देशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

महान धम्मसम्राट अशोक

न्या. सुरेश घोरपडे
माजी न्यायाधीश
मो. ९१४६४३६३१०

इ.स.पू. ३०४ ते इ.स.पू. २३२

सम्राट अशोक जागतिक महान चक्रवर्ती सम्राट होते. प्रसिद्ध इंग्रज विद्वान एच.जी. वेल्स म्हणतात की, ‘इतिहासाची पाने हजारो राजे व सम्राटांनी भरले आहेत, पण केवळ अशोकाचे नाव ताऱ्याप्रमाणे चमकत आहे’. सम्राट अशोकाचे पूर्वज शूर होते. भगवान गौतम बुद्धांच्या काळात मगधचा राजा बिंबीसार होता. त्यांचा मुलगा अजातशत्रू होता. त्यांचा पुत्र उदयनच्या काळात राजगृहाऐवजी पाटलीपुत्र मगधची राजधानी झाली. पाटली म्हणजे गुलाब. त्यालाच आता पाटणा म्हणतात. त्याच्या नंतर चंद्रगुप्त मगधचा राजा झाला. त्याचा मुलगा बिंदुसार व बिंदुसाराचा मुलगा अशोक होता.

चंद्रगुप्त मौर्यच्या काळात भारतावर अलेक्झांडर (सिकंदर) या ग्रीक राजाचे आक्रमण झाले होते. पण बलाढ्य चंद्रगुप्ताने त्याच्या राज्यपालाला हरविले. त्याच्या ताब्यात अफगाणिस्तान, बलुचिस्तान, कंधाहार होता. तर दक्षिण भारतापर्यंत त्याचे राज्य होते. सेल्युकस निकेटर ग्रीक सेनापती होता. त्याची मुलगी हेलेना/कार्लाइल चंद्रगुप्ताची पत्नी होती. अशा तऱ्हेने भारताच्या राजाचा ग्रीक कन्येशी पहिला आंतरराष्ट्रीय व आंतरधर्मीय विवाह झाला. चंद्रगुप्त मौर्य भारताचा पहिला सम्राट होता. त्यांची आई मोरिय राजवंशाची होती. सध्याचे एससी व ओबीसी भटके हे सर्व शाक्य व मौर्य वंशाचे कुणबी नागवंशी आहेत.।परंतु मनुस्मृती द्वारे बहिष्कृत करण्यात आले, जातीत वाटण्यात आले. बिंदुसार राजाला सोळा राण्या होत्या व १०० मुले होती. सम्राट अशोकाच्या आईचे नाव सुभद्रांगी होते. तिला दक्षिण भारतात धर्मा असे म्हणतात. ती पंडितांची मुलगी होती. तिला मुलगा झाला. त्यावेळेस तिला कुठलेही दुःख किंवा शोक झाला नाही, म्हणून त्याचे नाव अशोक ठेवण्यात आले. अशोकाचा जन्म इ.स.पू. ३०४ ला चैत्र महिन्यात शुक्ल अष्टमीला झाला.

अशोकाला विगतशोक नावाचा भाऊ होता, तर सुसीम हा सावत्र भाऊ होता. अशोकाला पांच राण्या होत्या; देवी, असंधिमित्रा, तिष्यरक्षिता, कारूवाकी, पद्मावती. अशोकाला तीन मुले महेंद्र, कुणाल, जल्लोक व संघमित्रा, चारुमती या मुली होत्या. जल्लोकाचा मुलगा दशरथ, संप्रती व विगतशोक होते. सम्राट अशोकाचा राज्याभिषेक इ.स.पू. २७३ ला झाला. राज्याभिषेकाच्या वेळी सर्व राजकुमार सोन्याच्या रथात बसून आले. परंतु अशोक मात्र राजासारखा हत्तीवर बसून आला होता. त्यामुळे राजाने अशोकाला राजा बनविले. सम्राट अशोकाचे शिलालेख इंग्रजांमुळे प्रकाशात आले. फॅन्थेलर यांनी १७५० मध्ये अशोकाचे शिलालेख शोधले. कनिंगहॅम यांनी इ.स. १८६० मध्ये संशोधन केले व ग्रंथ लिहिले. मार्शल यांनी इ.स. १९२२ मध्ये सिंधू संस्कृतीचा शोध लावला. जाॅन स्मिथ यांनी १८१९ मध्ये अजिंठा लेणीचा शोध लावला. जेम्स प्रिंसेप यांनी बौद्ध धम्माचा इतिहास शोधला. सर जेम्स प्रिंसेप यांनी १८३८ मध्ये सात वर्षे सतत अभ्यास केल्यावर अशोकाचे शिलालेख वाचले.

इ.स. १८९३ मध्ये वर्तमानपत्रात बातमी आली की, जसकरनसिंग या माणसाने नेपाळ मध्ये अशोक स्तंभ पाहिला आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्व विभागाने जर्मन अधिकारी डॉ. मूल्य ला फोटो घेण्यासाठी १८९५ मध्ये नियुक्त केले. डॉ.‌ यूरर यांनी डिसेंबर १८९६ मध्ये लुंबिनीच्या स्तंभाचे फोटो घेतले. त्या ठिकाणांचा अशोक स्तंभ हा महत्त्वाचा पुरावा होता. त्यामुळे लुंबिनीचा शोध लागला. त्यावेळेस नेपाळ सरकारने जनरल खडक समशेर राणा यांना लुंबिनीच्या अशोक स्तंभाचा शोध घेण्यासाठी नेमले. भारताचे पुरातत्व तज्ञ डॉ. पी.सी. मुखर्जी यांनी इ.स. १८९९ ला लुंबिनीची खोदाई केली. या ठिकाणी मायादेवीचे भव्य मंदिर होते. इंग्रजांनी बौद्ध धम्मावर अनेक पुस्तके लिहिली. बाराशे वर्षे राहिलेला बौद्ध धम्म भारतातून नाहीसा झाला होता, तो इंग्रजांनी व संशोधक इतिहासकार यांनी शोधून काढला. तसेच त्यांच्या अगोदर चिनी प्रवाशी फाहियान आणि ह्युएनत्संग यांनी त्यांच्या भारताच्या प्रवासवर्णनात बौद्ध धम्माचा महत्त्वाचा इतिहास आणि स्थळांचे वर्णन केले आहे.

महात्मा फुले, सयाजीराजे गायकवाड, केळुसकर कदम गुरुजी यांनी बुद्ध धम्मासाठी प्रयत्न केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परत प्रकाशात आणला. अशोकाचे शिलालेख ब्राह्मी लिपीत (धम्मलिपीत) होते. त्यामुळे सम्राट अशोकाचे महान कार्य जगाला समजले. सुरुवातीला सम्राट अशोक उज्जैनीचा राज्यपाल होता. त्याची पत्नी संधिमित्रा विदिशाची होती. तिच्यामुळे सांचीचा स्तूप बनला. तक्षशिलेत बंड निर्माण झाले. त्यावेळी अशोकाने तेथे जाऊन शांतता निर्माण केली. राजा बिंदुसाराची अशी इच्छा होती की, सुसीम मोठा मुलगा असल्यामुळे त्याला उत्तराधिकारी करावे. त्यावेळेस सुसीम काश्मिरला होता. परंतु मंत्री राधागुप्त व दरबारातील इतर मंत्र्यांची इच्छा अशी होती की, सम्राट अशोक हा शूर असल्याने त्याला राजा बनवावे. शेवटी सम्राट अशोकाला राजा बनविण्यात आले. सुरुवातीला सम्राट अशोकाच्या आईला इतर राण्यांनी चांगले वागवले नाही व अशोकाला सुद्धा चांगले वागविले नाही. त्यामुळे अशोकाचा स्वभाव सुरुवातीला रागीट बनला. सुसीमला अशोकाला राजा बनवण्याचा फार राग आला व त्याने अशोकाशी युद्ध पुकारले. परंतु अशोकाने त्याचा पराभव केला. सुसीम जळत्या खंदकात पडला व मरण पावला.

कलिंग युद्ध (इ.स.पू. २६१)
कलिंग (ओरिसा) हा‌ प्रांत चंद्रगुप्त मौर्याचा होता. पण त्यांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले. त्यामुळे अशोकाने विशाल सैन्यासह कलिंग राजा चैत्र खारवेल वर आक्रमण केले. कलिंग ची जनता फार स्वातंत्र्यप्रिय होती. कलिंगच्या महिलांनी सुद्धा हातात तलवार घेऊन युद्धात भाग घेतला. परंतु अशोकाच्या सामर्थ्यापुढे कलिंग हारला. त्या युद्धात हजारो सैनिक मारल्या गेले. हजारो महिला विधवा व बालके अनाथ झाली. रक्तपात पाहून अशोकाला फार दुःख झाले. त्यावेळेस निग्रोध नावाच्या बौद्ध भिक्षूने त्यांना सांगितले की, तलवारीच्या बळावर मनुष्याचे ह्रदय जिंकले पाहिजे. अहिंसा हिंसेपेक्षा महत्त्वाची आहे. त्याचा परिणाम होऊन अशोकाने युद्ध सोडले. निग्रोध हा अशोकाचा भाऊ सुसीम याचा मुलगा होता. निग्रोधच्या व उपगुप्त या भिक्षूंच्या उपदेशामुळे अशोक बौद्ध धम्माकडे वळला. बौद्ध धम्माचा मध्यममार्ग त्याला समजला. प्रज्ञा, शील, करुणा, दया, क्षमा, शील, शांती, अहिंसा, बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय त्याला पटले. तो मानवतावादी बनला. मोगलीपुत्त तिष्य यांनी सम्राट अशोकाला धम्मदीक्षा दिली. ते अशोकाचे गुरू होते. भगवान बुद्ध हे शाक्य होते. बौद्ध धम्म म्हणजे जात नाही तो शुद्ध विचार आहे. ते महान तत्त्वज्ञान आहे. ते समतावादी होते. सम्राट अशोकाने बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ व कुशिनगरला भेटी दिल्या, दर्शन घेतले. त्यावेळेस भन्ते उपगुप्त हे त्यांच्या बरोबर होते. अशोकाने पशू हिंसा बंद केली. लुंबिनीला स्तंभ उभारला. विहार बांधला. बुद्धगयाला महाबोधीवृक्षाची पूजा केली. महाबोधीविहार बनवला. अशोकाने सारनाथला शिलास्तंभ व विहार बनविला. महावंश व दिव्यावदान हे श्रीलंकेतील प्रसिद्ध धम्मग्रंथ आहेत. कुशिनगरला स्तंभ उभारला, स्तूप बनविला.

जगात धम्मप्रसार
सम्राट अशोकाने जगात बौद्ध भिक्षू धम्मप्रसारासाठी पाठविले. स्वतःचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्राला श्रीलंकेला पाठविले. त्यामुळे संपूर्ण श्रीलंका बौद्ध राष्ट्र झाले. सम्राट अशोक शूर राजा व विद्वान होते. त्यांनी अरबस्तान, इस्त्राईल, रशिया, इजिप्त, ग्रीक, अफगाणिस्तान, काश्मिर, बलुचिस्तान, सिंध प्रांत (म्हणजे आताचा पाकिस्तान), वजिरीस्तान व संपूर्ण भारतात बौद्ध धम्म पसरविला. अमेरिकेपर्यंत बौद्ध भिक्खू गेले होते. त्यानंतर बौद्ध भिक्खू चीन, थायलंड, तिबेट, मंगोलिया, नेपाळ, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान इ. देशात गेले. त्यांनी शिलालेख तयार केले. त्यांच्या काळात स्थापत्य कला प्रगतीवर होती. देशात शांतता, सुख व प्रगती नांदत होती. त्यांना ‘देवनामप्रिय अशोक’ ही पदवी होती. त्यांनी सर्वांना चांगले वागवले. त्यांचे राज्य कल्याणकारी होते. मानवतावादी होते. ते जगाच्या इतिहासातील महान राजे होते. बंगालचा पंडित राजा शशांक याने बोधिवृक्ष तोडला होता. अशोकाची राणी तिष्यरक्षिताने तो बोधिवृक्ष जाळला होता. कारण अशोक हा धम्माकडे जास्त वळलेला होता. परंतु अशोकाने तो बहरवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोकाच्या अशोकस्तंभावरील धम्मचक्र भारताच्या तिरंंगी झेंड्यावर घेतलेले आहे. पंडित नेहरू सम्राट अशोकाला महान राजा मानत होते. सम्राट अशोकाने प्रजेची काळजी घेतली. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. प्राणीमात्रांसाठी दवाखाने काढले. रस्ते बांधले, विहिरी व धर्मशाळा सुरू केल्या. आदर्श राज्य निर्माण केले. त्या काळात पाली भाषा ही देशाची भाषा होती. त्यांनी सांगितले होते की, ‘मी जेवत असो की शयनगृहात असो मला प्रजेचे हाल सांगण्यात यावे.’ त्यांनी बौद्ध संगिती आयोजित केल्या होत्या. त्यावेळेस ज्यांचा धम्माचा अभ्यास नव्हता अशा ६० हजार भिक्षूंचे चिवर उतरविण्यात आले. अशोकाच्या राज्यात काश्मिर‌ सुद्धा त्याच्या ताब्यात होते. अशोकानेच श्रीनगर शहर बसविले आहे. त्याने ८४ हजार शिलालेख तयार केले होते. सम्राट अशोकाने अनेक शिलालेख तयार करून घेतले. अशोकस्तंभ उभारला. सम्राट अशोकाला काल्पनिक आहे, असे पुराणात म्हटले गेले. परंतु सिद्ध झाले की सम्राट अशोक हा ऐतिहासिक सम्राट आहे. सम्राट अशोकाचे ‘देवनांपिय प्रियदर्शी अशोक’ असे शिलालेख सापडले. त्रिपिटक, जातक ग्रंथ, अट्ठकथामध्ये भगवान बुद्धाच्या २४ नावांचा उल्लेख आहे. त्यापैकी तथागत बुद्धाचे तेरावे नांव ‘प्रियदर्शी’ असे आहे.
(संदर्भ : महान सम्राट अशोक, शांती स्वरूप बौद्ध, सम्यक प्रकाशन)

आदर्श राज्यव्यवस्था
सम्राट अशोकाची राज्यव्यवस्था उत्तम होती. त्यांनी देशातील प्रांतांवर राज्यपाल नेमले होते. जिल्ह्याचे भाग पाडले होते. धर्मअमात्य व रज्जुक नावाचे अधिकारी नेमले होते. त्यांची दळणवळण व्यवस्था चांगली होती. पोलीस प्रशासन चांगले होते. केंद्र सरकार मजबूत होते, मंत्रिमंडळ होते. अशोकाचे लष्कर फार मोठे होते. ते उत्तम प्रशासक होते. अशोकाचे विदेशांशी चांगले संबंध होते. शेवटचा मौर्य राजा चित्तोडचा भानमौर्य इ.स. ७३४ ला होता. त्यानंतर भारतामध्ये गहलोत, यादव, सातवाहन इ. राजवटी सुरू झाल्या. बंगालचे पाल राजे बौद्ध धर्मीय होते. सम्राट अशोक राजस्थान मध्ये जयपूर जिल्ह्यात वैराटनगर येथे धम्मकार्यासाठी विपश्यनेसाठी जात असे. सम्राट अशोकानंतर त्याचा नातू बृहद्रथ याची हत्या पुष्यमित्र शुंग याने केली. त्यानंतर गुहिलवंशी शिसोदिया रावळ समरसिंह ला एका शिलालेखात ‘बुद्ध धम्म मर्मज्ञ’ म्हटले आहे. त्यानंतर भारतामध्ये यादव, सातवाहन इ. राजवटी सुरू झाल्या. सम्राट अशोकाने भगवान बुद्धांचा मैत्री, अहिंसेचा शांतिसंदेश जगात पसरविला आहे. अशोक फार दानी राजा होता. त्याने बौद्ध भिक्षूंना सोने, चांदी, पैसे दान दिले. शेवटी त्याचा नातू संप्रती याने त्याला दान देण्यासाठी नियंत्रण केले. अशोकाने स्वतः सोन्याचांदीची जेवणाची ताटे दान दिली. त्याच्या जवळ दान देण्यासाठी काही शिल्लक नव्हते, शेवटी एक आवळा उरला होता. तो देखील त्याने भिक्षूंना दान दिला. तो सर्वांनी कुटून खाल्ला होता. असा महान धम्मसम्राट अशोक होता. त्यांनी बौद्ध धम्म जगात पसरवला. त्यांचे निधन इ.स.पू. २३२ ला झाले. त्यांच्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परत भारतात बौद्ध धम्म स्वीकारून धम्मक्रांती केली. भगवान बुद्ध व सम्राट अशोकामुळे जगात भारताची ओळख आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!