्वी त्याच्या बालपणात ही रमून जातो. हरखून जातो.
माखजन डेज: मधुचे अल्लड बालपण
प्रसिद्ध लेखक आर के नारायणन यांच्या मालगुडी डेज सारखी मधू च्या या पुस्तकातील पहिली चार प्रकरणे आपल्याला माखजन मध्ये घेऊन जातात. त्या परिसरात आपण भटकंती करून येतो. आज अगदी अपूर्वाई वाटावी अशी मुस्लिम हिंदू धर्माची एकत्र संस्कृती दर्शविणाऱ्या गोष्टी लेखकाच्या गावात आहेत. आपण आजवर वाचलेल्या कोकणातील मोठमोठ्या लेखकांच्या पुस्तकात येत नाहीत तसे गाव संदर्भ यात येतात. मधु च्या लहानपणापासून मधुने त्याच्या नजरेतून टिपलेल्या त्याच्या गावात ब्राह्मण, वैद्य, मुस्लिम , वाणी, कुणबी, बौद्ध, तांबट, शिंपी, खाटीक, चांभार, कासार, कुंभार, सुतार, न्हावी, दालदी, घोरपी, बेलदार हे भटके परंतु गावात मुक्काम करून गावकरी झालेले अशा अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहत आहेत.
या माखजन मध्ये एका विशिष्ट जातीचा धर्माचा वरचष्मा ठेवून गाव न बघितल्याने गावाची समुद्राच्या सारखी विविध स्पंदने मधु टिपतो. “खाडीतून पलीकडची माणसे माखजनला येतात त्यात दालदी म्हणजे मुसलमान व्यापारी आपल्या सुक्या माशांचा व्यापार करायला होडीने किंवा मचव्याने येत. त्यांच्यासाठी बाजारात राखीव जागा कायम असे. बाजारात दालदी बायांचा भरणा विशेष दिसे.”
त्यांच्याबद्दल लिहिताना मधु त्यांच्या सरस, व्यवहार कुशल भाषा व मासे विकण्याचं त्यांचं कौशल्य वर्णन करताना जे लिहून जातात, ते आज प्रत्येक मराठी हिंदू माणसाने समजून घेतले तर आपली मिश्र संस्कृती आणि त्यातील हिंदू मुस्लिम कष्टकरी महिलांचा सहभाग या गोष्टींनी आपला इतका सुंदर परस्परावलंबी मानवी व्यवहाराचा वारसा आहे हे समजून घेता येईल. लेखक म्हणतो, “आमच्या दालदी महिलांचे कर्तृत्व उठून दिसायचे. त्यांच्या कौटुंबिक जीवनात डोकावण्याचा प्रसंग कधी आला नाही, परंतु त्यांचे घरातील स्थान हे कर्त्या पुरुषांइतकेच निर्णायक असले पाहिजे असे वाटते. आज एखाद्या सुशिक्षित अधिकारी महिले मध्ये स्वतःचा सांस्कृतिक शैक्षणिक विकास केल्यावर जेवढा आत्मविश्वास दिसतो, तशीच ही आमची दालदी महिला माझ्या नजरेसमोर उभी राहते.” आता सध्याची परिस्थिती सर्वोच्च पदावर असणाऱ्या नौदल अधिकारी असणाऱ्या मुस्लिम स्त्री ला अपमान सहन करण्याची वेळ या देशातील धर्मांध समाजाने आणली आहे. त्या पातळीवर मधु मोहिते यांच्या पुस्तकात कित्येक ठिकाणी त्यांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणून मुस्लिम समाज येतो आणि त्यातील मुस्लिम स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्माननीय उल्लेख येतो. समावेशक लेखन करण्यासाठी मुद्दाम जेव्हा प्रयास घ्यावे लागत नाही ते असते खरे जमिनीवरचे जगणे. याला कोणत्याही थिअरी मध्ये बसवता येणार नाही पण यातून थिअरी तयार करता येईल.
लेखकाच्या फक्त जाणिवेतच नाही तर नेणिवेत ही स्त्रीवाद
लहानपणापासून लेखकाच्या डोक्यात स्त्री आणि पुरुष अशा परस्पर विरुद्ध दोन कॅटेगरी नाहीत. तर दोघेही कर्तबगार आणि वेगवेगळी कामे करणारी माणसं आहेत. असे असल्याने लेखकाच्या मनातच स्त्रीवादी नेणिवा पोसल्या गेल्या आहेत. त्यांना चळवळीत खतपाणी मिळून त्या अधिक सम्पृक्त झाल्या असाव्यात . परंतु त्याच्याच समकालीन दलित पँथर, रिपब्लिकन पक्ष किंवा सामाजिक चळवळीतील पुरुष कार्यकर्त्यांच्या लेखनात, आत्मचरित्रात स्त्रिया 33 टक्के प्रतिनिधित्व दिलेच पाहिजे अशा अपराध बोधातून अपवाद म्हणून त्या येतात.. पण मधु मोहिते यांच्या शोध परिवर्तनाचा या प्रवासात सर्वत्र अतिशय कर्तबगार अशा त्याच्या समकालीन महिलांचा उल्लेख सहज स्वाभाविकपणे न विसरता झाल्याशिवाय राहत नाही. कित्येकदा या स्त्रियांचे व्यक्तिमत्व सुद्धा आपल्यासमोर लेखक उभे करतो.
श्यामच्या आई पेक्षा वेगळी अशी मधुची शेतकरी कष्टकरी आंबेडकरी आई
तर माखजन डेज मध्ये आहेत त्याची आई आणि इतर सर्व बाया विशेषत: दादाचे लग्न झाल्यावर आलेली वहिनी. तिचे आणि आईचे नाते फार भावणारे आहे.
इथे साने गुरुजींच्या श्यामची आई ची आठवण येते. नकळत तुलना होते. कोकणातील ब्राह्मण घरातील आईचे कष्ट आणि इतर जातींमधील आईचे कष्ट आणि जगणे खूप वेगळे आहे. ही आई मला मॅक्सिम गोर्की च्या आई च्या जास्त जवळची वाटते.
मधुच्या आईवर चित्रपट काढताना तिच्या अवतीभवती वावरणाऱ्या विविध जातीं, धर्मांमध्ये असणाऱ्या स्त्रियांवर त्यांच्या वेगळ्या मानवीय संस्कारांच्या गोष्टींचा , घटनांचा अंतर्भाव करावा लागेल. एका विशिष्ट जातीतील आई संस्कारी आणि इतर खालच्या जातीतील आई असंस्कारी असे पसरवलेले सर्व जातीभ्रम तुटण्यास यातून मदत होईल. तसेच आंबेडकरी समाजातील लोक समृद्ध नव्हते, ते फक्त गरीब होते असा समज सुद्धा इथे लेखकाने केलेल्या वर्णना मुळे दूर होतो. त्यांच्या घरी असलेली खिल्लारी बैलांची जोडी , मोठे जोत, घरात वडील आणि मोठा भाऊ मुंबईला. त्यामुळे मनी ऑर्डर यायची. मधुच्या आईला लोक चाकरमानींन म्हणत. त्यामुळे आई कुणाकडे कामाला जात नसे. पण तिच्या दिवसरात्र कामाचा झपाटा मात्र अफाट. आईच्या व्यक्तिमत्वाची मोहिनी मधुच्या लेखनात आवर्जून डोकावते. आपली आई एकेकाळी मुंबईत होती यापेक्षा ती आपल्याजवळ आता आहे याने त्याला फार सुरक्षित वाटायचं. आई जानकीबाई, पिठू बय, जनी बय एकत्र लावणीला जात. माखजन मधील हे वर्णन माझ्या खूप आवडीचे आहे. अशी वर्णने आता हळूहळू साहित्यातून लुप्त होत असताना स्त्रियांच्या श्रमाचे विश्व जे अजूनही अनेक गावात तसेच आहे ते शहरी लोकांना समजायला मदत होऊ शकते. बयो हा शब्द कोकणातील एकमेकींना साथ देणारा तो इथे सापडतो. महार जाती या उत्पादक जाती आहेत याचे काही पुरावे सापडणाऱ्या आत्मकथनांमध्ये मधुच्या या आत्मकथनाचा उल्लेख करता येईल. भात लावणीची अतिशय सुंदर वर्णने खूपदा आपण वाचली आहेत. पण श्रम करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष यांच्याबद्दल एकमेकांवरील विश्वासातून जी कृतज्ञता व्यक्त केली जाते गाण्यातून त्याचे सुंदर वर्णन लेखक करतो. माझ्या राजा रे, माझ्या सर्जा रे असे हाकारे….चिखलांमध्ये पाय रोवून येणाऱ्या पावसाचे स्वागत करीत मातीशी नाते सांगणारे ते हुंकार असत. आम्ही समर्थ आहोत, मेहनती आहोत. आमचे जगणे कठीण आहे, परंतु ते आम्ही आनंदाने जगतो आहोत, आम्हाला जगू दे, असा त्यात विश्वास असे. …आमच्या बयो आणि त्यांनी चालवलेला पायंडा यांच्याविषयी आदरच व्यक्त होत असे.”
तर या पुस्तकातील माखजन परिसरातील कष्टकरी आणि स्त्रिया विशेषतः त्यांचे बाहेरचे शेती, मासेमारी या संदर्भातील श्रम विश्व आणि स्वयंपाक घर यात त्यांचे कौशल्य, आणि तरीही आपला नवरा चाकरमानी आहे याचा थोडा अभिमान, आणि गावाकडचा संसार आपल्याला सांभाळायचा आहे म्हणून आलेले व्यवहारिक शहाणपण आणि घरातील तापट, संतापी पुरुषांना ही घरातील सुंदर उमद्या बैलांना उधाण आल्यावर घालावी लागते तशी वेसण घालून जमिनीवर ठेवणाऱ्या या बाया वेगळ्या आहेत. म्हणूनच या पुस्तकातील सर्व स्त्रिया आणि पुरुष इथे हाडं मांस असलेली जगरहाटी करणारी साधी कष्टकरी माणसं आहेत. त्याच्या जीवनात आई आणि वहिनी प्रमाणेच त्याचे चाकरमनी वडील, मोठे भाऊ- दादा, धाकटे भाऊ, पुरूष व्यापारी, बाजार करणारे मासेमारी करणाऱ्या होड्या , किंवा बोटीवरील काळाशी, दर्यावर्दी, शेतकरी, दारू पिऊन झिंगलेले, हमरी तुमरी वर येणारे तरुण आणि मग एकत्र खेळणारे, हिंदू मुस्लिम तरुण एकत्र हुतूतू खेळणारे, मुस्लिम मुले व्हॉलिबॉल खेळण्यात हुशार. होळी आणि मोहरम दोन्ही सण दोन्ही समाज एकत्र साजरे करत, मध्यमवर्गीय मुस्लिम बायका बाहेर फारशा काम करत नसत, पण घरात लागणारा इंधन फाटा कुळवाडी व दलित स्त्रिया पुरवत त्यांची वर्णने आणि आपापसातील बार्टर पद्धती अशा अनेक गोष्टींनी पहिली चार प्रकरणे ही कोकणातील एका अशा विश्वात घेऊन जातात की आज इथे मुंबईत राहून ज्या लोकांनी तिथे सांप्रदायिकता आणि धार्मिक तेढ निर्माण केली. त्यांना हा वारसा सांगायलाच हवा. म्हणून या परिवर्तनाचा शोध घेत असताना जे आर्थिक, सांपत्तिक, भौतिक परिवर्तन झाले, जमीनदार, भांडवलदार, जातीचे ठेकेदार , सरंजामशाहीवादी सावकार, वसाहत वादी यांनी काय काय लुटले जे या कोकणातील लाल मातीत , खाडीत, समुद्रात , शेतीत , गिरणीवर, बाजारात एकत्र काम करणाऱ्या सर्वांच्या जगण्याचा जैविक भाग होता, ते समजून घ्यायला हे पुस्तक नक्की वाचायला हवे.
मुंबईत आल्यावर चाकरमान्याच्या या मुलाने टिपलेली कामगार मुंबई
दहा वर्षांचा मधु 1967 मध्ये मुंबईत आल्यावर त्याचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. एवढे मोकळे वावर, खाडी, टेकडी , दिवसरात्र हुंदडणे सर्व जाऊन 10 x 12 स्क्वेअर फूट जागेत सात आठ माणसं आणि शाळा असं विश्व. मग झोपण्यासाठी जागा शोधायला कधी पोलीस व भोईवाडा मैदान नाहीतर अजून कुठे फूटपाथ अशी शोधाशोध. पण शाळेत बेंचवर बसणे , स्काउट्स च्या जंगलातल्या कॅम्पस अशा अनेक गोष्टींनी मधु बिडीडी चाळीतील आपले भावविश्व रंगवताना सुद्धा शाळेत जास्त रमलेला दिसतो. मजा अशी की आजवर मी अनेक पुरुषांच्या आत्मचरित्रात मैत्रिणींचा उल्लेख त्यांच्या नावाने करणे क्वचित पाहिले. पण मधुच्या जवळच्या मित्रमंडळीत मैत्रिणी आवर्जून आहेत. आणि मित्रांसारखेच त्यांचे स्थान आहे.
मुंबई मधील प्रत्येक चाकरमान्यासाठी गिरणगाव वेगवेगळ्या स्वरूपात स्मरणात असेल .परंतु मधुने हे गिरणगाव व त्याच्या स्मृती जाग्या केल्या आहेत.. शिवाय उपजत विनोदबुद्धी मुळे कितीतरी प्रसंग आपल्याला हसवल्या शिवाय राहवत नाहीत.
“तसेच बिडीडी चाळी म्हणजे सिमेंटच्या चाळी म्हटले जाई.कधी कुणी आजारी पडला की या सिमेंटच्या चाळीला माणुसकीचा असा गहिवर यायचा की आपल्याला हुंदका येणार की काय असं वाटावं, असे कोपरखळीतून मारणे लेखकाच्या लेखनशैलीचा भाग आहे.
एरवी चाळीतील नळावरची भांडणे अनेक लेखकांनी प्रसिद्ध केली आहेत. लेखकही त्याला अपवाद नाही. कारण नळावर पाणी भरणे हा अतिशय नाट्यमय प्रसंग चाळीच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. पण त्याने वर्णन करताना पुरुषांना ही सोडलं नाही. “आपल्या घराण्याच्या पोराला हात लावायची हिंमत कशी झाली म्हणून तानाजी मालुसरे च्या आवेशात बाहेर पडलाच गडी.” अशी खुमासदार वर्णने नॉस्टॅल्जिया मध्ये घेऊन जातील असे या चाळींचे दिवस रंगवले आहेत.
सोबतच चाळीतील बायांचे आयुष्य लेखकाने ज्या पद्धतीने लिहिले आहे, त्यातून त्याची संवेदनशीलता दिसतेच. पण वस्तुस्थिती जशीच्या तशी समोर ठेवल्याने स्त्रियांच्या कामाचे उदात्तीकरण होत नाही तर त्यांना काय काम असतं असा एक मराठी मध्यमवर्गीय पुरुषांचा/ लेखकांचा हेटाळणी चा जो सूर असतो त्याला पण तडा जातो. लेखक लिहितो, …” गिरणगाव म्हणजे गिरणीचे भोंगे वाजायचे. त्याप्रमाणे लोकांच्या काही गोष्टी ठरलेल्या असायच्या. कोहिनूर मिल, गोल्ड मोहर, स्प्रिंग मिल, टाटा मिल वगैरे आमच्या जवळ होत्या. कामगार धावत धावत घरी येऊन पटकन जेऊन जायचे. त्या वेळी स्वयंपाक तयार ठेवायची जबाबदारी घरातल्या गृहिणींची असायची. नित्यनियमाने हे होत असायचे यात बदल नसायचा. चाळीत नळाचे पाणी भरण्याच्या घाई गडबडीत मुलांना तयार करून शाळेत पाठवणे या सारख्या गोष्टीत स्त्रियांची नुसती त्रेधा तिरपट होत असे. त्यातच जर स्टोव्ह मधील रॉकेल संपले असेल तर वाण्याकडे जाऊन रॉकेल आणण्यापासून लगबगीने सर्व कामे करावी लागत.” …..
मधु सकाळी 9 वाजता मधल्या सुट्टीत घरी आला की वहिनी पाणी भरत असायची मग उभ्या उभ्याच स्वत:च्या हाताने चपाती भाजी खाऊन शाळेत पळायचा. पण त्याच्या नजरेतून हे बायांचे कष्ट लपले नाही. त्या सर्व खरकटी भांडी, कपडे धुण्यापासून सर्व कामाच्या रगाड्यात बायांची अख्खी दुपार कशी जात असे आणि त्यात ही घरातील हेकट माणसांच्या शिव्या आणि राग , संताप या सासुरवाशीणी ना कसा सहन करावा लागत असे याचे वर्णन लेखक करतो. जेव्हा पुरुष म्हणतात की स्त्रिया काय करतात तर आम्ही त्यांना इतके बारीक सूक्ष्म तपशील देत नाही, पण मधूचे हे तपशीलवार वर्णन एखाद्या जेंडर प्रशिक्षणासाठी उपयोगी पडेल आणि किमान स्त्रियांच्या श्रमाची कदर करण्याची दृष्टी यातून मिळू शकेल.
युवक क्रांती दला मुळे बदललेला दृष्टिकोन : 1975 ते 2025; परिवर्तनाच्या वाटेवरील अर्ध शतक
खरेतर चळवळीचे पाणी अंगाला लागण्यापूर्वी मधुची भूमी आंबेडकरी विचारांच्या घरातून, एका श्रमिक शेतकरी, कष्टकरी जगण्यातून तयार झाली होती. त्यावर शोषक आणि शोषित, भवतालच्या वास्तवात असे शोषण होत असताना त्याविरुद्ध लढ्याशिवाय पर्याय नाही अशी वैचारिक रुजवात झाली ती युवक क्रांती दला पासून.
लेखकाच्या आयुष्यात अचानक युवक क्रांती दलाची एन्ट्री झाल्यावर त्याचं जग सपशेल बदललं. लेखक म्हणतो की त्याला युक्रांद मुळे जगण्याचा दृष्टिकोन मिळाला. या काळात जे आहे तसे स्वीकारून जगण्याच्या त्याच्या एक मार्गी जीवनात परिवर्तन झाले आणि तिथूनच त्याचा परिवर्तनाचा शोध सुरू झाला. या काळात त्याला मिळालेल्या सहकाऱ्यांपैकी काहींनी तर त्याला आयुष्यभर साथ दिली. त्यामुळे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून एवढा संघर्ष, मारहाण, संघटनेत होणारी पडझड, अनेकदा झालेले अपमान, मानहानी, उपेक्षा, पक्षातून अचानक बाहेर फेकले जाण्या सारखी आकस्मिक बहिष्कृतता वाट्याला आली तरी या संपूर्ण लेखनात कुठेही कडवटपणा नाही. किंवा मुळात या पुस्तकाची धाटणी घटना आणि प्रसंग मांडणी अशाप्रकारची निवडल्याने लेखक चिकित्सा करत बसत नाही. त्यामुळे त्या व्यक्ती , नेतृत्व, पक्ष, संघटना यांच्या. बद्दलचे विश्लेषण घडलेल्या गोष्टींमधून शोधण्याची जबाबदारी वाचकांवर लेखक सोडतो. तसे सूत्र किंवा सुतोवाच घटनांच्या निमित्ताने लेखक करतो.
हिंदू मुस्लिम प्रश्नावर कार्य करणाऱ्या सर्वांसाठी एक वस्तूपाठ
जसे हिंदू मुस्लिम सख्य त्याच्या आयुष्यात किती खोलवर आहे हे लेखकाच्या जगण्यातून आपल्याला कळतं. त्याच्या आयुष्यात माखजन येथे बालपणीच अविभाज्य हिस्सा असणारे मुस्लिम मुंबईत आल्यावरही त्यांच्या परम प्रिय मित्र मैत्रिणी बनून कायम साथ करतात. तो ही त्यांना जीवाभावाची साथ करतो. म्हणून हिंदू मुस्लिम मैत्री इथे किस्सा बनून येत नाही किंवा ती सांप्रदायिक संकट आले तरच मग दोस्ती करावी असे ओढून ताणून घडत नाही. छबिलदास शाळेत त्याला हुसेन दलवाई सर भेटतात, त्याचे आयुष्य पालटतात आणि नंतर तर हुसेन भाई अगदी त्याच्या आयुष्यातील अतिशय महत्वाच्या घटनांचे साक्षीदार म्हणून उपस्थित असतात. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पण हा अपवाद नव्हता. ते एक प्रमुख वक्ते म्हणून पाठीवर थाप द्यायला उपस्थित होते. तर छबिलदासच्या या शाळेतील हुसेन दलवाई मुळे मधु मोहिते, त्यांचा एक विद्यार्थी, याच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो. त्याला इथे त्याच्या शाळकरी वयापेक्षा मोठे सहकारी मिळतात. कृष्णकुंज, दादर येथील मीटिंग मधून सुरू झालेला हा प्रवास युसूफ मेहेर अली जनता केंद्र ताडदेव पर्यंत आज ही अथक सुरू आहे. .
