महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

गुरु-शिष्यांनी वादळ निर्माण केलं

लेखक- आर. के.जुमळे

लेखांक २

फुले दांपत्याचे आगमन झाल्याचा काळ पेशवाई नंतरचा जरी असला तरी सामाजिक परिस्थीती पेशवाईकालीन परिस्थितीपेक्षा फारशी सुधारली होती असे म्हणता येत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुध्द आणि संत कबीर यांचे सोबत ज्योतिबा फुले यांना सुध्दा गुरु मानले होते. ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक चळवळीला भारताच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासात विशेष स्थान आहे.
एका ब्राम्हण व्यक्तीच्या सांगण्यावरुन ज्योतीबांच्या वडिलांनी ज्योतीबांचे शिक्षण बंद केले होते. परंतु गफ्फार मुन्सी व लेजिट अशा मुस्लिम व ख्रिचन व्यक्तिने ज्योतीबांच्या वडिलांना समजावीले. म्हणून ज्योतीबांना पुढील शिक्षण घेता आले.
याच काळात त्यांचेवर ख्रिचन मिशणमधील शिक्षणाचा, थॉमस पेन यांच्या ‘मानवाचे हक्क’ या ग्रंथाचा, जॉर्ज वाशिग्टन व शिवाजीराजे यांच्या चरीत्राचा प्रभाव पडला.
ब्राम्हण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून ज्योतीबांना हाकलून दिले होते. वडिल म्हणाले की, ‘बरे झाले तुला फक्त हाकलले. पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाने तुडविले असते.’ ज्योतीबा वडिलांना म्हणाले की, ‘बाबा तुम्ही हे सर्व सहन केले असेल. परंतु मी मात्र सहन करणार नाही.’ हा प्रसंग त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. त्यानंतर त्यांनी धर्मशास्त्र, वेद, पुराण याचा अभ्यास केला व जातीभेदाच्या नावाने देण्यात येणार्‍या कारणांचा शोध घेतला.
सामाजीक क्रांतीच्या चळवळीचे नेतृत्व करु पाहणार्‍या सेनापतीला दुरदृष्टी व धाडस या दोन मौलीक गुणाची गरज असते. हे दोन्हिही गुण ज्योतिबा फुले यांच्याकडे निश्चितच होते.
ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी या विरोधात चळवळ चालविली. मातृत्व आलेल्या स्त्रियांना आत्महत्या न करण्याबाबत प्रवृत केलेँ. त्यांचे बाळंतपण व मुलांचे संगोपण त्यानी स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृह व बाल संगोपण गृहात करीत असत.
काशीबाई नावाच्या एका ब्राम्हण स्त्रिला आत्महत्या न करु देता, तीचे बाळंतपण केले व तिच्या बाळाला-यशवंताला दत्तक घेतले. हेच फुले दांपत्याचे एकमेव मुल होते. कारण त्यांना स्वत:चे मुल नव्हते. या यशवंताला त्यानी वैद्यकीय शिक्षण दिले व त्याचे आंतरजातीय मुलीशी लग्न लाऊन दिले.
ज्योतिबा फुले यांनी विधवा मुलींचे नाव्ह्यांनी डोक्याचे केस कापू नयेत म्हणून त्याचे शिष्य नारायन मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत त्यांचा संप घडवून आणला होता. आजकाल पगारवाढीसाठी संप केला जातो. पण अशा सामाजिक प्रश्‍नासाठी संपाचे शस्त्र ज्योतिबा फुलेंनी ऊगारले हे जगातील त्यावेळचे पहिले उदाहरण असेल.
ज्योतीबा फुले शुद्र-अतिशुद्राच्या गुलामगिरीचे, दुखाचे कारण अविद्या आहे असे म्हणत. म्हणून त्यांनी ‘शेतकर्‍याचा आसुड’ या ग्रंथात म्हटले आहे की-
विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
हा महात्मा फुले यांचा संदेश म्हणजे क्रांतीकारक तर आहेच. पण एक नविन तत्वज्ञान मांडणारा आहे. पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीपासून जवळपास २००० वर्षापासून एखाद्या मुक्या जनावराप्रमाणे राहणार्‍या शुद्र अतिशुद्र समुहाचा अडकलेला हुंकार मुक्त झाला या संदेशामुळेच!
म्हणून ज्योतिबांनी शिक्षणावर जास्त भर दिला. १ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी भिडे वाड्यात पहिली ऎतिहासिक शाळा काढली. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. पुढे १८५२ पर्यंत अशा शाळांची संख्या १८ पर्यंत नेली.
इंग्रज लोकांची अशी धारणा होती की जर वरिष्ठ जातींना उच्च शिक्षण दिले तर झिरपत खालच्या जातीपर्यंत येईल. फुलेंनी या त्यांच्या योजनेला विरोध केला. त्याऎवजी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे करावे असे त्यांनी हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात मागणी केली.
याची अंमलबजावणी मात्र राजश्री शाहु महाराजांनी त्याच्या राज्यात केली होती. जे पालक मुलांना शाळेत टाकणार नाहीत त्यांना ते दंड करीत.
याचीच तरतुद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात केली. परंतु खेदाची गोष्ट अशी की, ६० वर्षानंतर त्याचा कायदा होऊन १ एप्रिल २०१० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याची जर आधिच कायदा होऊन अंमलबजावणी झाली असती तर शिक्षणाच्या बाबतीत भारतामध्ये एक वेगळेच चित्र निर्माण झाले असते.
मुलींना शिकविण्यास शिक्षक मिळत नव्हते. म्हणून त्यांनी सावित्रीलाच शिक्षिका बनविले. सावित्री ही भारतातील पहिली शिक्षिका ठरली. त्यानंतर त्या मुख्याध्यापिका झाल्यात. तेव्हा भारतामध्ये मुख्याध्यापिका झालेल्या त्या पहिल्या स्त्री होत्या.
त्या घरुन शाळेत जायच्या तेव्हा रस्त्यातील ब्राम्हण लोक तिला शेण, माती,दगडं मारुन अर्वाच्च शिव्या देत असत. मुलींनी शिकणे पाप आहे. धर्माच्या विरोधात आहे. जेवणाच्या ताटात अळ्या पडतात. आज कोणाच्या स्त्रिया शिक्षणामध्ये व इतर अन्य क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत? असे असून सुध्दा या स्त्रिया सावित्रीमाईं विषयी कृतज्ञता व्यक्त करतात काय? की त्या फक्त काल्पनीक सरस्वतीला जीला कोणताही इतिहास नाही, अशा सरस्वतीलाच देवता मानतात? याचे आश्चर्य वाटते. ज्योतीबांना व सावित्रीमाईंना वडिलाने ब्राम्हणाच्या तक्रारीवरुन घराबाहेर काढले. तरीही ते डगमगले नव्हते.
स्त्रि-पुरुष समानतेवर ताराबाई शिंदे यांनी लिहलेल्या पुस्तकाचा त्यांनी गौरव केला. त्यांनी स्वत:च्या जीवनात त्यांच्या विचाराचे अनुकरण केले. ज्योतीबांना अपत्य नव्हते. तेव्हा सगेसोयरे व प्रत्यक्ष पत्‍नी सावित्री हिने सुध्दा दुसरे लग्न करण्याची विनंती केली. तेव्हा ते सावित्रीना म्हणाले की, वैद्यकिय दृष्ट्या तुझ्यात जर ऊणीव असेल तर दुसरे लग्न करुन सवत आणण्यास काही हरकत नाही. पण माझ्यात जर ऊणीव असेल तर तुला दुसरे लग्न करुन या घरात सवता आणावे लागेल, याला तुझी तयारी आहे का? असा तिला प्रश्‍न केला.
सतीप्रथेच्या बाबतीत ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी जागृती निर्माण केली. बायको मेल्यावर तीचा नवरा सता का जात नाही असा ते प्रश्‍न विचारीत. अशा प्रकारे समता कृतीत आणणारे ते युगपुरुष होते.
क्रमशः
लेखक- आर. के.जुमळे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!