महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ७९


भिक्खूचे कार्य
भिक्खूचे कार्य काय? या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे. भिक्खूने केवळ व्यक्तीगत साधनेला वाहून घ्यावयाचे की त्यांनी लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करावयाची?
त्यांनी दोन्हीही कार्ये केली पाहिजेत. व्यक्तीगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही. म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ, धार्मिक, ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती असला पाहिजे. यासाठीच त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. (Practice self-culture)
भिक्खू गृहत्याग करतो; परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही. गृहत्याग करण्यात त्याचा हेतू, ज्यांना गृहासंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्यांचे जीवन दुःख आणि दैन्य यांनी व्याप्त असून जे असहाय्य असतात, अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा असतो.
धम्माचे मूलतत्त्व करुणा हे आहे आणि त्या तत्त्वानुसार प्रत्येकाने प्राणिमात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. भिक्खू करुणेच्या परिपालनास अपवाद नाही.
भिक्खू स्वतःच्या आध्यात्मिक व व्यावहारिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला (however perfect in self-culture) तरी, जर तो मानवजातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो ‘भिक्खू’ या संज्ञेला पात्र ठरत नाही. त्याला इतर काही संज्ञेने संबोधिता येईल पण भिक्खू या संज्ञेने नाही.

भिक्खूची दीक्षा देण्यासंबंधी कर्तव्ये

यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची (conversion) वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की, देशातील सर्वात श्रेष्ठ कुळांतील (highest families) आणि इतर कुळातील उपासक बुद्धांकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले. पुष्कळ लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिश: मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते. म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला ‘संघ’ या नावाने धार्मिक संप्रदायाचे (religious order) रूप देणे त्यांना आवश्यक वाटले.
तेव्हा परिव्राजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या दोन अवस्थांतून गेले पाहिजे त्या ठरविल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्षे एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर परिक्षक मंडळासमोर आपली योग्यता सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल, असे ठरविले.
धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून बुद्धांनी त्यांना भिक्खू बनविले व भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रसारित करण्यासाठी ‘धम्मदूत’ (Missionaries) म्हणून पाठविले. धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत, “भिक्खूहो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनांपासून मुक्त झालो आहे. भिक्खूहो, तुम्हीही अशा बंधनांपासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपेने माणसांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा.”
“कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती कल्याणकारी; त्याप्रमाणेच तत्त्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण अशा श्रेष्ठ जीवनाची घोषणा करा.”
“सर्व देशांत जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या सर्व जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञान द्या.”
“ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रम्हर्षी (great Rishis, royal Rishis, Brahman Rishis too) वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायांचा फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या मताप्रमाणे प्रभावित करा.”
“एकटेच जा. करुणामय अंतःकरणाने जा. लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या.”
भगवंतांनी त्यांना असेही सांगितले, “धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे.”
“शेताचे तणामुळे नुकसान होते. मानवजातीचे मोह व तीव्र आकांक्षा यांमुळे नुकसान होते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे.”
“शेताचे तणामुळे नुकसान होते. मानवजातीचे द्वेषामुळे (hatred) नुकसान होते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे.”
“शेताचे तणामुळे नुकसान होते. मानवजातीचे गर्वाने (vanity) नुकसान होते. म्हणू न धम्मदानाचे फळ फार मोठे आहे.”
“शेताचे तणामुळे नुकसान होते. मानवजातीचे तृष्णेने (lust) नुकसान होते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठ आहे.”
अशा रीतीने धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचा आदेश घेऊन साठ भिक्खू धम्मप्रचारार्थ सर्व देशांत गेले.
धम्मपरिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना पुढे अधिक शिक्षण दिले.

धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही

परिव्राजक भग्गव यांच्यासोबत झालेल्या संवादातून स्पष्ट होते.
“माणसाला अद्भूत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवीत नसतो. माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निरास कसा येईल हे शिकवतो.
बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधी (knowledge and insight) यात काहीच दैवी नाही. (nothing superhuman). त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर एका वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादन केला आहे. ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे. त्यात दैवी असे काही नाही. तथागतांनी आपल्या धम्मप्रसारासाठी अलौकिकता अथवा चमत्कार (the superhuman or the miraculous) अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही.
धम्मपरिवर्तन हे बळाने करावयाचे नाही. भिक्खूने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे.
संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. (Organised Body) केवळ परिव्रज्या स्वीकारल्याने परिव्राजकाला संघाचे सभासदत्व लाभत नसे. उपसंपदा स्वीकारल्यानंतरच परिव्राजक संघसभासद बनत असे. संघ ही स्वतंत्र संस्था (independent body) होती. प्रत्यक्ष संस्थापकावरही ती अवलंबून नव्हती. संघ ही स्वायत्त संस्था (autonomous) असून आपल्याला आवडेल, योग्य वाटेल त्याला सभासदत्व देऊ शकत होती. विनय पिटकाच्या नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व काढून घेऊ शके.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१.३.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड पाचवा)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!