74 च्या सुरुवातीला मुंबईत झालेल्या हिंदू मुस्लिम दंगली नंतर हिंदू विरुद्ध दलित असे वातावरण तयार झाले होते. तेव्हापासून मधुच्या आयुष्यात ज्या लोकांनी प्रवेश केला , त्यातील प्रत्येक व्यक्ती आज स्वतःच एक चरित्र ग्रंथ होईल असे जगलेल्या प्रसिद्ध व्यक्तींपैकी आहेत. जातीयता नष्ट करण्यासाठी आणि हिंदू मुस्लिम सलोखा निर्माण करण्यासाठी एकत्र येणं, या देशात लोकशाही टिकवून ठेवणं, ज्यांना शिक्षण आणि विकासापासून वंचित ठेवलं आहे त्या आदिवासींच्या पाड्यांवर जाऊन दारूबंदी आणि शाळा सुरू करून जागृती करणे अशा प्रकारचे कार्य कॉलेजच्या कॅम्प च्या निमित्ताने सुरू झाले होते. दुसरीकडे मार्क्स, लेनिन,फुले, आंबेडकर, समाजवादी क्रांती, इतर देशात झालेले परिवर्तन याचा युक्रांद सारख्या संघटनेतील अभ्यासवर्गातून होत असलेला परिचय, वाचायला मिळणारी पुस्तके आणि ऐकायला मिळणारी भाषणे व चर्चा अशा गोष्टींनी मधु सारख्या कार्यकर्त्याच्या व्यक्तित्वाला पैलू पडत होते.
1974 ची दंगल
1974 साली मधु जिथे राहायचा तिथे आंबेडकरी चळवळीची रुजवात झाली होती. दलित पँथरची स्थापना होऊन तरुणांमध्ये स्फुरण निर्माण झालं होतं. तेव्हा या तरुणाने सकाळी 5.30 ला उठून सवर्ण वस्तीत पेपर्स टाकायचा. त्याने एवढ्या लहान वयात पेपर एजन्सी सुरू केली होती. सवर्ण आणि दलितांचे भांडण कशासाठी ते एकमेकांवर छुपे हल्ले का करतात , आई बहिणी वरून शिव्या घालत आगीचे बोळे का फेकतात, दगड, बाटल्या फेकून काचांचा सडा का करतात हे समजण्याचं ते वय नव्हतं. पण मधु सारख्या मवाळ मुलाच्या अंगात ही रस्त्यावर जाऊन त्या दंगलखोर मुलांसोबत सामील होण्याची खुमखुमी यायची असं ते वातावरण. जेव्हा दंगल शमली तेव्हा सर्वांबरोबर आनंदाने नाचण्यात , दारूचा ग्लास पिण्यात घेतलेला पुढाकार एखाद्या तरुणाला केवढं भारी वाटतं आणि तरुण एका जोषात कसे वाहून जातात याचं वास्तवदर्शी वर्णन लेखक करतो. तशा जीवावर बेतण्याच्या काळात तो आपल्या पोटापाण्यासाठी सवर्ण वस्तीत ही पेपर वाटायला जात राहतो.
लेखक म्हणतो त्यावेळी बाबासाहेबांची शिकवण आहे संघर्ष करा असे आम्हाला मोठी मुले सांगत . जातीसाठी माती खावी लागते. आपल्यावर त्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रति उत्तर द्या, पोरांनो घाबरू नका असे दलित पँथर, आंबेडकरी तरुणांनी केलेल्या आवाहनाने कळत नसले तरी जोश संचारायचा. या काळात रिपब्लिकन पक्षाचे नेते, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, बौद्ध जन पंचायत चे सेक्रेटरी यांच्यासोबत असणारी नातेवाईकांची ऊठबस असे वातावरण . बी. सी. कांबळे यांचे चाहते वडील, थोडी फार त्यांना ह्या सभांची माहिती कानावर पडायची. पण अजून आंबेडकरी चळवळीत पक्षात पुढाकार घेण्याइतकी तयारी झाली नसली तरी मधू च्या आयुष्यात आंबेडकरी चळवळ जैविक रीत्या भिनली होती. आणि तो ही त्याचा भाग झाला होता.
राशीन येथील युवा चळवळीपासून रिपब्लिकन पक्ष ते भारत जोडो यात्रेपर्यंत कार्यकर्ता ते नेता आणि नेता ते कार्यकर्ता असा अथक प्रवास
राशीन च्या कार्यशाळेपासून लेखकाच्या कोकण ते मुंबई या भौगोलिक परिसराच्या बाहेरचे अहमदनगर मधील गावातील जात वास्तव किती भयंकर आहे, ही परिस्थिती अनुभवला आली . महानगर आणि प्रत्यक्ष गावात महार, चांभार, मराठा, ओबीसी आणि ब्राह्मण यांच्या वेगवेगळ्या वस्त्या , कार्यशाळा आयोजित करतानाही सर्व समाजाचे लोक एकत्र यावेत यासाठी धडपडणारे कार्यकर्ते आणि सवर्ण व दलितांसाठी वेग वेगळी पाण्याची सोय अशा गोष्टी बघून लेखकाला पहिल्यांदा जात वास्तवाची प्रखर जाणीव झाली. ही जाती आधारित समाजरचना कोकणा पेक्षा अधिक बंदिस्त होती. एकीकडे रोजगार हमीवर फक्त 3 रुपये रोजीवर काम करणारे सगळें गरीब मजूर पण त्यांच्यातही जातीभेद कायम. अशा परिस्थितीत काढलेल्या पदयात्रा, दलित वस्ती स्वतः यात्रेमध्ये भुकेली, त्यामुळे त्यांनी रात्री पानात जे वाढले ते खाणे, मग पोटाचे विकार जडणे असे कार्यकर्त्याच्या जीवनातील नित्य युद्धाचे प्रसंग कायम लेखकाच्या आयुष्यात सोबत करत राहिले.
राशीन , तलासरी, डहाणू; गिरणी कामगार सत्याग्रह, , नामांतर आंदोलनात सत्याग्रहात सक्रिय सहभाग, विजापूर जेल मध्ये 11 दिवस कारावास, गिरणी संपात मिल लेबर युनियन मार्फत सक्रिय, सात रस्ता तुरुंगात कारावास, मुंबईतील फुटपाथवासी झोपडपट्टी धारकांसाठी आंदोलन , हिंद मजदुर किसान पंचायत मध्ये चिटणीस, रायगड जिल्ह्यात आदिवासी व भूमिहीन शेतकऱ्यांसोबत कार्य, औरंगाबाद हमाल माथाडी कामगार सत्याग्रह मध्ये अटक, शोषित जनआंदोलन निर्मिती मध्ये रामभाऊ देशपांडे यांच्यासोबत सहभाग , महाराष्ट्रभर भूमिहीनांचे आंदोलन संघटित करण्यात संपर्क प्रमुख म्हणून पुढाकार, 1987 मध्ये खालापूर येथे प्राणघातक हल्ला, न्हावा शेवा आंदोलनात सत्याग्रह व अटक, 1989 साली भारतीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश,सरचिटणीस म्हणून जबाबदारी आणि कोकण प्रदेश अध्यक्ष, 1995 मध्ये मुंबई म्युन्सिपल कामगार संघात सरचिटणीस, मुंबई महानगर पालिका कामगार संपात यशस्वी जन वकालत , 1999 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली, सद्भावना साधना मासिकाचे संपादन, सर्वोदयी संघटनां बरोबर सहयोग, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकरवादी) सक्रिय, युसुफ मेहेर अली सेंटर मध्ये सरचिटणीस, आणि सध्या राहुल गांधीं यांच्या भारत जोडो यात्रे मधील सहभागानंतर परत एकदा हिंदू मुस्लिम सांप्रदायिक एकतेसाठी प्रतिबद्ध आणि सेंटर मधील रचनात्मक कार्यातून चळवळीतील कार्यकर्त्यांना परत आर्थिक आधार देण्यासाठीं क्रियाशील….असा भरगच्च बायोडेटा कुठल्याही नोकरी मधील कितीही प्रतिष्ठित व्यक्ती जवळ नसेल, असा समृद्ध करणारा जीवनानुभव घेऊन मधू मोहिते नावाचे चळवळीतील एक प्रतिबद्ध व्यक्तित्व आपल्याला पुस्तकात सापडते. ते त्या त्या काळातील सूक्ष्म तपशील बारकावे आणि जेवढ्या जमतील तेवढ्या व्यक्ती व घटनांचे ऐतिहासिक योगदान व पुरावे देत हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही. उलट मला वाटत जशी पूर्वी रशियन पुस्तके असत तेव्हा आपण उत्कंठेने एकेका चळवळीच्या जडण घडणी चा पुन्हा प्रत्यय घ्यायचो तसे इथे होते.
परिवर्तनवादी चळवळीचे आणखी एक लक्ष्यवेधी वैशिष्ट्य म्हणजे आंतरजातीय प्रेम विवाह किंवा चळवळीत जुळलेले विवाह. मधु च्या पुस्तकातील न मिटता येणारे एक जरदोझी पान आहे ते म्हणजे त्यांचे लग्न.
मधु आणि माधुरी यांच्या लग्नाची परी कथा: न मिटता येणारे पान
युक्रांद मुळे दोघांची ओळख झाली आणि त्याच्यानंतर लग्ना पर्यंतचा प्रवास एखाद्या परी कथेत शोभावा असा आहे. इथे एक श्रीमंत समृद्ध घरातील राजकन्या आणि सिंड्रेला सारखा पायात सुरुवातीला चपला नसणारा असा गरीब कार्यकर्ता आहे. एकूण चार्ली चॅप्लिन च्या चित्रपटाचे कथानक. माधुरीच्या घरी तिच्या आईबाबांना भेटायला जाताना मधूची ती तारांबळ. स्वतः आपण नाही रे वर्गातले आहोत जाती आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर. याची कार्यकर्ता झाल्यावर झालेली जाणीव एकीकडे मधुला आहे. माधुरीने प्रत्यक्ष स्वतःहून विचारल्यावर आपण दुर्लक्षित नाहीत लक्षित आहोत, …जीव ओवाळावा म्हणजे काय असं सगळं जे काही दाटून आलं त्याच एखाद्या प्रेमकथे पेक्षा ही सुंदर वर्णन लेखक करतो. कारण ते उपरे नसतं, आतून असं सरसर दाटून आलेलं असतं आणि तरी आता भविष्यात काय असा प्रश्न डोळ्यासमोर आहे. माधुरीचे वडील चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ. अतिशय समृद्ध, श्रीमंत, कला संपन्न वारसा असणारी माधुरी . तिला मधु जेव्हा आपल्या दीडशे रुपये मानधन, एक झोळी आणि आपले कार्यकर्त्यांचे दोन जोडी कपडे, पाणी नाही, टॉयलेट ची सोय नाही अशी गरिबी आणि चळवळीतील फाटके आयुष्य समोर ठेवतो तेव्हा माधुरी जे बोलली आहे, ते सिनेमातले संवाद नाहीत, ते तिने मधुचे सर्व जगणे पाहून डोळसपणे घेतलेल्या निर्णयाचे बोल आहेत. त्यात प्रेम आहे तशीच आपण आजवर जे श्रीमंती आयुष्य जगत आलो ते सोडण्याचे भावनिक नव्हे तर समजूतदारपणे घेतलेले उत्तरदायित्व आहे. कुणीही आंतरजातीय प्रेमविवाह किंवा अंतर धर्मीय प्रेम विवाहाला लव्ह जिहाद म्हणून विरोध करू लागले तर हे प्रकरण वाचायला द्यावे, इतकी ताकद या शब्दांमध्ये आहे. त्याचा एक ट्रीझर इथे देते….
” ही न्यायाची, बंधुत्वाची, समतेची खरी लढाई आहे. हे माझ्या मनावर बिंबत गेले, तू जांभूळपाड्याला जाऊन राहत होतास, खेड्यापाड्याचे जीवन मी कधीच अनुभवले नव्हते… तू तिथे एका खोलीत राह्यचास. तुला भूमिका मांडताना मी पाहिले आहे. झोपडपट्टीत जेवढा एकरूप होतास, तसाच इथे त्या गरीब शेतकरी आदिवासी मध्ये मिसळून गेला होतास. तुझ्या बैठकांना, तहसील कचेरी वरील मोर्चाना प्रतिसाद मिळतो आहे. तू त्यांचा आत्मविश्वास जागवत होतास. ते मी पाहिले आहे. हे तुझे नाटक नव्हते. हे माझे जगणे आहे आणि माझ्या लोकांसाठी आहे अशी तुझी भावना होती. …..मला जो पगार मिळेल त्यामध्ये आपण मजेत राहू. माझी तयारी आहे. तू असाच काम करीत रहा…मला तुझ्याकडून पैशांची अपेक्षा नाही. ” माधुरी चे हे बोलणे मधू ला अधिकच प्रेमात पाडू लागले..अर्थात यानंतर मधु ने रंगवलेला त्याचा माधुरीच्या आई वडिलांना भेटायला जायचा प्रसंग मी वर लिहिले त्याप्रमाणे चार्ली चॅप्लिन च्या सिनेमातल्या प्रमाणेच आपल्याला हसवतो सुद्धा आणि आत खोलवर आपण हेलावतो सुद्धा.
त्याचा मित्र सुशील महाडेश्वर आणि त्याची बायको अंजलीकडे मधु पोचल्यावर सुशील म्हणाला मेल्या असा जाणार आहेस? पायात काय तर प्लास्टिक चपल, सळी ने वितळवून अंगठा तयार केलेली. अंगातला शर्ट विरविरीत आणि प्रकाश दळवीने दिलेली पॅट चकचकीत ब्लू सिल्क टेरिकॉटची. दुमडून पांढऱ्या धाग्याने शिवलेली. सुशील म्हणाला हा तुझा अवतार बघून कोणते आई बाप म्हणतील की आमची मुलगी याच्याबरोबर सुखी राहील? …मधु म्हणाला अरे मी ज्या जातीतून आलोय, गरिबीतून आलोय ते लपविण्याचं काहीच कारण नाही. (तर या सत्य गोष्टीचे नाव जेव्हा मी जात चोरली नाही, असे ही असू शकत होते. )
तर सकाळी उठल्यावर सुशील ची बायको ऑल द बेस्ट देऊन बँकेत नोकरीवर जाते. सुशील त्याचा एक ब्राऊन कलरचा शर्ट मधुला देतो. तो थोडा ठीक बसतो. पॅन्ट चा पांढरा धागा दिसतो म्हणून घरातील निळ्या शाईने रंगवला. तरी तो पांढरा रंग उलट अधिक उठून दिसू लागला. वाटेत स्टेशनजवळ कोल्हापुरी चप्पल पंधरा रुपयांची विकत घेतली. जुनी फेकून दिली. ….. त्यांच्या घरी गेल्यावर तेथील सुंदर सजावट बघून मधु भारावलेला. माधुरीचे आई वडील आलेत. ….त्यांनी खालून वर त्याच्या कडे बघितले. तेवढ्यात आईचे लक्ष फरशीवर उमटलेल्या लाल ठशांकडे गेले . ती. म्हणाली अरे हे लाल ठसे कसे उमटले. ते मधु ने घातलेल्या नवीन कोल्हापूरी च्या लाल रंगाचे होते. माधुरी म्हणाली नवीन चपला घेतल्या वाटतं. माधुरीच्या आई ने ते पुसून टाकले….मधु म्हणतो खरेतर माझी विकेट गेली होती. … असे सर्व प्रसंग मधुने जसेच्या तसे लिहिले आहेत आणि त्यामुळे आत्मकथनाची विश्वासार्हता वाढते.
तर अशा या जगावेगळ्या जोडप्याचा कळवा येथील दीड खोलीतला संसार मी जवळून पाहिला. अशा या प्रेमा पलीकडच्या प्रेमाची मी सुद्धा चळवळीतीलं मैत्रीण म्हणून कळवा येथे मनिषा नगरात जवळच राहत असताना साक्षीदार राहिली आहे. माझी मुलगी मनस्विनी 6 वर्षांची आणि त्यांचा रोहित 3 वर्षांचा असतानाचा हा काळ आमच्या जीवनातील अविस्मरणीय सुंदर काळ आहे. चळवळीतले हे मैत्र इतक्या वर्षात गाठी भेटी न होता सुध्दा शिल्लक आहे.
मला राहून राहून वाटतं की इतक्या पडझडी नंतर ही जी स्त्री पुरुष कार्यकर्ती मंडळी कोलमडली तरी ताठ उभी राहतात, पुन्हा आवेशाने परिवर्तनाच्या घेतलेल्या ध्येयापोटी विषमतेच्या तुरुंगाला धडका देतात त्यामागे ज्या काही जीवन प्रेरणा आहेत त्यांमध्ये एक आहे प्रेमा पलिकडचे प्रेम. ते कुणाला जोडीदाराने, कुणाला मुलीने, कुणाला मुलाने तर कुणाला चळवळीतील साथीदारांनी दिलेले असते. आणि म्हणून हे खरे लव्ह आझाद आहे. स्वातंत्र्य, समता, समानता , मैत्री, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये टिकवण्यासाठी ही परिवर्तनाची लढाई खरेतर प्रेमा पलीकडचे प्रेम जागवण्याचीच गोष्ट आहे. या शोध परिवर्तनाचा पुस्तकात अनेकांना वेवगवेगळे शोध लागतील पण मला एक शोध लागला . तो म्हणजे मी निवडलेला कार्यकर्ता होण्याचा मार्ग खडतर होता, संघर्षमय होता पण चुकीचा कधीच नव्हता… त्यासाठी मधु व माधुरी मोहिते दोघांचे आभार….अर्थात माझ्या वाट्याची चळवळ लिहिण्याची प्रेरणा जागवली या पुस्तकाने.
या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची व बोलण्याची संधी मला कुमार केतकर, हुसेन दलवाई आणि भालचंद्र मुणगेकर यांच्या सोबतीने मिळाली. त्यावेळी लेखक मधू मोहिते , माधुरी मोहिते आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर विचार मंचावर होते. तेव्हा मी जे बोलले ते जरी खूप आतून आलेले प्रभावी असे होते तरी खूप काही तेव्हा जे राहून गेले ते मी या समीक्षा रूपी लेखात लिहिले आहे.
सर्वात शेवटी हेच म्हणेन की ज्या काळात पूर्ण वेळ कार्यकर्ता नावाची एक अख्खी हयात चळवळीसाठी घालवलेली जमात सध्या हरवत चालली आहे. स्त्री व पुरुष पूर्ण वेळ कार्यकर्ते ज्यांनी परिवर्तनाचा ध्यास घेत खिशात, पदरात दमडी नसताना, एक ध्यासपर्व बनून आयुष्य दिले आहे त्या अनेकांच्या पदरी निराशा आहे, कुणाला आपले कुटुंब टिकवण्यासाठी वयाच्या साठी नंतरही अर्थार्जन करावं लागत आहे. आता तशी शारीरिक धावपळ करण्याची स्थिती नाही, अशा काळात मधु मोहिते चे हे पुस्तक येणं ही कार्यकर्त्यांच्या जखमेवरची फुंकर आहे. तसेच एक समुचित असे अवजार पण मधु ने कार्यकर्त्यांच्या हाती दिलं आहे, तुमच्यावर कुणी लिहित नसेल, तरी आपल्याजवळ असलेले अनुभव, ज्ञान , चळवळींनी दिलेला अनेक गावातील मित्र परिवार, विसाव्यासाठी एक थांबा आणि इतिहासाचे संचित, एक असा दृष्टिकोन जो पेरल्याशिवाय उगवत नाही असे आपणच लिहून काढू शकतो. आपला मौखिक इतिहास दुसऱ्या कुणी लिहिण्याची काय गरज , आपण शब्दबद्ध करू या, अशी उमेद जागवतं हे पुस्तक ” शोध परिवर्तनाचा.” म्हणून अशी अनेक कार्यकर्त्यांची पुस्तके आलीत तर परिवर्तनवादी चळवळीचा एक मोठा कोलाज केलेला व्यामिश्र इतिहास पुढच्या पिढीला वाचायला मिळेल.
डॉ लता प्रतिभा मधुकर
बहुजन स्त्रीवादी समीक्षक, लेखक, संशोधक, अनुवादक, विचारक , प्रचारक व
पर्यावरणवादी, स्त्रीवादी आणि फुले आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत