बुद्ध जयंतीचा संदेश-भाग २

आर.के.जुमळे
बाबासाहेबांनी धर्मास ग्लानी का येते? या राजा मिलिंदानी विचारलेल्या प्रश्नाला भन्ते नागसेनाने दिलेल्या उत्तराचे विवेचन करताना तीन कारणे सांगतात.
१. पहिले कारण हे की, एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वात गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व कालानुसार असा धर्म नष्ट होतो.
२. दुसरे कारण हे की, धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मास ग्लानी येते. ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिध्द नसतील तरी धर्माला ग्लानी येते.
३. आणि तिसरे कारण हे की, धर्म व धर्माची तत्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ट विभूतिचे पूजन करतात.
बाबासाहेब म्हणतात की, आपण बौध्द धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजे. बौध्द धर्माची तत्वे कालिक (काही काळापुरती) आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही.
म्हणून धम्म प्रचारासाठी व गावा-गावात, मोहल्या- मोहल्यात बुध्द विहारे बांधण्यासाठी आणि समाज प्रबोधन करण्यासाठी समाज बांधवांनी विशेषत: शिकलेल्या बुध्दिजीवी वर्गांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण हा वर्ग समजून घेऊन इतरांना समजावून सांगू शकतो. हा वर्ग बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभधारक आहे. तेव्हा या लोकांवर बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी येऊन पडते.
बाबासाहेब म्हणतात, “मात्र तूमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शुन्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये, म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”
म्हणून बुद्ध धम्म उत्तम रितीने पाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.
बाबासाहेब म्हणतात, “हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिले आहे हे तरूणांनी लक्षांत घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा.” म्हणून आपल्या कमाईतून हा विसावा हिस्सा म्हणजे पाच टक्के आपल्याच घरात, शौकपाण्यासाठी खर्च न करता आपण बाबासाहेबांच्या कार्याकरीता योगदान देऊन खर्च करावा..
म्हणून आजच्या बुद्धजयंतीच्या अनुषंगाने एवढेच नव्हे तर प्रत्येकांनी समाजकार्यात माझा कितपत सहयोग होता आणि यापुढेही मी काय सहयोग देणार याचा अंतर्मुख होऊन अवश्य विचार करावा. तसेच आपल्या जिवनामध्ये धम्माचे अनुसरण करावे तेव्हाच आपणास खऱ्या अर्थाने जयंतीचे महत्व कळले असे दिसून येईल. अन्यथा जयंती साजरी करण्याला काहीही अर्थ उरणार नाही असे मला वाटते.
जयभीम…! नमोबुद्धाय…!!
आर.के.जुमळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत