नवापूर तालुक्यातील दोन घटनांत तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू.

तालुक्यातील दोन घटनांत तीन मुलांचा बुधवारी (ता. २७) पाण्यात बुडून मृत्यू झाला. निखिल कैलास राजपूत, आर्यन गोरख वळवी व प्रीतम गोरख वळवी या तिघांचा यात समावेश आहे.
नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनीतील १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. घटनेनंतर प्रभाकर कॉलनीसह शहरातील रहिवाशांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने आई-वडिलांच्या आक्रोशाने सर्वांचे डोळे पाणावले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निखिल राजपूत हा शहरातील सार्वजनिक गुजराती हायस्कूलमध्ये वाणिज्य शाखेत अकरावीत शिकत होता.
सकाळच्या सत्रात महाविद्यालयात गेला. दुपारी दीडच्या सुटीत परत महाविद्यालयात न जाता घरी जेवण करून बाहेर जाण्याचे नियोजन केले. निखिल याने घरी जेवण केल्यावर इन्सुलिनचे इंजेक्शन घेतले. त्यानंतर भवरे (ता. नवापूर) धरणावर चार वर्गमित्रांबरोबर फिरण्यासाठी गेला. निखिल धरणात अंघोळ करीत असताना पाण्यात बुडू लागल्याने त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्याच्या वर्गमित्रांना पोहता येत नव्हते.
त्याला वाचविण्यासाठी काही वेळातच जवळील गुराख्याची मदत घेतली. त्याला पाण्यातून बाहेर काढले. लगेच, उपचारांसाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, अशी माहिती नातेवाईक व वर्गमित्रांनी दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील, हवालदार दादाभाई वाघ आदींनी पाहणी केली. निखिलचे वडील मानस हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच आईची तब्येत बिघडली. त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत