भगवान बुद्धांची शिकवण-भाग ५८

धम्म म्हणजे काय?
जीवन शुतिता राखणे म्हणजे धम्म
जीवन शुचितेचे तीन प्रकार आहेत.
१. देहशुचिता
माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार (sinful living) यांच्यापासून परावृत्त होणे याला ‘देहशुचिता’ म्हणतात.” (purity of body)
२. वाकशुचिता
वाकशुचिता म्हणजे असत्य आणि व्यर्थ बडबड करण्यापासून दूर राहण्याला ‘वाकशुचिता’ म्हणतात.
३. मनःशुचिता
मनःशुचिता म्हणजे कामवासना, द्वेष, आळस, तंद्रा, उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची जाणीव होणे. त्याप्रमाणेच या सर्व मानसिक दुःस्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते यांचे ज्ञान असणे म्हणजेच मन शुचिता. जो काया, वाचा, मन शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे, अशा निष्कलंकपणाला मन शुचिता म्हणतात. मनःशुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्षा यांपासून परावृत्त होऊन सम्यक् दृष्टी धारण करतो.
साधनेला (training) बाधक ठरणाऱ्या दुर्बलता
पाच प्रकारच्या दुर्बलता (weaknesses) आहेत. त्या साधनेला (training) बाधक ठरतात. त्या म्हणजे – जीवहिंसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढविणाऱ्या मद्याचे सेवन. साधनेतील ह्या पाच बाधा दूर करावे.
कायानुपश्यना
पहिल्या सावधानतेत ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून, प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन व संयमित चित्ताने, कायेला ती केवळ काया असे मानून (कायानुपश्यना करीत) जीवन व्यतीत करणे.
वेदनापश्यना
दुसऱ्या सावधानतेत वेदनांना (Feelings) त्या केवळ वेदना आहेत असे मानून (वेदनापश्यना करीत) जीवन व्यतीत करणे.
चित्तानुपश्यना
तिसऱ्या सावधानतेतचित्त हे चित्त आहे असे मानून जीवन व्यतीत करणे. चित्तात उत्पन्न होणारे विचार (ideas) ते केवळ चित्तधर्म आहेत, असे मानून (धम्मानुपश्यना करीत) प्रयत्नपूर्वक, जागरूकतेने आणि स्वाधीनचित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळविणे.
धम्मानुपश्यना
चित्तात उत्पन्न होणारे विचार (ideas) ते केवळ चित्तधर्म आहेत, असे मानून (धम्मानुपश्यना करीत) प्रयत्नपूर्वक, जागरूकतेने आणि स्वाधीनचित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळविणे.
जेव्हा साधनेतील पाच दुर्बलता दूर होतात तेव्हा चार सावधानतांंचा (स्मृति-उपस्थानाचा) (mindfulness) उदय होतो.
घात (अपयश)
घात (अपयश) तीन प्रकारचे आहेत. शीलघात, चित्तघात, आणि दृष्टिघात.
शीलघात म्हणजे जीवहत्या, चोरी, कामभोगासंबधी मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात.
चित्तघात म्हणजे लोभ आणि दुष्टपणा.
दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टीकोन स्वीकारतो की, दान, त्याग, परित्याग यांमध्ये काहीच सद्गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्याचा परिणामही घडत नाही. हे जग नाही की यापलीकडे जग नाही, आई नाही की बाप नाही, आणि प्राणी स्वोत्पन्नही नाही. या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे, पूर्णता मिळविली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या जगापलीकडले जग कळले आहे, आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण (संन्यासी) आणि विद्वान या जगात नाहीत, असे जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी दृष्टीघात झाला आहे असे समजावे.
ह्या तीन घात दूर केल्यावर तीन लाभ मिळतात. त्या म्हणजे शीललाभ, चित्तलाभ आणि दृष्टिलाभ.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग तिसरा
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.९.२.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत