खरच संविधान धोक्यात आले आहे काय?

लेखन:- अशोक नागकीर्ति
दिनांक:- २३/६/२०२४
मोबाईल:- 7039120462
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३८ मध्ये मनमाड येथील कामगार परिषदेत आपले लोकशाहीचे मारेकरी शत्रू याबद्धल जे विचार मांडले आहेत ते असे की;भांडवलशाही व ब्राम्हणशाही हे लोकशाहीचे मारेकरी शत्रू आहेत. त्या नुसार गेली सत्तर वर्ष आपल्या देशातील लोकशाही कारभार कसा चालतो आहे.ते आपल्या समोर आहे.
म्हणून म्हणावे लागते की; होय ते ब्राम्हणशाही व भांडवलशाही यांच्यामुळे धोक्यात आले आहे.ब्राम्हणशाही ही लोकशाहीला विरोध करणारी प्रवृत्ती आहे.त्यांना सर्वांना समतेने सामावून घेणारी लोकशाही अभिप्रेत नाही.त्यांना त्यांचे वर्चस्व असलेली विषमतावादी मनुस्मृती हवी आहे.जिने आपल्या वर्चस्वासाठी माणसा माणसात भेद करणारी ; माणसाचा तिरस्कार करणारी जातीव्यवस्था निर्माण केली.समाजाला विभंगून राज्य करण्याची ही त्यांची निच प्रवृत्ती यातून आपणास दिसते.जो भारतातील मागासवर्गीय हिंदू म्हणजे ओबीसी; एससी ; एसटी ; एनटी ; एसबीसी ; बौद्ध व मुसलमान यांना गुलाम करून ब्राम्हणी श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवणारी मनुस्मृती हवी आहे.म्हणून ते संविधान बदलण्याची भाषा करतात.मनुवाद्यांना सर्व जाती धर्मांना सामावून घेणारी सर्वांचे हित साधणारी लोकशाही विषमतावादी मनुवादी यांना अडथळा वाटत आहे.सर्व जातींना संविधानाने दिलेले हक्क; अधिकार; स्वातंत्र्य ; आरक्षण ही शेटजी व भटजी यांची पोटदुखी झाली आहे.त्यांना संविधानामुळे सर्वहारा वर्ग एकत्र झाला तर राज्य करता येणार नाही.याची सतत भीती आहे.या भीतीतून ते मागासवर्गीय हिंदू(ओबीसी; एससी;एसटी;एनटी; एसबीसी) व बौद्ध; मुसलमान यांच्या मध्ये तणावाचे वातावरण निर्माण करून तसेच जातीय दंगली घडवून सामाजिक धृविकरण निर्माण करून भांडवलशाही व ब्राम्हणशाही हे लोकशाहीमध्ये राज्य करत आहेत.म्हणजे देशात २६ जानेवारी १९५० पासून नावाला लोकशाही आहे.परंतु तिच्यावर कब्जा मात्र भांडवलशाही व ब्राम्हणशाहीचा आहे . मग ते मागासवर्गीय हिंदू व बौद्ध समाज हा मागासलेला कसा राहील यासाठी त्यांनी आरक्षण संपवून टाकले आहे. त्यांनी सरकारी उद्योग नष्ट करून नोकऱ्या घालवल्या.शाळा बंद करून शिक्षणापासून या देशातील बहुजन समाजाला वंचित ठेवण्यात आले आहे.आरोग्य महाग करून लोक यमसदनी कसे लवकर जातील याची व्यवस्था निर्माण केली.करोनाच्या काळात या भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांच्या सरकारांचा अनुभव प्रत्येकाने घेतला आहे.
संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाची काय अवस्था आहे?
आजची राजकीय परिस्थिती पहाता ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केले त्यांचा समाज आजच्या घडीला कोणत्या अवस्थेत आहे.जर संविधान धोक्यात आले आहे.तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाने प्रथम गंभीर झाले पाहिजे होते.आज आपण २०२४ च्या निवडणुका राबवत आहोत.या निवडणुकांमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणारे पक्ष त्यांचे पाच ते दहा उमेदवार उभे आहेत.हे आपल्या लक्षात येईल. काही महाभाग तर चक्क लोकशाहीचा शत्रू असलेल्या पक्षा बरोबर युती करून मोकळे झाले आहेत.तेही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन.किती मोठी शोकांतिका आहे.किती मोठा पराभव आहे महापुरुषांचा. जर खरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव या पक्षांवर असता तर त्यांनी आपल्या समाजात समन्वय ;सामंजस्य; विश्वास; सहकार्य या भावनेने एक उमेदवार उभा केला असता किंवा सर्व गट एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासाठी गठबंधन केले असते. आपल्या उमेदवाराला संविधान संवर्धनासाठी लोकसभेत निवडून पाठवले असते.परंतु तसे काही दिसत नाही. यावरून एक निष्कर्ष निघतो की; खरच संविधान धोक्यात आहे काय? जर धोक्यात असते तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाने फार गांभीर्याने विचार करून समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते.आपण आंबेडकरी समाजाचा लोकशाहीच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला काय दिसते. तर लोकशाहीचा पाया रचणाऱ्या महापुरुषांचे अनुयायी आपल्या संस्था पक्ष लोकशाही पद्धतीने राबवतात काय? तर बहुसंख्य संस्था पक्षांची स्थिती ही निराशाजनक आहे.एक हुकुमशहाच ती संघटना चालवताना दिसतो.याला अपवाद म्हणून काही अल्पसे प्रामाणिक लोक लोकशाही पद्धतीने काम करतांना दिसतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे म्हणायचे की तुमची झोपडी शाबूत ठेवा. ४ऑक्टोबर १९४७ रोजी सिद्धार्थ कॉलेज येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणतात की; आपल्या विद्यार्थ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे.आपला राजकीय लढा संपलेला नाही.त्यासाठी शेड्युल कास्ट फेडरेशनच्या झेंड्याखाली सर्वांनी आपली संघटना वाढवली पाहिजे.आपले आचरण शुद्ध ठेऊन आपल्या इच्छित ध्येयासाठी जागरूक राहिले पाहिजे.आजच्या परिस्थितीत आपले मनोरथ जरी साध्य झाले नाही तरी ते आम्ही साध्य करू अशा निश्चयाने वागले पाहिजे.तुमच्या करिता मी या कॉलेजात अनेक प्रकारच्या सवलती ठेवलेल्या आहेत.त्याचा योग्य तो फायदा करून घ्या.आज आपला पक्ष राजकारणात जरी डावलला गेला असला तरी आम्ही भावी काळात आमचे ध्येय साध्य करून घेऊ आणि आपला पक्ष विजयी करू.इंग्लंडच्या मजूर पक्षाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा.तो पक्ष फारच लहान होता आणि त्याला पदोपदी अपयशही आले होते.पण सतत चिकाटी मुळे तो पक्ष आज अधिकाररुढ झाला आहे.आपल्याला कॉंग्रेमध्ये घुसलेल्या हरिजनांनी फसवले आहे.तेव्हा या सर्वांगीण परिस्थितीचा विचार करून प्राप्त परिस्थितीला टक्कर देण्यासाठी तुम्ही आपल्या समाजाचे विश्वासू नेते बना आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करा असा तुम्हाला माझा आदेश आहे.पण साठ वर्षांत या आदेशाचे अवमूल्यन करून व झोपडीचे छप्पर;कुड; खांब ज्याला हवे तसे पळवून ; त्याने झोपडी उद्धवस्त करण्याचे काम केले आहे.आजच्या घडीला भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांच्या मुळे समाजाच्या अस्तित्वाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत समाजात सामंजस्य निर्माण करून लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात एकच एक उमेदवार उभा केला पाहिजे होता. पण प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन पक्ष चालविणारे असे का वागतात.गेल्या साठ वर्षांचा इतिहास काय सांगतो. तर याची सुरूवात अहंकारापासून सुरू झाली आहे.मग मी इतरांपेक्षा जास्त विद्वान आहे हा भाग यांच्या डोक्यात शिरला.नंतर लोकशाही विरोधी पक्षांबरोबर युती करून काही घबाड मिळत काय इकडे वाटचाल सुरू झाली. इथून मात्र समाजात घबाड प्राप्त करण्यासाठी स्वार्थ साधण्यासाठी गल्लोगल्ली अखिल भारतीय पक्ष ( भारतात यांना कोणी ओळखत नाही) निर्माण झाले. अनेक गटां तटांची दिवसेनदिवस भर पडत गेली.त्यातून गल्लोगल्ली दलाल निर्माण झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने धंदेवाईक लोकांची चलती व मौज दिवसेंदिवस वाढत आहे.निवडणुका आल्या की बरेच दलाल भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांच्या पक्षांच्या मागे घिरट्या घालायला सुरुवात करतात.तोडपाणीचा धंदा तेजीत सुरू होतो.मग या पक्षांना व दलालांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पक्षाचा व लोकांचा अडसर निर्माण होतो.त्यातून भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांच्या दावणीला बांधलेले पक्ष; दलाल; विद्वान व साहित्यिक हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पक्षाला व लोकांना बदनाम करतात.त्यांच्याबाबत अफवा पसरवतात.यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा पुरता पराभव होत राहिला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून नैतिकतेने; सत्यवादीपणाने व स्वाभिमान टिकवून ठेवून काम कराणाऱ्याला भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांच्या पक्षांची तळी उचलून धरणारे तथाकथित स्वतःला आंबेडकरी विद्वान म्हणून घेणारे तुटून पडतात तेव्हा ते खरंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विद्वान आहेत काय? हा प्रश्न निर्माण होतो. काहीतर भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांच्या पक्षांकडून सुपारी घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना बदनाम करण्यात आघाडीवर आहेत. कारण काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असलेला नेता व कार्यकर्ते जेव्हा समाजात काम करतात तेव्हा धंदेवाईक लोकांच्या पोटावर पाय येतो. मग त्यांना त्या नेत्याला कार्यकर्त्याला बदनाम करण्याशिवाय गत्यंतर नसते. ते स्वतःच्या स्वार्थाच्या आड येणाऱ्या विरूद्ध चवताळून समाजात बौद्ध धम्माला काळीमा फासणारे काम करतात.खरे तर हे दलाल व धंदेवाईक लोक हे चळवळीचे पहिले शत्रू आहेत.यांच्यामुळे समाजाच्या एकतेला बंधुत्वाला तडा जातो.समाजाची एकता भंग पावते.समाज गटा गटात विभागल्यामुळे शक्तीहिन होत जातो.एकून परिस्थितीचा विचार केला तर असे लक्षात येते की; आंबेडकरी चळवळीतील विचारशून्य लोकांच्या स्वार्था मुळे चळवळ हि विकलांग होत चालली आहे. २०२४ च्या निवडणूकित वंचित बहुजन आघाडी बरोबर रिपब्लिकन पक्ष जे भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांचे बटिक गुलाम आहेत ते तसेच बामसेफ मधून तयार झालेले अनेक पक्ष या निवडणुकीत उभे होते. परंतु एकट्या बाळासाहेब आंबेडकर यांनाच फक्त बदनाम केले जात आहे.हा विचार करण्यासारखा विषय आहे. समाजाने आपल्या अवतीभवती होणाऱ्या परिस्थितीचा प्रज्ञा चक्षूने विचार केला पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन सुद्धा समाज गेल्या साठ सत्तर वर्षात सुधारला नाही.( काही थोडे अल्पसे अपवाद आहेत)खऱ्या अर्थाने बौद्ध झाला नाही हे आजच्या त्याच्या दारून परिस्थिती वरून लक्षात येते.
इतिहासात छत्रपती संभाजी महाराज यांची पेशव्यांनी किती वाईट परिस्थिती निर्माण करून ठेवली होती.त्यावरून हे लक्षात येते की; छत्रपती संभाजी महाराज हे नैतिकतेने सत्यवादी; प्रामाणिक व माणूसकीने वागत होते.हे अनैतिक पेशव्यांसाठी अडथळयाचे होते. त्यामुळे अनैतिक भ्रष्ट स्वैराचारी पेशव्यांनी संभाजी महाराज यांना साम; दाम; दंड; भेद; छेद या नियतीचा वापर करून त्यांना बदनाम करणे; त्यांच्या चारित्र्यावर शिंतोड उडवण्यात आले.नंतर अनेक वेळा मारेकरी पाठवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.याचा अर्थ काय तर स्वार्थाच्या आड येणाऱ्याचा द्वेष केला जातो.त्याला बदनाम केले जाते.त्याच्या काटा काढला जातो.हे काम इतिहासात पेशव्यांनी केल्याचा इतिहास आपल्या समोर आहे.स्वार्थी पेशव्यांना या देशातील संपत्ती सत्ता ही फक्त आमचीच जहांगिर आहे असे वाटत होते.म्हणून त्यांनी मानवतेचे काम करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांना काम करु दिले नाही. पेशव्यांनी मावळयांतील स्वार्थी कमकुवत लोकांना हाताशी धरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य उद्धवस्त केल्याचा इतिहास आपल्या समोर आहे.आजही ही परिस्थिती आपल्या अवतीभवती सगळीकडे घडतांना दिसत आहे.
संविधानाचा दुसरा लाभार्थी मागासवर्गीय हिंदू म्हणजे (ओबीसी एससी एसटी एनटी एसबीसी) हा समाज घटक लोकशाही बद्धल जागृत आहे काय?
तर आपणास असे दिसून येईल की; हा फार मोठा समाज हा रूढी; परंपरा; कर्मकांड; उपास; तापास; बुवा; बाबा; महाराज यांच्या कोंडाळयात अडकलेला आपणास दिसून येईल.त्याची आज जी शैक्षणिक; सांपत्तिक; सामाजिक स्थिती सुधारली आहे त्याचे श्रेय तो देवाला देतो.त्याचा पूर्ण विश्वास आहे की; आपली प्रगती ही देवामुळेच होत आहे. आता ईथे प्रश्न निर्माण होतो की; १९५० पुर्वी माझ्या आजोबाला लंगोटी सुद्धा घालायला का मिळत नव्हती.सर्व बहुजन समाजाला शिक्षण बंदी का होती.या प्रश्र्नांबद्दल बहुजन समाज जागृत नाही. हा समाज या देशातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहे काय? हा प्रश्न निर्माण होतो.कारण ओबीसी समाजासाठी मंडल आयोग लागू झाला.तो अजून ९८ ०/०. ओबीसी समाजाला माहित नाही. जनगणना होत नाही.आरक्षणाला सतत उच्च हिंदू जातींकडून विरोध केला जातो त्या बद्धल या समुहाला काही देणेघेणे नाही.उलट उच्च हिंदू जातीचे लोकांच्या री मध्ये हा संविधान अज्ञानी समाज री ओढताना दिसतो.कुजबुज गॅंग डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्धल तिरस्कार निर्माण करते.त्या गोष्टीला हा समाज कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करणारा (फक्त एक टक्का अभ्यास करणारा समाज आहे.या समाजाला त्याच्या समाजात कोणतेच स्थान नाही.) असल्याने कुजबुज गॅंग च्या अपप्रचाराला सहज बळी पडतो.ज्यांनी
सत्तर वर्षात संविधानाचा एक शब्द वाचला नाही अशा बहुसंख्य असलेल्या समाजाकडून लोकशाही रक्षणाची अपेक्षा कशी काय करू शकतो. ज्या राज्यकर्त्यांनी संविधान साक्षरता गाव पातळीपासून सुरू करायला पाहिजे होती ती निट केलेली आपणास दिसत नाही.फक्त प्रजासत्ताक दिनी झेंड्याला हार घालणे व नारळ फोडणे ( हे लोकशाही विरूद्ध कर्म आहे.) या गोष्टींच्या पलीकडे लोकांना काहीही माहिती नाही. प्रजासत्ताक दिनी तरी लोकांचे लोकशाही हक्क; अधिकार; स्वातंत्र्य काय आहे याचे प्रबोधन व्हायला हवे होते ते झाले नाही.कारण लोकशाहीचा ताबा लोकशाहीचे मारेकरी शत्रू भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांनी घेतल्यामुळे हे प्रबोधनाचे काम प्रामाणिकपणे होऊ शकले नाही. आज तर या लोकशाही विरूद्ध प्रवृत्तींचा देशात नंगानाच चालू आहे. अशा लोकांना धर्मांध अंधभक्तांचा पाठिंबा असल्यामुळे लोकशाही विरोधी प्रवृत्ती लोकशाही उद्धवस्त करून देशाला लुटत असल्याचे आपण पहात आहोत.देशात संविधान साक्षर समाज नसल्याने भारतात सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकली नाही.आजही गाव खेड्यातील मागासवर्गीय हिंदू व बौद्ध समाज आपल्या हक्क ;अधिकार ;स्वातंत्र्य या पासून वंचित असलेला आपणास पहावयास मिळत आहे.हे सगळे आम्ही भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांच्या पक्षांना निवडून देत असल्याने घडत आहे. या देशात खरी लोकशाही अंमलात आणणाऱ्या पक्षाला भांडवलशाही व ब्राम्हणशाही पक्ष त्यांना वाढू देत नाहीत.अशी परिस्थिती आपण पहात आहोत. हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पैसे घेऊन मत देणाऱ्यांबद्धल काय म्हणत आहेत.मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो.महणून तो द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो.अशा उमेदवारांकडून समाज हिताची व राष्ट्र हिताची कार्ये होत नाहीत.पैसे वाला जर कायदेमंडळात गेला तर तो पैसेवाल्या लोकांचे हित संरक्षण करीलव तो सर्वसामान्य व गरीबांच्या हिताच्या आड येईल.म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करु नका व आपली दिशाभूल करुन घेऊ नका.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे बोल आजही खरे ठरत आहेत.आपले हक्क; अधिकार ;स्वातंत्र्य या बाबत अनभिज्ञ असलेले लोक पैसे घेऊन मत देताना आपण पहात आहोत.पैसे घेऊन मत देणाऱ्यांमुळे ते स्वतः व त्यांची मुलबाळ त्यांच्या पापाची फळे भोगत आहेत.लोकशाहीने दिलेले आरक्षण आज या लोकांमुळे धोक्यात आले आहे. समाजाची पिळवणूक करणारी ठेकेदारी उरावर घेऊन हा अंधभक्त पापी नाचत आहे. महागाईच्या नावाने याला लुटले जाते तरी याला थांगपत्ता लागत नाही. शिक्षण ; आरोग्य महाग करून याला शिक्षण व आरोग्य यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र भांडवलशाही व ब्राम्हणशाही करते हे त्याला धर्माची आंधळी पट्टी बांधल्यामुळे काहीही दिसेनासे झाले आहे.भारतीयांसमोर लोकशाहीवर भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांचे जे संकट आले आहे ते दुर करण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. खरेतर या देशात खरा लोकशाही रूजवणारा रिपब्लिकन पक्ष (लोकशाहीला न्याय देणारा कार्यक्रम या पक्षाचा आहे.) निर्माण करून देशाचे राजकारण बहुजन म्हणजे मागासवर्गीय हिंदू ओबीसी; एससी; एसटी ;एनटी; एसबीसी; बौद्ध ;मुसलमान; ख्रिश्चन; शीख यांनी एकत्र येऊन आपले संविधानिक हक्क अधिकार स्वातंत्र्य यांचे रक्षण करणारा पक्ष तयार करावा.
. या लेखाचा उद्देश खऱ्या लोकशाहीचे बिजारोपण या देशात व्हावे एवढाच आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत