संविधाननिर्माते आणि संविधान विरोधी एक कसे ?

प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
भारतात आज स्पष्ट दोन वर्ग निर्माण झाले आहेत एक संविधान मानणारे आणि दुसरे संविधांनाला विरोध करणारे आणि हे २०१४ पासून जास्त स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे आहे. याची आता सामान्य नागरिक सुद्धा चर्चा करू लागले आहेत. आणि २०१४ पासून अशा अनेक घटना आहेत की, ज्या भारताच्या संविधनाला धोका निर्माण करीत आहेत. देशातील अनेक विचारवंत ,पत्रकार आणि लेखक यांनी स्पष्ट केले आहे की, भाजपा सरकार हे संविधान म्हणजेच सामान्य जनतेच्या विरोधी आहे कारण सामान्य जनतेला हक्क आणि अधिकार भारताचे संविधान देत आहे. २०१४ ते २०२४ या १० वर्षात या सरकारने किती कारनामे केले आहेत की, जे देशाच्या संविधान आणि जनतेच्या विरोधात आहेत हे जर आपण लिहले तर एखादा मोठा ग्रंथ तयार होईल आणि असे अनेक महत्वपूर्ण ग्रंथ बाजारात आले आहेत पण आता ते काही लोकांनी वाचले नसतील आणि जर वाचले असतील पण त्यांना जर या सरकारची बाजू चूक असतांना सुद्धा मांडायचीच असेल तर मग त्याला इलाज नाही. पण कोणत्याही विचारवंत आणि लेखकाने जनतेला इतके मूर्ख समजायचे नसते की, त्यांना काही कळणार नाही. आणि त्यात आंबेडकरी जनता आणि अनुयायी तर जास्त दक्ष असतात हा इतिहास आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे १३ नोव्हेंबर २०२४ या दिवशी वृत्तरत्न सम्राट या वर्तमानपत्रात सुजय पतकी यांचा एक लेख प्रकाशित झाला त्याचे शीर्षक होते “ डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे मा.नरेंद्र मोदी.” तसा मी मागील २५ वर्षापासून दैनिक वृत्तरत्न सम्राटचा वाचक आहे आणि १० वर्षापासून लेखक आहे पण एवढा विरोधाभासी लेख मी कधी वाचला नाही. आणि १३ तारखेला मला सकाळी आमचे नाशिक येथील मित्र मा. बेडीस साहेब (निवृत्त कर्मचारी बँक ऑफ महाराष्ट्र ) यांचा फोन आला आणि त्यांनी हा लेख सम्राट मध्ये कसा आला? याचे आश्चर्य व्यक्त केले. आणि मग मी तो लेख मोबाइल वर आमचे पुण्याचे मित्र मा.प्राचार्य डॉ. मिलिंद तायडे सरांनी मला पाठवला आणि मी संपूर्ण वाचला आणि मग यावर आपण प्रतिक्रिया द्यावी असे मनापासून वाटले म्हणून हा लेखप्रपंच आहे. मला तर हा लेख वाचून जे लेखक आहेत त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटली कारण आज जगात चर्चा आहे आपल्या देशातील जी एकूण आर्थिक सामाजिक परिस्थिती किती खालावली आहे याबद्दल जगातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आणि त्या प्रतिक्रिया साधारण व्यक्तीच्या नाहीत तर त्या त्या क्षेत्रात उच्च विद्याविभूषित अशा अधिकार असणार्या व्यक्तींच्या आहेत. या लेखक महाशयाचा पहिला मुद्दा आहे की, मागील ७० वर्षात देशात काहीच झाले नाही आता हा यांचा ठरलेला डायलॉग आहे. आणि तो खूप वेळा मा.प्रधानमंत्र्याकडून बोलला गेला आहे. आपले लोक फक्त भाषण ऐकतात आणि तेच पुढे बोलतात पण त्यावर विचार करीत नाहीत आणि मग याची चर्चा होते. आता ७० वर्षात काय केले ? हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे पण एकाच वाक्यात सांगतो की, जे आता विद्यमान सरकारकडून विकले जात आहे ते ७० वर्षात निर्माण केले आहे. आणि देश स्वतंत्र झाल्यावर आपल्याकडे कांही संसाधने नसतांना हे निर्माण केले आहे. दूसरा विषय आहे की, देशाचे मा. प्रधानमंत्री हे खूप सामान्य स्थितीतून आलेले आहेत हे सत्य आहे. पण सामान्य स्थितीतून आलेल्या व्यक्तीने तर सामान्य जीवन जगले पाहिजे आणि आपल्या गरीब जनतेला शिक्षण ,रोजगार,पाणी ,आरोग्यासुविधा अशा सुविधा दिल्या पाहिजे आणि महागाई कमी केली पाहिजे पण इथे तर सर्व उलट आहे आणि अंत्योदय योजना आणि मोफत रेशन या बाबी जाहीर मोठेपमाने सांगण्याच्या नाहीत तर त्या लाजिरवाण्या बाबी आहेत. कारण तुम्ही रोजगार कमी केला ,शेती उत्पादनाला भाव नाही आणि टॅक्सच्या माध्यमातून आज मध्यमवर्ग सुद्धा मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही तिथे गरीब जनतेचे काय हाल असतील ? याचा विचार न केलेला बरा ! आज देशात महागाई एवढी वाढली आहे की, लोकांच्या हातात पैसाच राहत नाही आणि मग सामान्य स्थितितून प्रधाममंत्री होऊन काय फायदा ? त्यांची आज जनतेच्या पैशातून जी दिनचर्या आहे त्याचा विचार जरा लेखकाने तटस्थपणे करून पहा त्यांचे विमान ,गाडी ,चश्मा आणि सूट तसेच जेवण याचीच चर्चा असते. आणि शेवटी एक मुद्दा आहे की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात पंचतीर्थ विकास करायचा आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्य हे अशा पंचतीर्थ विकासातून कधीच होणार नाही तर त्यांच्या कार्याचा उद्देश हा चांगले शिक्षण देऊन ,चांगल्या आरोग्य सुविधा ,रस्ते ,पाणी आणि रोजगार देऊन होईल हे असे स्मारके आणि पुतळे उभारणे म्हणजे समाजाची दिशाभूल आहे हे कदाचित लेखकाला माहीत असावे पण कुणाच्या सांगण्यावरून हा लेख लिहला आहे असे मला वाटत आहे. आणि शेवटी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली का दिली हे समजले नाही. कारण १३ नोव्हेंबर तसा काही प्रसंग नाही ६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन तर १९ दिवस पुढे आहे. आणि एक सांगतो की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांचा मार्ग हा लोकशाही मार्ग आहे आणि भाजपा आणि त्यांची मातृसंस्था आर.एस.एस. यांचा मार्ग हा लोकशाही विरोधी आहे आणि मा. प्रधानमंत्री तर फार जुने संघाचे स्वंयसेवक आहेत आणि जर लेखकाला माहीत नसेल तर सांगतो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेड्यूल काष्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात बाबासाहेब म्हणतात की,. “आर.एस.एस. सारख्या प्रतिक्रियावादी संघटनेशी मी कधीच संबध ठेवणार नाही.” आणि मुळात आंबेडकरवाद आणि संघपरिवार हे एकमेकांच्या सोबत किंवा एका मार्गावर कधीच चालू शकत नाहीत याचे साधे उत्तर आहे की, दोन्ही संघटनांचा उद्देश परस्परविरोधी आहे. आता असे एखादे आर्टिकल लिहून जर लेखकाचा उद्देश असेल की, हा आंबेडकरी समाज आपल्या बाजुने होईल तर तो एक मोठा भ्रम आहे. आंबेडकरी नेते विकले जातील जसे इतर समाजाचे विकले जातात पण आंबेडकरी जनता कधीच विकली जाणार नाही ही जरा पक्की खूणगाठ बांधा म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. आज भारतात सर्वात जास्त विचार करणारी ,जास्त पुस्तके वाचनारी आणि लिहणारी तसेच समाजाला योग्य वेळी दिशादर्शक असणारी जनता आहे. आणि जे इतर बहुजन लोक आहेत जे विचारवंत ,लेखक पत्रकार आणि व्यख्याते आहेत त्यांना सुद्धा मार्गदर्शक म्हणजे डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्यच आहे. आजचाच एक प्रसंग माझ्यासोबत घडला तो फार विशेष प्रसंग आहे मी या गावात मागील २० वर्षापासून आहे. एक व्यक्ती फार गरीब आणि तो बर्याच वेळा मला रस्त्यात भंगार विकताना दिसतो आणि मला पाहिले की, तो जोरात जयभीम करतो. सर्व गावालाच माहीत आहे तो बर्याच वेळा रस्त्यावर दारू पिऊन जोरा-जोरात बोलतो बर्याच वेळा मी त्याला पाहिले आहे की, कधी कधी रस्त्यावर ट्राफिक जाम होते पण तो कुणाकडे लक्ष देत नाही आपले बोलत असतो. आज मला तो एका ठिकाणी शांत एका ठिकाणी बसलेला दिसला. पण तो मला जयभीम करायचे विसरला नाही. का कोण जाणे पण मला असे वाटले की, याला आपण काही पैसे द्यावेत आज वाटले पण यापूर्वी कधी नाही वाटले. मी मोटरसायकल थांबवली आणि मी त्यांना हाताने इशारा करून बोलावले आणि तो व्यक्ती माझ्याजवळ आला आणि मी त्याला १०० रुपये देत होतो तर म्हणाला नको “ असे पैसे घेऊ नये.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. म्हणजे आता निवडणुकीचे वातावरण आहे आणि त्यामुळे मी त्याला मतदान करावे म्हणून पैसे देत आहे असे त्याला वाटले. मग मी त्याला सांगितले की, मी प्रचार करीत नाही तर तुम्हाला चहा घेण्यासाठी पैसे देत आहे आणि मी शिक्षक आहे असे ऐकल्यावर मग त्याने पैसे घेतले. म्हणजे पहा जो व्यक्ती भंगार जमा करून काही पैसे मिळाले त्यावर आपले जीवन चालवतो त्याला जर एवढी लाख मोलाची गोष्ट माहीत आहे की, आपल्या मताची किंमत किती मोठी आहे. तर मग उच्च शिक्षित किती स्वाभिमानी असला पाहिजे. मी तर या आजच्या घटनेवर फार विचार करू लागलो आणि त्यामुळे आंबेडकरी समाज किती विचाराला बांधील आहे हे समजते.
आपल्या देशात संविधनाचा अंमल २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाला पण त्यागोदर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मोलाचा इशारा दिला होता. तो असा आहे की, “ ही लोकशाही व्यवस्था भारताने एकदा गमावली आहे . ती पुन: गमावणार काय ते मला सांगता येणार नाही. परंतु भारतासारख्या देशात लोकशाही ऐवजी हुकुमशाही येण्याचा धोका जास्त आहे. कारण ज्याठिकाणी लोकशाही व्यवस्था दीर्घकाळ अंमलात आलेली नसते,त्याठिकाणी ती एक अगदी नवी व्यवस्था मानली जाते. भारतासारख्या देशात असे होऊ शकेल. या नवोदित लोकशाहीत बाहयांग लोकशाहीचे तर अंतरंगात हुकुमशाही असे होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले तर दुसरी शक्ती (हुकुमशाही ) अवतीर्ण होण्याचा धोका जास्त आहे.” पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तो सुद्धा इशारा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे की, “ इतर कोणत्याही देशापेक्षा भारताने हा इशार लक्षात ठेवणे जास्त महत्वाचे आहे कारण भारतीय राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर देशाच्या राजकारणात थैमान घालत नाही. आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग म्हणून भक्तीचा हा मार्ग धर्मसंस्थामध्ये राहू शकतो. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा अधोगतीचा निश्चित मार्ग ठरतो आणि शेवटी देशाला हुकुमशाहीकडे नेतो.” आता भाजपा आणि डॉ. बाबासाहेब यांचा मार्ग कसा विरोधी आहे हे लेखकाला कांही घटना सांगितल्या तर थोडे लक्षात येईल. भाजपावाले म्हणतात की, मागील ७० वर्षात काहीच झाले नाही आता आम्ही विकास करणार. तर एक अल्पज्ञान असलेली अभिनेत्री म्हणते की, २०१४ ला देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले आणि आम्ही सर्व ऐकतो हे कशाचे द्योतक आहे. आणि मागील ७० वर्षात काहीच झाले नाही ते हे करणार आहेत याचा आपण एक वेगळा अर्थ घेतला तर बरोबर आहे . म्हणजे अशा काही घटना आहेत ज्या मागील ७० वर्षात कधीच झाल्या नाहीत. जसे नोटबंदीचा एवढा घाईत प्रयोग, सरकारी संपती विकण्याचा प्रयोग (जर कोंग्रेसने काहीच केले नाही तर तुम्ही विकता ते काय आहे?) , भारतीय संविधानाची प्रत दिल्लीत जाळली , एवढा जाती आणि धर्माचा प्रभाव , शेतकर्यांचा संप आणि ७५० पेक्षा जास्त शेतकरी मृत्यू पावले , नौकर कपात आणि नौकर भर्ती बंद , महागाई , प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य गमावले, आणि जे सरकार विरोधी बोलतील त्यांना अटक करणे , बहुजन समाजासाठीच्या बजेटमध्ये कपात , देशापेक्षा धर्माला महत्व , धर्मसंसदेचे राजकरणावर वर्चस्व, मागासवर्गीय आणि स्त्रियावर अत्याचार यात वाढ , शिक्षणाचे धार्मिकीकरण या सर्व बाबी संविधानाला धरून नाहीत तर विरोधी आहेत आणि त्यांना ह्या उघड उघड करता येत नाहीत आणि हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे आणि त्यामुळे त्यांना कळून गेले आहे की, संविधान आहे म्हणून आपणास आपल्या इच्छित गोष्टी करता येत नाहीत. याचा अर्थ हे संविधान विरोधी आहेत हेच स्पष्ट होत आहे.
भारतीय संविधांनानुसार कोणताही धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे आणि त्याचा वापर त्याने खाजगीरित्या घरात करावा पण आज आपण पाहतो की, निवडणूक आयोगाला आणि सुप्रीम कोर्टाला असे सांगावे लागले की, कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या धर्माचा वापर राजकारणात उघडपणे करू नये. इथे तर आता २०२२ ला एक हिंदू धर्मपरिषद झाली आणि त्यांनी जाहीर इतर धर्माचा द्वेष पसरवणारी विधाने केली आणि केंद्र किंवा राज्य यापैकी कोणीही यावर कार्यवाही केली नाही हेच काय यावर एखादी प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही. याचा अर्थ त्यांची याला मुक संमती आहे हे आता स्पष्ट झाले आहे. एखाद्या धर्माचे मंदिर बांधणे हा राजकीय पक्षाचा अजेंडा असतो हे सुद्धा पहिल्यांदा दिसले आहे म्हणजे २०२४ ला ते बांधकाम पूर्ण होईल आणि लगेच लोकसभा निवडणुका आहेत म्हणजे पुन्हा त्याचा वापर प्रचारासाठी करायचा आहे. कोणत्याही धर्माचे मंदिर असेल किंवा एखादे तीर्थस्थळ असेल ते एखाद्या सामाजिक काम करणार्या संस्थेने बांधले तर काही वाटणार नाही पण राजकीय पक्षच म्हणतो की, मंदिर वही बनायएंगे तर मग मुख्य अजेंडा लक्षात येतो. म्हणजे इथे लोक उपाशी मेले तर चालतील एखाद्या कोविड सारख्या आजारात उपचाराअभावी मेले तर चालतील , शिक्षण महाग झाले तर चालेल , रोजगार नाही मिळाला तरी चालेल , पिण्याचे आणि शेतीला पाणी नाही मिळाले तरी चालेल , वीज रस्ते नाही मिळाले तरी चालेल पण मंदिर मात्र झाले पाहिजे जणू आज सर्व समस्यांचे मूळ मंदिर आहे अशी लोकांची मानसिकता तयार केली आहे. अनेक कायदे जसे कृषि कायदे किती घाईत आणि लोकांना म्हणजे सदस्यांना विचारात न घेता पास केले म्हणजे सारा देश कोरोंनाच्या खाईत असतांना कृषी कायदे पास कारणे एवढे आवशयक होते का ? तर नाही पण पुढे पुन्हा परिस्थिती नॉर्मल झाली तर पुन्हा संवैधानिक प्रक्रिया पार पाडावी लागेल या भीतीने यांनी लगेच कायदे पास केले पण लोक आता जागृत झाले आणि अनेक महीने लोकांनी आंदोलन केले याला सुद्धा लोकांना संरक्षण संविधानाने दिले आणि लोक शेवटी यशस्वी झाले. विरोधी संसद सदस्यांना बोलू दिले जात नाही , त्यांचा आवाज बंद करण्यासाठी माइक बंद केला जातो , अनेक उच्च शिक्षित विचारवंतांना बोलू दिले जात नाही , लिहू दिले जात नाही आणि जर लिहले तर कार्यवाही करून जेल मध्ये बंद केले जाते , कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवायची आणि नाही मिळाली तर सरकार पाडून सत्ता मिळवायची आणि मग हे संविधनाचे समर्थक की, विरोधक हे एखाद्या लहान मुलाला सुद्धा समजेल.
भारतीय संविधान बहुजन समाजाला सत्ता आणि संपत्ती मध्ये प्रत्येकाचा वाटा किती आहे याची जाणीव करून देते आणि तो वाटा कसा मिळेल याची तरतूद आहे. आणि आर.एस.एस. अजेंडा याविरुद्ध आहे की, या बहुजन समाजाला मजबूर करून त्यांना संपत्तीहीन आणि लाचार करून टाकायचे की, ज्यामुळे पुढील अनेक वर्ष यांना सत्ता आणि संपत्ती मिळू शकणार नाही. आर.एस.एस. प्रमुख गोलवलकर यांनी त्यांच्या we and our nationhood identified या पुस्तकात स्पष्ट लिहलेले आहे की, “ जेंव्हा सत्ता आपल्या हातात येईल तेंव्हा सरकारने जंगल,धन,संपत्ती आपल्या जवळच्या दोन-तीन विश्वसनीय लोकांचा हातात आली पाहिजे. आणि 95%जनता भिकारी बनली पाहिजे आणि मग पुढे अनेक वर्ष सत्ता आपल्या हातून जाणार नाही.” आता मोफत रेशन हा त्याचाच प्रकार आहे. आज बहुजन समाजाच्या कोणत्याही समस्या असतील तर त्यांना त्यावर एकच उत्तर आहे असे वाटत आहे आणि ते म्हणजे भारतीय संविधान आणि त्यामुळे आता सर्व थरातून आवाज येत आहे की, आता भारतीय संविधान वाचले पाहिजे आणि प्रत्येक भारतीय माणूस आता संविधान वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आज आपल्या बहुजन समाजाचे हक्क आणि अधिकार सुरक्षित आहेत याचे कारण आपले संविधान आहे. आणि त्यामुळे आज सर्वात पवित्र आणि महत्वाचा जर कोणता ग्रंथ असेल तर भारतीय संविधान आहे. बहुजन समाजाने याकडे थोडा काळ दुर्लक्ष केले आणि त्यामुळे आपण आज हे परिणाम भोगत आहोत. मात्र आज आपल्याला सावध होऊन संविधान वाचवले पाहीजे. आणि यांना कोणी महापुरुष नाहीत त्यामुळे आपले बहुजन महापुरुष त्यांच्या विचाराचे आहेत असे आपल्या मनावर बिंबविले जात आहे हा लेख त्याचाच प्रकार आहे. आणि त्यांना सर्वात जास्त भीती ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आहे आणि ती आज जास्त वाढत आहे. आणि त्यामुळे पुतळे आणि स्मारके उभे करून आपली विचारशक्ती मारण्याचा हा डाव आहे एक विचारवंत असे म्हणतो की,
पुतले से डर , विचारोसे डर , किताबोसे डर ,ऊनके घर से भी डर |
दुनियामे सिर्फ एकही इंसान हुआ है , जिनके ना होनेसे उनके नाम पर भी डर है ||
प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
नाशिक (९४२३१८०८७६ )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत