आंबेडकरी चळवळीलाच माझे आयुष्य समर्पित- साहित्यिक ज. वि. पवार

प्रकट मुलाखतीत केले प्रतिपादन! विविध विषयांवर भाष्य!
चिपळूण (प्रतिनिधी ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र आयुष्य हे समाजाच्या उत्थानासाठी खर्च झाले. त्यांच्या विचार आणि कार्याने समाजामध्ये परिवर्तन घडू शकले, हेच सामाजिक प्रबोधनाचे व परिवर्तनाचे काम मी सातत्याने गेल्या पाच दशकांहून अधिक काळ करीत आहे. आंबेडकरी चळवळ ही सर्वंकष व सशक्त बनावी, यासाठीच विविध आघाड्यांवर मी काम करीत राहिलो. या चळवळीलाच माझे आयुष्य समर्पित केले आहे, असे प्रतिपादन दलित पॅंथरचे सहसंस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक , आंबेडकरी विचारवंत ज. वि.पवार यांनी येथे केले.
अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने दुसरी सम्यक साहित्य कला संगीती कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी संगीतीच्या समारोपप्रसंगी त्यांची प्रकट मुलाखत लेखक डॉ. श्रीधर पवार व पत्रकार संदेश पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते .
ते पुढे म्हणाले, इयत्ता चौथीपर्यंत माझे शिक्षण माझ्या गावी म्हणजेच तोंडली पीलवली (तालुका चिपळूण) या ठिकाणी झाले. मात्र पुढील शिक्षणासाठी माझ्या आई-वडिलांनी मला मुंबईला पाठवले. काळजावर दगड ठेवून आईने माझी रवानगी मुंबईत केली. त्यामुळेच आज जो कोणी मी आहे तो घडू शकलो. मुंबईत आल्यानंतर माझ्या शिक्षणासोबतच आंबेडकरी चळवळीशी संबंध आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि कार्याने मीही भारावून जाऊन त्यामध्ये सक्रिय काम करीत राहिलो. कुटुंब, नोकरी सांभाळून सामाजिक, राजकीय चळवळीत सक्रिय राहिलो.
सत्तरच्या दशकात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे मराठी साहित्यामध्ये फुले आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य निर्माण झाले. ज्याला ‘ दलित साहित्य ‘असेही म्हटले जाते. आमच्या पूर्वसुरींनी तयार केलेल्या पायवाटेवर पावले टाकून आम्हीही लिहू लागलो. अत्याचाराच्या विरोधात बोलू लागलो. त्यातूनच पुढे नामदेव ढसाळ , राजा ढाले यासारख्या मित्रांची संपर्क झाला आणि ‘ दलित पॅंथर ‘ सारख्या संघटनेला आम्ही जन्म दिला. अल्पावधीतच ही संघटना जगभरात पोहोचली. तिचे नाव झाले . या संघटनेला आयुष्य जरी कमी मिळाले असले, तरी तिने उभे केलेले लढे , उभे केलेले वैचारिक पाठबळ, हाती घेतलेला अजेंडा हा आंबेडकरी चळवळीसाठी एक आश्वासक असा होता . आणि म्हणूनच आंबेडकरी तरुणांचे खूप मोठे पाठबळ या संघटनेला मिळाले. पँथर पंचकांपैकी आता केवळ जवी पवार हा एकमेव पॅंथर शिल्लक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नामदेव ढसाळ आजारी असताना त्यांच्यावर औषधोपचाराचा खर्च खूप मोठा होता अशावेळी त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी काहींचे हात पुढे झाले त्यामध्ये बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांनी देखील महाकवी नामदेव ढसाळ यांच्या औषधोपचारासाठी काही रक्कम देऊ केली त्याकरिता आपणच बच्चन साहेबांशी बोलणी केल्याचे गुपित त्यांनी उघड केले. नामदेव ढसाळ हा खूप मोठा कवी साहित्यिक होता. आणि तो माझा मित्र होता. याचा मला अभिमान वाटतो असेही त्यांनी नमूद केले.
पॅंथरच्या फाटाफुटीनंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आणि पुढे रिपब्लिकन फाटाफुटी नंतरही चळवळीचे काम सोडून न देता, एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत राहून आंबेडकरी चळवळीचे काम करीत राहिलो. चळवळीचे काम करीत असतानाच साहित्य लेखनामध्ये कधीच खंड पडू दिला नाही. सातत्याने लेखन करणारा, विविध सामाजिक – राजकीय प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारा, आंबेडकरी साहित्यिक म्हणून माझ्याकडे लोक आदराने पाहतात . याबद्दल मला समाधान वाटते . माझ्या लेखनाची सुरुवात गेल्या पन्नास वर्षांमध्ये ‘ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ या शब्दसमुच्चयाने होते. हा देखील माझ्या नावावर असलेला एक विक्रमच म्हणावा लागेल, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले.
आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीच्या इतिहास लेखनाबद्दल विचारता ते म्हणाले , आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचा समग्र इतिहास लिहिणे हे माझे निश्चित स्वरूपाचे स्वप्न होते आणि आहे. म्हणूनच आजवर या विषयावर निरनिराळे खंड प्रकाशित झाले आहेत . त्यामधून समग्र आंबेडकरी चळवळीचा साध्यंत व वस्तुस्थितीशी निगडित असलेला इतिहास जनतेसमोर मांडला आहे. जो अन्यत्र मिळू शकत नाही. त्याचबरोबर दुसरे महत्त्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आजवर 100 पेक्षा अधिक लोकांनी लिहिले आहे. मात्र या चरित्र लेखनात अनेक चुका, त्रुटी दिसून येतात. त्यावर मी संशोधनाचे कार्य केले . बाबासाहेबांच्या चरित्र लेखनातल्या त्रुटी आणि चुका शोधून त्या दुरुस्त करून दाखवणारा एक नवा ग्रंथ मी वाचकांच्या हाती दिला आहे . त्याचेही प्रचंड स्वागत झाले. वेगवेगळ्या वादांच्या पार्श्वभूमीवर त्या त्या प्रसंगी त्या वादांमध्ये उतरून सडेतोड उत्तर देण्याची ठाम भूमिका जविनेच घेतली. महाराष्ट्र टाइम्स मध्ये रंगलेला य. दी. फडके व ज.वी. पवार हा वाद समस्त मराठी जनतेने पाहिलेला आहे.
नवसंशोधनाबद्दल विचारता, बाबासाहेबांच्या विवाहाची तारीख, त्यांचे विवाह स्थळ , यासंबंधीचा शोध आपणच सज्जड पुराव्यानिशी घेतला आणि लोकांसमोर ठेवला. माता रमाईंचे चरित्र हे अस्सल कोकणी भाषेत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे सांगून त्यातून आपणास समाधान मिळाल्याचे नमूद केले.
अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या स्थापनेबद्दल विचारता ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक नामवंत साहित्यिक, कलावंत आहेत. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये साहित्यिक संघटना आहेत . मात्र कोकणातील साहित्यिक कलावंतांना योग्य विचारपीठ मिळत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळेच या कोकणातल्या साहित्यिक, कलावंतांना पुढे येण्यासाठी एखादे विचारपीठ उपलब्ध करायला हवे , या विचारातूनच अपरांतचा जन्म झाल्याचे नमूद केले . अल्पावधीतच ही संघटना मुंबई पासून गोव्यापर्यंत पोहोचली असल्याचे पाहून समाधान वाटते असे ते म्हणाले .
पुढील संकल्प बद्दल विचारता ते म्हणाले, लवकरच दोन-तीन पुस्तकांचे काम पूर्ण होत आहे. त्यांचे विषय नवे आहेत . त्यापैकी एक म्हणजे माझे आत्मचरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हे आत्मचरित्र म्हणजे केवळ माझे चरित्र असणार नाही, तर ते आंबेडकरी चळवळीचेच खऱ्या अर्थाने चरित्र असू शकेल असे मला वाटते असे ते म्हणाले. आपल्या झंजावाती जीवनावर चित्रपट येणार का ? असा सवाल उपस्थित केला असता , ते म्हणाले, याबाबतीत माझ्याकडे अनेकांनी विचारणा केली आहे. त्याबाबतीत अनेकांची जुळणी ही सुरू आहे . मात्र योग्य वेळी त्याची घोषणा करण्यात येईल. आत्ताच काही सांगता येणार नसल्याचे सांगितले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत