देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

ब्राह्मणमुक्त महाबोधी विहार ट्रस्ट आंदोलन आणि त्यानिमित्ताने उदभवलेले विचार

लेखक:-एच.बी.जाधव,सेक्रेटरी आर.पी.आय (कांबळे)
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
गया येथील महाबोधी विहार ट्रस्टच्या कमिटीत ब्राह्मण नसावेत अर्थात महाबोधी विहार ब्राह्मणांच्या तावडीतून सोडवावे म्हणून जे आंदोलन चालू आहे त्याबद्दल नकारात्मक भूमिका नसली तरी दलित पँथरच्या उगमापासून जी जी आंदोलने झाली ती सर्व १४ आक्टोबर १९५६ च्या धम्मदीक्षे नंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या राजकीय व धम्म चळवळीवर आधारित नव्हत्या. ती आंदोलने ज्याप्रमाणे हिंदु धर्मात निरनिराळे देव-देवता,निरनिराळे महाराज,निरनिराळे बुवा निर्माण होत असतात, त्याप्रमाणे केवळ मुखी बाबासाहेबांचे नाव धारण केलेले पण निरनिराळ्या विचारधारेचे पुढारी निर्माण करीत असतात.जाती अंताची चळवळ चालवितांना बाबासाहेबांनी कोणताही हिंसक मार्ग स्वीकारला नाही.त्यामुळे बाबासाहेबांच्या विरोधकांना बाबासाहेबांच्या चळवळीला गालबोट लावण्यासाठी हिंसक कारस्थानेद्वारे दंगली माजविण्याचे धारिष्ट्य झाले नाही.त्यामुळे बाबासाहेबांची चळवळ ही “शहीदांची” चळवळ झाली नाही. बाबासाहेबांच्या ” शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा” ह्या. संदेशाचा गर्भित अर्थ समजून घेतला पाहिजे. ह्या संदेशात बाबासाहेब प्रथम काय म्हणतात “शिका”. याचा अर्थ काय तर तुम्ही सुशिक्षित व्हा.विद्या आत्मसात करा.अभ्यासू बना.ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी विद्या आत्मसात केली व तदनंतर संघटन निर्माण केले.संपूर्ण भारत देश एका बाजूला आणि बाबासाहेब एका बाजूला.पण बाबासाहेब डगमगले नाहीत.नामोहरम झाले नाहीत.आपली चळवळ चालविण्यासाठी हिंसक शस्त्रांचा वापर करण्याचे विचार बाबासाहेबांच्या ध्यानीमनी कधीच आले नाही.त्यांनी संघटन केले.संघर्ष केला.तो विद्येच्या जोरावर.बाबासाहेबांनी “शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा जो संदेश दिला त्यातील प्रथम ” शिका” ह्या शब्दावर लक्ष केंद्रित करून मग” संघटित व्हा आणि संघर्ष करा” याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आजकालचे जे पुढारी निर्माण झाले आहेत त्यांचा संघर्ष रक्तरंजित मार्गाचा आहे.त्यांचा पिंडच मुळी रक्ताने माखलेला आहे.केवळ “शहीदांचा ढिग” निर्माण करणारा आहे.
बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या राजकीय व धम्म चळवळीवरील लक्ष विचलित करणारे स्वकीयांचे व परकीयांचे डावपेच ओळखून बाबासाहेबांच्या चळवळीचे संरक्षण करण्यासाठी बाबासाहेबांच्या चळवळीतला माणूस जगला पाहिजे.जाणूनबुजून घडवून आणलेल्या दंगलीचा बळी पडता कामा नये.
महाबोधी विहार ब्राह्मणापासून मुक्त झाले पाहिजे हे जरी शंभर टक्के खरे असले तरी महाबोधी विहार ब्राह्मणापासून मुक्त झाल्यावर ते कोणाकडे सुपूर्द करणार हा भव्य यक्षप्रश्न आहे.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा रजिस्टर क्रमांक वेगळा आणि भारतीय बौध्द महासभेचा रजिस्टर क्रमांक वेगळा अशारीतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या धम्मसंस्थेची ही हालत.त्यातच रामदास आठवले यांची बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया वेगळी.धम्माचा आणि रामदास आठवले यांचा काय संबंध हे तर महान कोडे आहे.आनंदराजने तर कोकणाच्या (बौध्द )पंचायत समितीवर कब्जा केला आहे.(बौध्द) पंचायत समिती सुध्दा धार्मिक संस्था म्हणवून घेत आहे.धार्मिक संस्थेच्या मुख्यपदावर खरे म्हणजे बौध्द धम्माचे परिपूर्ण ज्ञान असलेला आणि “बुध्द आणि त्यांचा धम्म” ग्रंथात वर्णिलेल्या भिख्खूंचे कर्तव्यांचे पालन करणारा भिख्खू असला पाहिजे.धम्म( धर्म) किंवा धम्म (धर्म)संस्था ही काय खाजगी मालमत्ता नाही.तसे असते तर धर्मसंस्थापकाच्या घरापुरताच धर्म राहिला असता. बरे. तथाकथित धार्मिक संस्थानी सरकार दरबारी “बौध्द” म्हणून कायदेशीर आयडेंटी प्राप्त व्हावी म्हणून काय प्रयत्न केले आहे का? उलट ४ जून १९९० रोजी भारत सरकारच्या राजपत्रात दुसर्‍या भागातील खंड १ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या निर्णयाद्वारे अनुसूचित जातीसाठी घटना आदेश १९५० च्या परिच्छेद क्रमांक ३ मध्ये बदल करून हिंदू व शीख धर्मियांप्रमाणे बौध्दधर्मियांना सुध्दा अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आला.याचा अर्थ नीट समजून घ्या.अनुसूचित जातीतून बौध्द धर्म स्वीकारला म्हणून नव्हे तर बौध्द धम्म स्वीकारून सुध्दा बौध्द हे अनुसूचित जातीचेच आहेत या भूमिकेतून केंद्र सरकारने विशेषतः व्ही.पी.सिंगच्या सरकारने या सवलती बौध्दांना दिल्या.याचाच दुसरा अर्थ बौध्द हे अस्पृश्यआहेत.बाबासाहेबांनी म्हटले,” मी नरकातून सुटलो.” ह्या बाबासाहेबांच्या उद्गारास फोल ठरविण्यात आले आहे.याच वेळी खरे म्हणजे सर्व बौध्दांनी ह्या कायद्याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे होता.परंतु तसे काही घडले नाही ही दु:खाची बाब आहे.व्ही.पी.सिंग सरकारने सवलतीचे पंचपक्वान्न वाढल्याबरोबर यांच्या तोंडाला पाणी सुटले .पण त्यात आपल्या मुलाबाळांची भवितव्य डळमळीत करणारे जालीम विष कालवले आहे हे यांच्या गावीही नाही. बाबासाहेबांच्या चळवळीत नेते,पुढारी,
कार्यकर्ते म्हणून मिरविणारे खरेखुरे बौध्द असतील तर ते ह्या कायद्याविरुद्ध आवाज उठवतील ना! सर्वात अत्यंत दु:खाची बाब अशी की,इतरांचे सोडा खुद्द बाबासाहेबांचे घराणेच व्ही.पी.सिंग सरकारच्या आदेशाला खतपाणी घालत आहे.तेथूनच आदेश येत आहे की, धर्म बौध्द लिहा आणि जात महार लिहा. आज ६५/६६ वर्षाचा कालावधी लोटला तरी जातीला घट्ट चिकटून बसलेल्यांना कोणता अधिकार पोहोचतो महाबोधी विहार आमच्या ताब्यात द्या असे म्हणण्याचा व त्या आंदोलनात लुडबूड करण्याचा?उलट ह्या आंदोलनात श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा ते न घडल्यास फाटाफूट करण्याचा प्रयत्न केला जाईल.
बौध्द म्हणून शासकीय प्रमाण पत्र मिळवावयाचे असेल तर बौध्द कायदा होणे अत्यावश्यक आहे.त्यासाठी भारतीय बौध्द महासभा किंवा बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया किंवा बौध्दपंचायत समिती ह्या संस्थांनी प्रयत्न केला आहे का? तसेच व्ही.पी.सिंग सरकारच्या बौध्दांना सवलती देण्याच्या कायद्या विरूध्द आवाज उठविला आहे का? व्ही.पी.सिंग सरकारच्या बौध्दांना सवलती देण्याच्या कायद्या विरूध्द आवाज उठविला तो आदरणीय (दिवंगत)
ॲड.बी.सी.कांबळे यांनीच आणि ह्या आदेशाविरुद्ध एकत्रित जनमत तयार करण्यासाठी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले आर.एस.गवई यांच्याशी संपर्क साधला. पण ह्या तिघांनीही असा शेरा मारला की मिळालेल्या सवलतीही बापूसाहेब कांबळे यांना घालवायच्या आहेत का? यावेळेस आनंदराज आंबेडकर यांनी आदरणीय ॲड.बी.सी.कांबळे यांच्या विषयी अपशब्द बोलले , असे आनंदराज आंबेडकर यांची भेट ज्या कार्यकर्त्यांनी घेतली ते कार्यकर्ते सांगतात. १५ मे १९६५रोजी बुध्द जयंतीच्या शुभ दिनी सेंट झेवियर जिमखाना मैदान परेल मुंबई येथे भरलेल्या बौध्द धम्म प्रथम अधिवेशनात बुध्दसासन तर्फे ॲड.बी.सी.कांबळे यांनी बौध्द कायद्याची मागणी केली आहे आणि त्यासाठी त्यांनी बौध्दांचे हक्कांच्या व त्यांच्या संस्कृतीचा विकास करण्यासाठी त्यावेळचे भारत सरकारचे माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री आणि सर्व राज्यांचे माननीय मुख्यमंत्री यांना बौध्दांची कैफियत सादर केली आहे.त्यातील महत्वपूर्ण
मागण्यांची छायांकित प्रती ह्या लेखांसोबत पोस्ट करीत आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!