महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

सत्य शोधक विद्रोही साहित्यिक बाबुराव बागूल – डॉ. अनंत दा. राऊत

आदरणीय आबा अर्थात बाबुराव बागूल यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्या साहित्याचा अल्पसा परिचय…

सत्य शोधक विद्रोही साहित्यिक बाबुराव बागूल
डॉ. अनंत दा. राऊत

मराठी साहित्यात १९६० नंतर उदयास आलेल्या बाबुराव बागूल यांनी समाजातील सत्याचा शोध घेणारे साहित्य लिहिले. एकूणच मराठी साहित्य प्रवाहाला वास्तकाभिमुख बनवले. बागुलांच्या पूर्वी मराठी साहित्यामध्ये जे लेखन केले जात होते ते लेखन खऱ्या अर्थाने मराठी माणसाच्या वास्तव जीवनाचे प्रतिनिधित्व करणारे लेखन होत असे म्हणता येत नाही. कारण बागुलपूर्व मराठी साहित्यात मूठभर मध्यमवर्गियांच्या जीववनाचेच प्रामुख्याने चित्रण होत होते. परंतु हा पांढरपेसा मध्यम वर्ग म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी माणूस नव्हे, हे भान बागुलांच्या साहित्याने आणून दिले. महाराष्ट्रातील मराठी माणूस खेड्यापाड्यात, वाडी तांड्यात, बकाल अशा झोपडपट्टीमध्येच मोठ्या प्रमाणावर राहतो. बाबुराव बागुलांनी खेड्यात अथवा शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाच्या जीवनातील दारिद्रय व भुकेतून येणारी विदारक वेदना आपल्या साहित्यातून खूप मोठ्या परिणामकारक रीतीने, आविष्कृत केलेली आहे.

बाबुराव बागुलांनी आपल्या वाङ्मयीन कारकिर्दीमध्ये कथा, कादंबरी व कविता हे तीन वाङ्मयप्रकार हाताळले. समीक्षा लेखनही केले. ‘जेंव्हा मी जात र चोरली होती, मगण स्वस्त होत आहे. हे त्यांचे कथासंग्रह. सूड, आंबेडकर भारत, कोंडी, पावशा, पाषान, सरदार या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ‘दलित साहित्यः आजचे क्रांतीविज्ञान’ हा त्यांचा समीक्षा लेखांचा संग्रह प्रसिद्ध आहे. बागुलांची कविता ‘वेदा आधी तू होतास’ या संग्रहातून प्रसिद्ध झाली आहे.

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे बागुलांचे सर्वच साहित्य समाजातील सत्याचा शोध घेणारे आहे. बागुलांनी मांडलेले पहिले सत्य म्हणजे या देशातल्या झोपडपट्टीतील रखरखते समाज वास्तव. बागुल मांडलेले हे वास्तव मध्यम वर्गीयांच्या संकुचित कल्पनेच्या बाहेरचे आहे. बागुलांच्या कथेमध्ये अत्यंत चित्तथरारक अशा घटना घडताना दिसतात. भारत देश स्वतंत्र झाला पण या देशातील सर्वसामान्य माणसाच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या गरजाही भागलेल्या नाहीत. त्यामुळे या माणसाला अत्यंत पशु पातळीवरील जीवन जगावे लागते. नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी अत्यंत अमानुष पातळीवरील संघर्षही द्यावा लागतो. थंडीपासून स्वतःच्या शरिराचे संरक्षण करण्यासाठी इथल्या माणसांना आपापसातचं किती कडवा संघर्ष करावा लागतो याचे अत्यंत चित्तथरारक असे चित्रण बागुलांनी ‘मैदानातील माणसे’ या कथेमध्ये केलेले आहे.

बाबुराव बागूल मानवी जीवनातील वेदनेचा तीव्र आविष्कार तर करतातच परंतु या वेदनेच्या सत्य कारणांचाही शोध घेतात. या देशाची धार्मिक (?) परंपरा मानवी जीवन दुःखीच असते असे म्हणते. पूर्व जन्मी केलेल्या पापामुळे माणसाला दुःख मिळते असे सांगते. बागुलांची कथा आणि कादंबरी मानवी जीवनातील दुःखाला पूर्वजन्मीचे पाप, नसीब किंवा दैव कारणीभूत नसते त तर या दुःखाला प्रस्थापित विषमतावादी समाजव्यवस्था कारणीभूत असते असे सांगते, प्रस्थापित धर्म व जात व्यवस्था शोषणावर आधारलेली आहे. ही व्यवस्था या देशातल्या बहुसंख्य माणसांना स्वप्रगतीची संधीच देत नाही. त्यामुळे ही माणसे अज्ञानांधकारातच राहतात, अशी ही माणसे प्रचंड काचाडकष्ट करतात पण योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांचे दारिद्रय कधीही संपत नाही. पर्यायाने त्यांना कधीही सन्मानाने जगता येत नाही. अशा स्वरुपाचे चिंतन बागुलांच्या सूड, पावश्या, सरदार. पाषाण, या कादंबऱ्यांच्या कथानकातून प्रकट होते.

माणसाचा उध्दार करण्यासाठी कधीही कोणतीही दैवी शक्ती त्याच्या मदतीला येत नसते तर माणसाला स्वतःचा उध्दार स्वतःच करावा लागतो, या दुर्लक्षिलेल्या सत्याची प्रभावी नोंद बागुलांचे साहित्य करते. धार्मिक परंपरा, परमेश्वर कधीतरी तुझे कल्याण करील असे सामान्य माणसांना नेहमीच सांगत असते पण त्यांचे कल्याण कधीही होत नसते, हे या देशातले रखरखते वास्तवही बागुलांचे माहित्या अधोरेखित करते. बागुलांच्या ‘विद्रोह’ या कथेतील जय या नायकाचे वाडवडील परंपरेने प्रामाणिकपणे भंगीकामच करत आले. परंतु परमेश्वराने त्यांचे कल्याण कधीच केले नाही. म्हणून जय हा बागुलांचा नायक स्वतःच स्वतःचा उध्दार करून घेण्यासाठी भरपूर शिक्षण घेऊन सॉक्रेटीससारखा ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करतो. त्याचे स्वप्न साकार होण्याआड येणाऱ्या संकटांना तो खूप मोठ्या जिद्दीने तोंड देतो. बागुलांच्या ‘रिपार्टाज’ या कथेतील भीमा नांदेडकर या नावाचा नायकही अशाच प्रवृतीचा आहे.

बाबुराव बागूलांचे साहित्य हे वैश्विक पातळीवर जाणारे कसदार साहित्य आहे. या साहित्यामधून मूलभूत मानवी वृत्ती प्रवृतींचा अत्यंत प्रत्ययकारी आविष्कार केला जातो. बागुलांच्या साहित्यातून प्रकट होणारे दुःख हेच मुळात वैश्विक पातळीवरील असते. माणसांना काही नैसर्गिक प्रेरणा असतात, त्याची तृप्तता करण्यासाठी माणूस सतत धडपडत असतो. अन्न क्षुधा, काम क्षुधा व सन्मान क्षुधा या माणसांच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत. त्या प्रेरणांची तृप्ती झाली नाही तर माणूस पिसाळून जातो. प्रसंगी अत्यंत पाशवी पातळीवरील अमानुष अशा कृती करत राहतो. ‘वानर’ या कथेतील बापू पैलवान, ‘काळोखाचे कैदी’ मधील देवराम, ‘पेसूक’ मधील जयदेव ही अशाच क्रूर पातळीवर जाणाऱ्या जागतिक मानवी प्रवृत्तीची उदाहरणे आहेत.

महान कुणाला मानावे ? असा एक मूलभूत प्रश्न बाबुराव बागुलांचे साहित्य निर्माण करते. देव, देश आणि धर्म या गोष्टींना सामान्यपणे महान मानले जाते. परंतु बागूल मात्र हे सर्वमान्य उत्तर नाकारतात आणि देव, धर्म, देशापेक्षाही माणूस महान आहे, असे सांगतात. यामागील त्यांची वैचारिक भूमिका अशी की देश आणि धर्म या सर्व गोष्टी माणवानेच निर्माण केलेल्या आहेत. माणसानेच निर्माण केलेल्या या गोष्टी मानवी हिताला पूरक ठरायला हव्यात. परंतु याच गोष्टी जर माणसाला अंधश्रध्द, भित्रा, स्वार्थी, आत्मकेंद्रित, तुच्छतावादी बनवत असतील तर त्या नाकारल्या पाहिजेत या विचारापर्यंत बागूल आलेले दिसतात. आपल्या संपूर्ण साहित्यामधून माणसाला शुद्र, लाचार व गुलाम बनवणाऱ्या सर्व संस्थांवर आघात करतात. परंपरावादी व विषमतापूजक मूल्येनाकारतात. भेदाभेद, शोषण नाकारणारी समतावादी व बुद्धीवादी समाजव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या वैचारिक भूमिकेचे सूचन करतात.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!