देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

तुम्ही हिंदू का? मुस्लिम, बहिष्कार व शांती

डॉ. अनंत दा. राऊत

२२ एप्रिल २०२५ रोजी भारताचं नंदनवन असलेल्या कश्मीरमधील पहलकाम इथं अतिरेक्यांनी गोळ्या झाडून २८ भारतीयांना मारलं. तुम्ही हिंदू की मुस्लिम हे विचारून हिंदूंनाच मारलं. मुस्लिमांना सोडलं. अशा या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या भावना व्हिडिओच्या द्वारे समोर आलेल्या आहेत. यावरून मुस्लिम धर्म नसलेल्यांना मारलं हे पुराव्यासह समोर येतं. अतिरेक्यांनी केलेला हा मनुष्यसंहार अत्यंत निंदनीय आहे. त्यांचं हे कृत्य अत्यंत संतापजनक, घ्रणास्पद आहे. त्या अतिरेक्यांना नेमकं टिपून त्यांना कठोरातकठोर शिक्षा केलीच पाहिजे. त्या अतिरेक्यांना हे अमानुष कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या अमानुष यंत्रणेचा शोध घेऊन ती यंत्रणा मुळासकट उखडून काढली पाहिजे. भारतीय सैन्याने आजच्या मध्यरात्री पाकिस्तानातील अतिरेक्यांचे तळ शोधून त्यांच्यावर मिसाईल डागले. असे नेमके लक्ष टिपून अतिरेकी घडवणाऱ्या संपूर्ण केंद्रांना नेस्तनाबूद करावे लागेल.

पहलगाम हल्ल्यामध्ये अतिरेक्यांनी मुस्लिमांना मारलं नाही, हिंदूंनाच टिपून मारलं यात बहुतांशी तथ्य असल्याचं दिसतं. परंतु या घटनेचा अर्थ सारे मुसलमान अतिरेकी आहेत असा अर्थ कुणी लावत असेल तर ते योग्य ठरणार नाही. असे काही व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर फिरत आहेत की ज्यातून मुस्लिमांवर बहिष्कार टाका. त्यांच्याकडून कुठल्याही कोणत्याही गोष्टी विकत घेऊ नका, असे आवाहन या व्हिडिओद्वारे केले जात आहे. दुसरे एक वास्तव तेव्हाच लक्षात आलेले आहे की, गोळ्या घालणाऱ्या अतिरिक्यांनी हिंदू मुस्लिम हा भेद केला असला तरी कश्मीरच्या मुस्लिमांनी हा भेद मुळीच केलेला नाही. पर्यटकांना वाचवण्यासाठी सय्यद सारखा मुस्लिम तरुण अतिरिक्यांना भिडला अतिरेक्याची बंदूक खेचू लागला आणि तोही या अतिरेकी हल्ल्यात मारला गेला हे एक वास्तव आहे. तसेच हल्ल्यात जे जखमी झाले, जे वाचले त्यांना मदत करणाऱ्यांमध्ये

त्यांना दवाखान्यात नेणाऱ्यांमध्ये, त्यांना सहारा देणाऱ्यांमध्ये सारे सारे कश्मीरी मुस्लिम आहेत.
कश्मीरमधील बहुतांश मुस्लिम कुटुंबांचा व्यवसाय पर्यटकांना सेवा देणे हाच आहे. कश्मीरच्या नंदनवनात गेल्यानंतर मुसलमानांची सेवा घेतल्याशिवाय कोणताही पर्यटक त्या नंदनवनाच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकत नाही, हे वास्तव विसरून चालणार नाही. कश्मीर आणि भारतातल्या सर्वच मुस्लिमांनी पहलगाम घटनेचा तीव्रपणे निषेध केला. अतिरेक्यांना कठोर शिक्षा करण्याची भूमिका घेतली. हे अतिरेकी इस्लाम धर्माचे असू शकत नाहीत अशी भूमिकाही मांडली.

आता मूलभूत प्रश्न असा आहे की, पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांनी हिंदू मुस्लिम असा भेद केला आणि निवडून हिंदूंना मारले, म्हणून भारतातल्या हिंदूंनी हिंदू मुस्लिम असा भेद करायचा का? आणि मुसलमानांना निवडून बहिष्कृत करण्याची भूमिका घ्यायची का? ही भूमिका योग्य व विवेकी आहे का? या प्रश्नाचे सुस्पष्ट उत्तर हे आहे की हिंदूंनीच नव्हे तर कुणीही हिंदू-मुस्लिम असाच नव्हे तर मानवनिर्मित जात धर्मीय असा कुठलाही भेद मुळीच करू नये. असा भेदाभेद करणे आणि कुणावर तरी बहिष्कार घालण्याची भूमिका घेणे अयोग्य व अविवेकी स्वरूपाचे आहे. देशातली आणि जगातली सर्वसामान्य माणसे आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माची कर्मकांडे करत असली तरी दुसऱ्या धर्मीयांचा द्वेष करत नसतात. आपणा सर्वांनाच एकमेकाची गरज आहे. एकमेकाला सहकार्य करूनच आपले जीवन सुखकर होऊ शकते आणि आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकतो, याचे भान सर्वसामान्य माणसांना कायम असते. हे भान बाळगूनच सर्वसामान्य माणसे आपले जीवन जगत असतात. सर्वच धर्मातील लोकांनी एक मूलभूत नैसर्गिक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की आपण नैसर्गिक सत्य स्वीकारले पाहिजे. आपण हिंदू, बौद्ध, जैन, शीख, मुस्लिम, असणे हे नैसर्गिक सत्य नाही. ते मानवनिर्मित मनोवास्तव आहे. आपण सारी माणसे आहोत हे नैसर्गिक सत्य आहे. धर्म कल्पनेचे भूत आपल्या मानगुटीवर अतिरेकीपणाने बसले की आपण मूलत: माणूस आहोत याचाच आपणाला विसर पडतो. आणि आपण धर्माच्या नावाने परस्परात भांडत राहतो. माणूस माणसाची कत्तल करतो. धर्माच्या नावाने लोक जेव्हा माणूस मारत असतात तेव्हा ते प्रचलित असलेल्या कोणत्याही धर्माचे, म्हणजे धर्मातील नैतिक तत्त्वांचे अनुयायी नसतात. ते अधार्मिकच असतात. परंतु स्वतःचा संकुचित स्वार्थ साधून घेण्यासाठी ते धर्माच्या आड उभे राहून अमानुष असे क्रूर कृत्य करत असतात. अतिरेकी हे अशाच वर्गात मोडणारे असतात. हे वास्तव लक्षात घेऊन आपण विवेकाने वागले पाहिजे. अतिरेकी धर्म विचारून मारतात म्हणून आपणही धर्म विचारून मारायचे का? ते अतिरेकी आहेत, हैवान आहेत, मानवतेचे शत्रू आहेत ते मुळीच धार्मिक नाहीत ही गोष्ट आपण गंभीरपणे लक्षात घ्यायची असते. सर्व माणसांचे सहजीवन महत्त्वाचे. सहकार्य महत्त्वाचे. सहिष्णुता महत्त्वाची. वैचारिक वैविध्याचा आदर करणे महत्त्वाचे. सांस्कृतिक वैविध्याला समजून घेऊन त्या वैविध्याचा गौरव करणे महत्त्वाचे. दुसऱ्याच्या सांस्कृतिक घटकाच्या अज्ञानापोटी त्याचा द्वेष करणे चुकीचे असते. आपल्याकडे असा द्वेष करण्याची प्रवृत्ती वर्तमानात मोठ्या प्रमाणात वाढते आहे. ही प्रवृत्ती राष्ट्रासाठी आणि एकूणच जागतिक मानवतेसाठी घातक आहे.

याच काळात ‘अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. भारतात जात विचारून वारंवार अन्याय केला गेलेला आहे, केला जातो. धर्म विचारून गोळ्या घालणारे अतिरेकी जेवढे मानवतेचे शत्रू आहेत तेवढेच जात पाहून भेदाभेद करणारे आणि अन्याय करणारे स्वतःला हिंदू धर्मीय म्हणवणारेही तेवढेच मानवतेचे शत्रू आहेत.’ अशा आशयाचे संदेही या काळात समाज माध्यमावर फिरले.

या संदेशाबद्दलचे चिंतनही सर्वांनीच गंभीरपणे केले पाहिजे. प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाचे माणूसपण लक्षात घेऊन प्रत्येकाने माणुसकीने व प्रेम मैत्रिणी वागणे हाच सर्वांच्या सौख्याचा व प्रगतीचा एकमेव मार्ग आहे, हे कुणीही कधीही विसरून चालणार नाही.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!