महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण भाग २१

मागील भागात
१. अविद्या (Ignorance, Lack of Knowledge)
२. संस्कार (Conception)
३. विज्ञान (Consciousness) ४. नामरूप (Mind and Body)
५. षडायतन
६. स्पर्श
७. वेदना
८. उपादान

या कड्यांबद्दल माहिती घेतली. आता पुढील कड्यांची माहिती घेऊया.
१०) भव
प्रतित्यसमुत्पादाची दहावी कडी म्हणजे भव. उपादानामुळे भव उत्पन्न होते.
भव म्हणजे अस्तित्वात येणे. तृष्णेच्या संग्रहाने अर्थात उपादानाने प्रभावित हॊऊन मानव पुढील कर्म करीत असतात. त्या कर्माचा परिपाक म्हणजेच ‘भव’ होय. भव म्हणजे चित्ताचे असे कर्म की ज्यामुळे फळाची उत्पत्ती होते. अर्थात हे भव म्हणजे कर्म पुन्हा उत्पन्न होण्याची, जन्म घेण्याची इच्छा निर्माण करते.
कम्म आणि विपाक असे भवाचे दोन पैलू आहेत. कम्म म्हणजे कर्म जी मनुष्याकडून कायेने, वाचेने व मनाने कुशल-अकुशल, पापमय-पुण्यमय, अध्यात्मिक आणि वैचारिक कृत्ये केली जातात ती. अशी कृत्ये की, ज्यामुळे त्याचेवर संस्कार घडत असतात किंवा त्याचा भविष्यातील जीवनक्रम घडवीत असतात. विपाक म्हणजे त्या कर्माचा परिणाम.
कम्माबाबत भगवान बुध्द म्हणतात की, समाजामध्ये नैतिक व्यवस्था सांभाळण्याचे काम कम्म नियम करीत असतात. समाजामध्ये नैतिक व्यवस्था चांगली आहे, याचा अर्थ मनुष्य कुशल कर्म करीत आहे. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर याचा अर्थ मनुष्य अकुशल कर्म करीत आहे. भगवान बुध्द कर्म सिध्दांतावर इतका जोर देत असत की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्म सिध्दांताच्या दृढ पालनाशिवाय नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे कम्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. कम्म नियमात जसे दिवसामागून रात्र येते तसे कर्मामागून त्याचा परिणाम येत असतो. म्हणून ‘कराल तसे भराल’ असे सांगणारे भगवान बुध्द पहिलेच आहेत.
कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करण्याला मिळत असतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुध्दाचा उपदेश असा की, असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करु नका. कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दु:खी होते. कर्माचा विपाक म्हणजे परिणाम कर्त्याला भोगावे लागतात. कधीकधी एकाच्या कर्माचा परिणाम दुसर्‍यालाही भोगावे लागतात. त्यामुळे नैतिक व्यवस्थेत बाधा निर्माण होते.
आपल्या मनात इच्छा निर्माण होणे हे मनाची एक वृती आहे. इच्छा निर्माण झाली की त्याच्या पूर्ततेसाठी मनुष्य मनाने, वाणीने व कायेने कर्म करीत असतो. बुध्द धम्मानुसार मनुष्याची इच्छा ही अगदी स्वतंत्र असून ती पूर्वी केलेल्या कर्मावर अवलंबून नसते. कर्म हे बीज आहे तर त्याचे फळ म्हणजे कर्मविपाक आहे. इच्छा ही कर्माप्रमाणे कुशल किंवा अकुशल असू शकते. इच्छा, त्यानंतर कर्म आणि कर्मानंतर कर्मविपाक असा कार्यकारणाचा खेळ अव्याहतपणे चालू असते. यालाच जीवन किंवा संसार म्हटले जाते.
जरी आपल्या हातून अपघाताने, चूकीने, अज्ञानाने, गैरसमजुतीने किंवा अन्य कोणत्याही कारणाने अकुशल कर्मे घडली असेल तर ह्या क्षणापासून जागृत राहून कुशल कर्मे करण्यास सुरुवात करावी. राहिलेल्या आयुष्यात आपण जेवढे जास्त कुशल कर्मे करु तेवढ्‍यामुळे अकुशल कर्माचा जोर कमी अथवा अगदी नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून मागे केलेल्या अकुशल कर्मांनी हताश व निराश न होता मनुष्याने ध्येर्याने जास्तीत जास्त कुशल कर्मे करावीत म्हणजे त्याचे जीवन मंगलदायी होऊन समाजालाही फायदा होईल. मनूष्याने सतत जागृत राहून कुशल कर्मे करीत राहावीत अशी भगवान बुध्दांची शिकवण आहे.
म्हणूनच भगवान बुध्दाच्या धम्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान आहे ते नीतिला दिले आहे.
उपादानाचा निरोध केला असता भवाचा निरोध होतो.
११) जाति
प्रतित्यसमुत्पादाची अकरावी कडी म्हणजे जाति. भवामुळे जाति उत्पन्न होते.
जातिचा अर्थ म्हणजे पंचस्कंधाचे प्रगट होणे. पंचस्कंध म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांचे प्रगटीकरण म्हणजेच जाति होय.
भवाचा निरोध केला असता जातिचा निरोध होतो.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.३.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!