अंधभक्त नावाची नवीन जात ..!

पूर्वी सरकार आणि समाज असा थेट सामना असे. गेल्या दहा वर्षांपासून सरकार आणि समाज यांच्यामध्ये “अंधभक्त” नावाची एक विचित्र अशी स्वयंघोषित फौज उभी झाली आणि ती सरकारची बाजू घेऊन समाजाविरुद्धच लढते आहे…
जणू सरकार ही या फौजेची खाजगी मालमत्ता आहे. या अंधभक्तांचा समज असा आहे की आपल्या शिवाय इतर समाजाचा सरकारवर काही अधिकार नाही किंवा सरकार म्हणजे काय ते फक्त आपल्यालाच कळतं, इतरांना नाही…
याआधीच्या काळात अनेक सरकारं आली गेली परंतु असं कधी झालं नव्हतं. खरं तर सरकारकडून मिळणारी सुखं किंवा दुःखं ही इतर समाजाला जशी अनुभवावी लागतात, तशीच या फौजेतील अंधभक्तांना देखील अनुभवावीच लागतात. ही फौज समाजाचाच एक हिस्सा आहे, पण सरकारची बाजू मांडण्यासाठी हे अंधभक्त समाजापासून वेगळं अस्तित्व दाखवत, हिरिरीनं त्यांच्या पेक्षा वेगळा विचार मांडणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाशी पंगा घेतात. या फौजेला सरकारवर टीका केलेली खपत नाही…
सरकारची अशी असरकारी फौज असणं हे नवं राजकारण आहे.
हे चांगलं की वाईट, हे काळच ठरवील, पण यामुळं समाजात एक दुही उभी असल्याचं चित्र निश्चित आहे आणि लोकांमध्ये आपापसात विचित्र कटुता निर्माण झाली आहे. प्रश्न आहे तो असा की ही कटुता देशाला पुढं नेमक कुठं घेऊन जाणार?
कोणतही सरकार काही अमरपट्टा घेऊन येत नाही तसं विद्यमान सरकारदेखील काही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, ते सत्तेत नसेल तेव्हा आजच्या या अंधभक्त फौजेचं काय होणार?
यातला धोका म्हणजे ‘आपलं सरकार’ आलं असं कुणा एका गटाला वाटणं आणि त्या गटाने इतर समाजाशी दुहीचा धोका स्वीकारणं आणि इतरांना सरकारबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाकारणं आणि बोलायचंच असेल तर आम्हाला आवडेल असंच बोला, असं आग्रही राहणं, या विकृतीनं एकसंघ देश ही भावना बाजूला पडते आहे…
“सरकार” या व्यवस्थेबद्दल आता समाजात व्यवस्थित अशी विश्लेषक चर्चा किंवा संवादी टीका होतच नाही, तर सगळ्याला एक वितंडवाद ….
चाळीस पैशांचे चियर लीडर !
भारतात १४ वर्षांपूर्वी आयपीएल क्रिकेट सुरू झाले. त्यात एक मजेशीर प्रकार होता. खेळाडूने चौकार,षटकार मारला की मैदानाबाहेरील छोट्याश्या स्टेजवर तोकड्या कपड्यातील परदेशी मुली नाचू लागायच्या.
पब्लिक त्या मुलींकडे बघत जल्लोष करायचं. त्या मुलींना क्रिकेटचे काही ज्ञान होतं किंवा खेळाडूंची माहिती होती असं काहीही नाही. फक्त इशारा झाल्यावर नाचून लोकांचं लक्ष वेधून घेणे एवढंच त्यांचं काम आणि चियर लीडर हीचं त्या मुलींची ओळख.
तसाच काहीसा प्रकार २०१४ पासून भारतीय राजकारणात पण सुरू झाला. जशा मैदानातील चियर लीडर मुली तोकड्या कपड्यात नाचू लागतात तशी “तोकड्या बुद्धीची” काही मंडळी कोणत्याही सरकारी मूर्खपणावर नाचू लागतात. त्यांच्या दृष्टीने तो मास्टर स्ट्रोक असतो.
नोटबंदी, GST, लॉक डाऊन असो, की थाळ्या वाजवण असो, भक्त रुपी चियर लीडर तोकड्या बुद्धीने नाचायला तयार होतात आणि वर गेल्या ७५ वर्षांत असा मास्टर स्ट्रोक कोणी मारलाच नव्हता असा आरडाओरडा करतात.
आयटी सेलच्या इशाऱ्यावर नाचायचं आणि त्यांच्या कडून आलेले मेसेजेस भसाभसा ईतर व्हॉट्स ॲप ग्रूपवर ढकलायचे हेचं या भक्तांचे काम गेली दहा वर्षे सुरू आहे.
आयपीएल मधल्या चियर लीडरना नाचण्याचे जसे पैसे मिळतात, तसेच सोशल मीडियाच्या चियर लीडरना (मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या अंध भक्तांना) देखील प्रत्येक मेसेज मागे मिळतात “चाळीस पैसे” आणि त्यासोबतच लोकांचे शिव्याशापदेखील.
सत्तेत सरकार कोणतेही असो, ते चुकले की जनतेला त्या सरकारला प्रश्न विचारायचा अधिकार असतो. त्या प्रश्नाची सरकारनेच उत्तरे दिली पाहिजे . मध्यस्ती व्यक्ती, किंवा संघटना यांनी लोकांना शिव्या देणे ट्रोल करणे याला काही अर्थ नाही…त्यामुळे काय योग्य व काय नाही, याचा सदसदविवेक बुद्धीने विचार करून प्रत्येक नागरिकाने विचार करावा. फक्त आपण त्या पक्षाचे कार्यकर्ता,पदाधिकारी आहोत म्हणून आपल्या पक्षाने जे धोरण आखले,निर्णय घेतले ते सर्वच योग्य आहेत व त्याला लोकांनी विरोध केला म्हणुन शिव्या देणे, देशद्रोही, धर्मद्रोही ठरवणे अशी बेगडी वृत्ती सोडून द्यायला पाहिजे…
सरकारला विरोध करण्याचा लोकांना अधिकार आहे हे मान्य करायला पाहिजे आणि आपण जनतेने देखिल बिनधास्तपणे, या भक्त मंडळींना न घाबरता आपला सरकारवर टिका करण्याचा अधिकार टिकवून ठेवण्यासाठी सतत जागे आणि सरकारी निर्णयांचे पोस्टमार्टेम करत राहिले पाहिजे. तरच लोकशाही टिकेल….
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत