दोन तरुण नेते .. सारखी पाऊले .. ! प्रा.रणजित मेश्राम



एका भाषणाची खूप चर्चा झाली म्हणून. दुसरे भाषण चर्चेत आले म्हणून. भाषणे ताजी आहेत. दोन्ही पूर्ण ऐकली. ती आवडली.
भाषणे रंगोटीची नाहीत. सहजतेकडे वळणारी आहेत. प्रार्थना करु, ती खरी निघावी.
एक भाषण होते कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे तर दुसरे बसपा नेते आकाश आनंद यांचे ! वेगवेगळ्या स्थळी !
आधी राहुल यांचे ऐकले. त्यांचे अकारण ‘हिन्दुस्थान’ उच्चारणे बाजूला ठेवून संदर्भावर (contents) लक्ष दिले. ते वेधत गेले. संदर्भात सातत्य होते. स्पष्टता होती. वेदनेच्या निकट होते. निदान देत होते.
कदाचित याचमुळे ‘या’ भाषणाची खूप चर्चा व स्तुती झाली असावी ! ‘समृध्द भारत फाऊंडेशन’ने आयोजित ‘राष्ट्रीय संविधान संमेलना’तील हे भाषण आहे.
राहुल म्हणाले, ‘हिन्दुस्थान कुठाय? देशातील नव्वद टक्क्यात की दहा टक्क्यात? हिन्दुस्थानला सुपर पॉवर करायचे ना ! मग ते कसे व्हायचे? तुम्ही नव्वद टक्क्यांना कोणत्याच क्षेत्रात येऊ देणार नाही. जन्माआधीच स्थाननिश्चिती करणार. ते न येण्याचा बंदोबस्त करणार.
केवळ दहा टक्के म्हणजे सुपर पॉवर होत नसते. मोदीजी तेच करीत आहेत.’
हे मी कालचे बोलत नाही. आजचे बोलतोय. आज हिन्दुस्थानात ५० टक्के पिछडा, १५ टक्के दलित, ८ टक्के आदिवासी, १५ टक्के मायनारिटी व ५ टक्के जनरल गरीब आहे. हिन्दुस्थान त्यांचा आहे. असून त्यांचा नाही. तेच जीवनाच्या कोणत्याच क्षेत्रात नाहीत. येऊ देत नाहीत.
खोटे असेल तर जनगणना होऊन जाऊ द्या. खरेखोटे कळून जाईल.
आर एस एस चे लोक मात्र सर्व संस्थात भरुन टाकले असे सरळ सांगत राहुल गांधी पुढे म्हणाले, संविधानाने कोटींची दारे उघडली. तीच बंद करु पाहतात. संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे ट्रांसफर ऑफ राईट्स, एव्हढेच नाही ! ते ट्रांसफर ऑफ पाॅवर, ऍसेटस, वेल्थ आणि स्कील्स पण आहे. ते तसे हस्तांतरण ९० टक्क्यांना झालेच नाही.
‘बात अच्छी लगे ना लगे. ये सोशल रिएलिटी भी है. ये सच्चाई भी है’
३ हजार वर्षात समाज बदलाच्या बऱ्याच चळवळी झाल्या. काही ज्ञात आहेत. काही अज्ञात आहेत. यात सर्वात यशस्वी काय असेल तर ते भारताचे संविधान आहे. यात ९० टक्क्यांच्या भागिदारीची शास्वती आहे. हे संविधान आंबेडकरजींनी निर्मिले असले तरी यात गांधीजी .. पेरियार .. बसवण्णा .. बुध्दा यांची 'सोच' आहे.
अशाच आशयाचे अधिक स्पष्ट व आश्वासक भाषण राहुल गांधी यांनी केले.
शेवटी संपवितांना ‘कांग्रेसने चुका केल्या. कांग्रेसला बदलावे लागेल’ असेही सांगितले.
भाषण संपविण्याआधी मात्र ते म्हणाले, भारत जोडो यात्रेने मला खूप दिले. राजकीय स्पष्टता दिली. यापूढे ९० टक्क्यांची हमी संधी हीच माझी राजकीय दिशा असेल.
हे सांगत असतांनाच त्यांनी मोदींचा समाचार घेतला. ते म्हणाले, मोदीजी स्वतःला राजा समजतात. ते पंतप्रधान नाहीत. ते राजा आहेत. सारे निर्णय स्वतःच घेतात. संविधानिक संस्था त्यांचेसाठी काहीच नाहीत.
पण, हे सर्व बदलेल. राजे रिकामे होतील. हे नक्की आहे. लिहून घ्या. असेही राहुल गांधी म्हणाले.
विशेष म्हणजे दोन्ही भाषणे उत्तर प्रदेशातील आहेत. राहुल गांधी यांचे भाषण लखनौ येथील आहे. १० मे चे.
त्याचदरम्यान आकाश आनंद यांचे आहे. प्रचार सभेतील. ते बसपा उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलत होते. जे त्यांना ‘नासमझ’ (अपरिपक्व) ठरवून गेले.
भाषणानंतर बहनजींनी आकाश ला तात्काळ पदमुक्त केले. आता आकाश आनंद हे उत्तराधिकारी वा राष्ट्रीय समन्वयक नाहीत.
ते काय म्हणाले ? ते म्हणाले, या कमल का फुल वाल्यांनी देशाचा चिखल केलाय. यांना आधी हटवा. चुकून परत आले तर भीकेचे ढोबर हातात देतील. वरुन हा नवा रोजगार असल्याचे सांगतील.
जे भजी तळायला रोजगार म्हणतात ते काहीही म्हणतील.
केलेला एक तरी वादा यांनी पूर्ण केला काय असे विचारुन आकाश म्हणाले, ८० कोटी जनतेला फुकट राशन देण्यासारखी लाजीरवाणी बाब नाही. तिही हे अभिमानाने सांगतात.
३० लाख पदे केंद्रात रिक्त असतांना हे भरत नाहीत. काय समजावे. यांना ती पदे जाणीवपूर्वक भरायची नाहीत.
आपणास यांना कायमचे गरीब, भीकारी ठेवायचय. वरुन फुकट राशन द्यायचाय.
यू पी सरकार वर वार करतांना आकाश आनंद म्हणाले, हे 'तरक्की' चे नव्हे 'तबाही' चे सरकार आहे. यूपी त दररोज एक शेतकरी आत्महत्या करतो. ४० टक्के ५ वर्षांखालील मुले कुपोषित आहेत. यौनशोषणाचे गुन्हे सर्वाधिक आहेत.
याशिवाय पंतप्रधानाचे वाराणसी हे सांसदीय क्षेत्र ‘किडनॅपिंग कॅपिटल’ म्हणून प्रसिद्ध झालय.
आकाश आनंद शेवटी म्हणाले, आज कांग्रेस जे वादे करते ते वादे, जिथे त्यांची राज्यसरकारे आहेत तिथे पूर्ण करायला काय अडचण होती ?
समाजवादी पक्ष ‘रिझर्व्हेशन इन प्रमोशन’ या मुद्यावर राज्यसभेत विरोध करतो याकडेही लक्ष वेधले.
मात्र, दोन्ही भाषणात, दोन्ही युवक नेत्यांच्या विचार करण्याकडे एक निश्चित दिशा दिसतेय.
४ जुन ला राजकीय ढगाळता अधिक स्पष्ट होईल !
० रणजित मेश्राम.. (लेखक जेष्ठ विचारवंत आहेत)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत