दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

ब्राह्मणीकरण महाराणी अहिल्यामातेचे ,शिकार बहुजन समाजाची…

मध्ययुगातील एक धगधगते स्त्रीरत्न म्हणजे लोकमाता ,राजमाता,राष्ट्रमाता महाराणी अहिल्यामाई होळकर .मूळच्या ऐतद्देशीय बुद्धीमान समाजाने विकसित केलेल्या आणि प्राचीन भारताला श्रीमंत बनविणाऱ्या मातृसंस्कृतीचे विकसित रुप म्हणजे अहिल्यामाई होळकर . खंत याची वाटते की पुराणात दगड झालेल्या आणि श्रीरामाने उद्धार केलेल्या अहल्येची बनावट कथा आज आमच्या एतद्देशीय समाजाला माहित आहे पण अठराव्या शतकात दगडालाही पाझर फुटावा असे खडतर आयुष्य जगणाऱ्या आणि आपल्या रयतेला मातृत्वाचे प्रेम देऊन त्यांचे जीवन फुलविणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्यामाईंची पराक्रमी कथा माहीत नाही ही खेदाची बाब आहे .
बहुजन समाजात माता यशोधरा ,मॉं जिजाऊ , अहिल्यामाता, क्रांतीज्योती सावित्रीमाई ,फातिमाशेख , माता रमाई ही महान स्त्रीरत्ने जन्माला आली .जी गुणवत्तेच्या बाता ठोकणाऱ्या एकाही उच्चवर्णीयाच्या घरी जन्माला आली नाहीत .भारतीय बहुजन समाजाने अख्ख्या विश्वाला दिलेली ही हिऱ्या मोत्यांची खाण .तात्पर्य काय तर बहुजन समाज हा गुणवत्तेची खाण आहे . बहुजनांच्या सुपीक भूमीत सोनं पिकत नाही, सोन्यासारखी माणसं जन्माला येतात , हिरे जन्माला येतात . बहुजन समाजाने आपली ही विरासत आता संघटितपणे समजून घ्यावी .बहुजन समाजात भाईचारा निर्माण होऊन मंगल मैत्री रुजावी .बहुजन महामानवांची आणि महान स्त्रियांची जयंती एकाच जातीने साजरी करण्याचा गुन्हा आपल्या हातून घडू नये .जाती निर्मूलनासाठी लढलेल्या महामानवांना अज्ञानातून आपण जाती-जातीत बांधू नये . बहुजन समाजाने एकत्र येऊन एक दिलाने महामानवांचे जयंती समारोह साजरे केले तरच त्यांना सन्मानाचे अभिवादन ठरेल .अपेक्षित अभिवादन ठरेल .
प्रतिक्रांती झपाट्याने होते पण क्रांतीला वेळ लागतो .इतिहास बदलणे,जुने संकेत बदलणे रंध्रारंध्रात वळवळणारे मनुवादी किडे मारणे हे फार क्रिटिकल काम आहे .फार चिवटपणे, चिकाटीने आणि जिद्दीने ते करावे लागते .आपल्या महामानवांनी न थकता,न थांबता ते केले इथून पुढे ते आपणाला करायचे आहे .मनुवादी लोक चालाखीने बहुजन महामानवांचे ब्राह्मणीकरण करून बहुजन समाजाचे ब्राह्मणीकरण करतात .छ.शिवाजी महाराजांना ‘गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणतात’ तर अहिल्यामाई होळकरांच्या हाती शिवलिंग देऊन त्यांना अहिल्या ‘देवी’, ‘पुण्यश्लोक’ असे संबोधतात . तलवार गाजवणाऱ्या एका रणमर्दानी स्त्रीचे हे केवढे अनैतिहासिक दैवतीकरण . ही किती मोठी विसंगती .जे हात तलवार चालवण्यासाठी निर्माण झाले त्या हातात शिवलिंग किती मोठे इतिहासाचे विकृतीकरण . बहुजन समाजाने हे सगळे मनुवादी गुंते समजून घ्यावेत .अहिल्यामाता धार्मिक होत्या .मानवतेवरील कळवळा,दयाभाव,सहानुभूती,प्रेम,माया त्यांच्या अंतकरणात दरवळत होती या अर्थाने त्या धार्मिक होत्या .परंतु आपली धार्मिकता आपल्या कर्तव्याच्या आड त्यांनी कधीही येऊ दिली नाही .काय होते ते कर्तव्य ? प्रजाहीत , प्रजाकल्याण ,प्रजारक्षण . पहिलं प्राधान्य दिलं सामाजिक कार्याला .पण प्रतिक्रांतीवाले हे सांगत नाहीत .अहिल्या’देवी’,’पुण्यश्लोक’ या ब्राह्मणांनी दिलेल्या पदव्या आहेत .ते ब्राह्मणीकरण करणारे शब्द आहेत . या ब्राह्मणी शब्दांचा बहुजन समाजाने चुकूनही उच्चार करू नये . देवी,देव म्हटलं की महामानवांचे मानवी कर्तृत्व संपते आणि श्रेय जाते देवीला,देवाला .अहिल्यामातेसाठी प्रतिगाम्यांनी अहिल्यादेवी असा शब्दप्रयोग केला आणि फार मोठी प्रतिक्रांती घडली .शब्द हे शस्त्र असतात .शब्दाच्या शस्त्राने मनुवाद्यांनी अहिल्यामातेला देवी म्हटलं मग आमच्या बहुजनातील भाबड्या लोकांनी विचार केला देवीचं ठाण कुठं असतं ?तर मंदिरात .मग बांधा मंदिरं .अहिल्यामातेची लाखो मंदिरं उभी राहीली .स्मारकं उभी राहायला हवी होती,कॉम्पुटर लॅब उभ्या राहायला हव्या होत्या,ग्रंथालय उभे राहायला हवे होते .जी महान स्त्री आपल्या प्रजेला पुत्र मानून रात्रंदिवस समाजकार्यात व्यस्त होती तिला आम्ही मंदिरात कोंबलं .ज्या स्त्रीने विशालकाय असे 29 वर्षे राज्य चालविले तिला आम्ही मंदिरात डांबलं . अहिल्यामातेला देवी म्हणणे आणि तिची मंदिरं बांधणे हे प्रतीक्रांतीचे काम कोणीही करू नये .’पुण्यश्लोक’ हा शब्दही वरून गोड आणि आतून विषारी आहे .अहिल्यामाई धार्मिक होत्या आणि त्या दान दक्षिणा वाटत राहायच्या,मंदिरं बांधत राहायच्या ,दान-दक्षिणा वाटून आणि मंदिरं बांधून त्यांनी एवढं पुण्य कमावलं की त्या ‘पुण्यश्लोक’ झाल्या . अहिल्यामाईला मानणाऱ्या बहुजन लोकांनी असेच पुण्य कमवावे .पुण्यश्लोक व्हावे .क्लासवन,सुपर क्लासवन होऊ नये .माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागांकडे त्यांचे लक्ष जाऊ नये ,त्यांनी नेहमी मंदिरामध्ये गुंतून राहावे आणि व्यवस्थेवर आपलेच अधिपत्य असावे यासाठीच्या या मनुवादी चाली आहेत .बहुजन समाजाने हे धोके ओळखावेत .प्रतिगामी लोक टिळकांचे , सावरकरांचे ,आगरकरांचे मंदिरं बांधत नाहीत त्यांची स्मारकं बांधतात आणि बहुजनांना आपल्या आदर्शांची मंदिरं बांधायला लावतात केवढी ही बदमाशी ? अहिल्यामाई केवळ पूजा पाठ करीत बसल्या असत्या ,हातात शिवलिंग घेऊन त्यावर बिल्वपत्रे वाहत आणि दान-दक्षिणा वाटत राहिल्या असत्या तर होळकरशाही केव्हाच संपुष्टात आली असती आणि अहिल्यामातेची जयंती आज आपण साजरी केली नसती .जागो बहुजनो जागो…!!
आज महाराणी अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने बहुजन समाजाला परिवर्तनासाठी मंगलदायी सदिच्छा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!