महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

पाण्यावरच्या मालकी हक्कासाठी,-जयवंत हिरे

पाण्यावरच्या मालकी हक्कासाठी,
रक्ताच्या नद्या वाहायच्या गर्जना करीत
शाक्य-कोलीय झाले युद्धास सज्ज.
तेव्हा एक राजपुत्र वदला;
रोहिणी नदी घोटभर पाण्याने
तहान भागवते सार्‍यांचीच.
पण,रक्ताच्या तहानेने विसरुन नाती,
आपण वाहवायची का रक्ताची नदी?
युद्धाने मिटेल का तहान पाण्याची?
या युद्ध विरोधाची सजा भोगत,
राजपुत्रासही करावा लागला देशत्याग.
उत्तरे शोधत फिरु लागला देशोदेशी-रानीवनी
माणसांच्या दू:खाची कारणे
अन् माणसांचे माणसाशी नाते.
कसे जुळेल माणसाचे मानवतेशी नाते?
पाण्याच्या तहानेतुन सुरु झालेला संगर
ज्ञानाच्या तहानेत तडफडत तडफडत,
बुद्धत्वाकडे कसा येऊन ठेपला.
मानवमुक्तीचा ज्ञानपथ जगाला त्याने देऊन टाकला.
तोच ध्यास तोच वसा.
स्वर्गापर्यंत जाणारा पाण्याचा पसा.
पहात होता स्वर्ग-नरकाचा भेजावरचा ठसा.
तो गंगेवर गेला,पसापसाभर पाणी वाहू लागला.
स्वर्गातल्या पुर्वजांना पाणी पोहचते;तर
शेतालाही पोहचलेच पाहिजे म्हणत
त्याने थोतांडांवर प्रहार केले.
कबीराच्या दोह्यांनी धर्मांपल्याड माणूसपण जागे केले.
पाणी वहातच होते खळखळा.
खळाळत्या पाण्याला कुणी धर्माधिष्ठीत केले.
जनावरांनाही खूले असले;तरी माणसाच्या स्पर्शाने पाणी विटाळू लागले.
त्याच्यातला शुद्रत्वाला उच्चत्वाने ललकारले;
“शुद्रा चालता हो वरातीतून.”
भर वरातीतून त्याला हाकलून दिले.
त्याने सार्वजनिक सत्यधर्माचे रणशींग फुंकले.
आपल्या हौदातले पाणी
धर्माने धूत्कारलेल्यांना त्याने खूले केले.
क्रांतिबाने धर्मातल्या उच्चत्वाला उघडे-नागडे केले.
तो तर राजपुत्रच काय;संन्यासाच्या वेशातला महात्मा नव्हता.
तसाच शुद्रत्वाने अपमानित केलेला महात्माही नव्हता.
पण,तो अधर्माने माणूसपण नाकारलेला.
अस्पृश्यतेच्या चटक्यांनी धगधगणारा निखारा होता.
जो जो अस्पृश्य म्हणेल त्याला त्याला
उभा चेतवत राखरांगोळी करणारा.
विझलेल्या राखे खालच्या निखार्‍यांना निखार्‍यागत धगधगवणारा.
त्याने जनावरांनाही खूले असलेले पाणवठे पाहिले.
पाण्यावाचून तडफडत असतांनाही त्यालाही नाकारलेले पाणी पाहिले.
लढवय्ये असतांनाही विटाळलेपण स्वीकारुन ,
जनावराचं जीणं जगणारी माणसे त्याने पाहिली.
ज्ञानपथावर चालता चालता तो प्रकाश टाकू लागला.
देव,धर्म,धर्मग्रंथांच्या सैतानी स्तोत्रांवर.
त्याने माणूसकीच्या लढाईचे मनामनात चेतवले निखारे अन् युद्ध छेडले महाडच्या चवदार तळ्यावर.
भीमराव रामजी आंबेडकर.
पाण्यालाही आग लावून धर्माचेही सरण रचणारा अन्
त्या अधर्माला पर्याय म्हणून रोहिणी नदीच्या रणसंगराला थांबवणार्‍याच्या धम्म पथावर माणूसपणाची दिशा जगाला दाखवणारा.
पाण्यासाठीच रणसंगर छेडणारा.
तो आणि त्या महामानवाने स्वीकारलेले सारेच गुरु पाण्याच्या लढाईतून मानवतेची बीजे मनामनात पेरणारे.
त्याच पाण्याच्या पलीत्यांच्या प्रकाशात जगाला दिशा देणारे.
-जयवंत हिरे
चवदार तळे सत्याग्रह दिन

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!