देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मतदार आपला मताधिकार का विकत आहेत?

लोकशाहीच्या रथाचे चाक कशात रुतले आहे?

शिवरायांची स्वराज्यक्रांती कशी आणि का यशस्वी झाली, हे सांगताना एका प्रतिभावान कवीने आपल्या काव्यात एक विलक्षण कथानक उभे केले आहे. त्या कथानकात अवघा दहा-बारा वर्षांचा कोवळा पोरगा त्याच्यासमोर आलेल्या सशस्त्र घोडदळाला ठणकावून सांगतो,

“खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे,
चिंधड्या उडवीन राई-राई एवढ्या!”

या प्रसंगातून कवीला हे अधोरेखित करायचे आहे की स्वराज्य ही संकल्पना केवळ शिवराय आणि रणांगणात लढणाऱ्या मावळ्यांपुरती मर्यादित नव्हती. “हे स्वराज्य माझे आहे आणि त्याचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे” ही भावना स्वराज्यातील प्रत्येक घटकाच्या मनात रुजली होती. प्रसंगी प्राणही पणाला लावण्याची तयारी ही रयतेच्या स्वराज्यावरच्या अतूट विश्वासातूनच निर्माण झाली होती. रयतेचा हा विश्वास हेच स्वराज्य उभे राहण्याचे आणि टिकण्याचे खरे गमक होते.
स्वराज्याच्या त्या क्रांतीला आज ३५०-४०० वर्षे उलटून गेली आहेत. राजेशाही नाकारून जगाने लोकशाही ही अधिक प्रगत व्यवस्था स्वीकारली. मात्र एवढ्या दीर्घ काळानंतरही एक मूलभूत प्रश्न उरतोच, “आजच्या लोकशाहीत राज्यकर्त्यांनी जनतेच्या मनात देशाबद्दल, राज्याबद्दल, व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण केला आहे काय?”,
“हा देश आपला आहे, ही सत्ता आपल्यासाठी आहे” असे लोकांना खरेच वाटते काय?
म्हणूनच कदाचित शिवराय आणि स्वराज्य आजही आपल्याला प्रेरित करत राहतात. याचे नेमके उत्तर गोविंद पानसरे यांनी त्यांच्या “शिवाजी कोण होता?” या पुस्तकात दिले आहे. स्वराज्याच्या इतिहासाचे आकर्षण हे शिवरायांनी रयतेच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासात दडलेले आहे आणि तोच विश्वास निर्माण करण्यात आजची व्यवस्था अपयशी ठरली आहे, हे त्यांचे विश्लेषण अत्यंत रास्त आहे.

पैसा, सत्ता आणि मतांची बाजारपेठ

ओबीसी आरक्षणाच्या सबबीखाली ३-४ वर्षे रखडलेल्या नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांत सर्वच प्रस्थापित पक्षांनी, विशेषतः सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या लाभार्थी मित्रपक्षांनी, अमाप पैसा ओतला. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतही हेच चित्र दिसणार, यात शंका नाही.
निवडणुकीतील पैसा, गुंडगिरी, बूथ कॅप्चर हे प्रकार नवीन नाहीत. जात-धर्म, भाषा, प्रांत अशा अस्मितांच्या जोडीला धनशक्ती, दादागिरी, दबावतंत्र हे भारतीय निवडणूक प्रक्रियेतील जुनेच शस्त्र आहेत. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,
“सामाजिक व आर्थिक समानतेशिवाय खरी लोकशाही शक्य नाही.”
मात्र नुकत्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मतांच्या खरेदी-विक्रीने जो कळस गाठला, तो लोकशाहीसाठी भयावह आहे.

‘एक व्यक्ती, एक मत’ – पण विश्वास कुठे हरवला?

संविधान निर्मितीच्या वेळी मताधिकाराबाबत अनेक मतप्रवाह होते. शिक्षितांनाच मतदानाचा अधिकार द्यावा का, असा विचारही मांडला गेला. मात्र बाबासाहेबांनी ठामपणे सांगितले की राजकीय शहाणपणाचा औपचारिक शिक्षणाशी थेट संबंध नाही. जात, धर्म, वर्ण, वर्ग, भाषा, लिंग, प्रांत कोणताही भेद न करता “एक व्यक्ती, एक मत” या तत्त्वाचा आग्रह त्यांनी धरला.
या मताधिकाराने शतकानुशतके उपेक्षित राहिलेल्या समाजाला सन्मान, ओळख आणि आत्मविश्वास दिला. ज्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जात होता, त्यांच्याकडे मत मागण्यासाठी उच्चवर्णीयांना झुकावे लागले. “माझ्या एका मताने सत्तेचा उन्माद उतरवता येतो” हा विश्वास लोकांच्या मनात रुजला.
पण हाच विश्वास उद्ध्वस्त करण्यासाठी धनशक्तीचा वापर करण्यात आला.

मतदार मत का विकतो?

आज गोरगरीबच नव्हे, तर तथाकथित शिक्षित वर्गही मत विकताना दिसतो. काही ठिकाणी तर घरातील एकूण मतदारांची यादी घेऊन थेट पक्ष कार्यालयात सौदे झाले. हे का घडते?
कारण मतदाराच्या मनात एक ठाम समजूत बसली आहे की, “कोणीही निवडून आले तरी भ्रष्टाचार करणारच.”
प्रामाणिक उमेदवार निवडून येणार नाही, त्याला दिलेले मत ‘वाया’ जाईल, अशी भावना आहे. त्यामुळे जो ‘जिंकणार’ त्याच्याकडे झुकण्याची प्रवृत्ती वाढते. पैसा, शक्तीप्रदर्शन, प्रचारयंत्रणा यामुळे हेच उमेदवार पुढे येतात, निवडून येतात आणि सत्तेत जाऊन पुन्हा भ्रष्टाचार करतात.
यातूनच एक घातक तर्क तयार होतो, “पुढे भ्रष्टाचार होणारच आहे, तर त्याचा फायदा आपण आत्ताच का घेऊ नये?”
हीच मतविक्रीची मानसिकता आहे.

लोकशाहीचा रथ नेमका कुठे रुतला?

भारतीय लोकशाहीचा रथ
पैशाच्या चिखलात, जात-धर्माच्या खाचखळग्यात, भीती व लालसेच्या दलदलीत आणि जबाबदारीशून्य, भ्रष्ट प्रतिनिधित्वात अडकलेला आहे.
रथावर बसलेले सत्ता, अहंकार आणि संपत्तीच्या तृप्तीत मग्न आहेत आणि शिक्षण, विचार, मूल्ये, संघटन यांशिवाय उभे असलेले नागरिक हा रथ पुढे नेऊ शकत नाहीत.

म्हणूनच आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र तितकाच लागू आहे. म्हणूनच शहीद भगतसिंगांचे “क्रांतीची तलवार ही विचारांच्या सहाणेवर परजली जाते”
हे वाक्य आजही तितकेच सुसंगत आहे.
लोकशाही वाचवायची असेल,
मताधिकाराचे पावित्र्य टिकवायचे असेल, तर विचारांची, मूल्यांची आणि बुलंद एकजुटीची लढाई लढण्याशिवाय पर्याय नाही.

© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!