शिक्षक भरतीला मुहूर्त कधी?

राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वारंवार जाहीर केले आहे. परंतु, समूह शाळांचे नियोजन, कंत्राटी शिक्षक भरती, संचमान्यता, विविध समाजांच्या आरक्षण मागणीमुळे रोस्टर पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षकभरतीबाबत संभ्रम निर्माण झाल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.
राज्य सरकारकडून शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलची निर्मिती केली आहे. २०२२ मध्ये अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी दिलेल्या उमेदवारांना ६ ऑक्टोबरपर्यंत पोर्टलवर नोंदणी करून स्वप्रमाणपत्र भरण्याची संधी देण्यात आली आहे. परंतु, नेमक्या किती पदांची जाहिरात निघणार, हे गुलदस्तात ठेवल्यामुळे शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवार हवालदिल झाले आहेत. एकीकडे शिक्षक भरती नेमकी कधी होणार? हे निश्चित नसताना सरकारने समूह शाळांची निर्मिती करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १४ हजार ७८३ शाळा आहेत. यामध्ये १ लाख ८५ हजार ४६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
तब्बल २९ हजार ७०७ शिक्षक त्यांना शिकवत आहेत. संबंधित शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर झाले, तर संचमान्यतेप्रमाणे साधारण ६ हजार शिक्षक पुरेसे ठरतील आणि २३ हजारांवर शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्याचबरोबर सरकार कंत्राटी शिक्षक भरण्याची तयारी करीत असून सहायक शिक्षक आणि शिक्षकांच्या कंत्राटी स्वरूपात भरती करणार आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलमार्फत नेमकी किती पदांची भरती केली जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत