सत्ता गरजेचीच, पण त्यापेक्षा सामाजिकीकरण महत्वाचे..!

- प्रतिनिधी
संसदीय लोकशाहीमध्ये निवडणुकांना विशेष महत्व आहे. किंबहुना निवडणूक प्रक्रिया हाच लोकशाही व्यवस्थेतील मूलभूत घटक आहे. त्यामुळे सत्तेचे राजकारण आवश्यक असते. सत्तेशिवाय जो विकासाचा अजेंडा तुमच्याकडे असतो तो राबवता येत नाही. मात्र, याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अपवाद म्हटले पाहिजे. कारण त्यांच्याकडे सत्ता नसताना देखील ज्ञानाच्या जोरावर त्यांनी देशहितासाठी अनेक दूरगामी विचार आणि योजना मांडल्या. ज्या आजही आपल्या देशात महत्वपूर्ण भूनका बजावत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी रक्ताचं नातं असलेले ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे त्यांचे नातू आहेत. त्यामुळे बाळासाहेब जो काही विचार मांडतात, त्याला राजकीयच नव्हे तर एक अमाजिक अधिष्ठान देखील असते. हवेची दिशा बघून भूमिका बदलणारे आंबेडकर कधीच असू शकत नाहीत. त्यामुळेच ते लाचार होऊन कुणापुढे कधीच झुकत नाहीत.
सत्ता मिळवणे एवढेच त्यांचे ध्येय असते, तर 1980 पासून ते सातत्याने सत्तेत राहू शकले असते. किंबहुना प्रस्थापित पक्षांनी त्यांना वेळोवेळी तशी ऑफर देखील दिली होती. मात्र, केवळ स्वतःपुरता विचार त्यांनी कधीच केला नाही. समाजाला वाऱ्यावर सोडून स्वतःचा विचार करणे त्यांना कधीच जमले नाही, जमणार नाही. त्यामुळेच ते 2024 च्या या लोकसभा निवडणुकीत देखील भाजप विरोधात खंबीरपणे आणि ठामपणे एक नेमकी भूमिका घेवून मैदानात उतरले आहेत.
महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतःहून पुढाकार घेतला होता, तो त्यासाठीच हे ध्यानात घेतले पाहिजे. सत्ता मिळवणे ही महत्वाकांक्षा असणे गैर नाही, ती असलीच पाहिजे. मात्र, लाचारी पत्करून कुणाच्या मागे स्वाभिमान गहाण ठेवून कोणताही आंबेडकरवादी माणूस कधीच जाणार नाही, हेच बाळासाहेबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा लोकसभेच्या निवडणुकांपासून सर्वसामान्य वंचित शोषित समूहांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी सुरुवातीपासून आग्रह धरला होता. महाविकास आघाडीत यावर काही चर्चा न झाल्याने त्यांनी जे उमेदवार उभे केले आहेत. त्यातील बहुतांश उमेदवार हे अत्यंत दुर्लक्षित, सर्वहारा वर्गातील आहेत, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. काही उमेदवार निश्चितपणे सर्वपरिचित किंवा दुसऱ्या प्रस्थापित पक्षातून वंचितमध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांना एक वलय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, बहुतांश उमेदवार हे ज्यांना चेहरा नाही, असे आहेत.
वंचित, शोषित आणि बहुजन समाज घटकांना सत्तेत वाटा मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर सातत्याने प्रयत्न करत आहेत. ॲड. आंबेडकर यांनी त्यांच्या प्रस्तावात म्हटले होते की, किमान ३ अल्पसंख्याक उमेदवार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून असावेत. पण, त्यांनी याच्या पुढे जात ४ अल्पसंख्याक उमेदवार दिले असून, यामध्ये ३ मुस्लिम आणि एक जैन समाजातील उमेदवार दिले आहेत. यामध्ये औरंगाबादमधून अफसर खान, उत्तर मध्य मुंबईमधून अबुल हसन खान, धुळ्यातून अब्दुर रहेमान आणि हातकणंगलेतून दादासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा, त्याचा मोबदला तुम्हाला कधीतरी मिळतो. आज प्रकाश आंबेडकरांच्या मागे प्रत्येक जात समूह ताकदीनिशी उभा आहे. का उभा आहे? कारण, त्यांनी नेहमीच समाजहिताची बाजू मांडली आहे. हीच गोष्ट अग्रभागी ठेवून या वेळी देखील त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत, भाजपला हरविण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. वास्तविक पाहता गेल्या 20 वर्षांपासून आंबेडकरांना ज्यांनी निवडून येऊ दिले नाही, तेच हे पक्ष असले तरी त्यांनी पाठिंबा जाहीर केला, हे नोंद घेण्यासारखे आहे.
विरोधक, टीकाकार तटस्थपणे याकडे न पाहता वंचितांचे राजकारण उभे राहू नये यासाठी अपप्रचार करीत आलेले आहेत. अगदी 2019 च्या निवडणुकांमध्ये वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र तो कुणीच सिद्ध करू शकले नाही. आताही लोक कुणीही काहीही बोलत असले तरी
लोकशाहीचे सामाजिकीकरण करायचे असते, तेंव्हा सर्वांना सत्तेत वाटा मिळवून द्यायचा असतो. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना 2018 मध्ये केली. त्यांनी ज्या गोष्टी आजपर्यंत बोलून दाखवल्या, त्या त्यांनी खऱ्या करुन दाखवल्या आहेत. त्यामुळे सर्व समूहांच्या प्रतिनिधींना उमेदवारी देऊन, त्यांनी त्यांचा अजेंडा प्रत्यक्षात उतरवला आहे. याचा प्रस्थापितांनी धसका घेतला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणात स्थिर व्हावं असं कुणालाच वाटत नाही. कारण तसे झाले तर त्यांची प्रस्थापितांची दुकानदारी बंद होईल अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे ते वंचित बहुजन आघाडीला भाजपाची बी-टीम म्हणत आहेत. त्यांच्या या खेळी मागचा त्यांचा उद्देश स्पष्ट आहे, वंचितला मत देणाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणे आणि ते हेच करत आले आहे. जर वंचित बी-टीम असती, तर त्यांनी एवढी नमती बाजू घेतलीच नसती. हेही तेवढचं खरं आहे. आत्तापर्यंत वंचितने जे उमेदवार दिले आहेत. तसेच, त्यांनी ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. तो देशाचे हित लक्षात घेऊनच, तो निर्णय घेतला आहे. यामुळे कोण बी-टीम आहे. हे सुद्धा जनतेला आता माहिती झाले आहे.
त्यामुळे आपली पाळेमुळे अजून घट्ट करायची ही संधी सोडू नका.. दुष्यंत कुमार यांनी म्हटलेच आहे..
कैसे आकाश में सूराख़ नहीं हो सकता
एक पत्थर तो तबीअ’त से उछालो यारो…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत