महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

दहा पारमिता भाग ३९

मागील भागात दहा पारमितांपैकी शील या पहिल्या गुणांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे दान या दुसऱ्या गुणांची माहिती याही भागात घेत आहोत.
दानवृत्तीला म्हणजेच दानाला बौध्द धम्मात फार महत्व आहे. दान करणे हा श्रेष्ठ गुण होय. दान केल्याने मनाची आसक्ती कमी होते. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते. दान देतांना मात्र बदल्यात दान देणाऱ्याने घेणाऱ्यांकडून काहीही अपेक्षा करू नये. कशाच्या ना कशाच्या मोबदल्यात दिलेले दान हे खऱ्या अर्थाने दानच नव्हे. सुखप्राप्ती, स्वर्ग प्राप्ती, धनप्राप्ती, पाप मुक्त व्हायचे म्हणून, दानी म्हणून नाव लौकिक व्हावा या हेतूने जे दान देतात, ते दान नव्हे. त्याचा देणाऱ्याला काहीच लाभ होत नाही. समाजकार्याला दान देणे हे आपले कर्तव्य असते. कारण आपण जे मिळवले त्यात समाजाचा अप्रत्यक्ष का होईना, सहभाग असतो. आपण जे कमावले त्याला अप्रत्यक्षपणे समाजाचाही हातभार लागलेला असतो. दान देणे व दान घेणे या दोन्ही क्रिया अत्यंत निर्मल व श्रध्दापूर्वक व्हायला हव्यात, तरच दानाचा हेतू साध्य होईल व दान देणाऱ्या व घेणाऱ्याचेही कल्याण होईल, मंगल होईल. म्हणून बौध्द उपासकाने शक्य तेवढे दान देत राहावे. आपण आपल्या कमाईतला काही भाग दान देत असल्यामुळे आपला अहंकार कमी होण्यास मदत होत असते. यातूनच तृष्णेचा, आसक्तीचा लोप होऊ लागतो. मनातील तृष्णेचा क्षय होऊ लागतो. समर्पनाची प्रवृत्ती वाढीस लागते. सर्व दानात श्रेष्ठ दान हे धम्मदान होय. धम्माच्या प्रसार-प्रचारासाठी दान देणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे. पण सोंग-ढोंग करून भीक मागण्याऱ्यांना, कर्मकांड, देव-दैवतांचे नावावर दान मागणाऱ्यांना प्रतिसाद देऊ नये. निरर्थक उत्सवांना कधीही दान देऊ नये.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑक्‍टोंबर १९५६ ला दिक्षाभूमी नागपूर येथे भाषण करतांना सांगितले की, “तुम्ही आपल्या प्राप्‍तीचा विसावा हिस्सा समाजकार्यासाठी देण्याचा निश्चय करावा.” सार्वजनिक लहानमोठे कामे समाजांनी दिलेल्या दानातून शक्य आहे. दानातून अनेक समाजोपयोगी कामे होऊ शकतात.
मुस्लिम समाज अडीच टक्के ‘जकात’ म्हणून दानाच्या रुपाने देत असतात. हे दान निर्धन व गोरगरिबांना करावे असा कुराणाचा आदेश आहे. अशा दानाचे निधी निर्माण करुन त्यातून समाजासाठी शैक्षणिक, आरोग्यविषयक व अन्य जनहिताचे कामे केली जातात. एका माहितगारानुसार एकटया मुंबई शहरात दरवर्षी ही ‘जकात’ रक्कम रुपये दहा कोटीच्या घरात जाते. रमजान मध्ये कुराण पठण जास्तीत जास्त केले जाते. रमजान मध्ये कुराणाची विक्री खूप वाढते. एका अंदाजानुसार एकटया मुंबईत सुमारे एक कोटी रुपयाचे कुराण ग्रंथ खरेदी करुन भेट दिले जातात. (मुजफ्‍फर हूसेन यांच्या लोकसत्तामध्ये दिनांक ०९.१२.२००१ रोजी लिहलेल्या रमजान, रोजा, इफ्‍तार या लेखावरुन) दानातून करोडो रुपये जमा करुन त्यांनी मोठमोठे मस्जिद बांधलेले आहेत. जैन लोक आपल्या मुलांना पैसे देऊन ते मंदिरातील दान पेटीत टाकायला सांगतात. लहानपणापासून ते आपल्या मुलांना दानाची सवय लावतात. दान पारमितामुळेच हे शक्य होत असते.
राजा बिंबीसारने भगवान बुध्दास वेळूवन दान दिले. अनाथपिंडकाने सोन्याच्या मोहरा जमिनीवर अंथरुन ती जमीन विकत घेतली व तेथे जेतवन नावाचे विहार बांधून भगवान बुध्दास दान दिले.
२४ नोव्हेंबर १९५६ ला सारनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा. तसेच प्रत्येक गावामध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.” म्हणून धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ठिकठिकाणी बुध्द विहारे बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी बुध्द विहारे बांधण्यासाठी सढळ हाताने दान करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे.
तसेच निवडणुकीमध्ये उमेदवाराला मत देणे म्हणजेच मताचे दान होय. पूर्वी राणीच्या पोटातून राजा निर्माण होत असे. आता मतपेटीतून राजा बनत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनूसार ‘शासनकर्ती जमात’ बनण्यासाठी मतदानाचा व मतांच्या अधिकाराचा उपयोग करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये मताला विकू नये.
समाजाच्या विकासाठी, अनाथाच्या कल्याणासाठी, बुध्द विहाराच्या उभारणीसाठी, बौध्द भिक्खूंच्या व्यवस्थेसाठी, बुध्द धम्म व संघाच्या उत्थानासाठी दान देऊन प्रत्येकांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे.
बाहेरील राष्ट्रांमध्ये प्रत्येक बौध्द उपासक जीवनामध्ये कमाविलेली संपत्ती आपल्या पुढील पिढीसाठी जमा न ठेवता ते धम्माला दान देत असतात. याउलट आपल्या देशात मात्र बौध्द उपासक जीवनामध्ये कमाविलेली संपत्ती आपल्या पुढील पिढीसाठी जमा करुन ठेवत असतात. परंतु ते धम्माला काही लोकांचा अपवाद सोडला तर दान करीत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे बुध्द विहारे बांधता येत नाहीत किंवा अर्धवट बांधून पडलेले असतात. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा.” म्हणजेच धम्माचे तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी बुध्दिवादी व शिकलेल्या लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कारण हाच वर्ग धम्म समजून घेऊन इतरांना समजावून सांगू शकतात. म्हणून या वर्गाने विद्यादान म्हणजेच धम्मदानाचे कार्य करावे; तेव्हाच धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. म्हणूनच धम्मदान सर्व दानामध्ये श्रेष्ठ आहे असे भगवान बुध्द म्हणतात.
आर.के.जुमळे
दि.२१.१.२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!