महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ५१

आर.के.जुमळे
दि.२.२.२०२४
बौद्ध जीवनमार्ग

लोभ आणि तृष्णा

मागील भागात ‘सत्, असत् आणि पाप’ याबाबतीत माहिती घेतली. या भागात
‘लोभ व तृष्णा, क्लेश आणि द्वेष’ याबाबतीत माहिती घेऊया.

लोभ व तृष्णा यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे.

धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना (desire) शमत नाही. कामना ही अशक्य व दुःखकर आहे.

जो स्वर्गीय कामभोगातही आनंद मानीत नाही, जो तृष्णेचा क्षय करण्यात आनंद मानतो, तो सम्यक सम्बुद्धाचा शिष्य होय.
लोभातून दुःख उत्पन्न होते. लोभातून भय निर्माण होते; लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते.

तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते.

जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो (grasping at pleasure) आणि अहंकारी बनतो तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाऱ्यांचा द्वेष करू लागतो.

जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अति-प्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात.
सुखोपभोगापासून (pleasure) दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही.

आसक्तीमुळे (attachment) दुःख आणि भय ही उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे. त्याला दुःख नाही, भय नाही.

कामुकतेपासून (lust) दुःख (grief) उत्पन्न होते. कामुकतेपासून भय (fear) उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही.
लोभापासून (greed) दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही.
जो शीलवान व प्रज्ञावान आहे (possesses virtue and intelligence), जो न्यायी आणि सत्यवादी आहे, जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा व्यक्तीवर लोक प्रेम करतात.

क्लेश आणि द्वेष

कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यासंबंधी द्वेषभावना बाळगू नका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.

ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देऊ नये.

श्रद्धा व विश्वास(confidence), शील(virtue), वीर्य, उत्साह (energy), समाधी (meditation) सत्यशोध, ज्ञान आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने गहन दुःखाचा अंत करा.

क्षमा परमतप आहे. निर्वाण परमपद आहे (most excellent of all is Nibbana), असे बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रव्रजित हा खरा तपस्वी होऊ शकत नाही.
निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धांचा उपदेश आहे.

स्वत: हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका.

जो स्वत: सुखाच्या शोधात आहे, त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल.

जो निष्पाप व निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याच्यावर लवकरच दुःख करण्याची पाळी येते.

जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयत आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय.

जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावर येऊन पडते, त्याप्रमाणेच त्या माणसाला स्वतःच त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो.

संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड चवथा भाग तिसरा
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२.२.२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!