हे संविधनाचे रक्षक कसे ?

प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
दोन दिवसापूर्वी एक घटना घडली की, मा. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने मनुस्मृती जाळत असतांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळल्या गेला असे मीडियात दाखवले आहे.पण जे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करीत आहेत त्याना असे करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ? आपल्या देशात कोणीही उठाव आणि काहीही करावं अशी स्थिती सध्या झाली आहे. आणि 2014 नंतर त्यात जास्त भर पडली आहे. आता भाजपावाले संविधान वाचवायला निघाले म्हणजे मोठा विनोद आहे. भाजपा 2014 ला सत्तेवर आले आणि यांचा एक कार्यकर्ता दिल्ली येथे भारताच्या संविधानाची प्रत जाळतो आणि देशात कोणीच कांहीच बोलत नाही. तेंव्हा कुठे गेले होते? जे आज संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवरून गोंधळ करीत आहेत. मला वाटते याला दाईचे प्रेम म्हणतात पण आईचे प्रेम यांना काय माहीत आहे. खरे तर हे दाईच्या प्रेमापेक्षा सुद्धा वाईट स्थितीला आहेत. कारण यांची थिंक टॅंक असणारी RSS आणि ते ज्या हिंदू धर्माला मानतात त्याचे प्रमुख शंकराचार्य करपात्री यांची भारतीय संविधानावर केलेली प्रतिक्रिया काय सांगते ते म्हणतात, “ आमची घटना अत्युत्तम आहे ,पण तिचा एक दोष आहे ती एका अस्पृश्यांने लिहली आहे.” म्हणजे बघा हे सर्व तीच मंडळी आहे जर हे भारतीय संविधानाचा इतका द्वेष करीत असतील तर ज्याने हे संविधान निर्माण केले त्याचा किती द्वेष करीत असतील हे आता लहान शेंबडया पोराला सुद्धा कळेल. आणि आज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील बेगडी प्रेम दाखवत आहेत आणि यांचा एक मंत्री म्हणतो “ आम्ही सत्तेत घटना बदलण्यासाठीच आलो आहोत.” आता हे किती भयानक आहे पण तेंव्हा अशी आमची चूक झाली असे कोणी म्हणण्यास पुढे आला नाही. यावरून यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपले संविधान याची किती काळजी आणि महत्व आहे हे समजते. कारण तेंव्हा हे निषेध करणार नाहीत कारण यांचा अजेंडा आहे की, भारतीय संविधान बदलायचे आहे. आता काळ गेला आज प्रत्येक बहुजन व्यक्ती सावध होत आहे. आणि त्यामुळे समाजाला दिशाहीन करण्याचे दिवस गेले हा फार जुना फार्मुला आहे. बहुजन समाजात तेढ निर्माण करण्याचाच हा एक प्रयत्न आहे. आता कांही दिवसापूर्वी भाजपाचे अमर साबळे म्हणले की, “ कोंग्रेसने अनेक वेळा घटनादुरुस्त्या केल्या आणि घटनेची मूलभूत चौकट याची मोडतोड केली.” पुढे ते म्हणाले की, “ 42 व्या घटनादुरुस्तीने आणीबाणी लागू करण्याची तरतूद केली आणि 43 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत बदल करून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द घुसडण्यात आले. संविधान बदलण्याचे काम कोंग्रेसने केले.” आता हे खासदार आहेत आणि त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते की, संविधान बदलणे आणि घटनादुरूस्ती यातील फरक जर समजत नसेल तर काय काम करीत असतील संसदेत याची कल्पना आपणास येईल. यात आणीबाणी बद्दल तर कोंग्रेसने केंव्हाच माफी मागितली आहे आणि धर्मनिरपेक्ष शब्द यांना नको आहे. कारण यांचा अजेंडा हिंदु राष्ट्र आहे आणि त्याला धर्मावर आधारित देश पाहिजे आहे. आणि त्यामुळे धर्मनिरपेक्ष हा शब्द त्यांना नको आहे. त्यामुळे कोंग्रेसवर राग आहे. पण यांना माहीत नाही की, संसदीय लोकशाही असणार्या देशाला धर्म नसतो तर व्यक्तीला धर्म असतो आणि धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे. त्याला रस्त्यावर कधीच आणू नये. आणि म्हणूनच संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की, “ मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी सुद्धा भारतीय आहे.” आणि त्यामुळे आज जगात त्यांचे नांव आहे आणि जगात भारताची ओळख हिंदू राष्ट्र नाही तर बुद्धाचा देश अशी आहे. म्हणून प्रधानमंत्री बाहेर देशात गेल्यावर म्हणतात “ मै बुद्ध की, धरती से आया हू |” पण आपल्याच देशात आपल्या महापुरुषांची किंमत हे करीत नाहीत. यावरून भारतीय संविधांनाबद्दल किती माहिती आणि तळमळ आहे हे समजते. विशेष म्हणजे घटना दुरूस्ती हा जर भारतीय संविधान निर्माते यांनीच केलेली घटनेतील तरतूद आहे. तर त्याचे एवढे अवडंबर का केले जाते याचा अर्थ एक षड्यंत्र आहे. आणि देशात जर 2014 नंतर एवढया मोठया प्रमाणावर घटनेची चर्चा लोक का करतात आणि भारताचे संविधान वाचवा हा नारा आजपर्यंत का दिला नाही लोकांनी आणि यात पुन्हा विशेष आहे. जे लोक आज भारतीय संविधान वाचवा असे म्हणत आहेत ते कांही साधे लोक नाहीत यात उच्च शिक्षित , प्राध्यापक ,अधिकारी आणि विशेष म्हणजे वकील आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील सांगतात की, “ आज देशाचे संविधान वाचवा.” याचा अर्थ काय आहे ? कधी नव्हे इतके भारतीय संविधान लोकांना प्रिय वाटू लागले आहे. याचे कारण म्हणजे लोकांना संविधनाचे महत्व समजले आणि त्यामुळे लोक आता भारताचे संविधान वाचवा असे म्हणत आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमातून हेच सांगत आहेत. आणि साधे सूत्र आहे ज्या पक्षाने नेहमी हिंदू आणि हिंदुत्व तसेच मंदिर –माजित असे विषय घेऊन आणि लोकांच्या भावनाशी खेळून सत्ता मिळवली आहे ज्यांचा उद्देश राम मंदिर बांधणे असेल ते काय भारतीय संविधनाचे रक्षण करणार आहेत ? कोणत्याही सरकारचा अजेंडा हा लोकांचे प्रश्न सोडविणे असला पाहिजे आणि ते प्रश्न कोणते असतात तर शिक्षण ,आरोग्य ,पाणी ,रस्ते ,वीज ,रोजगार आणि सामाजिक संरक्षण हे विषय तर यांचे कधीच नसतात. आणि हे सर्व सामान्य लोकांना मिळावे म्हणून भारतीय संविधान काम करते आहे. आणि नेमके हेच यांना नको आहे त्यामुळे भारतीय संविधनाचे सर्वात मोठे विरोधक हेच सत्ताधारी आहेत. उलट संविधनाचा गैरवापर सर्वात जास्त यांनी केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला इशारा आज खरा ठरत आहे.
आता आपण मुख्य विषयाकडे येऊ जो कार्यक्रम होता यात मनुस्मृती सोबत चुकून आयोजकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवला गेला. आणि जितेंद्र आव्हाड यांनी झालेल्या प्रकरणाची जाहीर माफी सुद्धा मागितली आहे. आणि मला तरी वाटते की, बहुजन समाजात ओबीसीचा एवढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान असणारा नेता मा. जितेंद्र आव्हाड यांचा सारखा दूसरा नाही. इतर लोक दिखावा करीत असतील पण हा माणूस जाहीर सभेत जयभीम म्हणणारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझा वैचारिक बाप आहे हे जाहीर सांगायला तेवढी हिंमत आणि तेवढा आदर सुद्धा असावा लागतो. नाही तर गळ्यात निळा रुमाल घालणारे आणि पोटात एक आणि ओठात एक असे तर हजारो नेते देशात आणि राज्यात आहेत पण जितेंद्र आव्हाड यांच्या सारखा लढवय्या भीमसैनिक दूसरा नाही. आज तरी या मनुवादी व्यवस्थेविरोधात एवढया निर्भीडपणे भूमिका घेणारा ओबीसी नेता नाही. दोन दिवस झाल्यावर मा. छगन भूजबळ साहेब सुद्धा सपोर्ट करीत आहेत मी काही कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा सपोर्टर नाही पण एक देशाचा नागरिक म्हणून तटस्थ भूमिका घेणारा आहे. पण शेवटी सत्य हे सत्यच असणार आहे. बहुजन समाज सर्व समजतो आहे. मागील अनेक वर्षात मी असे चित्र कधीच पाहिले नाही की, भाजपाचे लोक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर येऊन आंदोलन करीत आहेत, निषेध करीत आहेत यावरून त्यांचा दुट्टापीपणा लक्षात येत आहे. आंदोलन आणि संघर्ष करण्याचा मोठा इतिहास बहुजन समाजाचा आहे आणि त्यामुळे यांना असे आंदोलन शोभत नाही. ही काहीतरी नकल केल्यासारखे वाटत आहे.
महाराष्ट्रातील एक जेष्ठ आणि ख्यातनाम साहित्यिक आणि विचारवंत मा. यशवंत मनोहर यांनी लोकशाही काय असते याबद्दल फार मार्मिक विश्लेषण केले आहे ते आजच्या काळात या नकली लोकशाहीवादी सरकारला 100 टक्के लागू पडते यशवंत मनोहर असे म्हणतात की, “ लोकशाही शब्दात लोक हे पूर्वपद आहे. लोक या दोन अक्षराच्या शब्दात भारतातील सर्वच लोकांचा अंतर्भाव होतो. या सर्वच लोकांनी स्वत:ला केवळ भारतीय म्हणावे अशी बाबासाहेबांची लोकशाहीतील सुंदर संकल्पना होती. कोणी कोणाचा मालक नाही ,कोणीही कुणाचा गुलाम नाही. ही पद्धत ज्याच्या विचारातून आणि आचरणातून प्रकट होते.त्या समाजाला लोकशाही समाज आणि त्या संस्कृतीला लोकशाही संस्कृती म्हणावे.”
बाबासाहेबांची लोकशाही ऐंशी टक्के लोकांना या देशाचे अधिनायक करू इच्छिते म्हणून त्यांच्या लोकशाहीमध्ये पक्षशाही ,सरंजामशाही ,हुकूमशाही ,भांडवलशाही ,उन्मत्तशाही ,जातशाही ,उच्चवर्णशाही ,वंशशाही ,अभिजनशाही वा दुकानदारशाही अशी कोणतीही शाही बसत नाही. या सर्व शाहया ऐंशी टक्के लोकांच्या हत्या करणार्या शाह्या आहेत. “ धर्माची अफू चारून ऐंशी टक्के लोकांवर आज सर्व शाहया लादल्या जात आहेत. या सर्वच शाहया आज उध्वस्त करण्याची संपूर्ण बौद्धिक क्षमता बाबासाहेबांच्या लोकशाहीत आहे.” आपल्या देशात विविधतेत विषमता प्रस्थापीत करते तिला संस्कृती असे नांव शोभत नाही. वर्ण ,जातीची विविधता जपते तिला संस्कृती असे म्हणतात विषमतेच्या ढाच्याला पवित्र मानते ती संस्कृती नसते. सममूल्यतेला विरोध ही संस्कृती नसते ते अभिजन वर्गाच्या हिताचे जहर असते. “ समाजाला विषमतेत जाळणार्या वरील सर्वच संस्कृतीच्या निर्मूलनाचा महाप्रकल्प म्हणजे बाबासाहेबांची लोकशाही संस्कृती होय.”
मा. यशवंत मनोहर सरांच्या उपदेशाचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, आजपर्यंत आपल्या देशावर ज्या ज्या पक्षांनी राज्य केले त्यात कोंग्रेस जास्त काळ होता त्यांना सुद्धा हे जमले नाही. आणि आज जे सरकार आहे ते तर याच्या संपूर्ण विरुद्ध आहे. कारण आज सामान्य जनता कुठे आहे कोणाला काही घेणे-देणे नाही. आज आपला पक्ष आणि त्यांचे प्रतींनिधी कसे निवडून येतील याची काळजी यांना आहे. आज देशात सामान्य जनता खूप अडचणीत जीवन जगत आहे. आज 93 टक्के असंघटित क्षेत्र आहे म्हणजे ज्यांना रोजगार आणि जीवन जगण्याची कोणतीही हमी नाही आणि सरकारने यांना वार्यावर सोडले आहे. आणि सरकार आपल्याला जी आकडेवारी जाहीर करते ती संघटित क्षेत्राची असते. असंघटित क्षेत्रात किती लोकांना रोजगार आहे ? किती लोकांना घर आहे ? किती लोक रस्त्यावर आपले जीवन व्यतीत करतात ? आणि किती लोक रोज अर्धपोटी आणि उपाशी झोपतात ? याची काहीही काळजी सरकारला नाही जे सरकारचे आद्यकर्तव्य असते. म्हणजे जनतेच्या प्रती काय उत्तरदायित्व आहे. आणि या सर्व जबाबदार्या कोणी घेत नाही आणि कुठे कोणी असे काही नजरचुकीने बोलले की लोकांना भडकावून द्यायचे आणि त्याची राजकीय पोळी भाजून घ्यायची हा यांचा मुख्य उद्योग आहे. एखाद्या मंदिरावर आणि धार्मिक स्थळावर कुठे राजकारण चालते का ? हे जास्त दिवस चालत नाही एकदा जनतेला जर समजले की, जनतेचे परिवर्तन व्हायला जास्त वेळ लागत नाही. याला मराठीत एक म्हण आहे पूतनामावशीचे प्रेम. म्हणजे याचे असे झाले की, यांचे लोकप्रतींनिधी किंवा मंत्री जाणीवपूर्वक काहीही बोलतील तेंव्हा चालते पण एखादा विरोधी पक्षाचा थोडा जरी चुकून बोलला की, त्याचे मोठे भांडवल करायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचे असे सर्व चालले आहे. मागे एक यांच्याच एका धार्मिक शाखेची धर्मसंसद झाली आणि त्यामध्ये एक साधू म्हणाला की, मुस्लिम लोकांना मारण्यासाठी लाखो रुपये बक्षिस देऊ म्हणजे इतर लोकांचे जीवन फार महत्वाचे नाही, तर हेच जास्त महत्वाचे आहेत. पण यामुळे जगात आपली प्रतिमा किती खराब होत आहे हे त्यांना माहीत नाही. आणि जर हेच विधान एखाद्या मुस्लिमाने केले असते तर देशात रान पेटले असते. आता मला शेवटी असे वाटते की, हा सर्व दोष आपला आहे. म्हणजे बोलणारा काहीही बोलेल पण आपण ऐकणारे कसे ऐकून घेतो ? हा प्रश्न आहे. म्हणजे रामदेव बाबाला विचारले की, तुम्हाला भारतीय स्त्री कोणत्या प्रकारच्या कपडयात चांगली वाटते तर तो बेशरम म्हणतो की, विनाकपडयाची सुद्धा चांगली वाटते आता याला तिथे जमलेल्या स्त्रियांनी खरे तर चप्पलांनी प्रसाद द्यायला पाहिजे होता. पण आपले लोक आणि विशेष करून स्त्रिया शांतपणे ऐकून घेतात आणि असे साधू आपल्याला संस्कृती सांगतात आणि आपण ऐकतो हे विशेष आहे. आणि तत्कालीन मुख्यमंत्र्याची पत्नी सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर होती. पण काही प्रतिक्रिया नाही. आणि मग अशा राजकीय आणि सामाजिक लोकांची बोलण्याची हिंमत वाढते. आपण वेळीच बोललो तर यावर नियंत्रण येते. आताच एका लेखक कवीने आपली बुद्धी वापरुन मा. जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली ती वाचण्यात आली पण आपल्या बहुजन लेखक आणि विचारवंत यांना थोडे जास्त चिकित्सक व्हावे लागेल आणि आपल्या ज्ञानाचा इतर लोक वापर तर करीत नाहीत ना, याचा विचार गांभिर्याने करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या माणसाने जाणीवपूर्वक चूक करणे आणि अनावधानाने चूक होणे यात मोठे अंतर असते. आणि मोठया मनाने त्या व्यक्तीने चूक मान्य केली आणि दिलगिरी व्यक्त केली आहे. आता आपल्या बहुजन समाजाने अशा व्यक्तीला सपोर्ट केला पाहिजे. कारण आपल्यात अशी फुट पडली पाहिजे हाच तर आर.एस.एस. आणि इतर त्यांच्या सहकारी असणार्या संघटनांचा मुख्य उद्देश आहे. आणि तो जर सफल झाला तर उद्या आपल्या सर्वांना हे महागात पडणार आहे. म्हणजे एखाद्या गावात किंवा शहरात एखाद्या नगरात जर एकी असेल तर बाहेरील कोणीही त्यांना नुकसान पोहोचवू शकत नाही. पण एक जरी आपल्यातून बाहेर फुटला तर मग आपल्या विनाशाची सुरुवात झाली असे समजा आणि मग यासाठी आपण सर्व आपल्या बहुजन समाजाला एक ठेवले पाहिजे आणि कांही चुकून एखादी घटना घडली तर आपण आपल्यात तो विषय ठेवला पाहिजे. आपल्यात फुट पाडणार्याला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. साधारण 25-30 वर्षापूर्वीची एक सामाजिक घटना मला आता आठवली म्हणून सांगतो. कारण ही घटना मी स्वत: पाहिली आणि अनुभवली आहे आणि त्याची सोडवणूक सुद्धा आम्ही सर्व मिळून केली होती. 1994-95 सालची घटना आहे मी ज्याठिकणी राहत होतो त्या नगरात एका व्यक्तीमुळे बौद्ध विहारातील तथागत यांच्या मूर्तीला साधारण थोडा तडा गेला होता. आता ती व्यक्ती बौद्ध नव्हती आणि उद्या गावात ही बातमी गेली. आमच्या नगरात थोडा सामाजिक तनाव निर्माण झाला. आणि एक असाच कमी शिक्षित आणि समाजाची कमी समज असलेला आमचा बौद्ध कार्यकर्ता आमच्याकडे आला आणि आम्हाला म्हणाला, “ तुम्ही काय हातात बांगडया भरल्या आहेत का ?” म्हणजे त्याचे म्हणे होते की, तुम्ही त्याला शिक्षा का देत नाही आणि तशी त्यादिवशी तरुण भारत या वर्तमानपत्रात बातमी सुद्धा आली की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे बोट तोडले आहे. म्हणजे पहा सत्य घटना काय आहे आणि वर्तमानपत्रात काय आले आहे असेच आज मीडिया आपणास दिशाभूल करीत आहे. पण आता साधारण बुद्धीच्या लोकांना हे षड्यंत्र कसे समजणार ? आणि मी ज्या वस्तीत राहत होतो तो पूर्ण कामगार राहत असलेला भाग होता. त्यामुळे तरुण भारत आणि हा पेपर कोणाचा म्हणजे कोणत्या विचारसरणीचा आहे हे समजणे अशक्य आहे. पण आम्ही कांही तरुण मुले सामाजिक चळवळीत असल्यामुळे आम्हाला माहीत होते आणि तशी आमची चर्चा सुद्धा होत होती. आणि त्यामुळे तो आर.एस.एस. चा डाव फसला आणि आम्ही सर्वांची मीटिंग घेतली आणि त्याठिकाणी सामाजिक सलोख्याने तो प्रश्न आम्ही मिटवला. हे उदाहरण सांगण्याचे कारण हेच आहे की, आपल्या बहुजन समाजाला असे आजपर्यन्त फसवून यांनी पोळी भाजली आहे. म्हणजे घटना असते एक आणि हे लोकांना सांगतात वेगळीच आणि आज तर मीडियाने किती कहर केला आहे हे आपणास चांगलेच माहीत आहे. म्हणजे मागे सोशल मीडियावर एक पोस्ट आली होती की, यांचा IT सेल बातमी कशी बदलतो तो फोटो होता मा. राहुल गांधी यांचा ते एका हॉटेलमध्ये जेवण करीत आहेत आणि जेवण करताना टेबलवर एक चहाचा कप आहे तर यांनी त्या चहाच्या जागी दारूचा ग्लास दाखवला होता. म्हणजे सोशल मीडियावर दोन्हीही फोटो आले होते. म्हणजे हे सर्व आर.एस.एस. वाले विज्ञानविरोधी आणि जुनाट विचाराचे आहेत पण तंत्रज्ञानाचा वापर मात्र सर्वात जास्त करतात म्हणजे गैर वापर जास्त करतात. पण आज आपला महाराष्ट्र वैचारिक पुढे आहे आणि त्यामुळेच हे षड्यंत्र फार चालनार नाही. आणि आम्ही सर्व भीमसैनिक चालू सुद्धा देणार नाही. उच्च शिक्षित माणसाने कोणतीही घटना शांत डोक्याने आणि विचारपूर्वक ऐकली आणि पाहिली पाहिजे आणि मगच त्यावर निर्णय घेतला पाहिजे. आपण आजपर्यंत भावनिक होऊन मोठया प्रमाणात समाजाचे नुकसान केले आहे. पण आज तसे होणार नाही असा मला विश्वास आहे. आज अशी स्थिती आहे की, यांची कोणतीही कृती असेल त्याचे उत्तर विचाराने आणि आपल्या बुद्धीनेच द्यायचे आहे. आपण बहुजन काही बुद्धीने कमी नाहीत. फक्त भावनिक होऊन यांच्या हातातील बाहुले होऊ नका. यांचा मेंदू आणि आपले हात हा डाव यांनी खूप वर्ष वापरला आहे पण आता मा. आ. ह. साळुंखे सर म्हणतात त्याप्रमाणे “ आता आपल्या धडावर आपले अपलेच डोके आहे.” याचे भान ठेवले पाहिजे हेच यानिमित्ताने सांगावे वाटते. शेवटी एक शाहीर म्हणतो त्याप्रमाणे आज होऊ नये तो इशारा खूप महत्वाचा आहे. आमचे महाराष्ट्रातील एक मोठे प्रबोधनकार होते मा. प्रतापसिंग बोदडे ते त्यांच्या एका शायरीत म्हणतात,
तुझ्या पाऊलखुणा भीमराया, तुझी पोरं पुसू लागली रे |
आज वैर्याच्या दारात जाऊन, पंगतीला बसू लागली रे ||
प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
नाशिक (9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत