
विश्व शांतीचा संदेश देणाऱ्या,ताठ मानेने जगाकडे पाहणाऱ्या विश्वाची नजर आपल्या कडे वळविणाऱ्या आणि विश्व मानवतेचे उगमस्थान असणाऱ्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या भारतात आज धर्मा धिष्टीत अराजकतेची वाट मोकळी केल्या जात आहे. विश्वरत्न म्हणून जगाने स्वीकारलेले,विद्वत्तेचा कंठमणी.आधुनिक भारत घडविण्यात आणि मढविण्यात मोलाचे योगदान असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,ज्यांच्या अस्तित्वाने दूरदर्शी बुद्धी चक्षूने भारताची भारतीयता कायम राखली,अशा महामानवाच्या कार्याची फळे चाखणाऱ्या आणि नावाचा द्वेष करणाऱ्या कृतघ्न नराधमांचा नंगा नाच पाहून मन पेटून उठते.धर्मांध,आणि जात्यांधतेने ग्रसीत अविवेकी भुसा डोक्यात भरवून,समाजात जंगलराज निर्माण करणारे हे मानव हितशत्रूंचे वाढते वर्चस्व प्रबुद्ध भारताचे चिंतन बनले आहे.राजकीय चीरहरण,आर्थिक गळचेपी करणं सामाजिक विद्रुपीकरण या समीकरणात शुन्य बाकी ठेवणारी ही शासकीय प्रणाली विकसित होत आहे.ही विश्व गुरू समजल्या जाणाऱ्या भारताला राजेशाही, हूकूमशाहीची चाहुल देणारी धोक्याची नांदी आहे.
उगवणारा प्रत्येक दिवस काल घडलेल्या अमानुष घटनेच्या दहशतीत उगवतो आणि धास्तावलेल्या मनाने भीतीच्या दडपणात मावळतो.श्याहात्तर वर्षाची स्वातंत्र्यता अजुनही स्वकियांच्या दास्यात,पारतंत्र्यात श्वास घेत आहे.हिंदु आणि हिंदुत्वाच्या ओरडण्यात,हिंदू राष्ट्राचा राग आलापणाऱ्या नतद्रष्टांनी आधी हिंदू कोण हे जाणुन घ्यायला हवे.मुठभर लोकांनी आपल्या पोटभरण आणि वर्चस्वाठी ओंजळभर लोकांच्या डोक्यात उतरवलेली एक भावनिक संकल्पना.हिंदु हिंदू करणाऱ्यांनी इतिहासात डोकावून बघावे.हिंदुनीच हिंदुचं पानीपत केल्याचे दाखले इतिहासात ठिक ठिकाणी पहावयास मीळतील.गरज आहे इतिहासाचा मागोवा घेऊन आत्मपरीक्षण करण्याची.ज्यांच्या विद्वत्तेला, कार्याला संपूर्ण विश्व सलाम करते त्या बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या जन्म भूमीत कर्मभूमीत ईर्षेतील हीनकस दृष्टीने बघण्यात येते ही भारतासाठी लाजीरवाणी असलेली बाब अजुनही भारताच्या कानाकोपऱ्यात दिसुन येते.देशात बऱ्याच भागात बुद्धिस्टांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मिरवणुकीच्या वाज्यागाज्यात साजरी करतांना बघून त्याची खुन्नस मनात ठेवून कट कारस्थानाने अंगावर काटे आणणारी बर्बरता गावगुंड करतांना दिसतात.संवेदनशीलतेचा बुरखा पांघरून काही असभ्यतेतील सभ्य चेहरे जातीय दंगली होत नाहीत तर त्या घडवून आणल्या जातात, अशी पोपटपंची करून इथेही राजकारण करतात.असे म्हणतांना आपले हि पाय मातीचेच आहेत ही बाब ते हेतूपुरस्सर पणे विसरतात. झोळी घेवून न फिरता,मानवतेच्या दृष्टीने काही करता येत असेल तर करा.ज्या घटनेने सारा महाराष्ट्र ढवळून काढला जिचे पडसाद भारतभर पसरले त्या घटनेनेची किती दलितेतर संघटनांनी दखल घेतली.कुणाचे काळीज चर्र झाले,कुणाचे डोके सुन्न झाले.कीती प्रचार माध्यमांनी याची कैफियत मांडली.कोण या दुर्दांत घटनेला न्याय देण्यासाठी पुढे आले.एरवी रोज खून, आत्महत्या,बलात्कार, भ्रष्टाचार,चोरी दरोड्याच्या बातम्यांची उधळण करणार्या प्रचार माध्यमांनी या जात्यांध पणात घडवून आणलेल्या हिंसक प्रवृत्तीच्या गावगुंडांची वरात का काढली नाही.वर्चस्वाचे हस्तक बनुन मस्तक झुकवीणारी काही अंशी बाजारु झालेली पत्रकारिता दगडी समाजमनावर दस्तक ती काय देणार!
एम एल गोपनारायण
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत