त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर

इवलीशी भागीरथी आता रमाबाई बनून संसारात गर्क झाली .डबक चाळ सर्वार्थाने अपुरी होती. भिवाचा आता भीमराव झाला होता. अशा प्रकारे त्यांच्या प्रपंचाची सुरुवात झाली . १२ डिसेंबर १९१२ ला त्यांना पुत्र झाला . त्याचे नाव यशवंत असे ठेवले .यशवंताच्या जन्माने रमाला आपले जीवन सफल झाले असे वाटत होते. कारण यशवंताने रमाईला आईपण दिले होते . भीमरावही आनंदी होते. सुभेदार रामजी बाबांचे निधन झाल्यानंतर रमाईला मोठा धक्काच बसला, रमाई ने आपल्या आई -वडिलांचा मृत्यू पहिला .आणि आता सासऱ्यांचा मृत्यू पाहत होती . . २ फेब्रुवारीला रामजीबाबांचे निधन झाले तेव्हा रमाबाईवर जसे काही डोंगरच कोसळले .
त्यानंतर भीमरावांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत प्रवेश मिळाला . भीमराव अमेरिकेला पोहोचल्याचे पत्र रमाईला पाठविले .भीमरावांनी अमेरिका आणि लंडनमधील अनेक पदव्या घेतल्या . रमाबाईना त्या पदव्यांचे महत्व वाटायचे . रमाबाईंना पतिसुख मिळत होते , परंतु मुलांचे सुख काही मिळत नव्हते . गंगाधर , रमेश ,इंदू यांचे निधन झाले होते. रमाबाई आपल्या मुलांच्या मृत्यूबद्दल भीमरावांना तात्काळ कळवीत नसत . मुलांच्या मृत्यूचे कळाले तर साहेब अर्ध्यावर अभ्यास सोडतील .मुलांचे दुःख पचवायला रमाबाई समर्थ होत्या. परंतु पतीला तर सांगणे भागच होते. १९१३ ते १९१७ या चार वर्षात रमाचे खूप हाल झाले तिला सर्पणासाठी वणवण फिरावं लागत होत .तशाही परिस्थितीत रमाई ने काटकसर करून बाबासाहेबांना पुस्तकासाठी मदत केली.
१९१८ ला भीमराव मुंबईत परत आले त्या साली भीमराव सीडनेहॅम कॅालेजात प्राध्यापकाच्या जागेवर रुजू झाले . भीमरावांना पहिला पगार रु. ४५० /– मिळाला घरी आल्यावर भीमरावांनी पगाराची रक्कम रमाईच्या हातात दिली आणि म्हणाले ‘रामू ! मोज हा किती पगार आहे . रमाईंच्या डोळ्यात अश्रू तराळले .रमाई ने तो पगार सुभेदारांच्या फोटो समोर ठेवला आणि बोलल्या घ्या आपल्या मुलाचा पगार . त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या . भीमराव म्हणाले अग रामू ! पगार तरी मोज किती आहे . रमाई म्हणाल्या , ‘ मला वेडीला एवढा पगार कसा मोजता येणार ? आणि रमाबाई जमिनीवर बसल्या पगाराच्या नोटा काढून त्याच्या चारशे पन्नास रुपयाच्या वीसप्रमाणे पुड्या केलेल्या पाहून रमाई एकदम हबकल्या ‘ बाय बाय बाय ‘ एवढा पगार आहे, रमाबाईंचा कंठ दाटला भीमराव रमाबाईंच्या सालस चेहऱ्याकडे पाहत राहिले .
दोन मुले व मुलगी तडकाफडकी गेल्यानंतर अपत्य प्रेमास आसुलेल्या रमाबाईंना १९२८ मध्ये पुत्र झाला राणीसारख्या इंदूची आठवण त्यांना सतावत होतीच ह्या मुलाचे नाव राजरत्न असे ठेवले .राजरत्नाचा चेहरामोहरा भीमरावांसारखाच होता त्याचे योग्य ते पालनपोषण झाले पाहिजे व त्याला वेळेवर औषधोपचार मिळाले पाहिजेत या उद्देशाने एखादी नर्स मिळते का ? म्हणून भीमरावांनी शोध घेतला . परंतु अस्पृश्याच्या घरी नर्स बनून काम करायला एकही तयार नव्हती रमाबाई तर प्रचंड अशक्त होत्या . भीमराव काही चोवीस तास बाळाबरोबर राहू शकत नव्हते अखेर १९ जुलै १९२६ या दिवशी मृत्यूने राजरत्नवर घाला घातला . रमाबाईनि साहेबांकडे नजर टाकली .साहेब रडत होते त्यांनी साहेबाना मिठी मारली , त्या साहेबांच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागल्या .
महाडच्या प्रसंगानंतर रमाबाईना असे वाटू लागले कि साहेबांच्या जीवाल धोका आहे . आणि ह्याचा धक्का त्यांना बसला व रमाईने अंथरूण धरले . रमाईची प्रकृती आता खालवत चालली मुंबईची हवा त्यांना काही मानवेना . तर एकदा निपाणीचे वराळे मास्तर घरी आले . त्यांनी रमाबाई ना विनंती केली चार दिवस धारवाडला येऊन राहा . तिथे गेल्यानंतर रमाईच्या तब्बेतीत थोडी सुधारणा झाली . तिथे असलेले मुलांच्या वसतिगृहास त्यांनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या व मुलांच्या खाण्यपिण्याची सोय करण्यास वराळे मामांना सांगितले .धन्य ती माऊली .
दुसऱ्या राउंड टेबल कॅान्फरन्स वरून १९३० ला भीमराव भारतात परतणार होते. साहेब बोटीवरून खाली आले अनेकांनी आणलेले पुष्पहार बाबासाहेब स्वीकारीत होते. भीमराव आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनि मिरवणूक निघाली . सगळ्यात शेवटी रमाबाई नि हार देतांना बाबासाहेबांचा चेहरा न्याहाळन्याऐवजी त्यांची नजर साहेबांच्या पायावर होती. त्यांना ह्याबाबत प्रश्न केल्याबद्दल त्यांनी उत्तर दिले कि मी साहेबांना नेहमीच पाहते .ज्यांना कधी काळी त्यांचे दर्शन होते त्यांना प्रथम संधी देणे हे माझे कर्तव्य आहे .त्यांनी गोरगरिबांच्या उद्धाराच कंकण बांधल आहे व मी त्यांची पत्नी आहे त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे नजर वळविली .
२२ मे ला बाबासाहेब पनवेलला गेले तेव्हा रमाबाईची प्रकृती खालावली होती. २७ मे १९३५ ला त्या पलंगावर झोपल्या होत्या त्यांनी साहेबांना पहिले . त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले . त्यांना काहीतरी सांगायचे होते. मोठ्या प्रयासानी त्यांनी आपला हात वर केला परंतु तो हाथ एकाएकी खाली पडला रमाबाईंनि त्या क्षणी अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या पतीच्या मांडीवर अखेर मरण पत्करले . साहेबांनी हंबरडा फोडला .माझी रामू..रामू..रामू…मला सोडून गेली.
हि प्रेत यात्रा वरळी स्मशानभूमीत नेण्यात आली आणि पुत्र यशवंतानि सर्व विधी पार पाडले . रमाबाई यांचे कलेवर दफन करण्यात आले . त्यागाची एक मूर्ती तीने ह्या जगाचा त्याग केला
माता रमाबाई भीमराव आंबेडकर , भारतातील करोडो पददलितांची , अव्हेरलेल्यांची माऊली . आयुष्यभर झाडासारखी उन्हात उभी राहिली आणि तिने करोडो लोकांना सावली दिली . ती मंद वाऱ्याची झुळूक झाली . हि माऊली जशी त्यागमूर्ती होती त्याच प्रमाणे चराचरांवर प्रेम करणारी माऊली होती. दुधावरची साय होती. परोपकार हा तिचा धर्म होता तिचा त्याग हाच आंबेडकरी समाजाचा ठेवा आहे . महिलांचा तो आदर्श आहे . ह्या मातेने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्याप्रती समर्पित केलेच नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते . बाबासाहेबांनी चाळीस -पंचेचाळीस वर्षात पंखविहीन पक्षांना पंख दिले, पंखात बळ ओतले त्यामुळेच सरपटणारे प्राणी गरुड झेप घेऊ शकले. या सगळ्या किंमयेत किमयागार डॉ बाबासाहेब असले तरी या किमयेच्या भागीदार आहेत ; आईसाहेब तथा रमाबाई आंबेडकर . बाबासाहेबांच्या लढ्याला उर्जा देऊन त्याला उर्ज्वस्वल करण्याचे काम याच मातेने केले आणि तेही अर्धपोटी राहून .
त्यागमूर्ती मातेच्या स्मृती दिनी विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम….
समाज माध्यमातून साभार…..
सद्धम्म प्रचार केंद्र मालेगाव जिल्हा वाशीम.
सुधाकर ग्यानुजी पखाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत