निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

“जर सरकार भारतातील बहुजनाला ‘गुलामी’ करायला भाग पाडणार असेल तर आपण सरकार ‘बदलायला’ शिकले पाहिजे ! आयु. विजय बनसोडे

या सरकार बदलाच्या प्रक्रियेत राज्यातील विद्वानांनी बाळासाहेबांना साथ दिली पाहिजे !

आपल्या देशामध्ये मागच्या दहा वर्षांमध्ये सरकारने हिंदुत्वाच्या नावावर जो नंगानाच चालवीला आहे, याचे कांहीं अंशीं आपण बळी पडत आहोत परंतु आपली येणारी “पिढी” मात्र मोठ्या प्रमाणात या नंगानाचाला नक्कीच बळी पडणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भारतातील आंबेडकरवाद्यांना अडगळीला टाकण्याचे षडयंत्र मनुवादी आणि गांधीवादी राजकीय पक्षाकडून कशा प्रकारे करण्यात आले याचं दर्शन भारतातील तमाम एस.सी/एस.टी/ओ.बी.सी आणि मायनॉरिटीच्या लोकांना दिसून आलं. परंतु इथले मनुवादी/गांधीवादी राजकीय पक्ष आंबेडकरवादी विचाराच्या राजकीय पक्षांना “खतम” करण्याचं षडयंत्र करत आहेत, ही बाब महाराष्ट्रातील तथाकथित विचारवंत, साहित्यिक, लेखक, डॉक्टर, इंजिनियर्स आशा विद्वानांच्या मात्र लक्षात येत नाही यास काय म्हणावे हेच कळत नाही !

महाराष्ट्राच्या लोकसभा राजकारणामध्ये बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली या भूमिकेवर चिंतन आणि मंथन करण्यासाठी भारताचे अर्थतज्ञ अर्थात भारताच्या अर्थकारणाचे नियोजन करणारे काँग्रेस धार्जिने भालचंद्र मुंणगेकर यांनी बाळासाहेबांच्या धोरणावर बोलताना मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप नोंदवला की, अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी आघाडीशी जुळवून घेणं अपेक्षित होतं. खरंतर वरकरणी ही गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारची वाटत असली तरी भालचंद्र मुंणगेकर सारख्या मोठ्या विद्वानाने बाळासाहेबांवर भाष्य करत असताना महाराष्ट्रातल्या एकूण 40 ते 50 वर्षाच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन बोलायला पाहिजे होतं. परंतु त्यांच्या बोलण्यातून तसं दिसलं नाही. काय यास आपण भालचंद्र मुंणगेकरांचे अज्ञान म्हणू शकतो का ? तर दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा क्षेत्रामध्ये काम करणारे शाम मानव म्हणतात की, “मी काही राजकीय व्यक्तिमत्व नाही परंतु सध्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांना मोठी व्यापक भूमिका घेणे गरजेचे होतं. परंतु तसं झालं नाही. त्यामुळे आपण आघाडी सोबत राहील पाहिजे” असं त्यांचं मत आहे.

खरं तर महाराष्ट्रातल्या या दोन विद्वानांची मतं ऐकल्यानंतर असं वाटतं की, आपण आज ही ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय चळवळीला स्वतंत्र अस्तित्व असावं’ असा विचार करत नाही. ही बाब प्रकर्षाने या ठिकाणी दिसून येते. जवळपास वीस वर्षांमध्ये देशाचं अर्थकारण सांभाळत असताना काँग्रेसची नीती संविधान समर्थक होती काय ? काँग्रेसच्या सत्तेच्या 20 वर्षाच्या काळामध्ये भालचंद्र मुंणगेकारांनी देशाच्या अर्थकारणाची धुरा सांभाळत असताना काँग्रेस सत्तेच्या काळात भारतातील एस.सी/एस.टी आणि इतर मागासवर्गीय, मायनॉरिटी समाजाच्या अर्थकारणाची नीती ठरवित असताना काय भूमिका घेतली हे सुद्धा त्यांनी सांगितले पाहिजे. मग परिस्थिती अशी बिकट असेल तर आज आपण स्वतंत्र स्वतःचा सवता सुभा उभा करत असताना किंवा आंबेडकरी विचाराच्या राजकारणाची स्वतंत्र दिशा ठरवीत असताना बाळासाहेबांच्या भूमिकेवर टीका का करावी ? हेच समजत नाही. याचा अर्थ असा होतो की, आपण किती ही मोठे विद्वान असलो तरी ही राजकीय दृष्ट्या आश्रित आणि उपेक्षित राहण्यातच धन्यता मानत आहोत हे मोठे विदारक वास्तव आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील विद्वान आणि विचारवंतांनी बाळासाहेबांच्या राजकीय भूमीवर टीका टिपणी करण्यापेक्षा आजच्या या राजकारणामध्ये चौरंगी आणि पंचरंगी लढतीमध्ये बाळासाहेबांना विजय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे वाटतं.

तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकेचे स्वागत करण्यापेक्षा चिकित्सा आणि समीक्षा करत असताना आपण आपल्या महाराष्ट्रातील इतर आंबेडकरवादी राजकीय पक्षांच्या नेत्यांची थोडीशी समीक्षा करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या 40 ते 50 वर्षापासून गवई, आठवले,कवाडे,ही मंडळी आंबेडकरी विचाराच राजकारण करत आहे. यांच्या एकूणच राजकीय धोरणांकडं किंवा भूमिकांकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, आतापर्यंतच्या काळामध्ये प्रस्थापित गांधीवादी आणि मनुवादी राजकीय पक्षांचा त्यांना सन्मानाने सोबत घेण्यासाठी प्रयत्न होता का ? काय ही सर्व मंडळी इतर राजकीय पक्षांच्या पुढे आपली राजकीय भूमिका परखडपणे मांडू शकत होती का ? काय यापैकी कोणत्या राजकीय नेत्याच्या अवती भवती राज्याचे राजकारण फिरत होतं का ? मागच्या 40 वर्षात उपरोक्त आंबेडकरवादी नेत्यांच्या आवती भवाती निवडणूक राजनीती फिरत नसेल तर याला आपण काय म्हणावे ? आणि का फिरत नव्हती याचा ही विचार करणे गरजेचे आहे. परंतु आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष बाळासाहेबांच्या रणनीतीपुढे हातबल झालेले दिसत आहेत. ही का साधीसुधी गोष्ट आहे का ! त्यामुळे आज आपण बाळासाहेबांच्या राजकीय भूमिके वर टीका टिप्पणी करण्यापेक्षा चिकित्सा आणि समीक्षा करण्यापेक्षा ज्या परिस्थितीमध्ये आपण ज्या साधन संपत्तीच्या बळावर प्रस्थापितांशी लढू शकतो, त्या प्रत्येक साधनाचा वापर करत या लोकसभा निवडणुकीमध्ये लढाई करणं अत्यंत गरजेचं आहे.

मागच्या काही दिवसापूर्वी अगदी मिठू सारखा मिठू मिठू बोलणारे आंबेडकरी समाजातील बुद्धिजीवी, विचारवंत, साहित्यक हा आता मित्र अतिशय गप्प झाला आहे. कारण बाळासाहेब आंबेडकरांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका घेतली ती भूमिका आवडली नसावी महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी विचाराच्या राजकीय पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असावे असेच कदाचित यांना मान्यचं नसावे. महाराष्ट्र मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय पक्षाचे अस्तित्व स्वतंत्र असावे किंवा आपली शक्ती ही दखलपात्र असावी असा विचार इथे रुजत नसल्यामुळे आज बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय इथल्या बुद्धिजीवी, साहित्यिक, विचारवंतांना रुचत नाही असं म्हटले तर वावगे ठरणार नाही.

खरं तर आंबेडकरी समाजातील फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ विचाराच्या बुद्धिजीवी कर्मचारी विद्वानांनी विचार करायला हवा की मागच्या जवळपास 70 वर्षांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं राजकारण करणाऱ्या विविध राजकीय पक्षांची अवस्था काय ? त्यांचा राजकीय दर्जा काय? त्यांच्या राजकीय भूमिका काय ? ग्रामपंचायत पासून ते लोकसभेच्या निवडणुकांमध्ये हे लोक कोणत्या प्रकारची धोरणं आणि ध्येय राबवतात ? याचा मात्र आजचा हा बुद्धिजीवी आणि आंबेडकरवादी म्हणून घेणारा तथाकथित विद्वान विचार करताना दिसत नाही. तर ते विद्वान आंबेडकर समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मनुवादी/गांधीवादी नेत्यांच्या आदेशावरून करत आहेत.

सद्यस्थितीला महाराष्ट्र मध्ये अस्तित्वात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत असल्याचं सांगणाऱ्या राजकीय पक्षांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काय अवस्था असते ? किंवा आतापर्यंत याच राजकीय पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दखलपात्र असा धोरणात्मक पर्याय मनुवाद आणि गांधीवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांसमोर ठेवला आहे का ? हा सुद्धा विचार आज बाळासाहेबांवर टीका करताना किंवा टीका करणाऱ्यांनी करायला पाहिजे. तर आपल्या लक्षात येईल की मागच्या 70 वर्षांमध्ये पुरोगामी महाराष्ट्रात आंबेडकरी विचाराच्या राजकारणाची काय स्थिती आणि अवस्था आहे ? हे सुद्धा आताच्या क्षणी तपासणी करणं गरजेचं आहे.आघाडी सोबत जायला पाहिजे असा विचार सांगणाऱ्या विद्वानांनी लक्षात घेतले पाहिजे की, मागच्या अनेक दशकापासून राज्यातील काही थोर नेतेमंडळी इतर राजकीय पक्षासोबत आघाडीमध्ये आहे. काय त्यांच्या आघाडी करणे, आघाडीत राहण्यामुळे आंबेडकरी विचाराचा विजय कुठे झालेला दिसतो आहे का ?

पुरोगामी महाराष्ट्रात धर्मांध राजकीय पक्षांना रोखण्यासाठी बाळासाहेबांनी मागच्या दोन वर्षांमध्ये जी धोरणे आणि ज्या प्रकारे राजकीय नितीचा वापर केला,याकडे पाहिलं तर निश्चितपणे असं सांगू शकतो की, आज 2024 मध्ये फुले, शाहू, आंबेडकवाद हा बहुजन समाजाचा विचार म्हणून खऱ्या अर्थाने सर्वत्र रुजत असल्याचे चित्र आपल्याला पाहण्यास मिळत आहे. जसे की मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे स्थित जवळपास 500 वर्षांपूर्वीची मस्जिद ज्या धार्मिक आणि राजकीय द्वेषातून पाडण्यात आली तर दुसऱ्या बाजूला औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढविण्याचा विषय असेल या दोन्ही ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली, खरं तर बाळासाहेबांच्या या प्रचंड अशा शक्तिशाली व ताकतवर भूमिकेमुळे आर.एस.एस प्रणित भाजपा आणि त्यांच्या पिलावळींचा महाराष्ट्रात अराजकता माजविवून धार्मिक दंगली घडून आणण्याचा जो प्रयत्न चालू होता तो प्रयत्नच बाळासाहेबांनी हाणून पाडला ही काय साधी-सुधी गोष्ट नव्हती. बाळासाहेबांच्या या एकूण शक्तिशाली असलेल्या रणनितीकडे सुद्धा आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आणि निवडणूक काळात या सर्व मुद्द्यांना प्रत्येक मुस्लिम वस्त्यापर्यंत घेऊन गेले पाहिजे.

तरच आपल्या लक्षात येईल की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र पाऊल उचलत असताना महाराष्ट्रामध्ये एकूण जातीय समीकरणाला जोडण्याचा मोठा यशस्वी प्रयत्न आपल्या धुरंधर अशा रणनितीमधून केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने असलेला महार अर्थात बौद्ध, मातंग, माळी, धनगर आणि मुस्लिम समाज अशा या सत्तेपासून दूर असलेल्या 4MD जातीय समीकरणाला (बौध्द म्हणवून घेणारा महार, मांग,माळी,मुस्लिम आणि धनगर ) राजकारणामध्ये उतरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत बाळासाहेबांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण राजकारणामध्ये “मतं” जोडण्याचं काम केलं पाहिजे.

तर दुसऱ्या बाजूला मागच्या दोन वर्षाच्या आरक्षण आंदोलनामध्ये बाळासाहेबांनी ज्या प्रकारे विस्थापित मराठ्यांची भूमिका इतर मनुवादी आणि गांधीवादी राजकीय पक्षांच्या तुलनेत विस्थापित मराठ्यांची बाजू कणखरपणे घेतली याचा सुद्धा मोठा परिणाम या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहण्यास आपल्या सर्वांना मिळेल. सध्याची लोकसभा ही धार्मिक मुद्द्यांपेक्षा विकासात्मक आणि आरक्षणाच्या दृष्टीने खूप मोठी असलेली आपल्याला पाहण्यास मिळत आहे. जरांगे पाटलांच्या एकूण आरक्षण आंदोलनाच्या काळामध्ये बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली ती महाराष्ट्रातील कित्येक लोकसभा सीट वरती बाळासाहेबांना पोषकच ठरणार आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये विस्थापित मराठा आणि प्रस्थापित मराठा हे सूत्र राजकारणावर मोठा परिणाम करेल. कारण विस्थापित मराठ्यांच्या विकासाचा मुद्दा आतापर्यंत कोणी लावून धरला नव्हता. परंतु आरक्षणाच्या माध्यमातून विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे.सत्तेच्या माध्यमातून विविध सुख सुविधा, सवलती मिळाल्या पाहिजे हा विषय मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रस्थापित मराठ्यांची राजनिती ही स्वतःच्या पद, प्रतिष्ठा आणि संपत्तीसाठी आहे ही गोष्ट विस्थापित मराठ्यांच्या सुद्धा लक्षात आल्यानं विस्थापित मराठ्यांनी बाळासाहेबांच्या भूमिकेचं मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. त्यामुळं ह्या सर्व बाबी आपण लक्षात घेऊनं सध्य परिस्थितीला उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेणे उचित ठरते.

विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक 8600210090
जि.संघटक भारतीय बौध्द महासभा
????????????????????????????????????????????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!