कोकणातील पाणी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करणार.

मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच काही जलसंपदा प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. यानंतर आता लवकरच उत्तर कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. त्यानुसार उत्तर कोकणातील नदीखोऱ्यांतून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनेद्वारे आणि उपसा नदीजोड/वळण योजनांद्वारे एकूण २२.९ टीएमसी पाणी वळविण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण १४,०४० कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
उत्तर कोकणातील नार-पार, अंबिका औरंगा, दमणगंगा, वैतरणा व उल्हास नदी उपखोऱ्यात ३१७ टीएमसी अतिरिक्त पाणी शिल्लक आहे. पश्चिम वाहिनी खोऱ्यातील (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी प्राथमिक अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने २०१९ रोजी समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार कोकणातील नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनांद्वारे; तसेच उपसा नदीजोड/वळण योजनांद्वारे एकूण ८९.९२ टीएमसी पाणी वळविण्याबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुसार जवळपास ७.४ टीएमसी पाणी प्रवाही वळण योजनांद्वारे; तर १५.५ टीएमसी पाणी प्रमुख उपसा वळण योजनांद्वारे असे एकूण मिळून २२.९ टीएमसी पाणी वळविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
यासाठी प्रवासी वळण योजनेद्वारे एकूण ३० योजना प्रस्तावित असून, यापैकी १४ योजना पूर्ण झाल्या आहेत. त्याद्वारे १.०७ टीएमसी पाणी वळविवले जात आहे. पाच योजनांचे बांधकाम सुरू असून, त्याद्वारे १.३५ टीएमसी पाणी वळविले जाईल. ११ भविष्यकालीन योजनांद्वारे ४.९८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य म्हणजे प्रमुख उपसा वळण योजनेद्वारे जवळपास १५.५५ टीएमसी पाणी वळविण्याचे प्रस्तावित असून, त्याअंतर्गत तीन प्रकल्पांवर सध्या काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सध्या काही नदीजोड प्रकल्पांवर काम सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत