महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

आर्यअष्टांगिक मार्ग भाग ३१

शील म्हणजे विशुध्दीमार्ग. या विशुध्दीमार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्त्वे आहेत, ज्याला पंचशील म्हणतात. १) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, २) चोरी न करणे, ३) व्यभिचार न करणे, ४) खोटे न बोलणे व ५) मादक पदार्थाचे सेवन न करणे. पंचशीलाबाबत एक गोष्ट अशी आहे की, एकदा एक भिक्खू एका गावावरुन दुसर्‍या गावाला जात असताना रात्र होते. म्हणून ते त्या गावाच्या शेवटच्या घरातील गृहस्थाला निवार्‍याची व्यवस्था करायला विनंती करतात. तेव्हा तो गृहस्थ आनंदीत होऊन भिक्खूंची राहण्याची व्यवस्था करतो. सकाळी उठून भिक्खू त्या गृहस्थाला पंचशीलाचे पालन केल्यामूळे तुझे कल्याण होईल असे सांगतात. परंतु त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा असल्यामूळे तो मनातल्या मनात विचार करतो की, हे शील पाळणे मला शक्य होणार नाही. म्हणून जस-जसे भिक्खू एक-एक शील समजावून सांगतात तस-तसे तो गृहस्थ शीलाचे पालन करण्यास नकार देतो. त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा आहे, हे सुध्दा तो गृहस्थ भिक्खूला सांगू शकत नाही. म्हणून भिक्खू म्हणतात की, पाचही शीले पाळता येत नसतील तर निदान चार शीले तरी पाळा. तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खू म्हणतात की, निदान तीन शीले तरी पाळा. तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खू म्हणतात की, निदान दोन शीले तरी पाळा. तो गृहस्थ त्यालाही नकार देतो. तेव्हा भिक्खू म्हणतात की, निदान एक शील तरी पाळा. गृहस्थाला वाटते की, एखादा शील तरी पाळायला काय हरकत आहे! म्हणून तो गृहस्थ भिक्खूला म्हणतो, “मी खोटे बोलणार नाही, हे शील पाळायला तयार आहे.” भिक्खू उपदेश करुन निघून जातात. रात्रीला नेहमीप्रमाणे तो गृहस्थ चोरी करायला बाहेर पडतो. त्याचवेळेस त्या राज्याचा राजा सुध्दा वेशांतर करुन राजवाडयाच्या बाहेर येतो. तेव्हा त्या राज्याला तो गृहस्थ दिसतो. त्या गृहस्थाला राजा विचारतो, “कोण आहेस? काय करतो?” त्या गृहस्थाने खरे बोलण्याची प्रतिज्ञा घेतल्यामूळे त्याने सांगितले, “मी चोर आहे. राजाच्या तिजोरीतील हिरे मला चोरायचे आहे.” तेव्हा त्या राजाला त्या़च्या खरे बोलण्याबद्दल कौतुक वाटले. राजाने त्याला सांगितले, “तू तर खरा बोललास. मी जर हे राजाला सांगितले तर ते तुला शिक्षा करतील. म्हणून तू जे हिरे चोरशील त्यापैकी मला अर्धे दे. म्हणजे मी राजाला सांगणार नाही.” या गोष्टीला तो चोर तयार होतो. तो राजवाडयाच्या आत जाऊन हिर्‍याचा शोध घेतो. तेव्हा त्याला असे दिसते की, त्या तिजोरीत फक्‍त तीनच हिरे आहेत. यापैकी अर्धे हिरे बाहेरच्या व्यक्‍तीला कसे देणार असा प्रश्‍न पडल्यामूळे तो एक हिरा तसाच ठेऊन दोन हिरे सोबत घेऊन राजवाडयाबाहेर पडतो. बाहेरच्या व्यक्‍तीला त्या दोन पैकी एक हिरा देतो. त्या व्यक्‍तीने विचारल्यामूळे पत्ता सांगून तो चोर निघून जातो.
दुसर्‍या दिवशी राजा प्रधानाला तिजोरीची पाहणी करायला सांगतात. तिजोरी पाहिल्यानंतर प्रधानाला तीन पैकी फक्‍त दोन हिरे चोरीला गेल्याचे आढळते. प्रधानाला वाटले की, चोराने तिन्हीही हिरे चोरले असते. राजाला कुठे माहिती आहे की, एक हिरा चोराने तेथेच ठेवून दोन हिरे घेऊन गेला. म्हणून तो एक हिरा स्वत:जवळ ठेवतो व राजाला सांगतो की, तिजोरितील तिन्हीही हिरे चोरीला गेले आहेत. राजाला त्या प्रधानाचा खोटेपणा व चोराचा खरेपणा लक्षात आला. त्याचवेळेस राजा दरबार भरवतो. हिरे चोरणार्‍या त्या चोराला राजा दरबारात बोलावीतो. चोराच्या लक्षात येते की, रात्रीचा जो व्यक्‍ती होता तो राजा आहे. आपण त्याला खरे सांगितल्यामूळे राजा आता आपल्याला निश्चितच शिक्षा करणार! आपण भिक्खूंमूळे फसल्या गेलो याचे त्याला दु:ख होते. राजा प्रधानाने केलेल्या खोटेपणाबद्दल प्रधानाला काढून टाकतो व चोराच्या खर्‍यापणाबद्दल त्या चोराला प्रधान बनवीतो. राजाचा हा निर्णय पाहून चोराला आश्चर्य वाटले. भिक्खूने सांगितलेल्या एका शीलाचे पालन केल्यामूळे मला प्रधानपद मिळाले. मी जर पाचही शीलाचे पालन केले असते तर मी कुठल्या कुठे जाऊन पोहचलो असतो. एवढी ताकद या पंचशीलामध्ये आहे याची त्याला जाणिव होते.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१३.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!