राष्ट्रवादीतील फुटीबाबत आज दोन सुनावण्या.

मूळ पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवारांच्या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दुसऱ्यांदा युक्तिवाद केला जाईल. तर, पक्षाच्या नऊ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शरद पवार गटाने महायुती सरकारमध्ये मंत्री झालेल्या नऊ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. याप्रकरणी पवार गटाने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली असून न्यायालयाने विधानसभाध्यक्षांना निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या या याचिकेमुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभाध्यक्षांना सुनावणी घ्यावी लागणार आहे. पण, तोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित राहील.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सोमवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये प्रामुख्याने अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद केला जाणार असून विधिमंडळ पक्षामधील बहुमत गृहीत धरून मूळ पक्षावर हक्क सांगितला जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे ५३ पैकी ४३ आमदार, विधान परिषदेतील ९ पैकी ६ आमदार आपल्या बाजूचे असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वतीने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत करण्यात आला होता. सोमवारी या मुद्दय़ाला बळकटी देणारे युक्तिवाद केले जातील. मात्र, विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या युक्तिवादावर शरद पवार गटाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित असेल तर विधिमंडळ पक्षातील बहुमत गृहीत धरता येणार नाही, असा निकाल शिवसेनेच्या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला होता. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, हा वाद सोडवताना विधिमंडळातील बहुमताचा आधार घेता येणार नाही, असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत