दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपान

राजा राममोहन राय व सतीची चाल !

    बंगालमधील राजा राममोहन राय (२२ मे १७७२ ते २७ सप्टेंबर १८३३) हे आधुनिक काळातील सुधारक समजले जातात. विशेषत: , सतीची चाल बंद करणेबाबत त्यांनी फार प्रयत्न केले. 
      बंगालमध्ये सतीची चाल फार मोठ्या प्रमाणात होती. त्याचे कारण असे कि, बंगालमध्ये वारस म्हणून मिळालेल्या संपत्तीच्या वाटणीसाठी ‘दायभाग नियम’ प्रचलित होते. आपल्या देशात वारस संपत्ती वाटणीचे दोन कायदे आहेत, एक मिताक्षरी व दुसरा दायभाग ! दायभाग पद्धतीत मुलाच्या मृत्युनंतर सुनेला संपत्तीत वाटा द्यावा लागतो. तो देऊ लागू नये म्हणून बंगालमध्ये विधवा सुनांना मोठ्या प्रमाणात सती पाठवू लागले ! धर्माचा दुरूपयोग स्वार्थासाठी कसा करावा , याचे हे उत्तम उदाहरण आहे. 
  राजा राममोहन राय हे लहानपणी फार बोलके व वेगळा विचार मांडणारे होते. त्यांचे हे प्रागतिक विचार (अर्थातच , त्या काळाच्या तुलनेत !) व चुणचुणीत बोलकेपणा त्यांच्या मोठ्या भावजयीला खूप आवडायचा. हा आपला धाकटा दीर काही तरी वेगळाच आहे, असे तिला जाणवले होते. 
  काळाचा महिमा असा कि, राजा राममोहन राय यांचे मोठे बंधू वारले. गर्भश्रीमंत व खानदानी घराणे ! दायभाग नियमानुसार सुनेला संपत्तीचा हिस्सा देऊ लागू नये म्हणून या सुनेला सती पाठविण्याची तयारी चालू झाली. मात्र तिची सती जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. शिवाय आपले बोलके व प्रागतिक विचारांचे दीर (म्हणजे राजा राममोहन राय) मला वाचलतील, याची त्या भावजयीला पूर्ण खात्री होती. 
  ठरल्याप्रमाणे अंत्यसंस्काराची तयारी झाली. नववधूप्रमाणे साजशृंगार करुन व सर्व दागदागिने अंगावर लेऊन राजा राममोहन राय यांची भावजय जड अंतःकरणाने सरणावर जाऊन बसली. तिथे उपस्थित असलेले माझे दीर आपल्याला वाचवतील , असा तिला विश्वास होता. हा बोलका व बुद्धिमान दीर एक दोन चमकदार शब्द वापरुन माझा जीव वाचवेल, यांविषयी तिला खात्रीच होती.  
   मंत्राग्नि सुरू झाले. चिता पेटली. सरणावर बसलेली भावजय कानात प्राण आणून बोलक्या दीराच्या शब्दाची वाट पाहू लागली. पण दीर गप्प होते ! भावजयीला चितेच्या ज्वाला जाणवू लागल्या. अंगाला चटके बसू लागले. तरीही तिची जगण्याची आस संपली नव्हती ! शेवटी ज्वालांची धग असह्य झाल्यावर तिने जिवाच्या आकांताने चितेवरूनच आपल्या बुद्धिमान व बोलक्या दीराला हाक मारली , “भावोजी ! मला वाचवा !!” या हाकेने राजा राममोहन राय यांच्या काळजाचे पाणी झाले, परंतु ते आपल्या भावजयीला वाचवू शकले नाहीत ! मात्र आपल्या भावजयीची ही प्राणंतिक हाक आयुष्यभर त्यांच्या कानात घुमत राहिली व त्यामुळे ते सतीप्रथेचे विरोधक बनले ! लॅार्ड बेंटिकच्या कार्यकाळात झालेल्या १८२९ च्या सतीप्रथाविरोधी कायद्याची पार्श्वभूमी ही अशी आहे ! 
  सती जाताना विधवेला दागदागिन्यांसह साजशृंगार करायला लावीत. कारण सतीची राख सावडण्याचा अधिकार हा अंत्यविधी करणाऱ्या ब्राह्मणांना असतो. त्यामुळे चितेच्या ज्वालेने वितळून राखेत जमा झालेले सोने त्यांना मिळत असे ! सतीची चाल ही स्वत:ला वरिष्ठ समजणाऱ्या जातींतच होती, हेदेखील लक्षणीय आहे. ज्यांना स्वार्थासाठी साजीवंत स्वजातीय स्त्रियांना जाळताना व त्यांची राख सावडताना काही वाटले नाही त्यांना देवधर्माचे व विशेषतः बहुजनांच्या सुखदुःखाचे सोयरसुतक ते काय असणार ! 
  धर्माच्या नावाने आतापर्यंत ज्या स्त्रियांना सती जाण्यास भाग पाडले त्यांच्या असह्य वेदनांचा हिशोब कोण आणि कसा देणार आहे ? राजा राममोहन राय यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करीत असतानाच आपण सर्व जण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करु या 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!