नागपूरमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

मराठी भाषा – लिपी – साहित्याच्या उगम – वास्तव- डॉ. मिलिन्द जीवने ‘शाक्य’

मराठी भाषा – लिपी – साहित्याच्या उगम – वास्तव – अभिजात दर्जा महा विवाद आणि बुध्द संदर्भ विचारवाद प्रभाव : एक गंभीर अवलोकन …!
डॉ. मिलिन्द जीवने ‘शाक्य’ नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

     मराठी साहित्य - आंबेडकरी साहित्य  / बौध्द साहित्य असा सत्तावाद - मानवी मुल्य धारा हा गंभीर विवाद असतांनाच, मराठी भाषा ह्या क्षेत्रातही ब-याच अशा विविध साहित्य प्रकारांचा जन्म झाला. उदाहरणार्थ  - व-हाडी साहित्य, झाडीबोली साहित्य, आदिवासी साहित्य, विद्रोही साहित्य, संत साहित्य इत्यादी इत्यादी. आणि त्या विविध साहित्य प्रकारावर सविस्तर चर्चा आपण पुढे तरी करु यां. आणि मागिल एका महिन्यांपासून ह्या महत्वपूर्ण विषयावर मी माझे स्पष्ट विचार लिहावे असा माझा मानसही होता. "कारण मराठी भाषा - लिपी - साहित्य उगम - विकास आणि विवाद ह्या संदर्भात खुप काही लिहिले गेले आहे. आणि काही ब्राह्मणी साहित्यिक - विचारवंतांचे लिखाण हे तर एकांगी अशा स्वरूपात दिसुन आले. परंतु मराठी भाषा - लिपी - साहित्याचा खरा उद्गाता कोण ?" हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. जसा "प्राचिन भारताचा इतिहास" हा "ब्राम्हणी असत्यधारेचा इतिहास" आहे...! आणि "संशोधनातुन येणारे सत्य" हे अलग असणारे आहे. "सरस्वती" ही विद्येची देवी ! पण तिचे शैक्षणिक क्षेत्रात योगदान काय ? हा अहं प्रश्न आहे. "आंबेडकरी / बौध्द साहित्यिक - विचारवंतांनी" मराठी भाषा - लिपी - साहित्य उगम संदर्भात खुप फारसे असे काही संशोधन लिखाण केलेले दिसुन येत नाही. माझे हे स्वत: चे विचार मी खुप मोठा साहित्यिक / समिक्षक आहे म्हणुन नसुन ते "केवळ आणि केवळ एक अभ्यासक" म्हणून लिहिले आहेत. तेव्हा तमाम मराठी भाषी नामांकित साहित्यिक मंडळींनी / आंबेडकरी - बौध्द साहित्यिक मंडळींनी हा विषय सहज घ्यावा इतकेचं माझे म्हणणे आहे.
     भारतीय भाषा - लिपी असो वा मराठी भाषा - लिपी ह्या विषयाच्या अंतरंगात जाण्याच्या आधी आपल्याला "प्राचिन भारताचा इतिहास - सिंध घाटी सभ्यता वा हडप्पा संस्कृती" ह्या विषयाकडे जाणे गरजेचे आहे. सिंध घाटी आद्य संस्कृतीला तिन भागांमध्ये विभाजित करावे लागेल. पुर्व हडप्पा संस्कृती (कालखंड इ.पु. ७५०० - ३३००) / हडप्पा संस्कृती वा पहिले नागरीकरण (कालखंड इ. पु. ३३०० - १५००) / परिपक्व हडप्पा संस्कृती (कालखंड इ. पु. २६०० - १९००). तसेच प्राचिन आद्य तिन युगाकडे जाणे ही गरजेचे आहे . पाषाण युग (पुरा पाषाण युग कालखंड इ. पु. २५००० - १२००० / मध्य पाषाण युग कालखंड इ. पु. १२००० - १००००) / नव पाषाण युग कालखंड इ. पु. १२००० - ३५००) / कांस्य युग कालखंड इ. पु. ३३०० - १२०० / लौह युग कालखंड इ. पु. १२०० - ५५० ह्या "प्राचीन कालखंडाचा संदर्भ हा केवळ प्राचिन भारत संदर्भात नसुन तो विश्व इतिहास संदर्भित आहे." भुवैज्ञानिक अरुण सोनकिया ह्यांनी तर मध्य प्रदेश स्थित नर्मदा नदी काठावर (हथनोरा गाव) येथुन "३ - ५ लाख इसा पुर्व आदी मानवाची खोपडीचा" शोध लावला. सदर मानव खोपडी ही प्राचीन "होमो इरेक्टस" श्रेणी प्रजातींची होती. ती "अति प्राचिन खोपडी" मला अति जवळुन बघण्याची आणि हाताने स्पर्श करण्याची ही संधी मिळाली. असो. आता आपल्याला उपरोक्त विषयाच्या अंतरंगात जावे लागेल. "विदेशी वैदिक आर्य" ह्यांचे प्राचिन भारतात आगमन "कालखंड हा इ. पु. १५०० - ६००" दरम्यान समजला जातो. बुध्द कालखंड हा इ. पु. ५६३ - ४६३ आणि "मौर्य साम्राज्याचा" कालखंड हा इ. पु. ५४४ - १८५ राहिलेला आहे. रामायण ह्याचा कालखंड इ. पु. ८३२३ आणि महाभारत कालखंड हा इ. पु. ५२०० असा सांगितला जातो. जर "विदेशी वैदिक आर्य" ह्यांचे प्राचीन भारतात आगमन हे इ. पु.  १५०० - ६०० (लौह युगामध्ये) ह्या दरम्यान इतिहास सांगत असतांना "रामायण / महाभारत" ह्या महाकाव्याचे अस्तित्व हे आधी कसे ? हा मुख्य प्रश्न आहे. आणि "रामायण / महाभारत" हे केवळ "महाकाव्य" (साहित्य) आहेत. ते "धर्म ग्रंथ" नाहीत. आणि तेव्हा "भाषा - लिपीचा" शोध ही नव्हता. मध्यप्रदेश स्थित भीमबेटका (भोपाळ) हे स्थळ "प्राचिन पाषाण युगाचा" इतिहास बयाण करतो. भीमबेटका ह्या पाषाण युग कालीन प्राचिन भारत स्थळाला मी माझ्या परिवारासह अभ्यास भेट दिलेली आहे.
  प्राचिन "बुध्द साहित्य" लिखाण संदर्भात चर्चा करतांना ब-याच बौध्द साहित्यिक ह्यांच्या लिखाण संदर्भात चर्चा पुन्हा कधी तरी करू या. परंतु बोधिसत्व अश्वघोष आणि ब्राह्मण कवि कालिदास ह्यांचा कालखंड समजून घेणे गरजेचे आहे. बोधिसत्व अश्वघोष (इ. पु. १५०) ह्यांनी प्रथम - द्वितीय शतकात "बुध्दचरित्रम् / सौदरानंद / वज्रसुचि / सारिपुत्त प्रकरण" सारख्या  रचना लिहिलेल्या आहेत. ते "बौध्द दार्शनिक / नाटककार / कवि / संगितकार / कुशल वक्ता" ही होते. आणि अश्वघोष ह्यांच्या साहित्यात "सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / दर्शन शास्त्र / नैतिकवाद" ह्याची अनुभुती दिसुन येते. आणि ते राजा कनिष्क ह्यांच्या दरबारात कवि ही होते. तर कालिदास हे "चतुर्थ शताब्दी" काळात उज्जयिनी राजा विक्रमादित्य ह्यांच्या दरबारात कवि होते. दुसरे म्हणजे कालिदास ह्यांनी मेघदुतम् / कुमार संभव / ऋतुसंहार / रघुवंश सह  ४० रचना लिहिलेल्या आहेत. आणि कालिदास ह्यांच्या रचना ह्या "भोगवाद" भावाची अनुभुती करतांना दिसुन येते. "साहित्यातील भोगवाद ही ब्राम्हणी धर्माची जननी आहे." असे ही म्हणता येईल. अर्थात कालिदास ह्यांना "संस्कृत आद्य कवि" म्हणने उचित नाही. तर बोधिसत्व अश्वघोष हेच केवळ संस्कृत - पाली आद्य कवि आहेत.
  मराठी भाषी - "संत अभंग" ह्या संदर्भात चर्चा होत असतांना ब्राम्हण धर्मीय - ज्ञानेश्वर महाराज (ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी) ह्यांच्या अभंगाना "मैलाचा दगड" म्हणून गौरविण्यात येते. कारण शेवटी ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मणी व्यवस्थेला शरण गेलेले असतात. परंतु शिंपी जातीचे असलेले - नामदेव महाराज (नामदेव दामा रेळेकर) ह्यांना मात्र दुर्लक्षित केले जाते. ज्ञानेश्वर महाराज ह्यांचा जन्म २२ ऑगष्ट १२७५ रोजी आपेगाव - पैठण येथे झाला. संत नामदेव महाराज ह्यांचा जन्म संत ज्ञानेश्वर ह्यांंच्या ही आधी २६ आक्टोंबर १२७० रोजी ग्राम नारसी - हिंगोली येथे झाला. आणि त्यांनी २५०० अभंग रचना लिहिलेल्या आहेत. नामदेव महाराज हे पंढरीचे पांडुरंग - बुध्दाला आपले खरे आदर्श मानतात. नामदेव महाराज म्हणतात - "बुध्द अवतारी आम्ही झालो संत | वर्णावया मात नामा म्हणे ||" आणि त्यांच्या नंतरचे झालेले अन्य संत - महार समाजाचे संत चोखामेळा (१३०० - १४००) / वाणी समाजाचे तुकाराम महाराज (१६०८ - १६५०) - तुकाराम बेल्होबा अंबिले मोरे / संत तुकाराम महाराज ह्यांचे अभंग कागदावर उतरविणारे त्यांचे तेली समाजातील मित्र संताजी जगनाडे महाराज / ब्राह्मण धर्म समाजातील संत  एकनाथ/ नामदेव महाराज ह्यांच्या परिवारातील संत जनाबाई / ब्राह्मण समाजातील महापति बुवा / सोनार जातीचे संत नरहरी सोनार / महार जातीच्या संत चोखामेळा ह्या परिवारातील संत सोयराबाई (पत्नी), संत निर्मलाताई (बहिण), तसेच संत कर्ममेळा (भाऊ) ही सर्वचं मंडळी नामदेव महाराज ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवून "बुध्द धर्म चळवळ" त्यांच्या वैचारिक स्तरावर पुढे हाकतांना दिसतात. "ही संत मंडळी पंढरपुरी विठोबा हे बुध्द असल्याचा बोध करतात." ह्या संतांनी बुध्दाच्या संदर्भात लिहिलेल्या काही अभंगांची चर्चा पुन्हा कधी तरी करु यां. ब्राह्मण धर्मीय - रामदास महाराज(१६०६ - १६६२) ह्यांनी संसाराबद्दल लिहिले कि "संसार मुळीचा नासका | विवेक करावा नेटका ||" तरीही मात्र रामदास स्वामींना महान केले जाते. आणि तुकाराम महाराज हे जेव्हा बुध्दाच्या संदर्भात म्हणतात - "बौध्द अवतार माझिया अदृष्टा | मौन्य मुखे निष्ठा धरियली ||"  दुस-या एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात - "नावे रुपे अंगी लावला विटाळ | होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध ||" तेव्हा मात्र ब्राह्मणी व्यवस्थेला खुप त्रास होतो. शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराज ह्यांना आपले गुरू मानतात. छत्रपती शिवाजी महाराज हे तर नांदुरकी वृक्षाखाली ध्यानस्थ संत तुकाराम महाराज ह्यांचे आशिर्वाद घेऊन ते कार्याला सुरुवात करतात. ब्राम्हण वर्ग ही गोष्ट मात्र लपवुन ब्राह्मणी संत - रामदास स्वामी ह्यांनाचं छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे गुरु म्हणून प्रचार करतात. शके १११० मध्ये (?) मुकुंदराजांनी रचलेला "विवेक सिंधु" हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे, असे सांगितले जाते. परंतु शिंपी समाजाचे - नामदेव महाराज" हे मराठी भाषी आद्य कवि" संबोधिले जात नाही. ह्या कारणांचा शोध घेणे फार गरजेचे आहे.
  मराठी भाषेचा उगम उत्तरेकडुन (सातपुडा रांगापासुन कावेरीच्या पश्चिमेकडे आणि उत्तरेस दमणपासुन दक्षिणेस गोव्यापर्यंत विस्तार) असे सांगतांना तिला "आर्यांची भाषा" कां म्हटलेले आहे ? हा प्रश्न आहे. कारण मराठी भाषा ही "पुर्व वैदिक / वैदिक / संस्कृत / पाली / प्राकृत" अशा अपभ्रंश टप्पातुन उत्क्रांत होत गेल्याचेही म्हटलेले आहे. मराठी भाषेतील पहिले वाक्य हे - "श्री चामुण्डेराये करविले" इ. स. १०३९ शके ९०५ मध्ये अंकित असुन ते कर्नाटक ह्या राज्यातील "श्रवणबेळगोळ शिलालेख" येथिल असल्याचे म्हटलेले आहे. तर दुसरीकडे सोलापूर शहराजवळील "हत्तरसंग कुडल" ह्या गावी इ.स. १०१८ शके ९४० साली मराठी भाषेचा "पहिला शिलालेख " सापडल्याचे विषद केले आहे. ह्या शिलालेखात "स्वस्ति श्री शके ९४० कालायुक्त सवंत्सरे माघ कधतुळिकाळ छेळा" ही अक्षरे अंकित असल्याचा दावा केला आहे. ह्या विवादात पुन्हा भर म्हणून रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका स्थित अक्षी ह्या गावात इ. स. १०१२ साली कोरलेला "पहिला मराठी शिलालेख" सापडल्याचे विषद आहे. तेव्हा "मराठी भाषेचा पहिला शिलालेख " खरा कोणता ? आणि कोणत्या कालखंडात मराठी भाषेचा उगम झाला आहे ? हा नेहमीच विवादाचा विषय राहिलेला आहे. सोबतचं तो संशोधनाचाही विषय आहे. तेव्हा सदर शिलालेखातील मराठी लिपीचा अर्थ भाव पुढे कधी तरी चर्चा करु या. अर्थात मराठी ह्या लिपीवर "ब्राह्मण अधिपत्य" असा विचार आपण मान्य करावे काय ? आता खरा प्रश्न आहे. आणि "शिलालेख संकल्पना" ही तर "बौध्द काळाची देणं" आहे. शिलालेख ह्या नंतर उदयास आलेला "ताम्रपट" ही जरी महत्वाची साक्ष असला तरी, हा महान चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांच्या शिलालेखाचा प्रभाव तो सांगुन जातो. इतकेच नाही तर ब्राह्मण धर्मीय - मुकुंदराज / ज्ञानेश्वर महाराज ह्यांना मराठी भाषी आद्य कवि संबोधिले आहे. आणि शिंपी समाजाचे नामदेव महाराज ह्यांना इतिहासाचा विसर होतो. अखंड प्राचिन भारताच्या इतिहासात "शिलालेखाचे खरे जनक" हे चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य ह्यांना मानलेले जाते. आणि "मौर्य साम्राज्याचा कालखंड हा इ. पु. ५४४ - १८५" असा राहिलेला आहे. जेव्हा आपण "शिवाजी महाराज कालखंडातील शिलालेख " (इ.स. १६७४ - १६८०) ह्याकडे वळत असतो, तेव्हा शिलालेखात "मराठी ऐवजी संस्कृत" भाषेचा उल्लेख दिसुन येतो. तेव्हा मात्र शिवाजी महाराज ह्यांच्या काळातील "ब्राह्मणी प्रभाव" हा समजुन घ्यावा लागणार आहे.
   आता भारतातील तमाम "प्राचिन लिपी" ह्या विषयावर आपण चर्चा करु या. "पहिली लिपी म्हणुन ब्राम्ही लिपी" (इ. पु. पाचवी सदी ते इ. पु. ३५०) बोध हा चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांच्या शिलालेख अध्ययनातुन तो दिसुन येतो. ब्राम्ही लिपी नंतर ती दोन भागात विभागल्या गेली - "उत्तरी धारा / दक्षिणी धारा." उत्तरी धारामध्ये "गुप्त लिपी / कुटिल लिपी / शारदा लिपी / देवनागरी लिपी ह्या लिपीचा समावेश होतो. तर दक्षिणी लिपीमध्ये "तेलगु / कन्नड / तामिल / कलिंग / ग्रंथ / मध्य देशी / पश्मिमी लिपी" ह्या लिपीचा समावेश होतो. ब्राम्ही लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जात असे. त्यांनंतर आलेली "खरोष्टी लिपी." ही पश्चिमोत्तर क्षेत्रात आढळुन येणारी आणि "उजवीकडुन डावीकडे" लिहिली जात असे. आणि ह्या लिपीला विदेशी लिपी सुध्दा बोलल्या जातांना दिसते. ह्यानंतर चर्चा करु या - "कुटिल लिपी." ह्या लिपीमध्ये प्रतिक चिन्हांचा प्रयोग दिसुन येतो. "भीमबेटका शीलालेख" (भोपाल) ह्याची ती साक्ष आहे. "देवनागरी लिपी" - (आठवी शताब्दी) ही "डावीकडून उजवीकडे" लिहिली जाणारी ती एक लिपी आहे. आणि "वैज्ञानिक लिपी ध्वनी / अक्षरांचे उत्कृष्ट समन्वय" ह्यात असल्याने "भारतीय संविधानाने" ह्या लिपीला संविधानिक मान्यता मिळालेली आहे. "शारदा लिपी" - (आठवी शताब्दी) ही कश्मीर प्रांतात सिध्द मातृका लिपीपासुन विकसित झाल्याचे हे बोलल्या जाते. "गुरुमुखी लिपी" - शिखांचे दुसरे गुरु अंगद ह्यांनी पंजाबी भाषेतुन "गुरु ग्रंथ साहिबाचे" संकलन केल्याचे विदित आहे. "ग्रंथ लिपी" - दक्षिण भारतात (तामिळनाडू) पल्लव / पांड्य / चोल ह्या शासका वर्गानी ह्या लिपीला विकसित केल्याचे सांगितले जात आहे. "तेलगु आणि कन्नड लिपी"- ह्या लिपीचा उगमस्थान एकचं असुन चालुक्य कालिन शिलालेख (हले बिड) ह्याची ती साक्ष देतो. "शाहमुखी लिपी" - सुफी लोकाकडुन ती प्रयोगात आलेली इराणी लिपीचे ते पंजाबी संस्करण आहे. "मोडी लिपी"- यदुवंशी लोकांनी हिचा उगम केल्याचे बोलल्या जाते. सदर लिपीच्या उगम संदर्भात मतभेदही असु शकतात. परंतु भारतातील सदर लिपीच्या अध्ययनातुन "मराठी लिपीचा उगम" निष्कर्ष काढणे शक्य आहे काय ??? हा सुध्दा आपल्या समोर एक प्रश्न आहे.
   "ब्राह्मण / उपनिषद" हे संस्कृत भाषेतील पद्य इ. पु. १५०० - १००० काळातील सांगुन इ. पु. सातवी शताब्दी पर्यंत त्या पद्याचा फैलाव होता, ह्या संदर्भात पुरावा काय ? कारण लिपीचे अस्तित्व हा मुख्य प्रश्न आहे. "ब्राम्ही लिपीच्या आधी पाली, प्राकृत, संस्कृत ही केवळ बोली भाषा म्हणून अस्तित्वात होती.आणि ती केवळ मौखिक आधारावर प्रयोगात होती" असे केवळ एक अनुमान काढता येईल. परंतु "संस्कृत भाषा ही भारताची मुळ भाषा आहे आणि ती सर्व भाषेची जननी" आहे, ह्या संदर्भात कुठलाही पुरावा असा उपलब्ध नाही. ब्राह्मणी विचाराने मात्र तो प्रभाव लादण्याचा प्रयत्न केला. भारतात २२ भाषांना अधिकारीक भाषा म्हणून मान्यता आहे. परंतु त्यात "मराठी भाषेचा" समावेश नाही. आणि मराठी भाषेला "अभिजात दर्जा" मिळावा म्हणुन राज्य सरकार समितीकडुन संघर्ष ही सुरू आहे. आणि मराठी भाषेची प्राचिनता सिध्द करण्यासाठी सातवाहन काळातील "नाणेघाट शिलालेख" ह्याचा दाखला दिला जात आहे. "पाली / प्राकृत / संस्कृत / वैशाली / मागधी भाषेचा" प्रभाव हा मराठी भाषेवर दिसुन येतो. म्हणून "मराठी भाषा ही अनेक अशा स्थित्यंतरातुन उदयास आली," हे सत्य मानावे लागेल. आणि "ब्राम्ही लिपी" हिला सर्व लिपीची जननी मानण्यास काय हरकत आहे ? हा तर मुख्य प्रश्न आहे. प्रा हरी नरके ह्यांनी तर इसवी सनाच्या पुर्वीपासूनचं मराठी भाषा ही अस्तित्वात होती. "माहाराष्ट्री - प्राचिन म-हाठी" हिच्या पासुन "शौरसेनी ही भाषा" निघाली. आणि शौरसेनी भाषेपासुन कालांतराने "मागधी / पैशाची" ह्या दोन भाषा निघाल्यात. अर्थात त्या दोन भाषा मराठीचे नातेवंडे आहेत, असा नविनचं अफलातून शोध प्रा .हरी नरके ह्यांचा दिसुन येतो. मराठी भाषेतील "मुख्य मराठी / अहिराणी मराठी / व-हाडी मराठी / मालवणी मराठी /  कोल्हापूरी मराठी" ह्या सर्व पोट- प्रकाराबद्दल पुन्हा कधी तरी चर्चा करु या. शिवाजी महाराज कालखंडात "मराठी भाषेवर फारशी भाषेचा प्रभाव" होता, असे म्हटले जाते. मराठी भाषा - लिपी उगम संदर्भात विवाद बरीच आहेत. ब्राह्मण मराठी वाद्यांच्या मक्तेगिरीत ग्रेस - (प्रा. माणिक गोडघाटे) ह्या मागासवर्गीय महा कविंचा विसर झालेला दिसतो. ग्रेस ह्यानी आंबेडकरी निष्ठा कधी जोपासली नाही आणि ब्राह्मण मराठीं वाद्यांनी त्या दुर्मिळ महा कविला कधी स्वीकारले काय ? हा प्रश्न आहे. ह्यातचं "आंबेडकरी - बुध्द साहित्याचे वेगळेपण" हे मराठी ब्राह्मण साहित्यीकांना शल्य देणारे आहे. शेवटी संत कबिर जी ह्यांच्या शब्द सुमनांनी मी माझ्या लिखाणाला विराम देतो."गांडु भडवे रण चढे, मर्दो के हो बेहाल | पतिव्रता भुखी मरे, पेढे खाये छिनाल ||"

▪️ डॉ. मिलिन्द जीवने ‘शाक्य’
नागपूर, दिनांक २० जुलै २०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!