लोकशाहीचा उंबरठा: जागरूकतेची आणि लढ्याची वेळ आली आहे”

लोकशाहीची ताकद ही फक्त निवडणूक प्रक्रियेत नसते, तर ती सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय समानतेच्या आधारावर उभी असते. पण भारतासारख्या देशात, जिथे संविधानाने सर्वांना समानता आणि स्वातंत्र्याचे हक्क दिले आहेत, तिथे संविधानविरोधी शक्तींच्या कटकारस्थानांनी या मूलभूत तत्त्वांना हादरवले आहे. परभणीच्या कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशीं यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूने व बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येने याचा आणखी गंभीर आविष्कार समोर आणला आहे. ही घटना फक्त एक दोन व्यक्तींची शोकांतिका नाही, तर संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करते.
👉सामाजिक विषमतेचा कट आणि परिणाम
नागपूरी प्रस्थापित आणि मनुवादी विचारसरणीने गेल्या काही दशकांत सामाजिक एकतेला आव्हान देणाऱ्या घटनांची निर्मिती केली आहे. धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या शक्तींनी समाजातील गटांमध्ये द्वेष पेरला. आज देशातील अनेक भागांतील हत्या, संघर्ष, आणि असहिष्णुतेच्या घटना ही त्यांची फळे आहेत.
शहीद नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्यावर झालेल्या हल्ल्यांपासून ते सोमनाथ सुर्यवंशी व संतोष देशमुख यांच्यापर्यंत पोहोचलेला हा रक्तरंजित मार्ग वैचारिकदृष्ट्या नपुंसक आणि षंढ प्रवृत्तीला अधोरेखित करतो. वैचारिक चळवळींचा सामना न करता, प्रतिकाराला हिंसेने दडपण्याचा प्रयत्न ही संविधानविरोधी शक्तींची कायरताच आहे.
👉आर्थिक विषमता: विषारी धोरणांची पेरणी
सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमतेने देशात संविधानाने ठरवून दिलेल्या लोकशाही तत्त्वांना धोका निर्माण केला आहे. शेती, कामगार, आणि मध्यमवर्गासाठी आधारस्तंभ असणाऱ्या धोरणांना खिळ बसवून देशातील श्रीमंत-गरिबांमधील दरी वाढवली गेली आहे.
कर्जाच्या सापळ्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत.
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सरकारी संसाधने लुटली गेली आहेत.
कॅगसारख्या संस्थांना निष्प्रभ करण्याचा कट उघड आहे.
ईव्हीएम च्या माध्यमातून मतांची चोरी करून हुकूमशाही सत्तेवर येत आहे
महागाईचा वणवा पेटवला जात आहे
ईलेक्टोरल बाॅन्डसच्या माध्यमातून खंडणीला अधिकृत केलें जात आहे
बहिण भावांच्या योजना आणून निवडणुकीत जो अनधिकृत पैसा वाटला जायचा त्याला सरकारी खर्चाने अधिकृत करुन मतदारांच्या डोळ्यांवर गांधार पट्टी बांधली जात आहे.
“रमी खेलो” नावाने जुगार अधिकृत केलें जात आहेत.
अशा अगणीत विविध प्रकारे समाजातील एका वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी दुसऱ्या वर्गाला वंचित ठेवण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे. आर्थिक विषमता ही राजकीय लोकशाहीसाठी थेट धोका बनली आहे.
👉राजकीय लोकशाहीचा ऱ्हास: बीडची घटना
राजकीय लोकशाही ही केवळ निवडणुकांपर्यंत सीमित राहिली तर ती लोकशाही नसते; ती केवळ सत्ताधाऱ्यांची सोय बनते. बीडच्या संतोष देशमुख यांची हत्या ही त्याच अधोगतीची साक्ष आहे. एका सरपंचासारख्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर झालेला हा प्राणघात संविधानाच्या तत्त्वांचा अवमान आहे.
जेव्हा गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त मिळतो, तेव्हा लोकशाहीचा आधार असणारे न्यायालय, पोलीस आणि प्रशासन अपयशी ठरतात. बीडमध्ये हेच घडले आहे. सत्तेच्या गैरवापरामुळे सामान्य जनतेचा आवाज दाबला जात आहे.
👉सावधान: क्रांतीचा इशारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, “सामाजिक आणि आर्थिक लोकशाही संपल्यास, राजकीय लोकशाहीचा अंत निश्चित आहे.” आज परिस्थिती अशीच आहे. सामाजिक विषमता वाढत आहे, आर्थिक विषमता तीव्र झाली आहे, आणि राजकीय लोकशाही निर्बंधित होत आहे.
जर संविधानवादी नागरिक जागृत राहिले नाहीत, तर भारतीय लोकशाहीचे पतन होईल आणि त्यानंतर येणाऱ्या क्रांतीचे स्वरूप फ्रेंच किंवा रशियन राज्यक्रांतीसारखे रक्तरंजित असू शकते.
👉उपाय: संविधानवादी चळवळ उभी करा
आजची वेळ ही आपल्या वैयक्तिक स्वार्थांच्या चौकटीतून बाहेर पडून संविधानाच्या मूल्यांसाठी लढा देण्याची आहे.
1. सामाजिक समानता प्रस्थापित करा: जाती-धर्माच्या भिंतींना मोडून एकात्मता तयार करा.
2. आर्थिक स्वातंत्र्य मिळवा: शेतकरी, कामगार, आणि मध्यमवर्गाला संविधानाने दिलेल्या हक्कांसाठी लढा द्या.
3. राजकीय जागरूकता वाढवा: सत्ताधाऱ्यांच्या पोकळ आश्वासनांना भुलण्याऐवजी त्यांच्या कृतींचे मूल्यमापन करा.
👉नवभारताची निर्मिती:
जर प्रत्येक नागरिक संविधानाच्या मार्गाने चालण्याचा निर्धार करेल, तर आपण केवळ समस्यांचे समाधान शोधणार नाही, तर खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीची पुनर्बांधणी करू शकतो. पण त्यासाठी साडी-माडी-गाडीच्या स्वार्थापलीकडे पाहण्याची गरज आहे.
“तथागतांच्या धम्मक्रांतीचे मार्गदर्शन घ्या, बाबासाहेबांच्या संविधानक्रांतीला उजाळा द्या, आणि एक नवी जागरूकतेची चळवळ उभी करा. अन्यथा रक्तरंजित क्रांतीसाठी तयार रहा.”
आता वेळ थांबून पाहण्याची नाही, तर कृतीची आहे. जागे व्हा, संघर्ष करा, आणि लोकशाहीचे रक्षण करा.
-कांबळेसर, बदलापूर ठाणे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत