संस्कृतीचे स्वातंत्र्य आणि धर्माची गुलामी.

स्वातंत्र्य आणि गुलामी यापैकी एकाची निवड करा,असे म्हटले तर माणूस निश्चितच गुलामी नको स्वातंत्र्य हवे,असेच म्हणेल.कारण निसर्गतः माणसाला स्वातंत्र्यच आवडते,याचे कारण माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे,त्यामुळे त्याला आपल्यातील अंगभूत क्षमता,शक्ती,कौशल्य,कला,या गुणांना वाव संधी मिळावी अशी त्याची अपेक्षा असते,कारण या सुप्तगुणांच्या आधारे आपला मानसिक बौद्धिक भौतिक विकास होतो,हे त्यास माहीत असते.प्रगती विकास साठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते.
मला माझ्या आवडीनुसार आणि विचारानुसार जीवन जगावे असे वाटते,म्हणजेच यासाठी मी काय खावे ,काय खाऊ नये,कोणता पोशाख करायचा,घर कसे असावे, केस कसे ठेवावेत ? अलंकार कोणता करायचा ? की ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही,असे सांस्कृतिक जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मला हवे,ही माझी रास्त व योग्य मागणी आहे.असा विचार येणे हे साहजिकच आणि नैसर्गिकच आहे.अर्थात ही संस्कृती ही त्या त्या भौगोलिक क्षेत्र आणि वातावरणानुसार निर्माण होत असते,संस्कृतीची जडण घडण होत असते.
धर्मांचा उदय झाला नव्हता त्यावेळी पृथ्वीवर फक्त संस्कृतीच होती. जगात ग्रीक इजिप्त सिंधू द्रविड इत्यादी फक्त संस्कृती निर्माण झाल्या होत्या.आधी मानवी संस्कृती निर्माण झाल्या,आणि नंतर देव ही संकल्पना अस्तित्वात आली,त्यानंतर देवाची आराधना म्हणून धर्म ही संकल्पना अस्तित्वात आली,म्हणजेच धर्माआधी देव आणि देवाआधी संस्कृती असा मानवी आविष्कार म्हटला पाहिजे.
या आधी सांगितल्यानुसार विविध पृथ्वीतलावर मोजक्याच पण विविध संस्कृती निर्माण झाल्या,त्या विविध का ? याचे कारण भौगोलिक रचना आणि हवामान यानुसार विविधता दिसते.जसे की थंड बर्फाळ प्रदेशातील लोकांचा पोशाख खान पान गाणी डान्स गिते ही अंगात उष्णता निर्माण करणारी , उष्ण प्रदेशातील लोकांचे कपडे ,खानपान, गाणी डान्स गिते ही अंगात थंडी निर्माण करणारी,तर समशीतोष्ण वातावरणातील लोकांचा पोशाख खानपान गाणी डान्स गिते ही समतोलपणा राखणारी अशी विविध संस्कृती निर्माण झाली.आदिवासी तर फक्त लंगोटीवरच दिसतात.याचे कारण भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण हे होय.म्हणून संस्कृतीत विविधता निर्माण झाली.याचा अर्थ निसर्गाचा हा परिणाम होय.निर्मिती होय.
सर्व संकस्कृतीत एक साम्यता दिसते ती ही की,माणूस आधी ईश्वरपूजक नव्हता कारण अजून ईश्वर ही संकल्पना त्यास सुचली नव्हती,तेंव्हा माणूस निसर्गपूजक होता,वृक्ष,अग्नी,जल, सुर्य,चंद्र,पशु,पक्षी ज्याचे उपकार मानवी जीवन जगण्यासाठी आहेत,त्यांच्या उपकाराची फेड म्हणजेच कृतज्ञ भावना म्हणून तो निसर्गाची पूजा करीत होता,तसेच वारा,अग्नी,पाऊस यांच्या प्रलयाने आणि वाघ सारख्या प्राण्यांच्या भीतीने त्यांची पूजा पण माणूस करू लागला,याचे कारण स्वतःला वाचवण्यासाठी.अर्थात ते अद्न्यानच होते.पण त्याला वाटे की,यांची पूजा केल्याने संकटे टळतील,याचा अर्थ असा निघतो की,माणूस भीतीमुळे अंधश्रधा पाळू लागला.ही भीती गेली की,अंधश्रद्धा जाते.
हजारो वर्ष माणूस देव आणि धर्माशिवाय केवळ संस्कृतीच्या आधारेच जीवन जगला.जेंव्हा ईश्वर आणि त्यानंतर धर्म ही संकल्पना पुढे दृढ झाली,तेंव्हा ही मुलसंकृती सोडून माणूस धर्म संस्कृतीचा स्वीकार करू लागला.आणि इथेच संस्कृतीचे स्वातंत्र्य संपले.माणूस धर्माचा गुलाम झाला.कारण धर्माची जी संस्कृती ( खानपान,पोशाख,केशभूषा, गाणी,डान्स,गीते,रूढी परंपरा,सण वार ) याचे बंधन धर्माने लादले.ईश्वराची आराधनाच्या पद्धतीत पण विविधता म्हणजेच धर्म निर्माण केल्या गेले.आणि धर्माच्या आचरणाशिवाय व्यतिरिक्त आचरण म्हणजे धर्म भ्रष्टता ,म्हणजेच भ्रष्ट आचरण,म्हणजेच अपवित्रता ,म्हणजेच पाप अशा संकल्पना निर्माण करण्यात आल्या.ईश्वरास न मानणे,त्यावर श्रद्धा न ठेवणे म्हणजे नास्तिकता,नास्तिकता म्हणजेच काहीतरी भयंकर आचरण,विचित्र संस्कृती असा प्रचार धर्माच्या ठेकेदारांनी,देवाचे मध्यस्थानी,केला.जे चुकीचे आहे.
यासर्व गोष्टीमुळे माणूस आपली बुद्धी विवेक हरवून बसला,म्हणून त्याने आपला संस्कृती च्या स्वातंत्र्याचा हक्क गमावला,आणि धर्माच्या संस्कृतीचा गुलाम झाला.म्हणजेच धर्माची गुलामी त्याने शिरसावंद्य मानले.
जो माणूस बुद्धिवादी,विवेकवादी, विज्ञानवादी,मानवतावादी,समतावादी नाही तो एक तर मालक म्हणून जगणार,नाहीतर मालकाचा गुलाम म्हणूनच जगत असतो,हेच सत्य.
लेखक : दत्ता तुमवाड,सत्यशोधक समाज नांदेड.दिनांक : 6 मे 2025.फोन: 9420912209.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत