राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी कराया मागणीसाठी संविधान ग्रंथासह धरणे

राष्ट्रीय एकात्मता समिती, पुणे
अध्यक्ष- डॉ बाबा आढाव
26 जानेवारी1950 ते 26 जानेवारी 2025
भारतीय राज्यघटनेची 75 वर्ष, निमित्त
भावंडांनो,
26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेचा अमल सुरू झाला. त्याची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. यंदाच्या 26 जानेवारीला त्याला 75 वर्षे पूर्ण होतील. मात्र सध्या प्रजासत्ताक हे संबोधनापुरते राहिले आहे.
प्रजासत्ताकाचा गाभा असणाऱ्या कायदे मंडळाच्या निवडणुकांमध्ये अधिकृत, अनधिकृत पैशांचा प्रचंड वापर नुकताच झाला. निवडणुकीसाठी वापरली जाणारी ईव्हीएम मशीन ची पद्धतही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
निवडून आल्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि त्या पक्षाचे केंद्रातील सरकार यांनी घटनात्मक संस्था मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे. भल्या भुऱ्या सर्व मार्गाने विरोधकांची सरकारे पाडणे, त्यांच्या नेत्यांमागे तपास यंत्रणांचा ससेमीरा लावणे. प्रसार माध्यमांना जवळपास विकत घेणे. त्यातून सरकार विरोधी कसलीही बातमी येऊ नये याची पुरेपूर व्यवस्था करणे. महागाई बेरोजगारी शेतमालाला भाव न मिळणे शहरांचे बकालीकरण महिला, दलित, अल्पसंख्यांक यांच्यावर होत असणारे अत्याचार अशा प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून धार्मिक विद्वेष पसरवणे. अशा प्रकारांमध्ये सरकारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित सर्व संघटना कार्यरत आहेत. पंतप्रधानांनी अकरा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. संसदेत उपस्थित राहणे त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. सत्ताधारी पक्षच संसद चालू देत नाही.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सरकार व त्याच्या पक्षातील नेत्यांच्या पोटातले ओठावर आले, त्याचा अनुभव आपण नुकताच घेतला. या सर्व परिस्थितीत प्रजासत्ताकाच्या 75 वर्षांचा फक्त उत्सव साजरा करणे यापेक्षा प्रजासत्ताकाची व त्याचा आधार असणाऱ्या राज्यघटनेची त्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता, समाजवाद या मूल्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. याकडे लक्ष वेधण्याची कृती करणे ही काळाची गरज आहे. भारतीय संविधान हे भारतीय जनतेने स्वतःला अर्पण करून त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्वतः घेतली आहे.
म्हणून सरकारचे डोके ठिकाणावर ठिकाणावर आहे काय आणि राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे अशा जळजळीत शब्दात ब्रिटिश सरकारची संभावना ज्या लोकमान्य टिळकांनी केली. त्यांच्या पुतळ्यासमोर सरकारने डोके ठिकाणावर ठेवून भारतीय संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करावी . या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली जनतेचे धरणे आंदोलन होत आहे. या धरणे आंदोलनात आपणही सहभागी व्हा. या धरण्यात सहभागी होण्यासाठी येताना आपल्याकडे उपलब्ध असल्यास भारतीय राज्यघटनेची प्रत सोबत घेऊन या. कळावे,
वेळ- 26 जानेवारी 2025 सकाळी 10.30वा.
स्थळ – लो.टिळक पुतळा,म.फुले मंडई,पुणे
आपला,
नितीन पवार,मो. 9270432153
निमंत्रक,
राष्ट्रीय एकात्मता समिती, पुणे
आपण वरील निवेदनाची सहमत असाल तर आपले नाव टाकून हे निवेदन पुढे धाडावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत