महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ६४


अधम्म म्हणजे काय?

आत्म्यावरील विश्वास हा अधम्म आहे

भगवान बुद्धांनी म्हटले आहे की, आत्म्यावर आधारलेला धर्म हा काल्पनिक धर्म आहे. (based on speculation) कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन (mind) आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे.
बुद्ध म्हणाले, “आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे.” म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा, अंधश्रद्धांचा जनक ठरतो.
“बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत नाहीत. आत्म्यासंबंधी त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात.
“आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांची विचारसरणी काय होती?”
ईश्वराचे अस्तित्व नाकारताना भगवान बुद्धांनी जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे, तीच त्यांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे.
त्यांनी असा विचार मांडला आहे की, आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही ईश्वराच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे.
ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्मादिठ्ठीला (सम्यक दृष्टी) जितका बाधक आहे, तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे.
त्यांनी असे विवेचन केले आहे की, ईश्वरावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो, त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना, अंधश्रद्धेला कारणीभूत होतो. त्यांच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भंयकर आहे. कारण त्यामुळे पुरोहितवर्ग निर्माण होतो. भ्रामक समजुतींचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो.
आत्मा काही वस्तू नाही. म्हणूनच त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात.
आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी आपला ‘नामरूप सिद्धांत’ मांडला.
नाम-रूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धांच्या मतानुसार ‘प्राणी हा काही भौतिक तत्त्वे आणि काही मानसिक तत्त्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे.’ या भौतिक आणि मानसिक तत्त्वांना ‘स्कंध’ म्हणतात.
रूपस्कंध हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या चार तत्त्वांचा परिणाम आहे. हे स्कंधरूप अथवा शरीराचे घटक होत.
रूपस्कंधाशिवाय ‘नामस्कंध’ हीही एक गोष्ट आहे, तेही प्राण्यांच्या रचनेचे घटक आहेत.
ह्या नामस्कंधाला विज्ञान- consciousness (चेतना) असे म्हणतात. या नामस्कंधात तीन मानसिक घटकतत्त्वे आहेत. वेदना (सहा इंद्रियांचा त्यांच्या-त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती), संज्ञा, (perception) आणि संस्कार, (states of mind). विज्ञान (चेतना) या तीन नामस्कंधात समाविष्ट केली जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की, विज्ञान (Consciousness) हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्त्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे.
पृथ्वी, जल, तेज आणि वायू या चार तत्त्वांच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते.
भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. हे सिद्धांतविरोधी असे विचारतात की विज्ञान (चित्त) याची उत्पत्ती कशी होते?
हे सत्य आहे की, माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची (चित्ताची) उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे चार भौतिक तत्त्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल?
बुद्धांचे उत्तर असे नव्हते की, या चार भौतिक तत्त्वांच्या सद्यःस्थितीमुळे किंवा त्याच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते. बुद्धांनी असे म्हटले आहे की, जेथे शरीर अथवा रूप-काया आहे, तेथे त्याच्यासह नाम-कायाही राहात असते.
आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र (Electric Field) असते. तेथे तेथे त्याच्यासह ‘आकर्षण क्षेत्र’ (Magnetic Field) असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही. परंतु हे नेहमीच विद्युतक्षेत्राबरोबर असते.
शरीर आणि विज्ञान (चेतना- Consciousness) यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे, असे का म्हणू नये?
आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात ‘प्रेरित क्षेत्र’ (Induced Field) असे समजले जाते. विज्ञान हेही रूप-कायांच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये.
भगवान बुद्धांची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथेच समाप्त होत नाही. ह्याशिवाय त्यांना आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते.
जेव्हा विज्ञानाचा (चित्त अथवा चेतना यांचा) उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान (consciousness) हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे.
विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे.
विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ‘ज्ञानमूलक’ असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल.
सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते, तेव्हा त्याला ‘भावनामूलक विज्ञान’ म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते.
विज्ञान (volitional consciousness) आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे.
यावरून असे स्प्ष्ट होते की, प्राणी जेवढी क्रिया करतो, ती ही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो.
ह्या विश्लेषणानंतर बुद्ध एक प्रश्न करतात की, आता आत्म्याने करावयाचे कोणते कार्य होते? आत्म्याची म्हणून जी कार्ये मानली जातात, ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कारण नाही, असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. या पद्धतीने बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे.
व याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही.

क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१५.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग चवथा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!