महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ९९


तथागतांची अंतिम धम्म-दीक्षा

तथागत बुद्ध धम्माचा प्रचार करीत पावा येथे आले. ते आम्रवनात उतरले असल्याचे चुंदाने ऐकले. तो आम्रवनात गेला आणि तथागतांच्या समीप जाऊन बसला. तथागतांनी त्याला धम्मोपदेश केला.
चुंदाने तथागतांना भोजनासाठी निमंत्रण दिले. तथागतांनी आमंत्रणाचा स्वीकार केला.
दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टांनाबरोबर सुकर-मद्दावांचीही सिद्धता केली. तयारी होताच त्याने तथागतांना कळविले, “तथागत वेळ झाली. भोजन तयार आहे.”
तथागतांनी वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खूंसहवर्तमान ते चुंदाच्या घरी आले आणि त्याने सिद्ध केलेले भोजन त्यांनी ग्रहण केले.
भोजनानंतर तथागतांनी चुंदास पुन्हा धम्मोपदेश केला आणि आसनावरुन उठून ते निघाले. तथापि हे भोजन तथागतांना मानवले नाही. त्यामुळे त्यांना घोर आजार जडला. अतिसारामुळे त्यांना मरणप्राय वेदना होऊ लागल्या.
पण तथागतांनी स्मृतीयुक्त व अविचल राहून शांतचित्ताने स्वनियंत्रणाच्या सहाय्याने सर्व सहन केले.
मग ते सर्वांसहीत कुशिनारा येथे आले.
सुभद्र नावाचा परिव्राजक कुशिनारा येथे राहत होता.
सुभद्र परिव्राजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला. तिथे स्थविर आनंद होता. सुभद्र त्याला म्हणाला
“स्थविर आनंद, मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल काय?”
त्याचे शब्द ऐकून स्थविर आनंद त्याला म्हणाला, “पुरे, पुरे सुभद्र! तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये. ते पार थकून गेले आहेत.”
सुभद्र परिव्राजक आणि स्थविर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. त्यांनी आनंदाला हाक मारुन म्हटले,
“आनंदा, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागावयाचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल. मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे आणि जे उत्तरादाखल मी सांगेन ते तत्काळ त्याला समजेल.”
तेव्हा स्थविर आनंद परिव्राजकाला म्हणाला,
“सुभद्रा, आत प्रवेश कर. तथागतांची तुला परवानगी आहे.”
“सुभद्र! ज्या धम्ममतामध्ये आर्यअष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. ज्या धम्मात आर्यअष्टांगिक मार्ग आहे, त्यात श्रमणही असतो.”
“सुभद्र! माझ्या धम्मात आर्यअष्टांगिक मार्ग आहे. म्हणून या धम्मात चार प्रकारचे (चार स्तरांवरील) श्रमण आहेत. दुसऱ्या धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे; पण सुभद्र जर ह्या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केले तर ह्या जगतात अर्हतांचा अभाव कधीच आढळणार नाही.”
त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले,
“आनंद! सुभद्राला आताच संघात दाखल करुन घे.”
“बरे, जशी आपली आज्ञा.” असे बोलून आनंदाने संमती दर्शवली.
अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिव्राजकाला भिक्खूसंघात स्वीकृत करण्यात आले. ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तोच अखेरचा श्रावक.
(संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-सहा)
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२१.३.२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!