महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

कथासंग्रह- अबीरमाती

स्वागत नव्या पुस्तकाचे.
दि. १/४/२०२५


लेखक- प्रा. आप्पासाहेब खोत
प्रकाशन संस्था- मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे
मूल्य ₹२४०

धनाजी धोंडीराम घोरपडे
बहादुरवाडी, सांगली
भ्रमर. ९४२१३०३७०२

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. आप्पासाहेब खोत यांचा अबीरमाती हा नवा कोरा कथासंग्रह नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांच्याकडून प्रकाशित झाला असून हे अठरावे साहित्यपुष्प वाचकांच्या भेटीला येत आहे.
कथा हा मुळातच मर्यादित अवकाश असणारा परंतु स्वयंपूर्ण आकृतीबंध व अधिक महत्त्वपूर्ण वाड्मय प्रकार असून त्यात ग्रामीण कथा हे मराठी वाङमय परंपरेला लाभलेले समृद्ध अधिष्ठान आहे. लेखक ज्या सामाजिक पर्यावरणात घडतो त्याच समाजातील अनुभवांची कथा तो निर्माण करीत असतो. ज्येष्ठ साहित्यिक आप्पासाहेब खोत यांचा अबीरमाती कथासंग्रह ग्रामसंस्कृतीतल्या समाज जीवनाचे वास्तवनिष्ठ दर्शन घडविणारा असून त्यात वारणा काठच्या गावरान बोलीचा व्यापक भाषा आविष्कार हा कथासंग्रहाला निराळेपण देणारा आहे. नव्वदी नंतरच्या जागतिक बदलामुळे गावगाड्यातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या बारा बलुतेदारांच्या संबंधित व्यवसायाला कशी मरणकळा आली. याचं वास्तव दर्शन खोत यांनी कोंडी, बैतं, माणुसकीचा ओलावा या सकस कथांमधून नेटकेपणाने मांडलेले आहे. शेती, माती, नाती आणि नीती व संस्कृती हा आप्पासाहेब खोत यांच्या आस्थेचा परीघ असून अस्सल ग्रामीण जीवनाच्या जाणीवा अतिशय डोळसपणे मांडणे हा त्यांच्या लेखनाचा मूळ स्थायीभाव आहे. सकारात्मक प्रबोधनात्मक आणि प्रादेशिक -भाषिक संस्कृतीचे जतन हे खोत यांच्या लेखणीचं आगळं -वेगळं वैशिष्ट्य असून पिकल्या पानाची कथा, दुभंगलेले नाते हे कथा विषय निव्वळ गावगाड्यातील नसून एकूणच मानवी जगण्याला आलेल्या अवकळेच चित्रण त्यात आहे. अडवणूक, वाटणीचा गुंता या कथेतून ग्रामीण समाज जीवनातील ताण तणाव चित्रित झाला असून त्यात भरडलेल्या, पिचलेल्या सामान्य माणसांची व्यथा आहे. शेतीमातीशी झट्या- झोंब्या घेऊन आस्मानी -सुलतानी संकटाशी दोन हात करणाऱ्या, बारा महिने तेरा काळ मातीत खपणाऱ्या, रापलेल्या माणसांची कथा खोत तितक्याच ताकदीने साकारताहेत. यातील काही कथा अगदी सूचकपणे विचार करायला लावणाऱ्या आहेत. कथाकथनातला ध्रुवतारा असं ज्यांच्या मागं बिरूद लावलं जातं ते आप्पासाहेब खोत तितक्याच ताकदीच्या सकस कथा लिहून वाचकाला नेहमीच अंतर्मुख करीत आले आहेत. त्यांच्या साहित्याने स्वतःचा असा विशिष्ट वाचक वर्ग निर्माण केला आहे. खोत यांची कथा कसदार काळ्या भूमीत उगवलेली असून मानवी नात्यातील जिव्हाळ्याने ती परिपूर्ण अशी आहे. तिच्या बोलीच्या निराळ्या ढंगाने आणि जोरकसपणाने ती पूर्णतः नटलेली आहे. ग्रामीण जीवनातल्या उपेक्षितांचे अंतरंग व त्यांची भाषा आणि परिसर यांचे खरेखुरे दर्शन अबीरमाती या कथासंग्रहातून घडवून आणलेले आहे. बदलत्या सामाजिक जीवनाच्या, बदलत्या अनुभवांची व जुन्या आणि नव्या सांध्यावरच्या ह्या कथा वाचकाला नक्कीच भुरळ घातल्याशिवाय राहणार नाहीत.असा विश्वास वाटतो.
‌‌

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!