मुंबई-पुण्याची आघाडी! देशातील घरांच्या विक्रीत निम्म्याहून अधिक वाटा

देशातील घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ३६ टक्के वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये एक लाख २० हजार घरांची विक्री झाली. विशेष म्हणजे यातील निम्म्याहून अधिक घरांची विक्री मुंबई आणि पुण्यात झाली आहे.
देशातील प्रमुख महानगरांतील घरांच्या विक्रीचा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकता या सात महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, यंदा जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीत एकूण एक लाख २० हजार २८० घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षातील याच तिमाहीत घरांची विक्री ८८ हजार २३० होती. आता त्यात ३६ टक्के वाढ नोंदविण्यात आली. देशात मुंबईमध्ये सर्वाधिक ३८ हजार ५०० घरांची विक्री झाली आहे. त्या खालोखाल पुण्यात २२ हजार ८८० घरांची विक्री झाली. देशातील एकूण घरांच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. घरांच्या विक्रीत मुंबईत वार्षिक ४६ टक्के, तर पुण्यात वार्षिक ६३ टक्के वाढ नोंदविण्यात आली.
देशात तिसऱ्या तिमाहीत एकूण एक लाख १६ हजार २२० नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात २४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. नवीन घरांच्या पुरवठ्यात मुंबई आघाडीवर आहे. तिसऱ्या तिमाहीत मुंबईमध्ये ३६ हजार २५० नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात केवळ एक टक्का वाढ झाली. याच वेळी हैदराबादमध्ये २४ हजार ९०० नवीन घरांचा पुरवठा झाला असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल ६० टक्के वाढ नोंदविण्यात आली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत