दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

फक्त पारध्यांनाच नव्हे तर या पुरोगामी महाराष्ट्रातील महार, मांग, ढोर, चांभार, आदिवासी भटक्या जाती समुहांना पाण्यासाठी तडफडावं लागे, प्रसंगी चाबुकाचे आसूड !

सत्यघटना : दुपारचे जवळपास बारा वाजत आले होते. उन्हाचा पारा सुद्धा चांगला चढत होता. मी ही माझी छोटी मोठी कामे आटपून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थी स्मारक उस्मानाबाद चौक येथे थकून बसलो होतो.

तेवढ्यात जेमतेम 35 ची असलेली एक पारधी समाजाची महिला व तिच्यासोबत जवळपास पाच ते सहा वर्षाची मुलगी (कदाचित ते शासकीय रुग्णालयातून या ठिकाणी आले होते कारण त्यांच्या हातामध्ये दवाखान्याचे पेपर व मलम औषधी दिसत होती. ) तेथे आली. मी बसलेल्या खुर्चीच्या समोरच अवघ्या दोन-तीन फुटावर माय-लेकर बसले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती काय हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

दवाखान्यातून चालत येऊन थोड्यावेळ सावलीला बसल्यावर त्या महिलेने माझ्याकडे “पिण्यासाठी पाणी पाहिजे” असा इशारा करत स्वतःच्या लहान मुलीला माझ्याकडे पाठवलं. आणि म्हणाली की थोडसं प्यायला पाणी द्या ! तिची करूण याचना पाहून माझ्या मनात कालवायला सुरुवात झाली. खरंच आत्ताच्या क्षणी पाण्याचं मोल तिला माहीत होतं. त्यावेळी प्रभाकरला सांगितले की, प्रभाकर यांना पाणी ही दे आणि दोन चहा सुद्धा दे ! दोघांनी थंडगार सावली खाली बसून पाणी पिले आणि चहा सुद्धा घेतला. माझ्याही मनाला थोड बरं वाटलं.

खरं तर आज 21 व्या शतकामध्ये जीवन जगत असताना मनामध्ये थोडी सुद्धा कल्पना करवत नाही की, आपल्याला पिण्याच्या पाण्याला सुद्धा हात लावण्यास बंदी होती. खरंच त्या काळामध्ये या अस्पृश्यांची काय अवस्था होत असेल ! जीवन जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक असताना सुद्धा या अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हतं. त्यांची स्थिती काय होत असेल याची कल्पना करवत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातील कलम 17 नुसार अस्पृश्यता संपवली. परंतु तरीही सरकार आणि जातीवादी व्यवस्थेच्या आशीर्वादाने गावांमध्ये अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात पाळण्यात येते. त्या काळामध्ये जिथे पाणी पिण्यास बंदी होती तिथे बाकीच्या गोष्टीचा काय विचार करावा ! या बाबीचा विचार एस.सी/एस.टी प्रवर्गातील प्रत्येक जाती समूहाने करायला पाहिजे.

खरंतर पोस्ट लिहिण्याचा कारण असं की, आजच महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह दिवस आहे. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या अस्पृश्यांना समानतेचा हक्क मिळावा म्हणून चवदार तळ्याच्या पाण्याचा संघर्ष केला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना चांगल्या प्रकारे माहीत होते की,चवदार तळ्याचे पाणी पिल्याने आपण काय अजरामर होणार नाहीत. परंतु हजारो वर्षापासून इथल्या माणूस असलेल्या माणसांना केवळ अस्पृश्यतेच्या नावाखाली पाण्याला हात लावण्यास सुद्धा बंदी होती, ही विषारी विषमता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नष्ट करायची होती.

परंतु आता माझ्यासमोर जी बसलेली महिला होती, ती महिला पारधी समाजातून आहे. खरं तर गाव तिथे पारध्यांच्या मोठ्या वस्ती आहेत. त्यांचा सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक दर्जा काय याची आपल्या सर्वांना माहिती आहेच. काय पारध्यांना याची जाणीव आहे का की पाण्यासाठी सुद्धा प्रस्थापित व्यवस्थेशी त्यांच्या मागच्या पिढ्यांना किती संघर्ष करावा लागला असेल? पारध्यांनाच नव्हे तर याच पुरोगामी महाराष्ट्रात राहणाऱ्या महार मांग डोर चांभार घिसाडी आदिवासी भटक्या लोकांना आज आपल्याला सहजच उपलब्ध होणारे “पाणी” ते काही काळापूर्वी आपल्याला परवानगी घेऊनच घ्यावे लागत होते. काही लोकांना तर पाण्याला हात लावण्यास सुद्धा बंदी होती. याची थोडी सुद्धा जाणीव त्यांना आहे असं कदापी वाटत नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथे चवदार तळ्याच्या “पाण्याला” स्पर्श करून आम्ही सुद्धा माणूस आहोत याची जाणीव इथल्या सवर्ण मानसिकतेचा बुरखा पांगरलेल्या जातीवादी व्यवस्थेला करून दिली. परंतु मोठ्या दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज ही ज्यांना प्यायला पाणी मिळत नव्हतं ज्यांना विचारून पाण्याला हात लावावा लागत होता. ज्यांना वरून पाणी वाढले जात होते. पाण्यासाठी अहोरात्र हजारो वर्ष तडफडणाऱ्या जाती आत्ता सुद्धा प्रस्थापित जातीव्यवस्थेच्या जीर्ण अशा हिनकस रूढी परंपरेला चिटकून आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे.

माझ्यासमोर असलेल्या या पारधी महिलेच्या दिनवाणी जगण्यास कोण कारणीभूत आहेत ? याचे उत्तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु खुद्द पारध्याला मात्र याची थोडी सुद्धा जाणीव नाही. ही प्रचंड मोठी शोकांतिका आहे.

विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक 8600210090
जि. संघटक भारतीय बौद्ध महासभा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!