उद्योगखान्देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

इंग्रजांनी नोट छापण्या करिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास)

पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ्या रयतेला मोघलाई पासून चालत आलेले चलनच परिचयाचे असल्याने रयतेच्या सोईसाठी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तशाच नक्षीकामाचे चलन पेशव्यांनी चालू ठेवले. नाण्यावर ‘गुलशनाबाद उर्फ ना’ असा उल्लेख सापडतो. हे ना म्हणजे नाशिक. चांदवडच्या टांकसाळीतून निघालेल्या नाण्यावर जाफराबाद उर्फ चांदोरचा उल्लेख सापडतो. १६६५च्या सुमारास औरंगजेबाने चांदवडचे जाफराबाद करून टाकले होते. पेशव्यांचे सेनाधिकारी तुकोजीराव होळकर यांनी चांदवडच्या किल्ल्यावर एका कारकुनाला सोने, चांदी, तांब्याची नाणी पडण्याचा परवाना दिला होता. पण नंतर म्हणजे सुमारे १८०० मध्ये ही टांकसाळ चांदवड शहरात आली. त्या वर्षी दहा तासात या टांकसाळीत वीस हजार नाणी पाडली जायची.
सन १८०० च्या पुढे एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांचा अंमल बळावत चालला. सुरुवातीला त्यांनी त्या त्या ठिकाणांचीच नाणी व्यापारासाठी वापरली. सुमारे १८३० पर्यंत तरी स्थानिक नाणी आणि स्थानिक टांकसाळी आहे त्या परिस्थितीत चालू ठेवल्या. पण १८३५ साली मात्र इंग्रजांनी नाणे विषयक कायदा केला. संपूर्ण हिंदुस्थानात एकाच प्रकारची नाणी वापरण्याची सक्ती केली. नाण्याच्या एका बाजूला किंमत लिहिलेली असे आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीला चौथ्या विल्यमचे आणि १८४०
नंतर व्हीकटोरीया राणीचे चित्र. १८३० साली मुंबईत जॉन हॉकिन्स नामक अभियंत्याने नवीन टांकसाळ बांधली आणि जेम्स फारीश नामक साहेबाच्या नेतृत्वाखाली इथली बहुतेक सर्व नाणी मुंबईच्या टांकसाळीत पाडली जाऊ लागली. तोपर्यंत टांकसाळीत धातू तापवून लवचिक करून हातोड्याने बडवूनच नाणी केली जायची. पण याच कालावधीत इंग्लंडात जोरदार औद्योगिक क्रांती झाली होती ती मुख्यत्वे वाफेवर चालणाऱ्या जेम्स वॉटच्या इंजिनाच्या जोरावर. मुंबईच्या नव्या टांकसाळीत जेम्स साहेबाने तीन वाफेवर चालणारी इंजिने बसवली. आधी वीस पंचवीस हजार नाणी दिवसागणिक पडायची. आता इंजिन आल्यावर दीड लाख नाणी मुंबईच्या टांकसाळीत पडू लागली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तर हिंदुस्थानातल्या रुपया बरोबर इंग्रज साहेबाने त्यांना इंग्लंडात लागणारी त्यांची नाणीपण इथे लाखांच्या संख्येने इथे छापुन तिकडे नेली. पण पहिल्या महायुद्धामुळे चांदीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि साहेबाच्या डोक्यात हिंदुस्थानात कागदी रुपये छापायची कल्पना आली.
इंग्रज व्यापाऱ्यांच्या कलकत्ता, मद्रास, मुंबई सारख्या ठिकाणी काही बँका होत्या. त्या त्या ठिकाणच्या, स्थानिक व्यवहारांसाठी या बँका कागदी नोटा वापरायच्या. पण हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या नोटा इंग्लंडातच छापल्या जायच्या. तिथून इकडे यायच्या. पण नाण्यांमुळे काम चालत असल्याने नोटा तिकडे छापून इकडे आणण्याची अडचण वाटत नव्हती. पण आता चांदीच्या तुटवड्यामुळे इंग्रजाला कागदी नोटा इथे हिंदुस्थानात कुठे तरी छापायच्या होत्या. आणि रंगून, कराची, ढाका, कलकत्ता, लाहोर, कानपुर, मद्रास, दिल्ली, पुणे, बेंगलोर इत्यादी सगळी महत्वाची ठिकाणे बाजूला सारून साहेबाला नाशिकनेच भुरळ घातली. नाशिकची निवड नोटा छापण्यासाठी करताना इंग्रजांनी अगदी सखोल विचार करूनच केली होती. नाशिक एकतर मुंबईच्या जवळ. हवामानाच्या बाबतीत नाशिक सुरुवातीपासूनच सरस. कुठल्याच मोसमात अतिरेक नाही पण वर्षभर तुलनेने थंड हवेचे ठिकाण. उन्हाळ्यातही दिवसातले काही तास सोडले तर अन्य प्रहरी नाशकात सुखद हवामान. साठ वर्षांपूर्वी सुरु झालेली रेल्वे हे ही एक महत्वाचे कारण होते ज्यामुळे साहेबाला नाशिक नोट छपाईसाठी आकर्षक वाटले. शेजारीच देवळाली होते. पूर्वीपासूनच देवळाली हा इंग्रजी फौजेचा तात्पुरता तळ असे. त्यामुळे नोटा तयार झाल्यावर रेल्वेतून वाहतूक करताना आवश्यक असण्याऱ्या संरक्षणाची व्यवस्थाही तयार होती. एका व्यवसायाची अनोख्या ठिकाणी सुरुवात करताना सर्वात महत्वाची आवश्यक ती बाब म्हणजे मनुष्यबळाची. विसाव्या शतका पर्यंत हजारो वर्षे नाशिकमध्ये असणाऱ्या आणि बहरत गेलेल्या उद्योग आणि व्यापारामुळे नाशिक हे एक उद्यमशील शहर होते आणि त्यामुळेच इथे एका नवीन उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कारागिरांची आणि अन्य मनुष्यबळाची इथे कधीच कमतरता नव्हती आणि नाही. अशा अनेक मुद्द्यांचा सारासार विचार करून इंग्रजांनी नाशकात नोटा छापायचा निर्णय घेतला आणि १९२८ साली नाशकात हा कारखाना सुरु झाला. उद्योगांच्या बदलेल्या व्याख्ये नुसार हा नाशिकचा पहिला कारखाना ज्या मध्ये एका छताखाली हजारो लोकांना इथे नोकरी मिळाली. आधुनिक नाशिकच्या इतिहासातला ही नोट प्रेस हा महत्वाचा टप्पा आहे. नोटांबरोबर स्टॅम्पपेपर, पोस्टाची तिकिटे, पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य अनेक महत्वाच्या कागदपत्रांची छपाई इथे आज होते. नोटप्रेस आणि सिक्युरिटी प्रेस मिळून साधारण पणे पाच हजार लोक इथे आज काम करतात.

लेखक माहीत नाही!

सोर्स व्हाट्सअप!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!