निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

वंचितांचे राजकारण अखेर आंबेडकरी समूहाकडूनच खंडित ?

दिपध्वज कासोदे यांचा लेख

१.
साधारणतः १९८४ पासून बाळासाहेब आंबेडकर सक्रिय राजकारणात आहेत.भारतीय रिपब्लिकन पक्षा पासून सुरू झालेले त्यांचे राजकारण, पुढे भारिप-बहुजन महासंघ आणि आता वंचित बहुजन आघाडी या नव्या प्रयोगाने महाराष्ट्र राज्यात ताकदीने उभे राहण्याचा प्रयत्न करीत असताना दुसऱ्याच लोकसभा निवडणुकीत अडखळले आहे.

बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव असे नेते आहेत,की त्यांनी आंबेडकरी राजकारणाची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे,१९९८,१९९९ चा अपवाद वगळता युती,आघाडीचे राजकारण त्यांनी केलेले नाही ; त्यामुळे त्यांचे नेतृत्व उभेच राहू नये,म्हणून काँग्रेस,राष्ट्रवादी नेहमीच प्रयत्नशील असताना दिसून येते.त्याची काही ठळक उदाहरणे : २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची सांगता येतील. या दोन्ही निवडणुकांमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस,राष्ट्रवादी या सरंजामी पक्षांनी झुलवत ठेवल्याचे आणि ऐनवेळी बाळासाहेब आंबेडकर यांना कोंडीत पकडण्याचे कारस्थान केल्याचेच लक्षात येते.मात्र बाळासाहेब यांनीच युती केली नाही,असा कांगावा केल्याचे प्रकर्षाने दिसून येते.

२.
वर्षानुवर्षे रिपब्लिकन पक्षाचे एक दोन गट जवळ घेऊन त्यांची एखाद्या जागेवर बोळवन करून युती- आघाडी करण्याचे आणि त्या बदल्यात देशभर दलित,आंबेडकरी मते लाटण्याचे षडयंत्र प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसकडून अवलंबिले जाते.त्यात आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भर पडली आहे.त्यात नवल म्हणजे आंबेडकरी समूह देखील त्यास प्रत्येक निवडणुकीत बळी पडत आला आहे.२०२४ च्या लोकसभेत महाविकास आघाडीसोबत वंचितची बोलणी फिस्कटताच : ‘वंचित भाजपची बी टीम आहे”,बाळासाहेब आंबेडकर भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करीत आहेत’,’राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात असतांना वंचितने आपले उमेदवार उभे करू नये’.अशी महाविकास आघाडीची भाषा सुरू झाली आणि तीच भाषा आंबेडकरी समाज,काँग्रेसी विचारवंत आणि स्वतःला बुद्धीजीवी म्हणविणारा वर्ग बोलत बोलतच निवडणुकीला सामोरा गेला.त्याचा प्रभाव २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून येईल,अशी पद्धतशीर तजवीज करण्यात आली.

३.
आंबेडकरी समाज एखाद्या निवडणूकित शहण्यासारखा वागतो ; आपली ताकद दाखवतो खरी. मात्र, झटपट उमेदवार निवडून आले नाही की,पुन्हा स्वतः च आपला राजकीय प्रभाव मोडीत काढतो,हा इतिहास आहे. १९८४ मध्ये २ खासदार असलेला भाजप २०२४ च्या निवडणुकीच्या निकालानंतर तिसऱ्यांदा केंद्रात पूर्ण ताकदीने सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने जात आहे.१९८४ ते २०१४ या ३० वर्षाच्या काळात त्यांनी भाजपला सत्तेत आणण्यासाठी जीवतोड मेहनत केली.सत्ता मिळाली नाही म्हणून त्यांनी आपल्या पक्षाला मत द्यायचे थांबविले नाही,की आपल्या पक्षाला दिलेले मत वाया जाते म्हणून कधी तक्रार केली नाही.किंवा एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या ते आपल्यासारखे वळचणीला उभे राहिले नाहीत.

४.
२०१९ मध्ये वंचित लोकसभेच्या निवडणुकीत ताकदीने उभी राहिली ; मात्र विधानसभेत मतांची टक्केवारी घसरताच आंबेडकरी समूहाने वंचितकडे पाठ फिरवली. आणि काँग्रेस आणि मित्रपक्षांनी वंचित संपविण्याचा विडा उचलला.महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाला वंचितचे अस्तित्व मुळात मान्य नाही,हे आंबेडकरी समूहाच्या लक्षात अजूनही आलेले नाही.येईल की नाही,ते माहीत नाही.

वंचितला अधिकृतपणे महाविकास आघाडीकडून हमखास पडणाऱ्या २ जागा दिल्या होत्या ,हे वंचितकडून स्पष्ट केल्यावरही वंचितला ६ जागांचा प्रस्ताव दिल्याचे संजय राऊत माध्यमांना खोटे सांगत राहिले,त्या वर खुद्द बाळासाहेब आंबेडकर सतत स्पष्टीकरण देत राहिले ; मात्र आपल्या नेत्यापेक्षा आंबेडकरी समाज संजय राउत यांच्यावर विश्वास ठेवताना दिसत होता. आंबेडकरी समाजाला वर्षानुवर्षे काँग्रेस,राष्ट्रवादीने जसे फसविले तसे शिवसेनेनेही फसविले ; मात्र झालेली फसवणूक संविधान आणि लोकशाही धोक्यात आल्याच्या कांगाव्याने समाजाच्या लक्षातच आली नाही ; उलटपक्षी फसवणूक करणाऱ्या तिन्ही पक्षांची आंबेडकरी समाजाने तळी उचलून धरल्याचे अनुभवास आले.आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून मोकळेही झाले.

– या निवडणुकीतील आंबेडकरी समाजाच्या मानसिकतेसंदर्भातील काही ठळक मुद्द्यांची चर्चा करणे अप्रस्तुत ठरणार नाही.

१. आंबेडकरी राजकारण करायचे असेल तर ते जिंकण्यासाठी असावे,युती आघाडीत मिळेल त्या जागा घेऊन लढल्या पाहजेत. रिझल्ट तात्काळ पाहिजे,थांबण्याची तयारी नाही.

२. आंबेडकरी राजकारण करणाऱ्या पक्षापेक्षा काँग्रेस,राष्ट्रवादीची कमालीची चिंता,आपला पक्ष मातीत मिळाला तरी चालेल,काँग्रेस, राष्ट्रवादी जिंकायला पाहिजे.

३(१) २०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा देऊन देवेन्द्र फडणवीस सरकारला पाठींबा दिला,२०१९ साली भाजप बरोबर सकाळचा शपथविधी घडवून आणला.राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार भाजप मध्ये गेले.
२(२) सन २०१४ मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपचे खासदार होते,अशोक चव्हाण,बाबा सिद्दीकी हे भाजप मध्ये गेले,मिलिंद देवरा शिवसेनेत.
२(३) राज्यात तीस वर्षे शिवसेनेने भाजप वाढविण्यासाठी मदत केली.भाजप सत्तेत फक्त शिवसेनेमुळे आली.महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसली.

या बाबत आंबेडकरी समाज चर्चा करीत नाहीत ; मात्र एकदाही भाजप बरोबर न जाणारे बाळासाहेब आंबेडकर मात्र भाजपची बी-टीम होतात आणि भाजपला मदत करणारे त्यांना वाटतात.आणि स्वतः काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेची गुलामी करून वंचित समर्थकांना अंधभक्त म्हणण्याचा निर्लज्जपणा ते करताना दिसतात.

  • या निवडणुकीतील सर्वात क्लेशदायक मुद्दा असा की, प्रथमच आंबेडकरी कुटुंबातील सदस्यांवर(बाळासाहेब, आंनदराज आणि भीमराव) व्यक्तिगत शाब्दिक हल्ले करण्यात आले.ते कुणी आणि कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आले ते माहीत नाही ; आंबेडकरी कुटुंबियांनाही चिकित्सा करण्याच्या नावाने अश्लाघ्य भाषा वापरून आपल्या उद्धारकर्त्याचाही उद्धार करायला आपण मागे पुढे पाहू शकत नाही,हे या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून देण्यात आले ; हे सर्व क्लेशदायक आणि निषधार्ह वाटते.
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने दोन वेळा निवडणुकीत पाडले.त्याला प्रतिउत्तर देताना आंबेडकरी समाजातील तथाकथित पाकीट बहाद्दर सोशल मीडियात लिहिणाऱ्यानी,हा अर्धवट इतिहास असल्याचं सांगून उलट बाबासाहेब याना काँग्रेसने घटना समितीवर घेतले नसते तर त्यांनी संविधान लिहिलेच नसते,असे काँग्रेसला श्रेय देतांना दिसून आले.

. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न ‘किताब दिला नाही.संसदेत तैलचित्र लावले नाही.केंद्रात बौद्धांना सवलती दिल्या नाहीत,या विषयाची आठवण करून देण्यात आली असतांना : हा इतिहास लक्षात ठेवण्याची गरज नाही.हा देखील इतिहास अर्धवट असल्याची मांडणी करण्यात आल्याचे वाचून आंबेडकरी समाजाला खुद्द बाबासाहेब यांचेशी देखील काही देणे घेणे नाही,हे प्रकर्षाने दिसून आले.

आंबेडकरी समाजाची राजकीय मानसिकता एकंदरीत स्वतः चे राजकारण अधिकाधिक संकुचित आणि दिशाहीन करणारे आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वतंत्र राजकारणाचे सर्व प्रयत्न सपशेल अपयशी ठरविण्याचा आंबेडकरी समाजाचाच एकंदरीत होरा दिसून येतो,तरीही वंचित बरोबर काही लोक ठामपणे उभे असल्याचे चित्र दिसून येते.मात्र भविष्यात ते कायम टिकून राहतील का,हा मोठा प्रश्न एकूणच आंबेडकरी राजकारणाच्या संदर्भाने उभा राहतो. बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्वीच ‘आंबेडकरी चळवळ संपली आहे..’हे पुस्तक लिहिले आहे,त्या पुस्तकातील भीती खरी ठरते की काय,अशी शक्यता या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली आहे.हे मात्र खरे.

  • दीपध्वज कोसोदे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!