निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

भारतीय राजकारणात मरणपंथाला लागलेली राष्ट्रीय काँग्रेस, त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कुशीतून स्वार्थासाठी जन्माला आलेली राष्ट्रवादी.

अनिल जी जाधव

दलित मुस्लिमांना धडा शिकवण्यासाठी कॉंग्रेसनेच प्रसुती वेदना देऊन प्रसवलेली वसंत सेना….(शिवसेना) हे तीन कडबोळे सत्तेसाठी एकत्र आले…तसे बघायला गेले तर राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व एकाच विचारांचे पक्ष आहेत फक्त नावं वेगवेगळी इतकाच काय तो फरक… एकाच हिंदुत्ववादी घरातील ह्या वेगवेगळ्या खोल्या आहेत. त्यामुळे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाणे इतके हे साहजिक आणि स्वाभाविक आहे आणि म्हणूनच या पक्षातून त्या पक्षात जाणे हे तितकेच सहजसाध्य…पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांत काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे सोडल्यास सर्वच तर हिंदुत्ववादी विचारांची फौज उभी आहे… जिथे सत्तेसाठी विश्वासघात, दगाफटका हीच राजकीय संस्कृती आह. तिथे जे पेरले जाते तेच उगवणार आणि याच न्यायाने स्वस्वार्थासाठी आणि जेलच्या भीतीने या पक्षांना फुटीचा जबरदस्त तडा गेला…घरका भेदी लंका ढाये नुसार शिवसेना, राष्ट्रवादी फुटली…कुणी बाटगे कबूल करोत वा ना करोत परंतु पवार साहेब आणि उध्दवजी यांचा जनाधार विभागला गेला तसे जर नसते आणि सहानुभूती उध्दवजींच्या बाजूने असती तर शिंदेंच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून कसे काय आले… त्यामुळे श्री. उध्दव शिवसेने कडे सहानुभूतीची लाट होती असे समजण्याचे काहीच कारण नाही
अशा वेळी या तिनही पक्षांना संजीवनी द्यायला धाऊन आला तो आंबेडकरी समाजाचा मतदार… होय आज जी राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा), राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (उध्दव गट) जे लोकसभेला खासदार निवडून आले आहेत त्यामध्ये आंबेडकरी बौद्ध समाजाच्या मतांची भीक ही मायंदाळ आहे आणि तरीही हे तिन्ही पक्ष ” उठ रांडे बस… ” या प्रकारची वागणूक बौध्द समाजाला येणाऱ्या काळात दिले तर त्यात नवल नाही कारण हे तिघेही स्वघराणे आणि हिंदू हिताचाच विचार करतात

मान. शरद पवार साहेब आणि माननीय श्री. उद्धव ठाकरे यांना स्वतःचे राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करायचे होते आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी “संविधान वाचवायचे आहे” ही आंबेडकरी समाजाला थाप मारली, राष्ट्रीय काँग्रेसच्या सत्ता काळातही संविधान धोक्यात होते आणि ते जातीयवादी भाजपच्या काळात ही धोक्यातच आहे.

सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही सरंजामी विचारधारेचेच समर्थक…
तीनशेच्या आतच थांबलेल्या हुकुमशहाला संविधानासमोर नतमस्तक व्हावे लागले ते ‘कालाय तस्मे नमः’ म्हणून…
एक जण संविधान समर्थक म्हणून संविधान कमकुवत करीत आला तर त्याचाच भाऊबंद हिंदुत्ववादी विचारांची गर्जना करीत हिंदू राष्ट्र बनवायचे आहे म्हणत संविधानाला जुमानिसा झाला…याची खातरजमा न करता करोडपती मतदार असलेल्या बौद्ध समाजानेही “संविधान वाचवायला” निवडून दिले ते कुणाला… ज्या राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत आमच्यातील हरामखोर गद्दारांना हाताशी धरून आमच्या बापाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाडले त्या कॉंग्रेसला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात असलेल्या कॉंग्रेसला…आणि कुणाच्या सांगण्यावरून…तर आमच्यातीलच काही भाडखाऊ, सुपारी बाज विद्वान, विचारवंत, बुद्धीवादी लेखक पत्रकार पांढरपेशी नोकरदारांच्या सांगण्या वरून…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय, वैचारिक,बौध्दिक आणि रक्ताचे वारसदार असलेल्या श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान किती झाले…तर पंधरा लाख…बाकी मतं गेली कुठे… तर ती सर्व मते गेली संविधान वाचवायचे म्हणून महा विकास आघाडीला…याच कॉंग्रेसच्या सत्ता काळात जसे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीच्या मंदिरात…संसदेत येऊ दिले नाही तसेच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायलाही याच कॉंग्रेसच्या सरकारने जागा नाकारली होती, त्यांच्या मृत्यूनंतर ही त्यांची वारंवार अवहेलना केली मग तो महापरिनिर्वाण नंतरचा अंतिमविधी असो… किंवा भारतरत्न पुरस्कार…अथवा संसदेच्या सभागृहात तैलचित्र लावण्यास विरोध असो…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले तिथे चैत्यभूमी उभारण्यासाठी दिलेली तुटपुंजी जमीन…

माननीय पवार साहेबांनी कायमच आंबेडकरी राजकीय रिपब्लिकन चळवळ उभी राहू नये यासाठी लालचुटुक नेत्यांना उभे करून फुट पाडली त्या राष्ट्रवादी काँग्रेसला…मी असली फालतु लोकशाही व्यवस्था मानत नाही म्हणून कायमच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या शिवसेनेला… आणि हे पक्ष संविधान आता वाचविणार…
या तीनही पक्षांनी या पूर्वी कधीतरी संविधान गौरव केला आहे काय…कधीच नाही…आणि तरीही संविधान वाचविण्यासाठी या पक्षांना जेव्हा बौद्ध समाजाचा लाखो मतदार मतदान करतो तेव्हा त्याला सुज्ञ म्हणायचा की बावळट…मला वाटते याचा शोध हा या समाजानेच घ्यायची वेळ आली आहे.

कारण जी कॉंग्रेस भारतीय राजकिय क्षितीजावर मरण पंथास लागली होती तीला या मतदानाने जिवदान मिळाले आहे तीच परिस्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सुध्दा म्हणायला हरकत नाही हे मरू घातलेले पक्ष पुन्हा एकदा उभे केले आहेत ते आंबेडकरी बौद्ध समाजाने…आता ह्या तीनही पक्षांना नव संजीवनी मिळाली आहे…आणि ती कुणा मारूतीने उचलून आणलेल्या जडी बुटीने मिळालेली नाही…तर ती मिळवून दिली आहे स्वत:च्या पायावर दगड मारून घेणाऱ्या बौद्ध समाजानेच…

आणि म्हणूनच आता हे तिन्ही पक्ष तुम्हाला गृहीत धरून विधानसभेच्या जागा वाटपाची तयारी करू लागले आहेत. तुम्ही म्हणजे दावणीला बांधून ठेवलेली गोठ्यातील गुरं…संविधानाची भीती घालून गपगुमान दावणीला बांधता येणारी गरीब गाय जी मतदान रूपाने सत्तेचे दुध देते… मात्र समजा या एक करोड मता पैकी साठ सत्तर लाख मते आंबेडकर विचारांच्या वंचित बहुजन आघाडीला मिळाली असती तर…तर तुमच्या विचारधारेचे खासदार संसदेत निवडून आले असते आणि येऊं घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही सन्मानाने, ताठ मानेने आणि कण्याने सत्ताधारी जमात बनला असता, परंतु दुसऱ्यांची बाळं मांडीवर खेळवायची सवय लागलेल्या या समाजाला स्वाभिमान नको आहे काय… दुसऱ्यांची गोंडस बाळं मांडीवर खेळवण्यापेक्षा स्वत:चं बाळ जन्माला घालून आपला आनंद आणि प्रगती साधा…

राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला जिवदान देऊन तुंम्हाला काय मिळालंय…जे काही मिळाले आहे ते पवार साहेबांना उध्दवजी आणि डुबलेल्या कॉंग्रेसला..
पवार साहेबांना पुतण्याला जागा दाखवून द्यायची होती ती त्यांनी दाखवून दिली आणि लेकीची खुर्ची मजबूत केली, जन्मदात्या बापाने जन्मास घातलेला पक्ष, मालमत्ता संभाळण्यास मी सक्षम आहे हे सिद्ध करण्याची संधी साधली मान. उध्दवजींनी परंतु आंबेडकरी बौद्ध समाजाने काय साधले… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे विरोधक असलेले हे पक्ष आंबेडकरी विचार जतन करतील काय…आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवतील की तीचे मारक ठरतील…आणि जर आंबेडकरी विचारांची चळवळ जिवंत राहीली नाही तर…तर तुमचं जगणं हे जगणं असणारच नाही…कारण त्या जगण्यात स्वाभिमान नाही, तर लाचारी असेल आणि खरा आंबेडकरवादी अनुयायी लाचारीने नाही तर स्वाभिमानाने जगण्याचा हक्क अधिकार मागतो…बजावतो दुसऱ्याच्या घरांत आपल्या कातड्याची जाझमं करून पायघड्या घालण्यापेक्षा आपली फाटकी घोंगडी, वाकळ अंथरूण सुखाने आणि स्वाभिमानाने जपा

महायुती मधुन अजित पवारांनी स्वतःहून बाहेर पडावे यासाठी जेष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी संजय राऊतांशी त्यांच्या झालेल्या चर्चेचा दाखला दिला आहे ते म्हणाले मान. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि वंचितला कसे महाविकास आघाडीतून बाहेर जाण्यास भाग पाडले याचे जे उदाहरण दिले आहे ते समाजाने लक्षात घेऊन आणि आमच्यातील हरामखोर विचारवंत बुद्धीवादी सुपारी बाजांना त्यांच्या मालकांचे जोडे उचलायला कायमचे घरी पाठवून द्या…

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी राजकीय विचारांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सोबत भक्कमपणे उभे रहा नाही राहिलात तर ती आंबेडकरी राजकीय विचारांची आत्महत्याच ठरेल…


आयु. अनिल जी जाधव
कपिल वास्तू नगर करबुडे रत्नागिरी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!