माता रमाई तू झिजली अन आम्ही घडलो !

लघुलेख – अंधार न मावळणारा..
सविता कांबळे ✍️
कर्जत , रायगड
27 मे 1935 रोजी
रमाईची प्राणज्योत मावळली
दिवस अस्त घेऊनच उगवला होता
सकाळची नऊ वाजताची वेळ होती
एक करुणा शांत झाली होती.
वरळीच्या स्मशानात
माता रमाईला अग्नी देण्यात आली….
आयुष्यभर जीव जळला आता
चितेवर उरला सुरला देह जळतं होता
लोक जमले होते…
माता रमाई साठी रडत होते
आपल्या सांस्कृतिक मातेच्या
मृत्यून ते शोकाकुल झाले होते
बाबासाहेबांची तर एक बाजूच
पांगळी झाली होती
ते सुन्न झाले होते
डोळे भरून भरुनच येत होते
मी नवं पंढरपूर उभ करणार आहे
ते पाह्याच्या आधीच तू गेलीस रमा
आपण रमाला सुख देऊ शकलो नाही
ही खंत त्यांच्या मनाला टोचत होती
मी तिच्या भरोशावर संसार
सोडून बिनधास्तपणे
ज्ञानसाधना केली
ती इमारतीच्या पायातील
चिऱ्यासारखी होती….
दुसऱ्या दिवशी ते वरळीच्या
स्मशानभूमीवर गेले
कोणालाही न सांगता एकटेच गेले
त्यांचं मन हळवं झालं होतं
मन पार हरवून गेल होत..
तेच हरवलेलं मन त्यांच
माता रमाईला शोधतं होत…
त्या राखेच्या ढिगार्याकडे
केविलवाणे पहात ते खूप वेळ
बसले होते एकटेच….
एकटेच रडत होते…
अंधार पडू लागला होता…
हा अंधार कधीच मावळणारा नव्हता.
या न मावळणाऱ्या अंधारात
बाबासाहेबांचा केवळ एक शब्द
रडत राहणारा होता
आणि –
तो शब्द होता –
रामू , रमा……
ही वेळ अश्रुंनी भिजलेली
उदास….
बाबासाहेबांच्या डोळ्यापुढ
रमाई
हा शब्द व्याकुळ , अश्रूंच विराट
झाड होत होता….
दुःखांचा गहिवर गदगदला होता..
बाबासाहेबांच्या हवालदिल काळजात
उमाळ्यावर उमाळे फुटत होते.
करुणेची फुले कासावीस झाली होती
उमाळून येणाऱ्या आसवात
भिजत होती.
बाबासाहेब धाय मोकलून
रडत होते
आपल्या हृदयाचे तुकडे जोडत होते
कोणी बोलत नव्हतं ,
पण त्यांचं फाटलेलं काळीज
ऐकत होतं…
अश्रू अश्रूंचं मनोगत ऐकत होत.
एक महाअगतीकता एका महा
दुःखाची गाथा ऐकत होती.
त्यागमूर्ती रमाई काळोखाच्या आड
कायमची निघून गेली ,
नऊ कोटी लेकरांना
पोरकं करून गेली….
तिच्या पदराची उब
आजही आम्हाला जाणवते…
धन्य तू रमाई माता
फक्त तूझ्या पुढेच झुकतो
माझ्या आदराने माथा
तू झिजलीस
आणि –
आम्ही घडलो….
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत