
सर्व शेतकरी बांधव हेच मोठे संवर्धक असून, तेच पीक विविधतेचे खरे संरक्षक असल्याचे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना अनन्यसाधारण शक्तीचे वरदान असून त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांचे अस्तित्व आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या अधिकारांबाबत नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पहिल्या जागतिक परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
भारत हा जगाच्या एकूण भूक्षेत्रापैकी केवळ 2.4 टक्के भूभाग असलेला बहुविविधता असलेला देश आहे. परंतू, सर्व नोंदी केलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींमध्ये त्याचा 7 ते 8 टक्के वाटा असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. जैवविविधतेच्या बाबतीत, वनस्पती आणि प्रजातींच्या विस्तृत श्रेणीने संपन्न देशांपैकी भारत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. भारतातील ही समृद्ध कृषी-जैवविविधता जागतिक समुदायासाठी एक खजिना असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
कृषी संशोधन आणि तंत्रज्ञान विकासामुळं भारताला अन्नधान्य, फलोत्पादन, मत्स्यपालन, दूध आणि अंडी यांचे उत्पादन 1950-51 पासून अनेक पटीने वाढवता आले आहे. त्याचा लक्षणीय परिणाम राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षेवर झाल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. कृषी-जैवविविधता संवर्धक आणि औद्योगिक शेतकरी, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते यांचे प्रयत्न आणि सरकारी पाठबळ यांनी देशातील अनेक कृषी क्रांतीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञान हे वारसा ज्ञानाचे प्रभावी संरक्षक आणि संवर्धक म्हणून योगदान देऊ शकतात, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत