राज्यातल्या 2359 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर

काल राज्यभरातल्या 2359 ग्रामपंचायतींसह 130 सरपंचपदांसाठीच्या निवडणुकीची मतमोजणी घेण्यात आली. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात स्थानिक नेत्यांनी आपले गड राखले आहेत. बारामती तालुक्यातील एकंदर 31 ग्रामपंचायतींपैकी 29 ग्रामपंचायतींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाने वर्चस्व मिळवलं आहे. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या दिलीप वळसे पाटील यांच्या गावात शिवसेनेच्या शिंदे गटाने बाजी मारली आहे तर पुणे शहरालगतचा भाग असलेल्या हवेली तालुक्यात मतदारांनी प्रस्थापितांना नाकारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला पसंती दर्शवली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. राजुरा तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला रामपूरमध्ये यश मिळाले तर सास्ती मध्ये भाजपने सत्ता मिळविली.
कोल्हापूर जिल्ह्यातील 91 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. अपक्षांनी सर्वाधिक जागा मिळवल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेदेखील वर्चस्व राखलं आहे. काँग्रेसनेही अस्तित्व टिकवून ठेवलं असून जनसुराज्य पक्ष, भाजप आणि शिवसेना शिंदे गट तसंच उध्दव गटानेही काही ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकावला.
यवतमाळ जिल्ह्यात 37 ग्रामपंचायत निवडणुकीत 36 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून यात काँग्रेसने सर्वाधिक 17 जागी विजय मिळविला आहे, तर भाजपने 8, शिवसेना शिंदे गट 3, शिवसेना ठाकरे गट 2, बी आर एस 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1, तर अपक्षांनी 4 ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे, तर अनेक ठिकाणी मतदारांनी स्थानिक आघाड्यांना कौल दिला आहे. अकोला जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने सर्वधिक जागा मिळवल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये माकडी ग्रामपंचायतवर भाजपने सत्ता मिळवली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने 23 पैकी सरपंच पदाच्या 15 जागांवर विजय मिळवला तर शिवसेना ठाकरे गटाला केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं. नागपूर जिल्ह्याच्या 140 सरपंच पदांपैकी 114 जागा भाजपनं जिंकल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात उद्या मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतींसह सरपंचपदांसाठीच्या निवडणुकीतल्या निकालांवरुन जनतेचं महायुतीला पाठबळ असल्याचं स्पष्ट होत असून, महायुतीची जबाबदारी वाढली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीनं एकंदर 1312 ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे. भाजपनं केलेले दावे खोटे असून भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात, असं आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत