दिन विशेषदेशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

संत शिरोमणी रविदास

संत शिरोमणी रविदास
महाराजांच्या जयंतीचा
फेब्रुवारी हा पवित्र महिना
आहे. आया बहिणी भाऊ
बहिणी मोठ्या जोशात ही
जयंती…दिवाळी सारखी साजरी करतात. आपापसातील रूसवे फुगवे,
मतभेद, मतभेद आणि वैर
विसरून सर्व शक्ती नुसार जयंती साजरी करण्यात कुठेही मागे रहात नाही.
यंदा ह्या जयंतीचा उत्साह उच्चांक गाठेल; हे निश्चीत!!

ह्या मंगलमय पवित्र प्रसंगी इच्छा असूनही मन दुखावणारे लेखन करण्याचे टाळत असतांनाच दोन शब्द लिहावे लागते आहेत..

आपलीच काही नेते मंडळी नामदार,खासदार, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सेवेला वाहून घेत आपल्या संघटना घाऊक पध्दतीने त्यांना देत आहेत. कार्यक्रमांना मंत्र्यांना आणल्याशिवाय यांचा आत्माच थंड होत नाही. आपल्या मंडळींचा
आत्मा थंड होत नाही.
मंत्र्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने एखादी घोषणा
करून भीकेचा तुकडा फेकला की, आपले सोंगाडे तृप्त होऊन नाचायला लागतात.
मुख्यमंत्री महोदयांना सध्या
जयंतीच्या कार्यक्रमाला
आमंत्रित केले आहे. यामध्ये
कोणाचा विकास होत आहे; हे सगळी जनता समजून आहे. पण मुख्यमंत्री, आणि पंतप्रधान
मोदींनी आपल्यासाठी काय
केलय् ? याचा सारासार विचार नाही त्यांच्यासाठी
लाल गालिचा (कार्पेट) टाकून ओवाळणी करणा-या आपल्या अतिउत्साही, भंपक नटवर्यांनी जरा खालील वस्तुस्थितीवर नजर टाकली तर बरे होईल.

केंद्रात नरेंद्र तर राज्यात
देवेंद्र यांचे दलिंदर आणि
कलंदर सरकार आहे.
गेली दहा वर्षे हे सरकार
सत्तेत आहे. यांनी तमाम
दलित, चाभार, आदिवासी
आणि बौद्धांसाठी काय केले
आहे..याचा लेखा जोखा जरा तपासा. हिंदूत्वाने पछाडलेल्या ह्या जातीयवादी
सरकारच्याच काळात हजारों
अत्याचारांची प्रकरणे रोजच
ऐरणीवर येत आहेत. आपल्या आया बहिणी उपभोगाच्या वस्तु समजून
बलात्कारांच्या शिकार होत
आहेत. आपले मुडदे पडत
आहेत. जातीवरून शिव्या
देवून आपल्याला अपमानित
करत आहेत. जमिनी जबरदस्तीने बळकावल्या जात आहेत. आणि आम्ही????

माझ्या रक्ताच्या प्रिय चांभार
नेत्यांनो,

जातीयवादी मंत्र्यासंत्र्यांच्या टाकलेल्या चतकोर भाकरीच्या भीकेने हुरळून
जावून नाचू नका. आपलं
डोकं जरा नीट धडावर ठेवा.
मेंदू स्थिर ठेवा. अंतर्भूत व्हा. आणि संत शिरोमणी रविदासांचे.. बाबासाहेबांचे
स्मरण करा…आणि शांतपणे आठवा….

अट्रासिटी कायद्याची १३,२५१ प्रकरणें गेली पाच वर्षांपासून प्रलंबित होती. नियम १६ नुसार आपल्या मुख्यमंत्र्यांनी वर्षातून दोन वेळा आढावा बैठका घेणे बंधनकारक आहे. २०१६ पासून बैठका नाहीत. चार वर्षांच्या काळात अन्याय अत्याचाराच्या साडे चार हजार केसेस मुंबई मधील अनुसूचित कार्यालयात धुळ खात पडल्या होत्या. चार वर्षे आयोग बंद होता. तिकडे केंद्रात सुध्दा तिचं बोंबाबोंब आहे. पंतप्रधानांनी बैठका घेतल्या नाहीत. प्रकरण जास्त वाढल्यावर हल्लीच श्री. आनंदराव अडसूळ यांची अध्यक्ष म्हणून राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगावर नेमणूक झाली आहे….. ह्या निष्क्रीय, ढिसाळ कारभाराला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जबाबदार असतांना कार्यक्रमात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करून कोणाचं चांगभलं होणार आहे? ही चमकोगिरी आणि चमचेगिरी करण्यामागे कोणता गुप्त आणि सुप्त हेतू आहे?

एखादे महाम़ंडळ, लिडकॉम म्हाडा, किंवा महाराष्ट्र भूषण साठी आटापिटा चालला असल्याची शंका तमाम बांधवांना येत असल्यास ते रास्तच आहे. खरं पाहता राज्यातील मुख्यमंत्री आणि मोदी साहेब यांच्या विरोधात अट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. असे असतांना त्यांना जाब विचारण्याची हिम्मत दाखवायचे सोडून त्यांचा आदर सत्कार कशासाठी? त्यापेक्षा समाजातील एखाद्या गरीब गटई बांधवाला, किंवा पुण्यातीलच आपल्या कट्टर खानदानी तरूणाला जो आरपार रविदासी आहे. किंवा समाजातील तडफदार नेता गरीब माऊलीला.. किंवा पुण्यातीलच गटई बांधवांचे नेते..संजय बनसोड, (उर्फ जरांगे पाटील) यांना आमंत्रित करून कार्यक्रमाची शोभा कां वाढवत नाही??

देशातील कोट्यावधी चांभार
समाजाचे पवित्र आदर स्थान
म्हणजे तीन रविदासी धाम
आहेत. आम्ही सर्व त्यांच्या
पुढे नतमस्तक आहोत. पैकी,
तिसरे पवित्र धाम पुण्यात
कात्रजला आहे. अलिकडच्या पाच वर्षांत
कात्रज धामाला अतिशय
महत्व प्राप्त झाले आहे.
येथील सर्वेसर्वा सद्गुरू
आहेत. काही मंत्री, आमदार,
खासदार बडे नेते सतत
कात्रजच्या धामाला आवर्जून
भेटी देवून आपले महत्व
वाढवून आपल्या काही
मंडळींना आपल्या सेवेत
लावत असल्याने त्यांना
सुध्दा स्वर्गसुखाचा आनंद
मिळतो…पण!!!!

कात्रजच्या धामा सहित
देशात आणि जगात संत
रविदासांची लाखों मंदिरें
आहेत. त्यांचा आम्हा चांभारांना सार्थ अभिमान आहे. पण आमचे दु:ख फार
वेगळं आहे. देशात चर्मकार
समाजावर रानटीपणाने
अत्याचार होत असून आमच्या आया बहिणींवर
बलात्कार होत आहेत.
आम्ही लाजिरवाणे गुलामगिरीचे जिणे
जगत असतांना… रविदास
महाराजांच्या मंदिरातील
आमचे महाराज, संत महंत आणि गुरू फक्त रविदासांचे संकीर्तन आणि दोहे गात आहेत काय? चर्मकार समाजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी या आपल्या साधू महाराजांची काही जबाबदारी आहे की नाही? शिरोमणी रविदासांचे
जिवन दैदिप्यमान आणि
क्रांतीचे आहे. चर्मकार समाजाचा तो मानबिंदु आहे…..तत्कालीन
शासक सुल्तान इब्राहिम लोदी हे रविदासांना गुरूस्थानी होते. क्रांतिकारक संत म्हणून त्यांची ओळख आहे. हातात टाळ चिपळ्या घेवून गळ्यात माळा घालून दारोदार फिरणारे हे संत नव्हते. सध्याचे आपले साधु
संत महाराज हे तिन्ही धाम
आणि लाखों मंदिरात नुसतेच किर्तन प्रवचन करत
बसले आहेत की काय? समाजावर होत असलेल्या
संदर्भात ही मंडळी अनभिज्ञ
आहेत काय? समाजासाठी
त्यांनी काय केले आहे. बाकीचे सोडा…गडावरील
विराजमान असलेले आदरणीय सुखदेवजी
महाराजांनी खाली उतरून
वाड्या वस्त्यांत जावून
समाजाच्या प्रश्नांवर आवाज
उठवून आंदोलन केल्याचे कधी स्मरणात नाहीत. त्यांची संगत आणि पंगत गडकरीं पासून
मुख्यमंत्र्यां पर्यंत ..तर थेट
समाजातील काही बुबुक्षित आणि निस्तेज मंडळींच्या पुढे जाईल; तो
समाजासाठी सुदिन!!!!

आज देशात काय आहे?
चातुर्वर्ण्य फोफावत आहे.
हिंदुंच्या प्रश्नांवर लाखों
साधु संत, महंत शंकराचार्य
रस्त्यावर उतरून संघर्ष करत
आहेत. सरकारची मान धरून त्यांची कोंडी करत आहेत. असंख्य अवैध आणि अनैसर्गिक मागण्या सरकारच्या बोकांडी
बसून मान्य करून
घेत आहेत. राखीव जागा,
पदोन्नती, संविधानाला विरोध होत आहे. आपल्या
संत रविदास आणि बाबासाहेबांच्या तसबीरींची
विटंबना होत आहे.आणि
आमचे चांभारांचे.. आमच्या रक्ताचे…. रविदासा़चे संत महंत महाराज आपल्या मंदिरात बसून नुसतेचं संकिर्तन आणि धार्मिक प्रवचन झोडत
समाजा पासून दूर जात आहेत. वरिल मंडळींची
सामाजिक बांधिलकी किंवा
उत्तरदायित्व काही आहे की नाही? *येथील जातीयवादी मनुवादी सरकारचे कान
उपटून त्यांना चार गोष्टी
ठणकावून सुनविण्याची
हिम्मत चर्मकारांच्या साधु,
संत महाराजांमध्ये नसेल
तर तिसरं चवथं पांचवं..
असे शंभर धामं असून नसून
काय फायदा?? कात्रजच्या
तिस-या धामावरून खाली
येवून जरा चांभारांच्या वाड्या वस्त्यांत जावून
त्यांचे हाल बघा. काही
असंतुष्ट आत्मे..ज्यांच्या
रक्तात लाचारी आहे; कणाहीन, निस्तेज स्वार्थी अशा लोकांनी धामावर जावून समाजाचे प्रश्न सुटणार आहेत काय? *तुम्ही धामावर तर समाज “निजधामावर”* चालला
आहे..ते जरा निट बघा.

आपल्या चा़भारांना कोणी
वाली आहे की नाही? आम्ही
दलित की हिंदु आहोत? सोयीनुसार येथील कट्टर
सनातानी आपल्याला हिंदु
म्हणतात. आणि जगात त्यांची संख्या गर्वाने फुगवून सांगतात. आणि भारतात हिंदुंची लोकसंख्या ८० टक्के आहे; असे गर्वाने सांगतात. आम्ही चांभार म्हणजे झापडबंद असलेले कोलूचे बैल आहोत. त्यांच्या गोठ्यातील जनावरें आहोत.
आपली अवस्था लुत लागलेल्या
कुत्र्यासारखी झाली आहे. कोणी शिवत नाही. जवळ घेत नाहीत. देवळात घेत नाहीत. जिकडे तिकडे अपमान… नरक यातना!! आपल्या संतांना हे ठाऊक
नाही काय ?? मग खाली उतरून क्रा़तिकारक निर्णय घ्यायला कशाला कचरता? एक तर रविदासी!!! रविदासिया !!!,
रैदास रोहिदास, चमार, चामारा अशा शब्दजंजालात
अडकून काथ्याकूट करत
बसले आहोत. निर्णय घेत नाहीत.आपल्याला
हिंदु म्हणून लाजिरवाणे
जगायचे की, त्या घाणीतून
बाहेर येवून माणूसकीचे जिवन जगायचे आहे??
किंवा बुध्दाला शरण जायचे !!! हा निर्णय तीन धामातील धार्मिक मंडळी घेण्यासाठी हिम्मत कां दाखवत नाहीत? काही तरी मर्दासारखा क्रांतिकारक निर्णय घेणार आहात की नाही? बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर समोर
ठेवून कट्टर मर्दाची भूमिका
घेण्यासाठी सगळ्या रविदासी संत महाराजांनी
तीन धामातून रस्त्यावर
येण्यासाठी एखाद्या ब्राह्मणांकडे जावून मुहूर्त काढायला आणखी किती शतके थांबणार आहोत?

आपल्या धर्मांतराची फक्त घोषणा करा…देशातच नाही…जगात
प्रचंड तुफान येईल. अक्षरशः मोठा विस्फोट होईल. येथील
सरकार नाक घासत आपल्याकडे येईल. पण ह्या
घाणीतून बाहेर पडा. आणि लाजिरवाणे जिणे जगणे सोडा.

गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात
काय चालले आहे? आरक्षण
आणि बढतीच्या प्रश्नावर
मराठा, ओबीसी आणि मुस्लिमांमध्ये उभी आडवी फूट पडली आहे. सगळे रस्त्यावर उतरून संघर्ष करत
आहेत. धनगर आणि भटके
विमुक्ती देखील मागे नाहीत.
खून हाणामारी होत आहेत.
विधान सभा निवडणूका आल्या. शंभर चर्मकार संघटनेचे एकमेव ह्रदय सम्राट नेते शंभर दिशेला!
निवडणूकीसाठी एकी
करून निवडणूका लढवल्या
नाहीत. काहींनी फॉर्म भरला. आणि माघार घेऊन
अवसानघातकीपणा दाखवला. तर काही नेत्यांनी
माकड उड्या मारत आपलाच कपाळमोक्ष करून घेतला.
सगळे मैदानात उतरले.
आम्ही कपडे संभाळत किना-यावर बसलो. आम्ही
कर्म दरिद्री!! आपापसातील
अहंभाव, अभिमान, इर्षा,
असूया आणि हेकटपणा नडला…आणि!!!!

किस को यह फिख्र है
कबीले का क्या हुआ
सब इस पर लढ रहे है
कि सरदार कौन हो?

जयंतीच्या निमित्ताने आपल्या अंगात, अणूरेणूत
संत शिरोमणी संचारला पाहिजे. ज्या शक्तींनी रविदास आणि त्यांच्या धर्म पत्नी ..माता लोणाबाई यांना तलवारीच्या तीक्ष्ण
संपवले..त्या बामणी शक्ती
आजही आपल्या बोकांडी बसून आपल्याला संपवत आहेत. जयंतीच्या हजारों
कार्यक्रमांत हा विषय हिरीरीने मांडला जावा; ही
माझी तमाम बांधवांना हात
जोडून विनंती करत आहे.
ज्या अतिउत्साही नेते मंडळींनी मुख्यमंत्री आणि
इतर मंत्र्यांना कार्यक्रमांना
बोलावण्याचा घाट घालून
कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचा संकल्प केला आहे; त्यांनी मुख्यमंत्र्यांना
भाषणातून वरील जाब विचारण्याची हिम्मत ठेवावी.

जय भीम

जय रविदास

गायकवाड वकील
९८१९७७०१८९

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!