देशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

पाकिस्तानची गोष्ट!

संजय आवटे

‘जा पाकिस्तानला’ म्हणणा-या टोळीला पाकिस्तानची ही गोष्ट सांगायलाच हवी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेले स्कॉलर जोगेंद्रनाथ मंडल पाकिस्तानच्या घटना परिषदेचे सदस्य आणि हंगामी अध्यक्षही होते. पाकिस्तानच्या पहिल्या घटना परिषदेत सुरूवातीला ९६ सदस्य होते. त्यापैकी मंडल एक. मंडल हे बाबासाहेबांचे अनुयायी. ‘शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन’च्या बंगाल प्रांत समितीची स्थापना त्यांनी बाबासाहेबांसोबत केली. मंडल मुस्लिम लीगचे महत्त्वाचे नेते झाले आणि बंगाल पाकिस्तानात गेल्यावर मंडलही बॅ. जिनांसोबत तिकडे गेले.

पाकिस्तानच्या राजकारणातील ते प्रभावी नेते होते.
नवा देश तयार झाल्यानंतर, पाकिस्तानचे राष्ट्रपिताही काही दिवसांतच काळाच्या पडद्याआड गेले. घटना परिषेदेचे काम तिकडेही त्याच कालावधीत सुरू होते. भारतात बाबासाहेब राज्यघटनेचे शिल्पकार जसे, तसे तिकडे मंडल पाकिस्तानच्या घटनेचे शिल्पकार म्हणून पुढे येत होते. ते पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री. मात्र, तीनच वर्षांत त्यांना पदासह तो देशही सोडावा लागला. लियाकत अली खान हे पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान. त्यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला आणि ते भारतात परतले. पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री १९६८ मध्ये भारतातील पश्चिम बंगालमध्ये अज्ञातवासात मरण पावले.

पाकिस्तानातले मुख्य प्रवाहातले राजकारण आणि मूलभूत तत्त्वज्ञानच एवढे घाणेरडे होते की मंडल यांच्या मूल्यांना तिथे स्पेस मिळणे अशक्य होते. मंडल यांच्या खाणाखुणाही आज पाकिस्तानात नाहीत. त्यांचा उल्लेख होणे तर दूरच.

पुढे झाले असेः पाकिस्तानने घटना परिषद स्थापन केली खरी, पण १९५६ पर्यंत राज्यघटना पूर्ण झालीच नाही. भारतात नोव्हेंबर १९४९ ला घटना तयार झाली. १९५० ला देश प्रजासत्ताक झाला आणि १९५२ ला पहिली सार्वत्रिक निवडणूकही झाली.

भारतासोबतच जन्मलेल्या पाकिस्तानात १९५६ ला कशीबशी राज्यघटना तयार झाली खरी, पण १९५८ लाच ‘मार्शल लॉ’ पुकारला गेला. त्यामुळे ती राज्यघटना मृत्युमुखी पडली. १९६२ ला आलेली नवी राज्यघटना १९६९ ला निलंबित झाली. पुढे, स्वातंत्र्यानंतर २५ वर्षांनी, म्हणजे १४ ऑगस्ट १९७३ ला पाकिस्तानच्या राज्यघटनेवर शिक्कामोर्तब झाले. झुल्फिकार अली भुत्तो तेव्हा पंतप्रधान होते. मात्र, चारच वर्षांनी जनरल झिया उल-हक यांनी लष्करी उठाव केला आणि होत्याचे नव्हते झाले.
आपली राज्यघटना पाकिस्तानला अद्यापही सापडली नाही.

हे सांगितले एवढ्यासाठीच की, भारताची कल्पना काय आहे, हे आपल्याच देशातील भल्याभल्यांना समजत नाही. गांधी हे राष्ट्रपिता, आंबेडकर राज्यघटनेचे जन्मदाता, तर नेहरू आधुनिक भारताचे निर्माता असे तीन थोर महापुरूष आपल्यासोबत होते, याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. याचा अर्थ मी या तिघांचा भक्त आहे, असे नव्हे. मात्र अगदी सामान्य चूकही या तिघांकडून निर्णायक क्षणी घडली असती, तर भारताची पुरती वाट लागली असती.
हे तिघेही आत्यंतिक लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष होते. सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते. आणि, सर्वसामान्य माणूस हा या तिघांचाही केंद्रबिंदू होता. पाकिस्तान आपली राज्यघटना अल्लाला समर्पित करते, तर भारतीय राज्यघटना मात्र लोक स्वतःलाच समर्पित करतात. हा या देशाचा मुख्य गाभा आहे. तपशीलाचे मतभेद असतील आणि अगदी तीव्र मतभेद होतेही, पण या आशयावर गांधी-नेहरू-आंबेडकरांचे एकमत होते.

आज आपण या तिघांनाही ‘क्रिटिसाइज’ करू शकतो (आणि, ते करण्यात गैर काही नाही!) कारण तो अवकाश इथे उपलब्ध आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता अधोरेखित करणारी भारताची घटना ही स्पेस देते. याचा अर्थ, इथे सारे आलबेल आहे, असे नाही. पण, उत्तुंग आकांक्षेच्या दिशेने धावण्याची संधी नक्कीच आहे. तीच खरी आशा आहे.
आता धावण्याची जबाबदारी आपली आहे.

  • संजय आवटे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!