जागर ३.. महात्मा जोतिबा फुलेंचे तिसरे महत्त्कृत्य–राजाराम सूर्यवंशी .



दि .२२ मार्च २०२४. –
महात्मा जोतिबा फुलेंचे तिसरे महत्त्कृत्य म्हणजे अनाथबालकाश्रमाची स्थापना . आपले पाप उघडकीस येऊ नये म्हणून स्त्री-पुरुषांनी कुठेतरी टाकून दिलेल्या आर्भकांच्या संगोपनाची व्यवस्था जोतिबांनी सावित्रीबाईंच्या मदतीने ‘ अनाथ बालकालय’ आस्तित्वात आणून केली होती. तत्कालीन उच्चवर्णिय समाजाने धर्माच्या नावार व शास्त्राच्या आधारावर विधवांच्या विवाहास बंदी घातली होती . त्याचे अनुकरण क्षत्रिय मराठा जातीने केले. त्यामुळे कामवासनेस बळी पडलेल्या विधवांच्या पोटी जन्मलेलं नवजात जीव नाहक बळी पडत होते. विधवा विवाहाची प्रथा रुजू झाली असती तर असला अनर्थ घडला नसता .
याबाबत लोकहितवादींनी शतपत्रात लिहून ठेवले आहे की , ” पुर्वी परशुराम भाऊ पटवर्धन यांची मुलगी विधवा झाली . तेव्हा मार्तंड वैगरे पुस्तकातून असे ठरविले की त्या मुलीचा पुर्नविवाह करावा . परंतु पेशवाईत नाना फडणवीस मोठे शहाणे होते . त्यांनी त्यास विरोध केला आणि सांगीतले की असे करु नका .कारण एकाने केले म्हणजे सर्व करतील. परिणामी त्या मुलीचा पुर्नविवाह झाला नाही . दुसरी गोष्ट तोफखान्याचे सरदार पानशे यांची . त्यांच्या घरी सत्तावण्ण बोडक्या होत्या हे ते मोठे शहाणपण समजत . परंतु मला वाटते हा मोठा अनर्थ आणि मनुष्ययज्ञ होता ” इती लोकहितवादी .
नाना फडणवीस हे विधवांच्या लग्नाला विरोध करीत मात्र त्यांनी स्वतःची सात लग्ने केली होती असा उल्लेख आहे .अशा नानांना लोक शहाणा व मुत्सद्दी म्हणत . परशुराम भाऊंच्या म्हणण्यास त्यांनी मोडता घातला नसता तर असंख्य विधवांना प्राणत्याग करण्याचा प्रसंग आला नसता किंवा त्यांच्या पोटी येणाऱ्या बालकांचा अमानुष रीतीने संहास झाला नसता .
एका अपरात्री आपला जीव द्यायला निघालेली काशीबाई जोतिबांच्या दृष्टीस पली .तीची करुण कहाणी ऐकुण जोतिबांचे पितृह्रदय कळवळून आले . जोतिबांनी तिला समजवले . धीर दिला व ती बोलू लागली …..
” विधवेच्या पोटी अनैतिक रीतीने जन्मास आलेला दुदैवी जीव हा या पापी जगात बहुतकरुन जीवंत रहात नाहीच , परंतु प्रसंगी तो आपल्याआईसहि या अन्यायी जगातून आपल्या बरोबर घेऊन जात असतो . त्याप्रमाणे मी या जगातून नष्ट होण्यास जात होते .”
काशीबाईच्या या प्रखर उद्गारांमुळे जोतिबांचे संतह्रदय जागृत झाले . पितृवात्सल्याच्या ओलाव्याने जोतिबांनी तीचा राग शांत केला ….. पुन्हा पुन्हा धीर दिला …..उपदेश केला आणि स्वतःच्या घरी तीला घेऊन आलेत ….. सावित्रीबाईंना हाक मारुन सांगीतले . “निर्मिकाने ही मुलगी आपणांस दिली आहे ……तिचा सर्व प्रकारे नीट सांभाळ कर” .
सावित्रीबाई या प्रत्यक्ष युगस्ती ! त्यांनी त्या मुलीची एकंदर हकिगत ऐकून तिला धीर दिला व सांगीतले , ‘मी तुला प्रत्यक्ष मुलीप्रमाणे सांभाळीन ‘ ! काशीबाई असे धीर देणाऱ्या शब्दांची खुप वर्षांनी ओळख होत होती . विधवा झाल्यापासून ती हेटाळणीची गुलाम झाली होती . माहेर चा दरवाजा कधीच बंद झाला होता .तर सासरची अंधार कोठडी नशीबी आली होती . त्या अंधारात कोण हिंस्र व लंपट मानव तिचे शरीराचे लचके तोडत होते हे तीलाही कळत नव्हते . तोंड दाबून बुक्क्यांचा मार ! तक्रार करायची तर कोणाविरुध्द व कोणाकडे. जबाबदारी घ्यायला एकही मर्द पुढे येत नव्हता .
हल्लीच्या सुधारलेल्या जमान्यातसुध्दा अशा दुदैवी विधवेस आश्रय देणारी सुशिक्षित व समाजसेविका म्हणवणारी स्त्री मिळणे शक्य तरी आहे का ? मग त्या दिडशे-पावणे दोनशे वर्षांपूर्वीच्या काळात रुढी-परंपरांनी बरबटलेल्या समाजाच्या अनिष्ट चालीरीतींना झुगारुन देऊन त्या मुलीला उघड आश्रय देणे यासाठी असामान्य धैर्य लागते . ते धैर्य युगस्त्री सावित्रीबाई व राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुलेंमध्ये होते . म्हणून काशीबाईसारख्या काही स्त्रिया ते वाचवू शकले होते .
पुढे काशीबाईच्या पोटी जन्मलेला ‘यशवंत’ यांस जोतिबांनी दत्तक घेतला व त्याला आपला वारस ठरविला . म्हणून अशा अद्वितिय कार्यांमुळे महात्मा जोतीराव फुले हे मला कायम राष्ट्रपिता वाटत आले आहेत .
असे नैतिक व धार्मिक धैर्य भारतात प्रथम जोतिबांनीच प्रकट केले होते . त्यापूर्वी याबाबत नुसते शाब्दिक बोलण्याचे धैर्यसुध्दा कोणी दाखविल्याचा इतिहास नाही . म्हणून महात्मा जोतिराव फुले हे आपले खरे राष्ट्रपिता आहेत!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत