खान्देशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

“मानवी हक्कांसाठीचा प्रदीर्घ लढा . “काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.”

काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त

         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी मूल्यांसाठी  दीर्घकाळ संघर्ष करीत, येथील जातीव्यवस्था, त्यातील शूद्रांना  मानवतेचे हक्क नाकारणाऱ्या प्रथा, परंपरा, रुढी विरुद्ध तहहयात लढा दिला. त्याचाच एक भाग नाशिक मधील"काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह" आहे. हा लढा पाच वर्षे, अकरा महिने निरंतर सुरू असल्यामुळे आंदोलनातील मैलाचा दगड ठरला आहे. स्वधर्मात देवदर्शनासाठी  इतका सातत्यपूर्ण व निरंतर दीर्घकाळ

चाललेल लढा जगात कुठेही झाल्याचे ऐकवित नाही. त्याचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड ह्यांच्यावर सोपवले होते.त्यांनी अतिशय निष्ठेने, कष्टपूर्वक ही कामगिरी यशस्वी केली. ह्या सत्याग्रहातील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचे नेतृत्व झळाळून लोकमान्य झाले.
आपले प्रश्न वर्णवादी व्यवस्थेमुळे इतके जटिल झाले आहेत की, ते मंदिर प्रवेशाने सुटणार नाहीत. आपण राजकिय, धार्मिक, सामाजिक आणि शिक्षणासाठी संघर्ष करीत आहोत. आपण हिंदू धर्मीय असून देखील स्वधर्मातील उच्चवर्गीयांनी आपल्याला मानवी हक्कांपासून दूर ठेवले. त्यामुळे आपल्या वाट्याला कायम दरिद्री, गरिबी, लाचारी आणि धार्मिक अंधश्रद्धा आली. यास्तव आपली प्रगती खुंटली. म्हणुन त्यांच्याकडून आपल्याला मानवी हक्क मिळतात का? आपल्याला माणूस म्हणुन ते स्विकारतात की नाही? ह्याचा उलगडा या सत्याग्रहाच्या माध्यमातुन होणार आहे. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणने होते.
मंदिर प्रवेशावर सनातनी लोकांनी प्रश्न केला की, तुमची रामावर भक्ती असेल तर मंदिरातच प्रवेश का? त्यावर बाबासाहेबांनी थेट उत्तर दिले की, देवळात प्रत्यक्ष पूजा करता यावी. यासाठी हा सत्याग्रह नाही. आम्हाला सिद्ध करायचे आहे की, आमच्या प्रवेशाने मंदिर भ्रष्ट होत नाही. तसेच स्पर्श केल्याने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही. हिंदुत्व जितकी स्पृश्य लोकांची मालमत्ता आहे, तितकीच ती अस्पृश्यांची देखील आहे. या हिंदुत्वाची प्राण प्रतिष्ठा जितकी वशीष्ठासारख्या ब्राह्मणाने केली,
कृष्णासारख्या क्षत्रीयांनी ,तुकारामा सारख्या वैश्याने केली. तितकीच वाल्मिकी, रोहिदास ह्या अस्पृश्यांनी देखील केली आहे.हे विसरून कसे चालेल ? हिंदुत्वाच्या रक्षणासाठी अस्पृश्यांनी माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्याची, तितकीच अस्पृश्यांची देखील आहेत.
हा लढा मंदिर प्रवेशापूरता मर्यादित नाही. तर सनातनी लोकांनी आमच्यावर लादलेल्या जाचक परंपरा, रुढी पासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे.
ऑक्टोबर 1929 मध्ये विचार विनिमय होऊन केशव नारायण वर्पेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली सत्याग्रह समिती स्थापन करण्यात आली. व तिच्या सरचिटणीस पदी भाऊराव गायकवाड ह्यांची निवड झाली. त्यांनी मंदिर प्रशासनास मंदिर प्रवेशाची माहिती देण्यासाठी आगाऊ नोटिस दिली. परंतु त्याची दखल घेतली नाही. पण त्यांनी प्रशासनाकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली.
2 मार्च 1930 ला नाशिक येथे सभा होऊन 15000 लोकांची मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव गायकवाड ह्यांच्या नेतृत्वाखाली मंदिर प्रवेशाकरिता निघाली. परंतु त्यांना पूर्व कल्पना असल्यामुळे मंदिराचे चारही दरवाजे बंद ठेवले. त्यामुळे मिरवणूक गोदावरीj घाटावर येऊन त्याचे सभेत रूपांतर झाले. तेव्हा प्रत्येक दरवाज्यासमोर 125 पुरुष व 25 महिला ह्यांचे चार गट करण्यात येऊन 03/03/1930 ला, कचरू साळवे, पतितपावन दास, पांडुरंग राजभोज,आणि शंकरदास नारायणदास ह्यांच्या नेतृत्वाखाली चार दिशेच्या दरवाजा समोर सत्याग्रहाला सुरुवात झाली. सत्याग्रह शांततेत आणि सनदशीर मार्गाने झाला पाहिजे. असा बाबासाहेबांचा आदेश असल्यामुळे सर्व शांततेत सुरू झाले.
त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भाऊराव गायकवाड हे गुरू, शिष्य

बारीक नजर ठेऊन व्यवस्था पाहत होते. त्यावेळी हजारो बंदूकधारी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते.
हा सत्याग्रह एक महिना निरंतर सुरू होता. तेव्हा 9 एप्रिल 1930 ला राम नवमी उत्सव आला.
तत्पूर्वी सनातनी मंदिर प्रशासनाशी
तडजोड होऊन अस्पृश्यांसह सर्वांनी रथ ओढण्याचे एकमताने ठरले. त्याप्रमाणे रामनवमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव गायकवाड कार्यकर्त्यांसह आले असतांना, त्यांनी रथाला हात लावण्यापूर्वी, सनातन्यानी हुलकावणी देत रथ दुसर्‍याच दिशेला पळवला. त्यामुळे पाठलाग होऊन रेटारेटी झाली. नंतर मारामारी सुरू झाली. हे सर्व पूर्वनियोजित असल्यामुळे सत्याग्रहींवर तुफान दगडांचा मारा सुरू होऊन त्यात अनेक लोक जखमी झाले.तर काही रक्तबंबाळ झाले. ह्या दगडफेकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील किरकोळ जखमी झाले. त्यामुळे त्यांना अधिक मार लागु नयेत म्हणुन डोक्यावर छत्री धरून त्यांची काळजी घेतली गेली. तेव्हढ्यात पोलिसांचे कडे तोडून भास्कर कद्रे मंदिरात घुसला. त्यामुळे
सनातनी खवळले. आमचे मंदिर बाटवले म्हणुन त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला. नंतर त्याला दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्याचे निधन झाले.
ह्या प्रकारानंतर दलितांच्या मुलांची शाळा बंद झाली. त्यांना रस्त्यावर चालण्यास मज्जाव करण्यात आला. एवढेच नाही तर दुकानातील वस्तू देण्याचे बंद करून त्यांची चौफेर कोंडी करण्यात आली. तुम्ही माजले आहात अशी दमदाटी सुरू झाली. ह्या ही परिस्थितीत ही कर्मवीर दादासाहेब गायकवाड ह्यांनी सत्याग्रहात खंड पडू न देता, ते निरंतर सुरूच ठेवले.
ही सर्व परिस्थिती डॉ. बाबासाहेबांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरीक साईक्स ह्यांना कळविली.
त्यामुळे गव्हर्नरांनी परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणुन आयुक्त घोषाल ह्यांना चौकशीसाठी तसेच प्रत्यक्ष बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी पाठविले. त्यांनी बाबांची भेट घेऊन परिस्थिती समजून घेतली. तेव्हा बाबा म्हणाले की, मी माझ्या लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी लढा उभारला आहे. त्यात सन्माननीय तडजोड होत असेल तर मी सत्याग्रह स्थगित करण्यास तयार आहे. तसेच आयुक्तांनी सत्याग्रहीची भेट घेऊन चर्चा केली. त्याचा अहवाल गव्हर्नर साहेबांना सादर केला. नंतरच्या काळात बाबांनी ह्यात तोडगा निघावा म्हणुन खूप पाठपुरावा केला. पण तोडगा निघाला नाही. पुढे दीर्घकाळ कर्मवीर दादासाहेब गायकवाड ह्यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह निरंतर शांततामय मार्गाने सुरू होता.
संपूर्ण उच्चवर्गीय समाज विरोधात असताना सतत पाच वर्षे अकरा महिने सत्याग्रह अखंडित चालविणे. ही अत्यंत खडतर गोष्ट होती. पण ते बाबांचे निष्ठावान अनुयायी होते. त्यांनी सर्व अडचणींवर मात करीत आणि अडथळे पार करून सत्याग्रहाची ज्वाला धगधगत ठेवली.
दरम्यानच्या काळात 04/02/1933 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येरवडा जेलमध्ये महात्मा गांधींची भेट घेतली. त्यावेळी एस. एन. शिवतरकर, डोळस, उपश्याम,कौले, घोरपडे आणि केशवराव जेधे उपस्थित होते. तेव्हा काळाराम मंदिर सत्याग्रहाचा विषय काढताच गांधीजींनी डॉ. सुब्बरायन, आणि रंगा नायर ह्यांच्या विधेयकाला पाठींबा देण्याची विनंती केली. त्यावेळी बाबा देखील मुंबई राज्य विधान परिषदेचे सदस्य होते. त्यावर बाबासाहेबांनी स्पष्ट नकार देत सांगितले की, त्यांनी सार्वमताने फक्त मंदिर प्रवेशास अनुकूलता दर्शविली आहे. परंतु पूजा करण्याचा काहीही अधिकार असणार नाही. असे सूचित केले आहे.शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशाने समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण मिळणे निकडीचे आहे.त्या अनुषंगाने जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. त्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही.
सामाजिक बदलाची प्रक्रिया हळूहळू होत असते. ह्याची बाबांना जाणीव असल्यामुळे, ते अस्पृश्यांना
हक्क मिळावेत म्हणुन वेगवेगळ्या
मार्गाने लढत राहिले. मंदिर प्रवेश हा त्याच लढ्याचा एक भाग आहे. ही एक क्रांतिकारी घटना असून, त्याने जाती व्यवस्थेच्या बुरुजाला सुरुंग लावण्याचे काम केले. हा लढा प्रतिकात्मक होता. जो समाज जाती व्यवस्थेचा बळी पडला आहे, त्याला या अंधारातून बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी इंग्रजांना देखील जाणीव व्हावी यासाठीचे पाउल होते.
ह्या सत्याग्रहात कुसुमाग्रज देखील सामील झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात ह्या लढ्यातून झाली.
इतके दीर्घकालीन आंदोलन करून देखील त्याचा परिणाम कुणावर परिणाम झाला नाही. म्हणुन बाबासाहेबांनी कंटाळून 3 मार्च 1934
रोजी भाऊराव गायकवाड ह्याना पत्र लिहून कळविले की, ह्यापेक्षा जास्त दिवस सत्याग्रह सुरू ठेऊन शक्ति वाया घालवण्यापेक्षा राजकिय हक्क आणि शिक्षणाची सोय व्हावी यासाठी वापरावी. म्हणुन सत्याग्रह स्थगित करावा.
ह्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवला येथे
पूर्ण विचाराअंती धर्मांतराची घोषणा केली.
मनाला खंत वाटते की, इतका दीर्घकाळ चाललेला आणि अत्यंत खडतर काळात ज्या भीम अनुयायांनी आपल्या जिवाची पर्वा न करता हा लढा निरंतर धगधगत ठेवला त्यांच्या स्मरणार्थ उचित स्मारक होणे अपेक्षित असतांना ते का होऊ शकले नाही. हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या लढ्यामधील अत्यंत महत्त्वाचे महाड, येवला, दीक्षाभूमि येथे उचित स्मारके उभारली गेली. आज ती आंबेडकरी जनतेची तीर्थस्थाने झाली आहेत. मग येथे कोणती अडचण आहे? मनाला अशी ही शंका चाटून जाते की, आंबेडकरी समाजात अनेक गट, तट आहेत आणि ते कायम एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात दिसतात. ह्या बाबतीत ही असे तर नसेल ना? जर असे असेल तर ती अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. त्यामुळे मला असे वाटते की, जर एखादा समूह, गट, संघटना स्मारकासाठी प्रयत्नशील असेल तर त्यांना सगळ्यांनी एकदिलाने सहकार्य करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी हातभार लावणे हेच खरे सत्याग्रहींना
अभिवादन ठरेल.
आज मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा स्मृतिदिन.
त्यानिमित्त सर्व सत्याग्रहींना विनम्र अभिवादन.!

जयभीम.

अरुण निकम.
9323249487.
मुंबई.
संदर्भ.
1 ) काळाराम मंदिर विकिपीडिया
2 ) धनंजय कीर.
3 )साप्ताहिक विवेक, रवी गोळे.
4 ) प्रशांत भरविरकर .
महाराष्ट्र टाइम्स, नाशिक पुरवणी. एप्रिल 2018.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!